पूर्ण भरलेल्या त्या वर्गात,
मी मधल्या रांगेत बसत होतो,
कॉलेजच्या त्या दिवसांत मात्र
आपल्याच विश्वात मग्न होतो.
मोठी मोठी पुस्तके पाहून,
एकच विचार पुन्हा पुन्हा येई,
"हे सारे आपल्याला जमेल का?"
फक्त याचीच चिंता मनी होई.
कितीही मारला रट्टा तरी,
भौतिकशास्त्र काही कळेना,
कितीही केल्या व्याख्या पाठ,
पण दुसऱ्या दिवशी काहीच आठवेना!
गणिताची ती कठीण सूत्रे,
डोक्यात मुळीच घुसेनात,
अल्फा, बीटा, गामा रटले,
तरी उत्तर काही जमेनात.
कधी मन पसरते
क्षितीजाच्या मागेपुढे
अशावेळी पक्षी एक
निळ्या लाटेवरी उडे
काचेपरी त्याचे डोळे
निळी तहान सांडती
पंख पसरून दोन्ही
निळ्या रेषा ओलांडती
पक्षी तोच वेड तेच
त्याला नाही भीती खंत
आभाळाशी त्याचे नाते
आभाळाशी इति अंत
द्वैत
नाती
मैत्रीची नाती परकी झाली
रागावू कुणावर |
अंतस्थ नाती दूर राहिली
लोभवू कुणावर |
छाया माझी नाहीशी झाली
साथ मागू कुणाला|
अंतरीची वेदना जाळीत राहिली
दाद मागू कुणाला|
सरळ दिसणारी वाट निसरडी झाली
आधार घेऊ कुणाचा|
वेदना माझी गीत झाली
सूर मागू कुणाला|
जरा आगळे आज वाटते
मनी काहीसे आज दाटते
करमत नाही
हुरहुर काही
कुणी सारखे स्वप्नात येते.
आज झऱ्याचा नाद वेगळा
आज नभाला साज वेगळा
वेगळ वाटतं नभातल चांदणं
काळजा छेडती कुणाची पैंजण
मना कुणीसे आज वेढते.
आज उदासी मना भारुनी
उरी कुणीसे येई फिरुनी
कळेना असे का भिरभिरते मन
मनी प्रीत कुणाची फुले क्षणक्षण
प्रीत कुणाची मनी उमलते.
https://youtu.be/8g_lRY-rduk
निसंग अथांग निशांत आसमंत
डोळ्यांत साठला नी दाटला –
सौंदर्याचे प्रतीक दिठी-दिठी
शब्द कंठाशी दाटला।
पंचमहाभूतांचा प्राण आकाश
लयींत वाहतो रंध्रातून श्वास
कधी क्षणात निर्गुणाचा आभास
येतो विरतो जसा श्वास-निःश्वास।
ना येणं त्याचं, ना जाणं खऱ्या अर्थी,
स्पंदनातीत ,निर्विकल्प ती विश्वमूर्ती।
सहस्राराच्या दशांगुळे वरती,
असे अक्षय भाव — अखिलानंदमूर्ती।
गुरुवार, १२/२/२६ , १०:३० AM
अजय सरदेसाई -मेघ
http://spiritualityandus.blogspot.com
कुंचल्यातून वेदनांचे रंग भरत गेलो मी,
प्रत्येक शब्दातून अंतरीचा हुंदका उमटत गेलो मी।
कागद जरी निःशब्द होते, तरी रेषाच बोलत होत्या,
मनातल्या प्रत्येक जखमेचा अर्थ वाचत गेलो मी।
ही तसबीर ओली का दिसते, कुणालाच कळले नाही,
डोळ्यांतून अलगद रंग झरत राहिलो मी।
दाद नाही, दिलासा नाही, कुणी साथ दिली नाही,
स्वतःच्या सावलीतूनच चालत राहिलो मी।
आठवणींची वादळी झुळूक जेव्हा जेव्हा आली,
स्वप्नांच्या निखार्यांना फुंकर घालत राहिलो मी।
शेवटी उमगलं, ऐ ‘मेघ’, हेच कलेचं खरं गूज —
मन जळत राहिलं… आणि त्यातच उजळत गेलो मी।
हात
पाककृत्या दिल्या आईने सगळ्या,
मसाले-जिन्नस भरले गाठोड्यात,
देऊ शकेल ते सारे दिले,
पण कसे देणार तिचे अनुभवी हात?
ते हात ज्यांनी लहानपणीच,
शिकली होती चूल,
त्या हातांवर भार होता,
सांभाळायचे होते घरकूल.
हातांनी त्या,
मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी
सगळ्यांना आग्रहाने करून घातले,
हातांनी त्या,
घडवली नाती,
पोसला एक पती,
दोन खादाड मुले.
पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ
नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु
हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ
येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ
अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM
अलवार सुगंध मोगरीचा
दरवळला माझ्या मनांत
जणु मिठीत सरुन माझ्या
तु शांत नीजली आहे ।।१।।
अधिर कटाक्ष तुझा
अंगी रोमांच दाटलेले
ती भेट चांदण्यात
मनांत जपून आहे ।।२।।
बरसतात श्रावण सरी
अंग चिंब भिजलेले
निसर्ग हा सजलेला
प्रेम गीत गात आहे ।।३।।
बंद होतां पापण्या
तुलाच पाहतो मी
पुर्ण चंद्र आसमंती
स्वरुप तुझेच आहे ।।४।।
श्वासात तुच माझ्या
तुच स्पंदनात आहे
तुच नादब्रह्म माझा
ओंकार तुच आहे।।५।।
मुलं मोठी होतच असतात,
पुर्वी शिंग फुटायची, आता मात्र
त्यांना स्वतः ची मतं फुटतात.
पुर्वी सुपर मॅन वाटणारा बाबा,
मुलांना हल्ली बावळट वाटतो.
मित्रमैत्रिणींच्या कूल बाबांसमोर ,
स्वतः चा बाबा अडचण वाटतो .
"तु गप रे बाबा ! , यातलं तुला काय कळत?"
आपल्यांच चिमुकल्यांच्या तोंडुन हे ऐकतांना,
आपलं काळिज मात्र खूप तुटत.
इंस्टाग्राम ,फेसबुक ,यु ट्यूब,
यांचं आपल्याला वावडं असतं.
यातलं काही येत नसेल तर ,
मुलांच्या दुनियेत आपल्याला स्थान नसतं .
मुलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला ,