मुंबई लोकल ट्रेन मर्डर

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2026 - 13:46

ज्यांना अजून बातमी ठाऊक नाही त्यांना थोडक्यात सांगतो

मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात मुसळधार पावसादरम्यान दरवाजा बंद ठेवण्याच्या वादातून साधारण २१-२२ वर्षीय युवकाची एका सहप्रवाशाने भर ट्रेनमध्ये चाकूने भोसकून हत्या केली. मृत मयंक लोहार हा विरार येथील रहिवासी होता, तर आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा-भाईंदर येथील रहिवासी आहे.

दोघेही रात्री १९.४२ वाजता अंधेरी स्थानकावरून ट्रेनमध्ये चढले होते. पावसापासून बचाव करण्यासाठी डब्याचा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, रोशन सुवर्णाने दरवाजा उघडला, ज्यामुळे काही प्रवाशांवर पावसाचे पाणी आले. मयंकने पुन्हा दरवाजा बंद केला आणि यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

वाद वाढल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ झटापट झाली. डब्यात उपस्थित प्रवाशांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी मयंकला दुसऱ्या बाजूला जाऊन उभे राहण्याचा सल्ला दिला, जेणेकरून वाद मिटू शकेल. मयंकने त्यांचा सल्ला मान्य केला आणि शांतपणे दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिला, पण आरोपी रोशनचा राग मात्र शांत झाला नाही.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, तो सतत मयंकला शिवीगाळ करत होता. ट्रेन गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान पोहोचली असताना रोशनने आपल्या बॅगमधून चाकू काढला आणि मयंकवर हल्ला केला. त्याच्या छाती व पोटावर तीन-चार वार केले. मयंक जागीच बेशुद्ध झाला.

एका सहप्रवाशाने बनवलेल्या व्हिडिओमध्ये हत्येनंतर रोशन सुवर्णा रक्ताने माखलेला चाकू हातात फिरवत घाबरलेल्या प्रवाशांना धमकावताना दिसतो.

ट्रेन बोरीवली स्थानकात पोहोचताच तो ट्रेनमधून उडी मारून पळून गेला. मयंकला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

----------------------

काल याचा व्हिडिओ पाहिला ज्यात मुलगा रक्तबंबाळ होत खाली पडला होता तर आरोपी चाकू हातात घेऊन डब्यात फिरत होता. प्रत्यक्ष हल्ला त्यात नसला तरी नंतरचे ते दृश्य सुद्धा विचलित करून गेले. कारण ते मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडले होते. आयुष्य गेले माझ्या या लोकल ट्रेनने प्रवास करताना आणि आजही दोन स्टेशनसाठी का असेना मी रोज ट्रेनने प्रवास करतो. आज त्या प्रवासात हेच आठवत होते. डब्यातील इतर प्रवाशांमध्ये सुद्धा हाच विषय चालू होता. कारण मुंबई लोकल ही मुंबईतील लाखो लोकांच्या दैनंदिनीचा भाग आहे, मुंबईची लाइफलाईन आहे. तिथे जर अशी घटना घडत असेल तर पडसाद उमटणारच. जसे मुंबई लोकल बॉम्ब ब्लास्ट नंतर कित्येक काळ ट्रेन मध्ये बसले की कुठे काही अनोळखी वस्तू तर दिसत नाही ना या भीतीत किती तरी जण प्रवास करायचे तशीच काहीतरी भिती काल कित्येक कॉलेजगोइंग मुलांच्या आईबापांना वाटली असेल.

माझे वडील मला लहानपणी नेहमी सांगायचे की ट्रेनमध्ये कधी कोणाशी हुज्जत घालू नये. कोण कसा सनकी निघेल सांगता येत नाही. मी लहान वयात ट्रेनने एकटा प्रवास करून शाळेत जायचो त्यामुळेही जास्तीची चिंता असेल. पण ते कायम लक्षात राहिलेले. आज मुलीला मुद्दाम ही घटना सविस्तर सांगून तिलाही हाच सल्ला दिला. कारण ट्रेन बाबतची वाईट गोष्ट म्हणजे तिथून जीव वाचवून कुठे पळूनही जाता येत नाही. चालत्या ट्रेन मधून उडीही मारता येत नाही. तसेच कामावर येता जाता कोण कसल्या मूडमध्ये असेल काही सांगता येत नाही.

त्यामुळे मुलांना संयमाचा आणि प्रसंगी पडते घ्यायचा सल्ला देणे गरजेचे आहे. ताकद कमावणे, सेल्फ डिफेन्स टेक्निक शिकणे, धैर्य दाखवणे हे गरजेचे आहेच. पण संयम बाळगता यायला हवा. यात त्या मुलानेच संयम दाखवला नाही म्हणत त्यालाच दोषी ठरवायचे नाहीये. पण अशी वेळ आपल्या मुलांवर येऊ नये याची आपण आपल्या परीने काळजी घ्यावी इतकाच हेतू आहे.

त्या माणसाने क्षुल्लक कारणावरून इतके टोकाचे पाऊल उचलले म्हणजे तो काय लेव्हलचा सनकी असावा, कदाचित आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलाने आपल्याशी हुज्जत घातली यात त्याचा अहंकार दुखावला गेला असावा, कदाचित त्याला कामाचे प्रमाणाबाहेर मेंटल स्ट्रेस असावे, तिथल्या अपमानाचा राग इथे बाहेर पडला असावा. जे काही असेल पण आपली मुले त्या बाजूला देखील नसावीत म्हणूनही त्यांना anger मॅनेजमेंट जमणे गरजेचे आहे.

तो माणूस त्यावेळी दारूच्या नशेत होता का नाही याची कल्पना नाही. पण शक्यता असावी. कारण मर्डर करून देखील शांतपणे उतरून स्टेशनबाहेर पडला असे कित्येक सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. त्यामुळे दारू किंवा कुठलेही व्यसन जे मेंदूचा ताबा घेते त्यापासून दूरच राहिलेले चांगले. आणि तशी व्यक्ती भांडायला आली तर तिच्यापासूनही दूरच राहिलेले चांगले.

गेले महिन्या दोन महिन्यात मुंबई लोकल ट्रेन मध्ये या प्रकारच्या दोन तीन घटना घडल्याचे कानावर आले. याबाबत जागरुकता पसरणे गरजेचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे!!!
>>>व्यक्ती भांडायला आली तर तिच्यापासूनही दूरच राहिलेले चांगले.
+१ खुमखुमी त्यांची त्यांना अन्य ठिकाणी जिरवु द्यावी. रोड रेज नावाचा भयानक प्रकार आहे. जरा काही झालं की पिस्तुल काढून गाडीवर गोळ्ञा घालतात. हा अँगर इश्यु अनेकांना असतो.

रोशन दारू प्याला होता.
भांडण झाल्यानंतर मयांकने त्याला आधी ठोसा मारला. तसेच काय सहप्रवाशांनी त्याला मारहाण केली. ते प्रवासी उतरून गेल्यावर रोशनने मयांकवर हल्ला केला.

सध्या लोकांची सहनशीलता कमी होत चालली आहे. ट्रेनमध्ये साध्या साध्या घटनांनी भांडणे होतात. उन्हाळ्यात बाहेरच्या उन्हाच्या त्रासाने लोकं आधीच वैतागलेली असतात, त्यामुळे एप्रिल मे महिन्यात ट्रेनमध्ये भांडणे जास्त होतात हा अनुभव. आता पाऊस सुरू झाला की रात्री 9 नंतर पार्टी करून घरी जाणारी बरीच मंडळी असतील, त्यामुळे सावधान राहावे

ट्रेनने प्रवास करणाऱ्यांनी आपण बरे, आपला प्रवास बरा ह्या भावनेने वागावे. आता पूर्वीची मुंबई राहिलेली नाही हे खरे

रोड रेज वरून आठवले, मुंबईत काही ठिकाणी रेज रूम्स आहेत तिथे जून टिव्ही, बाटल्या वगैरे ठेवलेल्या असतात. आपला राग ते सगळं फोडून भावनांचा निचरा करावा असे म्हणतात.

सध्या लोकांची सहनशीलता कमी होत चालली आहे, आणि गोंगाट अनेक पटींनी वाढत चालला आहे.

जगात कुठे काही चांगलं घडतच नाही का..? हा प्रश्न गेले काही वर्षे रोजच पडतोय.

मला यावरून एक प्रसंग आठवला. सुरवातीला एका कंपनीत जॉब करत होतो तिथला सिक्युरिटी up चा भैय्या होता. आम्हाला कंपनीने राहायला रुम्स दिल्या होत्या. बाथरूम कॉमन होतं. तर एक दिवस माझा रूममेट अंघोळीला गेला होता आणि इतक्यात तो भैय्या पण आला. भैय्याला घाई होती म्हणून तो जोरात दार वाजवून जल्दी करो ओरडत होता. माझ्या रूममेटची सटकली तावातावाने तो बाहेर आला आणि शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. ती बाचाबाची वाढून नंतर हाणामारीला सुरवात झाली. मी झोपलो होतो. बाहेर बाजार झाला म्हणून बघायला गेलो तर हे दोघे अंडरपँट घालून उघडे एकमेकांना मारत होते. मग आम्ही एक दोघांनी मध्यस्ती करून दोघांना दूर केलं. जास्त काय कोणाला लागलं नाही. कंपनीने दोघांना समज दिली आणि प्रकरण मिटलं. ती मारामारी सुरू होती तेव्हा आजूबाचूचे लोकं मस्त मजा बघत उभे होते. आजपण कधी त्या गोष्टीचा विषय निघतो तेव्हा रूममेट बोलतो त्यावेळी कंट्रोल करायला पाहिजे होतो. त्यामुळे भांडणं करू नयेत भले समोरच्याची चूक असेल तरी. असा कोणी भेटला तर शक्यतो त्याच्या तोंडाला न लागता तिथून लांब जावे.

>>>>>>जगात कुठे काही चांगलं घडतच नाही का..? हा प्रश्न गेले काही वर्षे रोजच पडतोय.
स्वतःला सांभाळाअयचे. फक्त सकारात्मक बातम्या वाच. राज अज्ञानी यांच्या 'बातम्यांच्या' धाग्यावरती मी शेअर करत जाइन.

सामो,
कुणी काहीही म्हणो, म्हणजे पूर्वी बातम्या एव्हढ्या येत नसतील किंवा काहीही, लोकांमधे पेशन्स खूप कमी झालेत हे रोज अनुभवाला येत असतं. रस्त्यावर तर ज्याची चूक आहे त्याला ए असं ओरडलेलंही चालत नाही. सगळीकडचे स्ट्रेस रस्त्यातच निघतात कि काय असं वाटतं. किंवा मग सोशल मीडीयावर.

अलीकडील घटनांतून घेण्यासारखा धडा…
आजच्या काळात शांत, सुरक्षित आणि सन्मानाने जगायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
• रस्त्यावरचा अनावश्यक आक्रमकपणा एकदम निषिद्ध करून टाका. ( No Road Rage)
• अनोळखी लोकांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका.
• सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक वाद घालू नका.
• प्रत्येकाशी राजकारणावर वाद घालणे आवश्यक नसते.
• अनेकदा एक पाऊल मागे घेणे, प्रसंगी “ठीक आहे” किंवा “माफ करा” म्हणत पुढे निघून जाणे, हेच खरे शहाणपण असते.
• सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान वाद निर्माण होण्यासारखी सिच्युएशन असेल तर ती स्वतः हँडल करण्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची त्वरित मदत घ्या जसे की पोलीस, रेल्वे पोलीस, यंत्रणा सुरक्षा यंत्रणा इत्यादी

कारण एखादा वाद हाताबाहेर गेला, तर आजूबाजूला शेकडो लोक जमतील; पण मदतीसाठी प्रत्यक्ष पुढे येणारे फार थोडे असतात.

आज आपल्या समाजासमोरचा सर्वात मोठा संसर्गजन्य रोग कोणता, तर

असंयम, आक्रमकता, असहिष्णुता आणि प्रत्येक मतभेदाला संघर्षात बदलण्याची वाढती प्रवृत्ती.

स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.

अहंकारापेक्षा संयम मोठा.
वादापेक्षा संवाद मोठा.
आणि खोट्या विजयापेक्षा सुरक्षितपणे घरी परतणे अधिक महत्त्वाचे.
शांत राहा. संयमी राहा. सुरक्षित राहा.

डॉ प्रशांत भामरे.
X वर डॉ भामरे यांचे विचार
सगळं पटलं पण कायद्याच्या मदतीचा मुद्दा चालत्या ट्रेनमध्ये कितपत यशस्वी होईल हे त्या यंत्रणेला प्रतिसाद द्यायला मिळणारा वेळ, त्या लोकांचे स्वभाव यावर अवलंबून आहे.
बाकी लक्षात ठेवावं असं सुचवलय त्यांनी.

इथे पुरूषाने पुरूषाला भोसकले त्यामुळे कोणाला सोमिवर चघळण्यात इंटरेस्ट नाही. मजा म्हणजे "पुरूषच पुरूषाचा शत्रु असतो" वगैरे फिलाॅसाॅफीही झाडत नाही अशावेळी. पण हेच एका महिलेने दुसरूया महिलेला भोसकले असते तर?? कल्पना करा किती गहजब झाला असता.
आता यात जातीचा/धर्माचा ॲन्गल निघाला तर येतील लोक आपापल्या सोयीची पोझिशन घेऊन. तोवर शांतता.

>>> इथे पुरूषाने पुरूषाला भोसकले त्यामुळे कोणाला सोमिवर चघळण्यात इंटरेस्ट नाही. मजा म्हणजे "पुरूषच पुरूषाचा शत्रु असतो" वगैरे फिलाॅसाॅफीही झाडत नाही अशावेळी. पण हेच एका महिलेने दुसरूया महिलेला भोसकले असते तर?? कल्पना करा किती गहजब झाला असता.
आता यात जातीचा/धर्माचा ॲन्गल निघाला तर येतील लोक आपापल्या सोयीची पोझिशन घेऊन. तोवर शांतता.
=====

अप्रतिम भरकट

सुनिती, जातीधर्माचा angle निघाला असता तर चित्र वेगळे असते हे कबूल. माझ्याही हे काल डोक्यात आले होते की नशीब प्रकरणाला ते वळण लागले नाही. यात मूळ मुद्दा बाजूला राहतो.

पण पुरुषाने पुरुषाला भोसकले हे काय नवीन?
इतिहासातील सर्व लढाया पुरुषांनीच पुरुषांना भोसकून झाल्या आहेत. तरी शाळेत इतिहास शिकताना हे कधी डोक्यात नाही आले.

कमाल आहे. एक तरुण चाकुचे वार झेलत असताना कोणिहि त्या हल्लेखोराला थांबवलं नाहि? आणि हे मुंबईतल्या लोकल ट्रेनमधे घडलं हे पचायला जड जातंय...

दत्तात्रेयजी छान पोस्ट..!

अतिशय धक्कादायक आणि निंदनीय घटना आहे. लोकलमध्ये नेहमीची भांडणं, मारामाऱ्या नवीन नाहीत पण हि घटना आणि त्या घटनेचा विडियो पाहून जीवाचा थरकाप उडाला. एक खून पाडून वर हातात सुरा धरून संपूर्ण डब्यात ज्या प्रकारे दहशत त्या खूनी व्यक्तीने माजवली होती ती पाहून असं वाटते की, रागाच्या भरात त्याच्या हातून गुन्हा घडला नसून खूनी अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीचा असावा.. त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजेच.

माझे वडील मला लहानपणी नेहमी सांगायचे की ट्रेनमध्ये कधी कोणाशी हुज्जत घालू नये. कोण कसा सनकी निघेल सांगता येत नाही. >> अगदी बरोबर, कोणाचा सणकीपणा आणि दुखावलेला अहंकार कुठल्या थरापर्यंत जाईल त्याचा भरोसा नाही. त्याचे गंभीर परिणाम विनाकारण निष्पाप माणसांना भोगावे लागतील त्यापेक्षा आपणच स्वतःला संयमित ठेवलेलं बरं.. कोण कधी यमाच्या रूपात पुढ्यात उभा ठाकेल सांगता येत नाही. काही वेळेला सहनशक्ती संपते पण अश्या घटना घडताना पाहून जीवाचं मोल समजते. ' माणसा रे माणसा , कधी व्हशीन मानूस..! ' हे असं ऐकलं / वाचलं की , बहिणाबाईंच्या कवितेतली हि ओळ आठवते.

मी मुलाला सांगून ठेवलंय चुकून पण कुणाशी लोकलमध्येच नाहीतर कधीच कुठेही वाद घालू नको तसा तो खूप शांत आहे पण तारुण्यातलं रक्त कधी सळसळेल सांगता येत नाही..

बऱ्याच वर्षापूर्वी मी ज्या ट्रेनमधून प्रवास करायचे त्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता... ट्रेन साइडिंग ट्रॅकला होती आणि डब्यातल्या लोकांनी मध्यस्थी केली आणि रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढची अनुचित घटना टळली. एकदा तर दोघांनी सीटवर बसण्याच्या जागेवरून एका वयस्कर व्यक्तीला एवढी मारहाण केली की, त्या व्यक्तीचे समोरचे दोन दात तुटले. पिडीत रेल्वे पोलिसांकडे तक्रार करायला जाईपर्यंत दोघे बिनधास्त उतरून निघून गेले. अक्षम्य असा गुन्हा करून वरून तोंड वर करून फिरायची बेफिकीरी येते कुठून लोकांकडे समजत नाही.

रुपाली छान पोस्ट

राज, मुंबईत असे काही घडले की लोकं मध्ये कसे पडले नाहीत असा प्रश्न पहिले मनात येतो.
कदाचित मुंबई पब्लिक बदलली असावी.
कदाचित उशीराची वेळ असल्याने असेल कारण पीक वेळेत बरेचदा ग्रूप असतात जे एकजुटीने आवाज उठवतात.
डबा सुद्धा फर्स्ट क्लास असल्याने असेल.
हातात चाकू असताना तो मारणाऱ्याचा आवेश कसा आहे हे सुद्धा महत्त्वाचे. शेवटी आपला जीव सांभाळूनच मध्ये पडले जाते.
या चाकू हल्ल्याच्या आधी लोकांनी मिळून त्याला दमदाटी केली होती ज्यात हा मुलगा त्यात पुढे होता.

पण हो, एके काळी हा विश्वास असायचा की वाद वाढल्यास मुंबईची पब्लिक मध्ये पडते. किंवा कोणी चोरीमारी, महिलांची छेडखानी किंवा ज्यादा हुशारी करत असेल तर त्याची पब्लिक धुलाई होते. तो आता तितका राहिला नाही.