अशा चांद राती , तुझा हात हाती
तु जवळी राहा ऋतू खमाज गाती
नको ते किनारे फुलांचे पसारे
आतुर दोघे तरी दुरावा कसा रे
मी दीप गाते उजळत फुलवाती
तु मल्हार गाता मेघ बरसुन जाती
मी तल्लीन व्हावे तुझ्या सप्तकांनी
मग बागेश्री गावी या तारकांनी
श्वासानी फुलावे स्वरातून आता
जहर हे भिनावे तु आलाप घेता
मग स्वाधीन व्हावे मी सुरुती गावी
तू केदार गाता रात उलटत जावी
सुखांच्या सरींनी पहाट भिजूनीच यावी
ओल्या क्षणांची एक सरगम व्हावी
सुमधुर शेवटाची तू भैरवी ती घ्यावी
अशा चांद राती रोज मैफिल व्हावी
चिपळूणला आईकडे बर्याच दिवसांत एस.टी. ने गेलो नव्हतो. यावेळी का कोणास ठाऊक पण महामंडळाकडे पुन्हा वळलो .. महामंडळाच्या लाल डब्यातून असो, किंवा निम-आराम किंवा आराम बस मधून, प्रवासाला निश्चित असं वेळापत्रक असतं त्यामुळे ताशी ४०-४५ कि.मी.पेक्षा जास्त दराने अंतर कापलं जाणार नाही याची मानसिक तयारी असतेच. ती ज्यांची नसते असे महाभाग हा संपूर्ण प्रवास चरफडत पार पाडतात .. आणि इतरजण मात्र एखाद्या माहेरवाशिणिला माहेरचं एखादं काही, सासरी वेगळं काही पटल्यानंतरही जितकं खटकेल तितक्याच शांतपणाने त्या प्रवासाशी मिळतं घेत असतात. तर काल माझा असा प्रवास अनेक वर्षांनी मी अनुभवत होतो.