नाम नामेति नामेति - दोन

Submitted by Revati1980 on 31 March, 2024 - 08:20

रेवतीबेन, तमे जे कह्यु के ब्राह्मणांनी देवदेवतेची, क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी, वैश्यांनी संपत्तीदर्शक नावे ठेवावीत असं सांगितलं ते मला काय पटलं नाही. शिवाय शूद्र यांच्याबद्दल तुम्ही बोललाच नाहीत. त्यांनी काय पाप केलंय?

खरच की, अहो शुद्रानी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची नावं ठेवावीत की. पाप बीप काही लागत नाही.

असं कसं शक्य आहे? एका बाजूला तुम्ही म्हणता ब्राह्मणांनी देवदेवतेची , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी, वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत आणि दुसऱ्या बाजूला शुद्रानी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची नावं ठेवावीत. कुछ हजम नहीं हो रहा है.

हाजमोला घ्या की त्रिवेदी साहेब. तुम्ही ब्राह्मण ना?

होय.

तुमचं नाव मनहरभाई, हो ना?

हां.

आपल्या सोसायटीत झाडू मारायला येतो त्याचं नाव पण मनहरभाई आहे, तमने खबर छे ने? मनहर सोलंकी?

येस.

शिवाय मी सांगते म्हणजे ते ब्रह्मवाक्य आहे असेही नाही. मी जनरल स्टेटमेंट केलंय साहेब, कारण नशीब आणि नाव यांच्यात एक अदृश्य दुवा असतो म्हणून मी तसं सांगितलं. तुम्ही ब्राह्मण आहात याचा तुमच्या नावावरून पुरावा काय? ब्राह्मण आहात तर सांगा बरं चार वेदांची नावं?

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद. बराबर छे?

वेदांची सहा अंगे सांगता का?

अं……

चार आश्रम?

आश्रम? बॉबी देओलवाला? अरे ते आपलं… हां, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. करेक्ट?

चार पुरुषार्थ?

हे काय असतं रेवतीबेन?

धर्म, अर्थ, काम, मोक्ष. बरं, चार ऋणे सांगाल काय?

अं…… नो लक…

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार काय आहेत?

चार जाती आहेत.

यही है आपका प्रॉब्लेम.अहो त्याला वर्ण म्हणतात. चार वर्ण. हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था आहे अशी गैर समजूत बऱ्याच लोकांची आहे, त्यामध्ये तुमच्या सारखे अगदी उच्च विद्या विभूषित सुध्दा आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारही वर्णांची कर्तव्ये, अधिकार, व्यवहार, परस्परावलंबित्व, परस्परपूरकत्व, इत्यादी गोष्टींचा विचार करून धर्मशास्त्रकारांनी ही एक सामाजिक चौकट निर्माण केली. वर्ण म्हणजे जात नव्हे. जाती अठरा पगड आहेत. भारतात तीन हजार प्रकारच्या जाती आहेत, तर वर्ण चारच आहेत. समाज व राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी निर्माण केलेले व्यवसाय म्हणजे वर्ण. आजही जगात व्यवसाय सर्वत्र आहेत. समाजाच्या धारणेसाठी ते अत्यावश्यकही आहेत. गुणांवर, पात्रतेवर आणि योग्यतेवर आधारलेली अशी ज्ञान, सत्ता, संपत्ती व कला-सेवा यांचे विभाजन व संयोजन म्हणजे वर्ण, एक सामाजिक संस्था किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणा हवी तर.

ऋग्वेदातील ऋचा, 'ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः l ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत l अशी आहे, म्हणजे " ब्राह्मण हे या पुरुषाच्या म्हणजे ईश्वराच्या मुखापासून, क्षत्रिय हे बाहूपासून, वैश्य हे मांड्यांपासून व शूद्र हे पायापासून उत्पन्न झाले.' एकाच ईश्वरापासून हे चार वर्ण निर्माण झाले आहेत. एकाच ईश्वरापासून. आता सांगा शरीराला पायच नसतील तर शरीर चालेल काय?

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात,

'चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्य कर्तारमव्ययम् ।।' (गीता ४.१३)

'गुण व कर्म यांच्या विभागाने मी चार वर्ण उत्पन्न केले. त्यांचा मी कर्ता असलो तरी देखील मला तू अकर्ता जाण.'

प्रत्येक वर्णाची कर्तव्ये गीतेच्या १८व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सुस्पष्ट केली आहेत,

'शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।।' (१८.४२)

'शांतता, आत्मसंयम, तपस्या, पवित्रता, सहनशीलता आणि साधेपणा, ज्ञान, अनुभूती, श्रद्धा, ब्रह्म-कृती, ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.'

'शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् । दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ।।' (१८.४३)

'शौर्य, तेज, धैर्य, चतुरता आणि युद्धातून पलायन न करणे (एवं) दान आणि स्वामीभाव ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत.'

'कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ।।' (१८.४४)

'शेती, गोपालन व क्रयविक्रयरूपी सत्यव्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे होत. सर्व वर्णांची सेवा करणे हे शुद्राचे स्वाभाविक कार्य आहे.

मुस्लीम आक्रमण आणि नंतर इंग्रज यांच्यामुळे वर्णव्यवस्था लोप पावली. वर्णव्यवस्था 'गुणकर्मविभागशः' असल्याने वाडवडिलांचे, पूर्वजांचे व्यावसायिक गुण पुढील पिढीत उतरले आणि त्यातून अठरा पगड जाती निर्माण होत गेल्या. वर्णाश्रम व्यवस्थेबद्दल आज समाजात अनंत गैरसमज आहेत. 'वर्ण' हा शब्द 'अस्पृश्य' या शब्दासारखा झाला आहे. ब्राह्मणांचे वर्चस्व राहावे व शूद्रांचे हाल व्हावेत म्हणून वर्ण निर्माण झाले अशी ही समजूत मेकॉले नावाच्या गोऱ्या मर्कटाने तुम्हाला करायला लावली. वर्णव्यवस्था यादव कुलातील श्रीकृष्णांनी निर्माण केली आहे. ब्राह्मणांनी नाही. श्रीकृष्णांनी निर्माण केली ती कुणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवण्यासाठी नाही. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, आणि संपूर्ण मानवजात यांचे कल्याण व्हावे हाच हेतू होता. चातुर्वर्ण्य व्यवस्थेऐवजी जातिव्यवस्था आली आणि राष्ट्राच्या समस्या व गुंतागुंत यात भरच पडली. त्यात तुम्ही अजून भर घालताय.

राम हे देवाचे नाव आहे काय मनहरभाई?

सो टका.

मग राम तर क्षत्रिय होता. श्रीकृष्ण देव होता का?

अरे सूं वात करो.. भगवान श्रीकृष्ण म्हणतो आपण.

तो तर गवळी होता, गुराखी. तो वैश्य होता हे त्यानेच गीतेच्या अठराव्या अध्यायात सांगीतले आहे. वैदिक कालखंडात, आर्यांनी नावे घेतली ती निसर्गापासून, पर्वत, टेकड्या, नद्या, जंगले, नंतर प्राणी, वनस्पती किंवा निर्जीव वस्तू, ज्यांच्याशी टोटेमिकली रिलेटेड आहेत अशा नावांचा उपयोग केला . उदा. नदी पासून नर्मदा, नदी पासून सरस्वती, गंगा नदी, शंतनूची पत्नी आणि भीष्माची आई ही गंगा. अज म्हणजे बकरी वरून अजाचे नाव आले जी ऋग्वेदात सांगितलेली एक जमात आहे. अश्व म्हणजे घोड्यापासून अश्वपती, अश्वत्थामा, अश्विन, अश्विनी कुमार, अश्विनी. भारद्वाज पक्ष्यापासून भारद्वाज ऋषी. गौतम आणि गोतमा हे गाय आणि बैलापासून, कौशिक, कौशक ही नावे घुबडापासून, कश्यप हे कासवापासून, मुद्गल म्हणजे मासा, नकुल म्हणजे मुंगूस. शौनक ऋषींचे नाव श्वानापासून. शौनकचा अपभ्रंश सूनक. ऋषी सूनक. पी एम ऑफ यु के. डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड्. नॉव बोथ आर सीटिंग इन टेन डाउनिंग स्ट्रीट. हा हा हा.

साची वात छे बेन.

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे खरे म्हणजे धर्म आहेत. ब्राह्मधर्म, क्षात्रधर्म, वैष्यधर्म, शूद्रधर्म. या चार वर्णानी आपापली नेमून दिलेली कामे करावीत. तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरची एम्प्लॉइ म्हणून सेवा केली तर तुम्ही शूद्र आहात. बरोबर ना?

येस येस. रेवतीबेन, करेक्ट…..बर ते चार ऋण सांगा ना..

देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि मनुष्यऋण.

हिंदू धर्माचे वेदांपासून पुराणांपर्यंतचे सिद्धांत व्यवहारात आणण्यासाठी चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार ऋणे आणि चार वर्ण , ही चार चतुष्के तयार केली आहेत. या चारही चतुष्कांचे निष्ठापूर्वक आचरण करणे म्हणजेच हिंदू धर्म होय.

ती सहा वेदांगे?

शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष.

ज्योतिष म्हणजे ते होरोस्कोपवाला?

होय.

तुम्ही सांगता ज्योतिष?

तुमची रास कुठली?

कुंभ.

साडेसाती चालू आहे.

होय. बारीक बारीक त्रास होतो. गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी गाडी पंक्चर. दोन वेळा झालं. बॉस फार त्रास देतो.

तुमचा राशीस्वामी शनी आहे. त्याला खुश ठेवा. काही त्रास होत नाही.

त्याला कसं खुश ठेवायचं बेन?

फार सोपं आहे. सुंदरकांड वाचा शनिवारी. जर तुम्ही दारू पीत नसाल, खोटी साक्ष देत नसाल, वादात गुंतत नसाल, खास करून बायकांशी वाद, आणि परस्त्रीवर नजर ठेवत नसाल तर शनि विल बी वेरी हॅपी. जगातल्या सगळ्या बायका लक्ष्मीच्या कन्या आहेत सो डोन्ट आर्ग्यू विथ देम अंनेसेसरीली. इव्हन ऑनलाईन. आजचा जमाना ऑनलाईन जास्त आहे. प्रत्यक्षात भेटल्यावर सर्व जण एकमेकांशी सभ्य भाषेतच बोलतील यात शंका नाहीं, खचितच नाही कारण आपण सर्व जण सभ्य समाजाचा भाग आहोत. असे ऑफ लाईन असताना आपण जे सभ्य असतो ते ऑन लाईन गेल्यावर इतके असभ्य आणि हिंसक का होतो? समोरचा माणूस प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून ही हिंसा? ऑफलाइन जगात जो शिष्टाचार असतो तोच ऑनलाइन जगात अपेक्षित आहे. ऑफलाइन जगात असताना कुणावर शाब्दिक हल्ले, अपमान, छळ असा प्रकार न करता आपण एकमेकांशी सभ्यतेच्या मर्यादेत राहून वागतो. ऑनलाइन जगात सुद्धा हीच वागणूक अपेक्षित असते पण तसं होतं का? ब्लँक स्क्रीन समोर मानसिक रीत्या नग्न होऊन कपड्याच्या जागी भाषा आणि वर्तन उतरवले जाते. हे मानसिक कॅन्सर झाल्याचे लक्षण आहे. शनी मग शारीरिक कँसर द्यायला कमी करणार नाही. चुकूनही अपंग, गरीब, मजूर, रिक्षावाले, कष्टकरी, सफाई कामगार, दुर्दैवी लोकांची चेष्टा करू नका, त्यांच्यावर अन्याय करू नका, नाहीतर शनी कोपला तर वाट लावतो. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्, या दोन ओळींचा श्लोक नेहमी जपत राहा. हे अगदी सहज होण्यासारखे आहे.

जरा डिटेल मध्ये सांगता का रेवतीबेन? पारुल पण कुंभ छे.

नंतर कधीतरी. बरं, पारुल डिलिवरीसाठी गेलीय ना?

होय. आज उद्या बातमी यायला पाहिजे.

मुलगा झाला तर नाव काय ठेवणार?

तुम्ही सुचवा ना?

कशाला? मी सुचवलं तर परत तुम्ही माझ्याशी वाद घालायला याल.

एवू नथी बेन, सांगा तर खरं?

ठेवा की, फटुकड्या, पिस्तुल्या, बंदुक्या, तोफ्या, रॉकेट्या, एके फॉर्टीसेवन्या, रायफल्या, पॉईंट अडतीस्या, डबल बॅरल्या वगैरे…

आणि मुलगी झाली तर?

फटाकडी, फुलबाजी, लवंगी, सुरसुरी, टिकली, चकरी, चम्मनचिडी, भुईनळी किंवा चीनचीनचू वगैरे….

तमे मजाक उडाओ छो मारी, बराबर?

शरुवात तो तमे करेली, बराबर?.....सोसायटीच्या नोटीस बोर्डवर तुमची सहा महिन्याची मेंटेनन्सची थकबाकी मी दाखवली म्हणून माझ्याशी काहीतरी निमित्ताने वाद घालताय, हो ना ?

अरे होय, एवू काई नथी बेन.

पुढच्या रविवार पर्यंत थकबाकी नाही भरली तर नळ कनेक्शन बंद.

अरे ना ना.. भरी नाखीस.

पंकज उधासच्या एका गजलेत दोन ओळी आहेत मनहरभाई, सब कुछ हमें खबर है, नसीहत ना दीजिए, क्या होंगे हम खराब, जमाना खराब है.

हिंदू धर्मात जन्म घ्यायला पुण्य करावं लागतं साहेब. नॅशनलीजम इज नॉट अँन आयडीयालॉजी, इट्स अ कॅरेक्टर.

…......

Group content visibility: 
Use group defaults

ज्याला जे आवडेल ते ठेवावं की नाव.आपल्याला उच्चारताना 'अरे हे नाव आणि आपलं आडनाव असं मिळून आपल्या मुलावर/मुलीवर उच्चारायला मस्त वाटतंय' असा आतून सिग्नल मिळाला की झालं.

छान लेख
प्रत्येक विचाराशी सहमत असो नसो, बरीच नवी माहीती मिळाली.

वर्णव्यवस्था यादव कुलातील श्रीकृष्णांनी निर्माण केली आहे. >>>> याची कल्पना नव्हती. पण गीतेत उल्लेख असेल तर शक्य आहे.

राम क्षत्रिय आहे. मांसाहार करतो. तरी देव आहे. याऊलट रावण ब्राह्मण आहे. शाकाहारी आहे. तरी राक्षस आहे. हे सारे मलाही गोंधळात टाकते. कृष्ण कोण होता हे माहीत नव्हते. पण यात दिल्यानुसार तो वैश्य होता हे समजले.

पण राम क्रुष्ण एकाच देवाचे अवतार तर एक क्षत्रिय एक वैश्य असे का?
आणि रामाचा काळ कृष्णाच्या आधी होता ना? जर कृष्णाने वर्णव्यवस्था निर्माण केली तर राम क्षत्रिय होता हे कोणी ठरवले?

वर्ण व्यवस्था श्रीकृष्णाने निर्माण केली, हे माहीत नव्हते. ऋग्वेद - पुरुषसुक्तात वर्ण व्यवस्थेचा उल्लेख असल्याचे वाचले होते, त्यामुळे तसच समजत आले होते. किंबहुना, वैदिक काळात वर्ण जन्मावरून न ठरता कर्मावरून ठरत असे, असं शिकल्याचं आठवतंय.

वैदिक काळात वर्ण जन्मावरून न ठरता कर्मावरून ठरत असे, असं शिकल्याचं आठवतंय.
>>>>>>>>

मला तर आजही असे वाटते की हे वर्ण जात धर्म काहीही असेल ते वयाची 18 किंवा 21 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येकाचे प्रत्येकाला ठरवायला द्यावीत. कुठलेच लेबल नको असेल तर तसाही एक पर्याय फॉर्ममध्ये असावा. कारण मला स्वताला माझ्या नावापुढे येणारे हे सारे जन्मजात टॅग कुठलाही गाजावाजा न करता काढायचे आहेत.

वैदिक काळात वर्ण जन्मावरून न ठरता कर्मावरून ठरत असे, असं शिकल्याचं आठवतंय.>>> काही उदाहरणं आहेत का, अमुक व्यक्तीला आठ अपत्ये होती, त्यातील कर्मानुसार काही ब्राह्मण झाली, काही वैश्य, काही शूद्र वगैरे?
किंवा अमुक शूद्र पालकांच्या पोटी जन्मला पण त्याचे कर्म पाहून त्याला/तो आधी वैश्य मग ब्राह्मण केले/झाला वगैरे.

अमुक शूद्र पालकांच्या पोटी जन्मला पण त्याचे कर्म पाहून त्याला/तो आधी वैश्य मग ब्राह्मण केले/झाला... अनेक (ब्रह्म/मह)र्षी आहेत ना जसे की वाल्या कोळी ह्यांचा वाल्मिकी

वाल्मिकींचे पिता कोण? वाल्मिकी लुटारु कसे/का झाले?

उलट आहे का?>> योग्य प्रश्न. कर्मावरून ठरत असेल तर काही पुराण कथांव्यतिरिक्त दोन्ही बाजूंची बरीच उदाहरणे असायला हवीत.

मला तर आजही असे वाटते की हे वर्ण जात धर्म काहीही असेल ते वयाची 18 किंवा 21 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येकाचे प्रत्येकाला ठरवायला द्यावीत

जावेद अख्तर हेच धर्माबद्दल म्हणतात. मुलांवर वयाच्या २१ वर्षापर्यंत कुठलेच धार्मिक संस्कार न करणे आणि कायदेशीररीत्या धर्म न विचारणे. २१ वय पूर्ण झाल्यावर त्याला धर्मविषयक ज्ञान अभ्यासण्याचा पर्याय खुला करावा. ह्या नंतर त्याला कुठला धर्म स्वीकारावा ह्याचे स्वातंत्र्य द्यावे. तो कुठलाच धर्म स्वीकारणार नाही अशी त्यांची खात्री आहे.

तो कुठलाच धर्म स्वीकारणार नाही अशी त्यांची खात्री आहे.
>>>>

हो,
जर लहानपणापासून धार्मिक संस्कार केले नाहीत तर नक्कीच कोणी कुठलाच धर्म स्विकारणार नाही.

आमच्याकडे आंतरजातीय विवाह आहे म्हणून घरात मुलांसमोर कधी जातीचा उल्लेख होत नाही. पण धर्माचा उल्लेख करतात. मी दरवेळी सांगतो की मुद्दाम असे उल्लेख नको पण माझे ऐकले जात नाही.

त्यामुळे मुलीला ना तिच्या आईची जात माहीत आहे ना वडिलांची... पण आपण धर्माने हिंदू आहोत आणि ख्रिश्चन मुस्लिम हे आपल्यापेक्षा वेगळे धर्म आहेत हे माहीत आहे.

आता एकदा का आपण स्वताला कुठल्या जाती धर्माचे लेबल लावून घेतले की त्यासोबत अहंकार आपसूकच येतोच. माझी अमुक तमुक जात धर्म आहे पण आम्ही जातिभेद किंवा धर्मभेद मानत नाही असे होऊच शकत नाही.

कल्पना नाही..
तशी वेळ तरी अजून आली नाही. किंवा आली असल्यास तो फॉर्म तिच्या आईनेच भरला असावा.
मुलगी आता पाचवीत जाईल..
तिला जात म्हणजे आपण मराठी आहोत इतकेच माहीत आहे.

मुलं शाळेत जातात ना? तिथे त्यांना फॉर्म वर जात लिहायला सांगत नाही का?>>
मुलांचे पालक अॅडमिशन च्या वेळी फॉर्म भरतात. मुलांना आपल्या जातीची कल्पना असतेच असं नाही. हा अनुभव मी शाळेतल्या मुलांचे दहावीचे आणी शिष्यवृत्ती चे फॉर्म भरून घेतांना घेतला आहे. तिथे जात लिहिणं आवश्यक असतं त्या शिवाय (ऑनलाइन) पुढे जाताच येत नाही. आणि मुलांना जाती.. पोटजाती ह्याची काहीही कल्पना नसते.

मुस्लीम आक्रमण आणि नंतर इंग्रज यांच्यामुळे वर्णव्यवस्था लोप पावली.

हे नेहेमीचेच पालूपद आहे. जणू काय या दोघांच्या आधी सर्व काही अलबेल होते. इंग्रज जाऊन सत्तर वर्षे झाली, मग आजही अशा घटना का घडतात ? दलित नवरदेवाला घोड्यावर बसायचे झाले तर पोलिस बंदोबस्त का लावावा लगतो ?

वाल्मिकी स्वतःला १०वा प्रचेतस, म्हणजे प्रचेताचा दहावा मुलगा म्हणतात.
वाल्या कोळीची गोष्ट वाल्मिकी रामायणात नाहीये. ती बंगाली भाषेत असलेल्या एका रामायणात येते. त्यातही ते शूद्र आहेत असे नाहीच. उलट स्पष्टपणे ब्राम्हण घराण्यातले आहेत पण गरिबीमुळे डाकू झाले असा उल्लेख आहे.

जुन्या महान काळात जात, वर्ण कर्माने ठरायचे तर मग आता नव्या भारतात ही प्रथा पुन्हा चालु करून टाकावी. सर्व नोकरीपेशा वर्ग शुद्र धरण्यात यावा कागदोपत्री.

बाली ईडोनेशिया (जिथे ९५% पेक्षा जास्त हिंदु आहेत) मध्ये सुध्धा हिंदु धर्मात ४ वर्ण आहेत. तिथे जात ही कर्माने ठरते. बालीमध्ये शुद्र चा मुलगा ब्राम्हण होउ शकतो आणि तो मंदीरात पुजा पण करतो. २० वर्षापुर्वीच्या बाली ट्रिप मध्ये अश्या माणसाशी बोललो आहे. नेट वर कदाचित काही माहिती पण मिळेल.

इंटरेस्टिंग...

पण मंदिरातले पुजारी ब्राह्मणच असतात का? म्हणजे भारतात छोटे मोठे हजारो मंदिरे असतील.. सगळीकडे ब्राह्मण पुजारी कुठून आणणार..

गुरव्/घाडी अशा जमातीमधिल लोकांना पुजारी का म्हणत नसावेत ? ते ब्राहंण समाजातुन येत नाहीत म्हणुन का?

मंदिरातले पुजारी ब्राह्मणच असतात का? >> कोकणात कुलदेवी/ कुल देवाला जेव्हा जातो, तेव्हा जोपर्यंत गुरव देवाची पूजा करत नाही, तोपर्यंत ब्राह्मण पुजा करत नाहीत. त्यात कोणालाही कमीपणा वाटत नाही.

मंदिरातले पुजारी ब्राह्मणच असतात का?
>>>
काय तर भारी प्रश्न आहे, यावरून मला कोणी सांगू शकेल का की मस्जिद मध्ये मौलवी मुस्लिमच का असतात, गुरुद्वारात सिख का असतात आणि चर्च मधील फादर ख्रिश्चन का असतात?

Pages