* निरोपाच्या कविता *
एक.
मान वेळावण्याआधी
प्राण कंठाशी येतात
न खाल्लेली सुपारी लागते
उंबर्यात पाऊल अडते,
ताटातुटीच्या बिकट समयी
नको नको म्हणताना
तेच ते आदिम आर्त नाट्य
आधुनिक युगातही घडते
दोन.
प्रकृतीस जपा
जेवणाचे हाल, रात्रीची जाग्रणे नको
पोहोचताच फोन करा
तुझ्या लक्षवेधी सूचनांची
लांबलचक यादी,
माझे बर्फाच्या तुकड्यागत
स्वत:त विरघळत जाणे
तुझ्या हरणकाळज्या पात्रात
धोक्याच्या पातळीपर्यंत
येऊन ठेपलेली महानदी
तीन.
गर्भगृहामधल्या
टिमटिम प्रकाशात
टकमका पाहतो तुला…
तू मला पाहतोस की नाही
याबद्दल असू शकते दुमत
सतराशेसाठ विवंचना
जगण्याचे घोर
कायबाय शिजत असते
सतत अव्याहत
सडक्या टाळक्यात
चालूच असेन
टकळी तुझीही अखंड
पण खात्री करायची नसते सोय
क्वचित भीती
फुटायचे श्रद्धेला फाटे
ठेवता थोडी फट
बोलाबसायची सोय
तर पिटतो चकाटया
काढतो उणेदुणे
उखाळ्यापाखाळ्या,
प्रत्यक्षात तुझ्यामाझ्यात
नितांत सुंदर पोकळी
गहनगूढ मौनाच्या
भिरभिरत्या पाकोळ्या
तू येशील तेव्हा
काजळी धरलेल्या
मिणमिणत्या नंदादीपाची
पिवळसर ज्योत
भडकेल क्षणभर
विझेल अकस्मात
अन्
जळक्या वातीचा उग्र दर्प
भरून राहील चराचरात...
कोपरे धरून असलेले
सुजलेले डोळे
पेंगणारे चेहरे, सोडतील
सुटकेचा दीर्घ नि:श्वास
लगेचच चालवू लागतील
पुढच्या ‘ क्रिया - कर्माचे ’
व्यावहारिक व्याकरण...
घराघरातून चिवचिवणाऱ्या
प्रत्येक शहाण्या मुलाला
आखीवरेखीव चाकोरीत ढकलून
बोन्सायगत वाढवण्यालाच
आपण संस्कारा-बिंस्काराचे
बिरूद चिकटवून देतो,
अवास्तव अपेक्षांचे वेताळओझे
कोवळ्या खांद्यांवर लादून
समजुतीच्या (त्याच त्या!) गोष्टी सांगत
त्यांना जन्मभर हाकारत जातो
आई म्हणते:
शहाणा मुलगा नेहमी
स्वत:च्या हाताने जेवतो
टाकत नाही उष्टेबिष्टे
करत नाही पसारा घरभर,
- आम्हाला असते एवढे स्वातंत्र्य
सुख सुविधा तर
आज कुठच्या कुठे असतो!
करवादल्या बाबांची टकळी
चालूच असते दिवसभर
सोनसळी अक्षरांचा
उदे लोचनात शेला
सांग कुणासाठी असा
जीव वेडापिसा झाला..?
जीव वेडापिसा झाला
नाही चित्त थाऱ्यावर
गोड पैंजणांची साद
छुम छुम वाऱ्यावर
छुम छुम वाऱ्यावर
मन पाखरू ओलेते
वाट पाहुनी थकली
रात्र डोळ्यांना डसते
रात्र डोळ्यांना डसते
शब्द चिंब ओले रान
थोडा उफानला वारा
थोडे किरमिजी क्षण
थोडे किरमिजी क्षण
उर्मी अनावर झाल्या
ठेव जतन करून
गोष्टी तुझ्या-माझ्यातल्या..!
***
कवितेच्या पांढऱ्याशुभ्र ठिपक्यांमधून
व्यक्त होणारी माझी भाविकता
पुरेशी नसते म्हणून की काय
तू नित्तनेमाने ढकलतेस माझा निगरगठ्ठ देह
कुठकुठल्याशा जागृत देवस्थानाच्या दिशेने…
मला भिववत-चिथावत नाही पाप
लोभवत-खुणावत नाही पुण्य
तरी चालतो निमूट –
नुकत्याच खरेदी केलेल्या
गुराच्या गळ्यातल्या फुटक्या घुंगरासारखा
आवाजवीहीन – तुझ्या पाठोपाठ
आलीच आहेस भेटीला तर
आरामात; नीट टेकून बस
टणकाय दोघांमधील माती
तरी टिकवून आहे कस ...
मोकळी ढाकळी देहबोली
शब्दांना अंगांग सैलावू दे
खळाळत्या शुभ्र हास्याला
थोडे पात्राबाहेर फैलावू दे...
रुचेल न रुचेल; भीतीपोटी
दाबू नकोच आतले कढ
उधळ बंधार्यांचे मनसुबे
जरा हमसून हमसून रड...
कशाला उगाच त्रास म्हणून
नाकारू नकोस वाफाळता चहा
मनावरचे मळभ दूर सारून
एकदा माझ्या आरपार पहा...
सावध; सजग जगण्याचा दंभ
क्षणभरासाठी सोडून देऊ
हातात हात घेऊन ; परत -
टिपूर चांदण्यात फिरून येऊ...
***
कविता मी तसा शाळा कॉलेजच्या दिवसांपासून लिहतोय. त्या त्या वेळी शाळा कॉलेजच्या नियतकालिकांतून वगैरे छापूनही आल्या पण त्यापलीकडे जाऊन त्याचे काही करावे किंवा कुठे सादर कराव्यात वगैरे फारसा अट्टहास नव्हता. कालांतराने मायबोलीवर आलो. गुलमोहरावर, झुळकेवर रमलो. इथे दर्जेदार लिहणाऱ्यांकडून त्या काळात दादही मिळत गेली आणि कविता लिहित राहिलो.
मध्ये बरीच वर्षे कामामुळे आणि इतर प्रायोरिटीजमुळे कवितालेखन खुप कमी झाले..... जवळजवळ नाहीच!!
चांगले चांगले वाचत होतो; youtube, podcasts वगैरेच्या माध्यमातून खुप चांगले ऐकत होतो.... पण बसून परत कविता लिहिणे वगैरे होत नव्हते.
शब्दफुलांच्या सुंदर बागेतुन मी शब्द वेचून आणतो।
शब्दांचा एक गुछ गुंफून मी कविता सादर करतो।।
शब्द हे निर्जिव कसे जिवंत होऊन बागडतात जणु ससे।
हृदयाचा ठाव घेऊनी कुठे दडून हे बसतात आणि कसे।।
कधी कधी तिखट शब्द बोचरे होऊन टोचतात जणू काटे।
घालून घाव हृदयावर वाहतात अश्रु होऊन डोळ्यां वाटे।।
शब्द अनोखे नी दुर्मिळ ओवुन बनविले मी अनेक अलंकार।
त्या अलंकारां नी तिज मडवताच तीच्या सौंदर्यास नूरला पार।।
विविध रंगाच्या विविध ढंगांच्या विविध छंदांच्या कविता।
वैविध्याने नटलेले शब्द चित्र बहरले कागदावर लिहिता।।
स्वत:पासून दू ऽऽ र पळून जाण्याचा
फसावा दुबळा प्रयत्न
अन् अडकून पडावे आयुष्यभर
घाटमाथा; आडवळणी दऱ्याखोऱ्यात
तसा तुझा सर्वव्यापी वावर
सरंजामशाही तोऱ्यात
औसे-पुनवेला येतो तुझ्या भेटीला
हिंदकळत... डुचमळत...
अनवट वळणे; खाचखळगे तुडवत
म्हणशील तर हवापालट
चेंज ऑफ टेस्ट
पूर्वजन्माची कार्मिक लेणदेण,
नसते कशाचीच खात्री -
पण पडलेच पदरात पुण्यबिण्य
तर नॉट अ बॅड बार्गेन..!