
जलधारा झंकारत बरसल्या,
मन झाले चिंब।
इंद्रधनूच्या कमानीतून
उमटले निसर्गबिंब॥
स्फुरल्या मज काव्याच्या ओळी,
शब्दांना पावसाची झिंग;
नभ मेघांनी आक्रमिले,
पसरला नभी धुंद प्रेमरंग॥
वाऱ्याची कुजबुज रानात,
जणू चहाडी पानांच्या कानात;
पानांची वाढली सळसळ,
उठली चलबिचल मनात॥
वसुंधरा ही व्याली,
बियांना कोंब फुटले;
मातीचा सुगंध दरवळता,
निसर्गाचे जडत्व सरले॥
प्रेमाची धुंदी चढली,
मेघांचे मन गहीवरले;
बाहुपाशात एकमेकांच्या,
धरा नि मेघ विरघळले॥
मेघ कोसळून स्वतः संपतो,
धरेस फुलवाया जीव अर्पितो;
प्रेमाची ही कैफियत सारी
निसर्ग स्वतःच सांगतो॥
धरा ती कृतघ्न नाही;
वैशाखात करपून जळते।
मेघाची वाफ अलवार
पुन्हा नभात सोडते॥
पुन्हा येती पावसधारा,
पुन्हा सृष्टी हिरवी फुलते।
काय वर्णन करू प्रकृतीचे,
जे या सृष्टीतच उमलते॥
मेघ-धरेच्या या मिलनात
अमृतानुभव दडला;
शिव-शक्तीचा साक्षात
अंतरी साक्षात्कार मज घडला॥
रविवार, ८/३/२६ , ०१:०४ PM
अजय सरदेसाई -मेघ
आवडली.
आवडली.