नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास भाग १

Submitted by साधना on 9 April, 2024 - 08:45

डिस्क्लेमर :

१. ही लेखमाला माझ्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. माझे शेतीविषयक ज्ञान अतिशय मर्यादीत आहे. मला जे पटतेय, परवडतेय व करता येतेय ते मी करत आहे. मी करतेय तेच बरोबर हा माझा आग्रह नाही.
२. मी कुठल्याही एका नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार करतेय असा समज करुन घेऊ नये. जी पद्धत बरोबर आहे असे मला वाटते ती पद्धत मी अनुसरतेय, इतर अनेक पद्धती पाहतेय, माझ्या वातावरणात काय योग्य आहे त्याचा विचार करुन वेळोवेळी शेतीत बदल करतेय, नव्या गोष्टी स्विकारतेय. मी अजुनही शिकण्याच्या मोडमध्ये आहे. अधिकारवाणीने दुसर्‍याला सल्ला द्यायच्या मोडमध्ये मी अजुन नाहीय.
३. मी मुख्यत्वे देशी गायीवर आधारित शेती करतेय. ज्यांना देशी गाय, पाळेकर गुरुजी ह्या विषयाची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी यापुढचे वाचले नाही तरी चालेल. न वाचल्याने त्यांचे काहीही नुकसान होणार नाही. तरीही वाचायचे असल्यास खुशाल वाचा. वाचुन माझ्याशी वाद मात्र घालु नका. वादात भाग घेण्याइतकी हुशारी व वेळ माझ्याकडे नाही.
४. लिखाण थोडे विस्कळीत वाटण्याचा संभव आहे कारण बर्‍याच गोष्टी आहेत व त्यामुळे एकत्रित नीट मांडणी जमत नाहीय. तरी सांभाळून घ्या.

*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&

जुन २०२० ला मी आंबोलीला सहकुटूंब राहायला आले तरी प्रत्यक्ष शेती सुरू करायला डिसेंबर २०२० उजाडले. मला शेतीचे ज्ञान शुन्य! शेतीत रस निर्माण होऊन सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची ओळख झाल्यावर काही शेतांना भेट दिली होती. शेतीनिगडीत वाचन सुरू होते. पाळेकर गुरूजींची तिन, दोन दिवसीय शिबीरे करुन झाली होती, त्यांच्यासोबत एक शिवारफेरी झाली होती. त्यांचे व इतरांचे शेतीविषयक यु ट्युब चॅनेल्स पाहात होते. तरीही गच्चीत केलेल्या कुंडीतल्या शेतीचा अनुभव सोडता प्रत्यक्ष अनुभव मात्र शुन्य होता. अनुभव मिळणार तरी कसा? हाती जमिन नाही तर शेती करणार कशी?? त्यामुळे जेव्हा जमिन हाती लागली तेव्हा आता शेंडी तुटो वा पारंबी, शेती करायचीच हे ठरवुन शेतीत ऊतरले. (जमिन कसायला मिळण्यापर्यंतचा प्रवास इथे वाचा - https://www.maayboli.com/node/80005 )

पर्यावरणाला हानीकारक कृत्रिम रसायने न वापरता नैसर्गिकरित्याच शेती करायची हे डोक्यात पक्के होते, पण प्रॅक्टिकल्स शुन्य! शेती करण्यामध्ये वातावरण हा एक खुप मोठा भाग आहे. तोवर जी शेती मी पाहिलेली तिथले वातावरण शेती साठी योग्य होते. पण आंबोलीतली परिस्थिती वेगळी आहे. अतिवृष्टी हा आंबोलीत मोठा त्रास आहे. पावसाळ्याचे चार-पाच महिने सुर्यदर्शन होत नाही हे लहानपणापासुन ऐकले होते. जुन २०२० पासुन आंबोलीत राहायला लागल्यानंतर ते खरेच आहे याचा प्रत्यय घेतला होता. या वातावरणात शेती कशी करतात याचे कुठलेही मार्गदर्शन कुठल्याही यु ट्युब चॅनेलवर नव्हते.

आंबोलीत शेती म्हणजे पावसाळ्यात नाचणी व भात. ऊन्हाळ्यात वायंगणी भातशेती व ऊस. ज्यांच्याकडे घराच्या आजुबाजुला १-२ गुंठे जागा आहे ते पाऊस गेल्यावर म्हणजे नोव्हेंबरानंतर लाल भाजी, मका, घरापुरते कांदे, सांडगी मिरची करण्यापुरत्या मिरच्या इत्यादी करतात. बाजारात जाऊन भाजी विकण्याइतपत भाजी कोणी करत नाही.

बारा वाड्यांचे आंबोली तसे मोठे गाव आहे, १० ते १५ किमी रुंद व १०-१२ किमी लांब. कर्नाटकातल्या घटप्रभा नदीची उपनदी हिरण्यकेशी नदी आंबोलीत उगम पावते आणि आजरा-चंदगड मार्गे कर्नाटकात पोचते. ह्या नदीला बारा महिने पाणी आहे, आटत नाही. पावसाळ्यात नदीत पाणी खुप वाढते आणि ऊगमापासुन चार पाच किमी खालपर्यंत तिच्या नेहमीच्या मार्गाच्या दोन्ही बाजुने फुटून ती वाहते. ह्या जागी लोकांच्या शेतजमिनी आहेत ज्या पावसाळ्यात पाण्याखाली जातात. नोव्हेंबरांत पाणी ओसरायला लागते तसे लोक आपापल्या जमिनीच्या चारी बाजुला फुटभर ऊंच बांध (मेर) घालुन पाणी शेतात धरुन ठेवतात व डिसेंबरात तिथे भात लागवड करतात. ह्याला वायंगणे म्हणतात व त्यात करतात ती वायंगणशेती.

सावंतवाडीहुन घाट चढुन वर आल्यावर पहिली लागते ती बाजारवाडी. पुढे जकातवाडी, गावठाणवाडी, कामतवाडी वगैरे १२ वाड्या येतात. कामतवाडीपर्यंत सह्याद्री घाटमाथ्याचा अतीवृष्टीचा प्रदेश विस्तारलेला आहे. इथे पावसाळ्यात कायम दाट धुके असते, पावसाची संततधार सुरू असते, हवेत प्रचंड आर्द्रता असते. अर्थात माझ्या बालपणी जितका होता तितका पाऊस आता उरलेला नाहीय पण आंबोलीतील इतर वाड्यांच्या तुलनेत ह्या तिनचार वाड्यांवर खुप पाऊस पडतो, हवा कायम कुंद असते. इथे पावसाळ्यात फक्त स्थानिक झाडे झुडपे कशीबशी तग धरतात; विकतची शोभेची रोपे, गुलाबाची कलमे, झाडे इत्यादी सगळे कुजुन जाते. स्वानुभव Happy

या वातावरणात कोणी शेती करत नाहीत. इथे मैलोनमैल एकर शेती कोणाचीही नाही. १०-१५ गुंठ्यांचे तुकडे असतात, दहा जागी विखुरलेले. या तुकड्यांना इथे वाफल्या म्हणतात. या वाफल्यांवर फक्त भातशेती होते - पावसाळी किंवा वायंगणी. बाकी काही करता येत नाही कारण पावसाळा सोडून इतर वेळी पाणी नसते. वर लिहिलेय तसे शेतात पाणी धरुन ठेवले तर त्यात फक्त भातशेती करता येते, भाज्या करता येत नाहीत.

गावठाणवाडी वगैरे ऊगमापासुन जवळ असल्याने पावसाळ्यात भातशेती होत नाही. कामतवाडीपर्यंत लोक फक्त वायंगणशेती करतात. पावसामुळे ऊस व पावसाळी भात करत नाहीत.

कामतवाडीच्या पुढे वातावरण जरा बरे आहे. त्यामुळे तिथुन पार गडदुवाडीपर्यंत भात व नाचणी व्यतिरिक्त नदीच्या दोन्ही तिरी ऊस करतात. ऊसशेती हे तुलनेत सोपे काम आहे असे लोक म्हणतात. ऊस लावायचा, एक दोनदा भरपुर रासायनिक खत द्यायचे, भरती करायची म्हणजे ऊसाच्या बाळरोपाला दोन्ही बाजुने माती चढवायची. ऊस मनाजोगा वाढत नसेल तर टॅानिक द्यायचे, एक दोनदा तणनाशक फवारायचे आणि निंदणी करुन तणाचा सफाचाट करायचा. दोनचारदा गवे येऊन ऊस चरुन जातात पण तरी तो बिचारा वाढतो. गव्यांना हाकलायला रात्रीचे भर थंडीत शेतात जागत बसावे लागते. डिसेंबरात ऊस लावला की मे पर्यंत हे काम अधुनमधुन करायचे. पाऊस सुरू झाला की मग काहीही बघायची गरज नाही. सगळी ऊसशेती नदीकिनारी असल्याने पावसाळ्यात कित्येकदा शेतात पाणी भरते पण ऊस उभा राहतो. डिसेंबरांत ऊस तोडणीच्या वेळी शेतात परतायचे. ऊस तोडुन कारखान्यात पाठवला की महिनाभरात पैसे खात्यात येतात. म्हणजे शेतमाल कुठे विकावा, किंमत काय मिळणार ह्याचेही टेंशन नाही. त्यामुळे आंबोलीत प्रत्येकजण ऊस लावायला ऊत्सुक असतो.

मी शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा काय पिक घेऊ हा प्रश्न ऊभा राहिला. करायचे भरपुर काही होते पण शेतात काय होणार हे माहित नव्हते. त्यात सल्ले देणाऱ्यांनी वात आणला. आंबोलीत सर्व काही होते यावर सगळेजण ठाम होते पण प्रत्यक्ष केल्याचा अनुभव सांगणारे कोणीही नव्हते.

मी ठरवलेल्या नैसर्गिक शेतीचे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा हे चार स्तंभ आहेत. बीजामृताचा संस्कार करुन बीज लावायचे, जमीन आच्छादित ठेवायची आणि जीवामृत देत राहायचे. आच्छादन कुजत राहते, त्याचा ह्युमस बनत राहतो त्यामुळे वाफसा टिकुन राहतो. सर्व प्रकारच्या नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे हेच तंत्र आहे. फरक तुम्ही जीवामृत वापरता, गोकृपा वापरता, गांडुळखत वापरता की अजुन काही अठरापगड जातीची सैंद्रिय खते वापरता यातच. बाकी आच्छादन हवेच, ह्युमस वाढायला हवाच व वाफसा टिकवायला हवाच. अर्थात हे किती सोपे किंवा अवघड आहे हे कळायला शेतकर्‍याच्या वंशालाच जावे लागते.

माझे शेत साधारण चार एकराचे असले तरी एका बाजुची दिडेक एकर जमिन म्हणजे निव्वळ खडक. याला इकडे तळाप म्हणतात. कधीकाळी तिथे खोल खड्डा मारुन त्यातुन चिरे काढले होते. तो खड्डा तसाच सोडलाय जो आता विहीर म्हणुन मी फेब्रुवारी पर्यंत वापरते. असेच अजुन अर्धवट मारलेले चारपाच खड्डे शेतात होते. खड्ड्यातुन बाहेर काढलेली दगड माती तशीच कडेवर मोठे ढिग बनुन पडलेली होती. त्याच्या आजुबाजूस झाडेझुडपे वाढलेली. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र अजूनच आकुंचले होते. शेती करणार हा २०१९ मध्ये निर्णय झाल्यावर जेसीबी घालुन सगळी माती मी खड्ड्यांत परत लोटली, सोबत झुडपांनाही लोटले. तेवढीच थोडी जमिन मोकळी झाली. असे करुन साधारण तिनेक एकर जमिन मी लागवडीसाठी तयार केली.

इतक्या क्षेत्रावर आच्छादन घालायचे म्हणजे टनावारी पालापाचोळा लागेल. तो आणायचा कुठून ?? ऊस पाणी भरपुर पितो आणि जमिनीचा कस कमी करतो असे भरपुर वाचले असल्यामुळे ऊस लावायचा नाही असे मी ठरवले होते. मी घातलेल्या लोखंडी कुंपणावर व तिथल्या मांगरावर सहा-सात लाख खर्च झाले होते. जंगली प्राणी वावरण्याचे प्रमाण आंबोलीत भरपुर आहे त्यामुळे कुंपण गरजेचे. तर हा खर्च भरुन काढण्यासाठी ऊस लावायचा आणि पैसे वसुल करायचे हा सल्ला प्रत्येकजण देत होता. माझ्या शेताला भक्कम कु़ंपण असल्यामुळे प्राण्यांचा त्रास न होता ऊसशेती सहज करता येईल असे लोकमत होते. पण मला ऊसशेतीत रस नव्हता.

माझ्यासाठी व माझ्या सगळ्या कुटूंबियांसाठी लागेल इतका तांदुळ, गहु, भाज्या, कडधान्ये कुठलीही हानीकारक खते, किटकनाशके, तणनाशके न वापरता पिकवायची हे माझ्या डोक्यात होते. मला नैसर्गिक शेती करायची होती आणि ती आंबोलीत अजिबात होणार नाही असे लोकांचे मत होते. आणि हे फारसे खोटे नव्हते. आज रसायनांचा अपरिमित वापर आंबोलीत होतोय, युरिया टाकला नाही तर साधी लाल भाजीही ऊगवुन येत नाही ही स्थिती आहे. गावात कॅंसर पेशंटची संख्या लक्षणीय आहे. पण रासायनीक निविष्ठा वापरल्यामुळे होणार्‍या दुष्परिणामांकडे लोकांनी डोळेझाक केलेली आहे. भरपुर खते देऊन ऊस करायचा आणि पैसे कमवायचे हेच ध्येय आहे. खतांमुळे व एकसुरी पिकांमुळे जमिनीवर होणारे परिणाम, तणनाशकांमुळे पाण्याचे होणारे प्रदुषण इत्यादी बाबी त्यांच्या गावीही नाहीत.

अर्थात याला कारणेही तशीच आहेत.

ईथे गंमत अशी आहे की ईथल्या बहुतांश शेतजमिनमालकांना शेतीत रस नाही आणि जे शेती करतात ते त्या शेतीचे जमिनमालक नाहीत. नोकरी मिळण्याची शैक्षणिक पात्रता नसलेला मोठा तरुण वर्ग इथे आहे जो शेतीकडे पैसे कमावण्यासाठीचा एक जोडधंदा म्हणुन पाहतो. जगण्यासाठी अनेक खटपटी इथले लोक करतात, त्यात ऊसशेती अग्रभागी येते कारण ऊसाचे एकरकमी पैसे हातात येतात. जमिन भाड्याने म्हणजे खंडाने घेऊन ऊस लावायचा. ऊस पाच वर्षे टिकतो, जमिनही पाच वर्षांसाठी मिळते. मग या पाच वर्षात पैसे कमवायचे की प्रयोग करायचे? त्यामुळे न करताच आंबोलीत नैसर्गिक किंवा युरीयामुक्त शेती होणार नाही हा ठप्पा मारला गेलेला आहे. स्वतः शेती करणारे जमिनमालक हाताच्या बोटावर मोजले जातील इतकेच आणि त्यात प्रयोगशील कुणीच नाही. प्रयोग करायला जावे तर निसर्गाची साथ नाही. पावसाळा जवळजवळ सहा महिने रेंगाळतो. इतर प्रदेशाच्या तुलनेत आंबोलीत पिकवाढीचा वेग कमी आहे, ज्या पिकाला गवश्यात किंवा आजर्‍यात तिन महिने लागतात त्याला आंबोलीत सहज साडेचार महिने तरी लागतात. त्यामुळे मार्केटसाठी झटपट भाजीपाला शेतीही फारशी करता येत नाही.

सर्व साधक बाधक विचार करुन मी शेवटी ऊस लावायचा बेत पक्का केला. माझ्यासाठी यामुळे दोन गोष्टी होणार होत्या. एक म्हणजे ऊसाच्या पाल्याचे आच्छादन मिळणार होते व वर्ष अखेरीस थोडे पैसेही मिळाले असते. पुर्ण तिन एकर भाजी वगैरे लावली तर ती विकण्याचा प्रश्न ऊभा राहिला असता. तीन एकरभर भाजी लावायचे ज्ञान व अनुभव तेव्हा नव्हता आणि आजही तितकासा नाही.

ऊसाव्यतिरीक्त अजुन काहीतरी करायची खुमखुमी होती त्यासाठी अर्धा एकर जमिन ठेवायची व ऊरलेल्या अडिज एकरात ऊस लावायचा असे ठरवले. नेहमीसारखा यालाही थोडा विरोध झाला. पण मी दुर्लक्ष केले. पाळेकर गुरूजी एक किस्सा सर्व शिबिरात सांगतात. त्यांना भेटणारे काही शेतकरी त्यांचा किती एकर ऊस आहे हे अभिमानाने सांगतात. घरचे तांदुळ, डाळ, ज्वारी, शेंगदाणा कुठुन आणता विचारले तर बाजारातुन आणतो हे ऊत्तर मिळते. गुरूजी म्हणतात काय हे कर्मदारिद्र्य!! जो आपण खात नाही तो ऊस लावायचा आणि जे आपण खातो ते पैसे देऊन विकत आणायचे, तेही विषयुक्त. मला अर्थात हे करायचे नव्हते. आपल्याला लागणारे धान्य जमेल तितके आपण पिकवायचे हे मी ठरवले होते. त्यासाठी सद्ध्या अर्धा एकर जमिन पुरेशी होती.

क्रमशः

पुढचा भाग : https://www.maayboli.com/node/84965

( चार वर्षांचा लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न आहे, थोडे लिहिलेय, बरेचसे लिहायचे आहे, त्यामुळे पुढचा भाग काढण्यास वेळ लागु शकतो.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यश लाभो. आरोग्य सांभाळून जमेल तसं करा.
वाचतोय. अनुभवाचे बोल चांगले असतात. प्रयोग करायचे ( घराभोवती किंवा बाल्कनीत/ गच्चीत नव्हे) चार एकराच्या रानात म्हणजे वेळ ,पैसे ,श्रम बरेच वाया जाणार. मग यशस्वी झालेले प्रयोग आयते घेऊन त्यावर उड्या मारणारे तयारच असतात. प्रयोग गुप्तच ठेवा.

चांगली सुरुवात, वाचतोय. शक्य झाल्यास जमाखर्चाचे आर्थिक गणित लिहाल का? म्हणजे इतरांना नैसर्गिक शेती हा उद्योग करण्यास उपयुक्त आहे की निव्वळ एक छंद म्हणून ते कळू शकेल.

<< यशस्वी झालेले प्रयोग आयते घेऊन त्यावर उड्या मारणारे तयारच असतात. प्रयोग गुप्तच ठेवा. >> चुकीचा सल्ला. असा स्वार्थी विचार इस्रायलने केला असता तर आज जगाला त्याचा फायदा झाला नसता.

छान लिहिलं आहे. लेखातून तुमची शेतीविषयीची तळमळ दिसते आहे. तुमचे अनुभव नवोदित शेतकऱ्यांना फार मोलाचे आहेत. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे लेख कुठेही विस्कळीत वाटला नाही.
पुढचा भाग लवकर टाका. वाचण्यास उत्सुक. पुलेशु

साधना, सुरुवात एकदम मस्त झाली आहे.
तुला खूप खूप शुभेच्छा.
शहर सोडून कोकणात जाऊन शेती करायचा निर्णय किती कठीण आहे पण तू तो घेतलास म्हणून विशेष अभिनंदन.
यावेळी जेव्हा गावाला जाईन तेव्हा रस्त्यात तुला आणि शेतीला, झाडांना भेटायला नक्की येणार.

साधना - आवडला लेख. यात मनासारखे यश मिळण्याकरता शुभेच्छा!

पुढच्या भागांची उत्सुकता आहे. >>> +१

स्तुत्य निर्णय आणि उपक्रम. पुढील वाटचालीस शुभेच्छा. प्रयोग गुप्तच ठेवा.+१
कारण सविस्तर लिहितो नंतर ... ऊ बो ह्यांच्या मुद्यावरही आपोआप उत्तर येईल त्यात.

आंबोली येथील जे वातावरण आणि शेताची भौगोलिक परिस्थिती वर्णन केलेली आहे त्यावर नफा लवकर (६ महिन्यातच) मिळवण्यासाठी काही सुचवणी आहेत. त्यासंबंधी (गिफ्ट तिलापिया संवर्धन + बायोफ्लोक + अक्वेरियम कोई कार्प प्रजनन) कदाचित इकडे लिहिणे विषय बदल होईल तर वेगळा धागा काढता येईलच.

सर्वांचे मनापासुन आभार.

अज्ञानी, इथे लिहाच पण वेगळा धागा काढुन लिहिलेत तर जास्त लोकांना फायदा होइल.

मला जेवढी माहिती मिळेल ती हवीच आहे. वनस्पतींपासुन तेले उदा. जेरेनियम हा ही एक विषय आहे. माझ्या शेतात व आंबोलीत शतावरी सहज उगवते, तोही मार्ग चाचपुन पाहायचा आहे. मी ऊस करतेय कारण सध्या घर, नोकरी व शेत अश्या तिन चाकी गाडीत धक्के खातेय :). त्यात नोकरीला टॉपप्रॉओरिटी द्यावीच लागते, पर्याय नाही. त्यामुळे शेत थोडे मागे पडते.

खूप छान सुरवात.
माझ्या आई वडिलांनी १९९६ साली नागपूर पासून ४० किमी अंतरावर सुमारे साडेबारा एकर शेतजमीन घेऊन ठेवली होती. यापूर्वी घरी कोणाला शेती करण्याचा अनुभव न्हवता. शिवाय बाबांचे बाबा १९४७ मध्ये पाकिस्तानातून निर्वासित म्हणून इकडे आल्यामुळे वडिलोपार्जित जमीन असण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही आईबाबांनी शेती करण्याचे ठरवले.

रिटायर होईपर्यंत दर शनिवार रविवार आणि आता रिटायरमेंट नंतर बाबा पूर्ण वेळ शेती करतात.
पूर्णपणे अ-रसायानिक, जैविक पद्धतीने आता बरीच पिके घेतात. शेतात जिवामृत आणि गोबरगॅस निर्माण करून त्याचाच वापर करतात.

काहीही पूर्वानुभव नसताना निरनिराळी पुस्तके, मासिके आणि लेख वाचून तसेच अनेक कार्यशाळा करून त्यांनी बरेच प्रयोग केले. YouTube वर पण अनेक व्हिडिओ बघितले. आणि स्वतः अनेक प्रयोग करून अक्षरशः शून्यातून शेती निर्माण केली. दरवर्षी काहीतरी नवीन करत होते. एका उन्हाळ्यात पूर्ण शेतीला कुंपण घातले, तर एकदा विहीर खोल केली. ठिबक सिंचन चे पूर्ण नेटवर्क बसवले. छोटी मोठी शेतीसंबंधी मशिनरी विकत घेतली. शेतात घर कम माल ठेवण्यासाठी पक्के छत उभे केले
4 एकरात संत्र्याची बाग लावली. इतर जागेत कापूस, गहू, तूर, भुईमूग, ज्वारी अशी पिके आलटून पालटून घेतात. आज आमचे कुटुंब किमान गहू आणि डाळ तरी घरचीच वापरते. या वयात देखील (७० वर्षे) दर दोन दिवस आड बाईक वरून नागपूर ते शेत जाणे येणे करतात. कापणी, पेरणी च्या वेळी तर सलग २-३ दिवस शेतातच मुक्काम असतो.

आज त्यांच्या कष्टाला चांगलेच फळ मिळाले आहे.

महाराष्ट्र शासनाने त्यांची २०२१ साली जैविक पद्धतीने पपईचे उत्पादन घेण्याबद्दल विशेष दखल घेतली आहे.
तुमची लेखमाला त्यांना वाचायला देते. खूप आवडेल

माझे प्रयोग पाहुन कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे. मी कुठल्याही मार्केटात नाही त्यामुळे माझे नुकसान नाही. मीही इतरांचे पाहुनच शिकतेय.

रासायनिक खते वापरली नाहीत तर शेतात काहीही येत नाही ही आजची भारतातली वस्तुस्थिती आहे, कदाचित जगभरही हेच झाले असावे. पण पर्याय म्हणुन नैसर्गिक शेती करुन वाढत्या तोंडांना अन्न देता येईल का हा प्रश्नही लोकांना सतावतोय.

आजवर हेच झालेय की एक प्रश्न सोडवताना दहा नविन प्रश्न जन्माला घातले गेले. रासायनिक शेतीला उत्तर म्हणुन केलेली नैसर्गिक शेती कितपत फायद्याची या प्रश्नाच्या उत्तरात मीही आहे. ते मिळायला वेळ द्यावा लागणार, तो मी देतेय.

अर्ध्या एकरात जे लागते ते धान्य म्हणजे थोडे थोडे असे बरेच काही लावले का...
पुढच्या भागात लिहालच..
मागे तुमच्या एका प्रतिसादातून समजलेले याबद्दल तेव्हाच आश्चर्य आणि कुतूहल वाटलेले. असे शून्य ज्ञान आणि अनुभव असताना शेती करायचे धाडसी निर्णय घेणारे जे कोणी असतील त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आजवर कधी ऐकला वाचला नव्हता.. तर अजून वाचायला आवडेल.

wow !! तुम्ही शेती करायची ठरवली इथेच खरे तर कौतुक संपले आहे.
एकंदर अशा सगळ्या वेगळ्या वातावरणात शून्यापासून सुरवात करण्याचे धाडस तुम्ही करताय हे खरोखर कौतुकास्पद आहे.
थोडा ऊस थोडी भाजीपाला शेती हा सारासार विचार करून केलेला निर्णय आवडला.
पुढील भागाच्या जोरदार प्रतीक्षेत, खूप शुभेच्छा तुम्हाला!

गावात कॅंसर पेशंटची संख्या लक्षणीय आहे>> या वाक्यामुळे थोडे कान टवकारले गेले आहेत. धोक्याची घंटा वाजते आहे असे वाटले. काही गावात(आंबोली असे नाही इतर गावात ) जिथे रासायनिक खाते वापरून भरपूर भाजी पिकवून इतर ठिकाणी पाठवली जाते तिथे भाजी किंवा त्यातील रसायनांमुळे कॅन्सरचा धोका वाढणार आहे हे ऐकून होते, फक्त खरेच असे हे पटत नव्हते किंवा पटत होते पण विश्वास ठेवावा की कसे कळत नव्हते. hope for the best.

धोका वाढणार असे नाही तर धोका समोर उभा ठाकलाय.
पंजाबचे उदाहरण सगळ्यांना माहित आहे. कोल्हापुरात शिरोळ तालुक्यात आज तेच होतेय. हा तालुका भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि आता कँसरसाठी. कोल्हापुरात अद्यावत कँसर रुग्णालये गेल्या १० वर्षात उदयास आलीत, ती अर्थातच मुंबैच्या पेशंट्साठी नाही ना… त्यांना स्थानिक पेशंट्स आहेत… कोकणात सावंतवाडीत कॅंसर केअरचे बोर्ड दिसतात.. इतका हा रोग पसरलाय. हवा, पाणी, अन्न सगळे प्रदुषित आहे.

कोल्हापुरात शिरोळ तालुक्यात आज तेच होतेय. हा तालुका भाजी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि आता कँसरसाठी>> हो हेच नाव आठवत नव्हते.
धोका वाढणार असे नाही तर धोका समोर उभा ठाकलाय.>> true !!

साधना, अनया, मनिम्याऊ आयडी आईवडील यांचे अतिशय कौतुक वाटते.
आमचा कुंडीत मोठ्या कौतुकाने लावलेला अळू सुरवंटाने अगदी नक्षी केल्या सारखा कातरला आहे.आता यासाठी काहीतरी नैसर्गिक उपाय करू.साधं कुंडीत 1 झाड टिकवणं जमेना, तुम्ही सगळे जमिनीवर शेती करता.
अजून लिहा यावर.

थोडा विचार केला तर हा एक मुद्दा सुचला म्हणून मांडत आहे. आंबोली हे ठिकाण जगातील biodiversity hotspots पैकी एक (पश्चिम घाट) आहे. अर्थात त्यामुळे नेहमीच्या शेतीपेक्षा जरा वेगळी शेती इथे करावी लागेल.
जंगल शेती सारखी संकल्पना राबवता येईल का? शेतीच्या जोडीला मधमाशी संवर्धनासारखे काही जोडधंदे करता येतील का? अशा कल्पना मनात आल्या.
बाकी चर्चा छान सुरू आहे!

मनिम्याऊ, खूप छान वाटले तुमच्या आईवडिलांचा उत्साह वाचून. तुम्ही वेगळी लेखमाला लिहा ज्यामुळे त्यांच्या
अनुभवांचा दस्तावेज तयार होईल.

Pages