
भेटला मज एक अनोळखी आज,
मनमेळ झाला, झाली सुरू मग गाज।
गाजेत आल्या कित्येक गोष्टी,
त्याच्या नि माझ्या मनातल्या कोष्टी।
तो अन मी आधी कधीच भेटलो नाही,
तरीही माझं त्याच्यापासून काहीच दडलं नाही।
तो मज वाचत होता जणू पुस्तकासमान,
पाठचे, पुढचे, आजचे—सर्व अध्याय घुमान।
काय म्हणू मी यास, काय करू या आभासास,
भेट आमुची क्षणभंगुर—जणू स्वप्निल प्रकाश।
जसे भेटलो अचानक तसेच वेगळेही झालो,
काही प्रश्न सुटले, काही अनुत्तरित—मी एकटाच उरलो।
स्थळ: हिंदुजा हॉस्पिटल – इमर्जन्सी
तारीख: १३/०४/२०२६
वेळ: साधारण ४ वाजता
काही भेटी ओळखीने सुरू होत नाहीत…
त्या अचानक येतात—अगदी नकळत—पण तरीही कुठेतरी आधीच ठरल्यासारख्या.
ही तशीच एक भेट.
डॉ. विनायक पोर्वाल—JJ Hospital चे माजी न्युरोलॉजी प्रमुख.
एकेकाळी त्यांनी जगाच्या मोजमापानुसार “यश” मिळवलं होतं.
डॉक्टर म्हणून नाव, नंतर उद्योगजगतात प्रवेश, Ranbaxy, German Remedies सारख्या कंपन्यांमध्ये नेतृत्व, आणि Batliboi सारख्या अभियांत्रिकी संस्थेचंही मार्गदर्शन.
पण मग… वयाच्या पन्नाशीत त्यांनी सगळं सोडलं.
काही गमावलं म्हणून नाही.
काही उरलं नाही म्हणूनही नाही.
कदाचित… “आता पुढे काय?” या प्रश्नाचं उत्तर तिथे नव्हतं म्हणून.
पुढील दोन पिढ्या काहीच न करता जगू शकतील इतकं त्यांनी कमावलं होतं.
पण त्यानंतर सुरू झाला तो वेगळाच प्रवास.
१९५१ साली उदयपूरजवळच्या एका छोट्या गावात जन्मलेला हा माणूस—आज ७५ वर्षांचा—कुठेतरी अधिक हलका वाटतो… जणू स्वतःच्या आयुष्याचं ओझंही त्याने उतरवलंय.
त्यांना एक मुलगा—सुमित.
सर्वसामान्य, स्थिर, शांत आयुष्य जगणारा.
जगाच्या दृष्टीने कदाचित “काही विशेष नाही” असं म्हणता येईल असं आयुष्य.
पण डॉ. पोर्वाल जेव्हा त्याच्याबद्दल बोलले, तेव्हा तिथे अपेक्षा नव्हती… फक्त स्वीकार होता.
“तो आमच्यावर खूप प्रेम करतो,” ते म्हणाले.
“या वयात जी सुश्रुषा तो करतो… तेवढंच पुरेसं आहे.”
त्या क्षणी जाणवलं—
यशाची व्याख्या कधीतरी शांतपणे बदलून जाते.
गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी हिमालय पालथा घातला.
पर्यटक म्हणून नाही… शोधक म्हणून.
त्या प्रवासात काही लोक भेटतात—जे स्वतःबद्दल काही सांगत नाहीत…
पण जे जाणतात, ते शब्दांपलीकडचं असतं.
अशाच एका भेटीतून त्यांना मिळाली एक विलक्षण विद्या—
चेहरा वाचण्याची.
भूतकाळ… वर्तमान… भविष्य.
हे इथवर ऐकलं, तर कदाचित तेवढं विशेष वाटणार नाही.
पण पुढे जे होतं, ते सामान्य नव्हतं.
ग्रहांची अचूक स्थिती, बारा भाव, नक्षत्रं… अगदी जन्मवेळसुद्धा.
ही विद्या पुस्तकातून नाही आली.
ती दिली गेली… आणि स्वीकारली गेली.
आतापर्यंत ते माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते.
आणि तरीही… काल, फक्त वीस मिनिटांत, त्यांनी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या—
ग्रहस्थिती, जन्मवेळ, आणि आयुष्यातले ठळक उतार-चढाव…
फक्त माझ्या चेहऱ्याकडे पाहून.
जणू ते काही नवीन सांगत नव्हते—
फक्त मला माझ्याच गोष्टी आठवण करून देत होते.
ते अजून बरंच काही सांगू शकले असते.
पण त्या क्षणी… ते स्वतः रुग्ण होते.
BP आणि किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल.
तरीही त्यांच्यात कुठलीही घाई नव्हती.
कुठलाही ताण नव्हता.
जणू शरीराचंही जे काही चाललं होतं, ते फक्त एक टप्पा आहे… इतकंच.
माझ्या आयुष्यात प्रथमच मला अशी व्यक्ती भेटली—
ज्याच्याकडे ज्ञान आहे… पण त्याचा गाजावाजा नाही.
ज्याच्याकडे क्षमता आहे… पण त्यात अहंकार नाही.
ही विद्या दुर्मीळ आहे.
किंवा कदाचित…
ती फक्त त्यांनाच दिसते, जे तिला भेटायला तयार असतात.
मला ठाऊक नाही.
पण एवढं नक्की—
काही भेटी अपघात नसतात.
त्या घडतात…
काहीतरी सांगण्यासाठी…
किंवा कदाचित… काहीतरी जागं करण्यासाठी.
रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास त्यांनी स्वतःहून रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला.
आपत्कालीन विभागातून बाहेर पडताना, त्यांनी क्षणभर थांबून माझ्याकडे पाहिलं…
आणि एकच वाक्य म्हणाले—
“लक्षात ठेव… देव आहे.”
ते वाक्य सल्ला नव्हतं.
ते उपदेश नव्हतं.
ते फक्त… एक स्मरण होतं.
मंगळवार, १४/०४/२०२६
सकाळी ७
अजय सरदेसाई – मेघ
टीप: वरील घटना पूर्णतः सत्य आहेत. त्यांच्या विनंतीनुसार नाव बदलले आहे.
“लक्षात ठेव… देव आहे.”
“लक्षात ठेव… देव आहे.”
असे लिहूनही इथे अजून एकही प्रतिसाद नाही हे आश्चर्य आहे.
भावना आवडली.
भावना आवडली.
कृपया व्यनि बघाल का?
कृपया व्यनि बघाल का?
व्यनि?
व्यनि?