“मेंटेनन्स मोड”

Submitted by दक्षिणा on 2 February, 2026 - 02:44

साध्या शब्दांत सांगायचं तर, मशीनच्या बाबतीत मेंटेनन्स मोड म्हणजे नवीन काही तयार करणं, वेगाने धावणं, सतत सिद्ध करत राहणं थांबवणं.
नवीन अपडेट्स थांबवणं. फक्त आवश्यक तितकंच काम करणं. काही बिघाड झाला असेल तर तो तपासणं. जुन्या फाईल्स मेमरीतून काढून टाकणं आणि स्वतःला स्थिर कसं ठेवायचं हे पावलोपावली ठरवणं.
माणसाच्या आयुष्यातसुद्धा असा एक मेंटेनन्स मोड येणं गरजेचं असतं ....... आणि तो येतोच.

एका विशिष्ट वयात सतत “आता काहीतरी मिळवायचं आहे” या धावपळीपासून स्वतःची सुटका करून घेणं आवश्यक ठरतं. स्वतःला विचारावंसं वाटतं कि मी आतापर्यंत जे करत आलेय, ते करून थकलेय का?
तेव्हा एखाद्या गोष्टीकडे अधिक समजूतदारीने पाहायला सुरुवात होते.

अपेक्षा कमी होतात. नात्यांकडे, शरीराकडे, आणि मनाकडे शांतपणे पाहून त्याचं विश्लेषण केलं जातं. या सगळ्या प्रक्रियेत इतरांना खूश ठेवण्याकडून लक्ष हळूहळू स्वतःकडे वळतं.
पण बऱ्याचदा हा बदल घडतो तेव्हा आपण स्वतःलाच सांगतो कि मी हरलेय.

ही हार नसते.
हा आपल्या दुरुस्तीचा काळ आहे हे आपण सोयीस्करपणे टाळतो.
कारण त्या रेसमध्ये धावणं आपल्याला सवयीचं झालेलं असतं.
ती रेस सोडून काही वेगळं करणं अचिव्हमेंट नाही, असं आपण स्वतःशीच ठरवून टाकलेलं असतं.
वेगाची सवय आपल्याला त्या रेसमधून बाहेर पडू देत नाही.
लहानपणी आपल्या घरातली किंवा आजूबाजूची काही माणसं आपल्यासाठी रोल मॉडेल्स असतात. त्यांच्यासारखं व्हायचं असतं, त्यांच्यासारखी यशाची शिखरं गाठायची असतात.
पण कधीतरी यालाही अंत येतो. त्यांच्या जागी आपण येतो आपल्या अनुभवांमुळे.
आणि तरीही, आपल्यालासुद्धा रिप्लेस करणारी पुढची पिढी तयार होतेय
हे सत्य आपण हळूच नाकारत राहतो.

पण सत्य नग्न असतं. आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
काही वर्षं आयुष्य पूर्ण वेगात धावत असतं. स्वप्नं गाठायची असतात,
लोकांना खूश करायचं असतं, स्वतःला सतत सिद्ध करत राहायचं असतं.
आणि मग हळूहळू… एक दिवस लक्षात येतं......
थकवा आहे, पण सांगता येत नाही.
मन भरलेलं आहे, पण कारण सापडत नाही.
तेव्हा माणूस मागे सरकत नाही. तो फक्त मेंटेनन्स मोडवर जातो.

या मोडमध्ये आयुष्य शांत होतं. मोठे निर्णय थांबतात.
नवीन स्वप्नं नसतात, मोठी धावपळ नसते.
फक्त स्वतःकडे पाहण्याइतकी हिंमत असते.
या काळात माणूस जुन्या जखमा तपासतो, काही अपेक्षा delete करतो,
काही नाती archive मध्ये ठेवतो, आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकतो.
हा काळ एकटा असतो, पण रिकामा नसतो.

इथे माणूस मोडत नाही तो आतून हळूच दुरुस्त होत असतो.
कधीतरी एका विशिष्ट वयात या मेंटेनन्स मोडचं कारण स्पष्ट होतं.
आणि प्रत्येकाने कधीतरी या मोडमध्ये जाणं गरजेचं असतं.
कारण आपण आयुष्यभर स्पर्धा करत, जिवाच्या आकांताने धावू शकत नाही.
कुठेतरी थांबणं गरजेचं असतं. कुठेतरी पूर्णविराम घेणंही जगण्याचाच एक भाग असतो.
*********************************************************************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Relax - Rethink- Rebalance- Revamp- Rebuild.

खूप छान लिहिलेत. विचारयोग्य, कृतीयोग्य. ❤

छान लेख आहे. आवडला हा विचार आणि मांडणी.. आणि आयुष्यातला मेंटेनन्स मोड ही संकल्पना.

स्वतःबाबत पडताळून पाहिले तर लग्नानंतर मी लागलीच या मोड वर गेलो आहे. आणि मुले झाल्यावर तर नांगरच टाकला आहे.
नवीन कुठलेही वैयक्तिक ध्येय साध्य करायची किंवा अप्राप्य गोष्ट मिळवायची इच्छा नाही. जे आहे तेच एन्जॉय करायला आयुष्य कमी पडेल अशी मनात भावना आहे.
महत्त्वाकांक्षी असणे चांगली गोष्ट आहे. पण नसणे सुद्धा वाईट गोष्ट नाही. शेवटी हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर आहे. आपण आपल्या स्वभावाशी प्रामाणिक राहावे. आणि तेच महत्वाचे असे वाटते.
आयुष्य जगायची लालसा मात्र वाढली आहे. आणि ती तशीच अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहावी एवढीच इच्छा आहे Happy

खूप छान!!
अगदी अचूक मांडणी केली आहेस. मेंटेनन्स मोडमध्ये आता पोहोचलो हे वेळीच लक्षात येणे आवश्यक.

सुपर्ब.

सुदर लेखन! लेख आवडला!!

- (मेंटेनन्स मोडमधे असलेला) सोकाजी

विचार आवडला आणि पटलाही. पण ही विश्रांती मात्र नव्हे. या काळात आपल्या आयुष्याचा अर्थ शोधायला सुरुवात होत असावी. ते बरंच अवघड काम आहे. बर्‍याचदा ते टाळण्यासाठी रुटीन सोडवत नाही.

दक्षिणा,
हॅट्स ऑफ
खूप मस्त लिहिल आहे.
कदाचित आयुष्यात हा मेंटेनन्स टप्पा आला आहे असे वाटते आहे.
या सगळ्या प्रक्रियेत इतरांना खूश ठेवण्याकडून लक्ष हळूहळू स्वतःकडे वळतं.>>>>>> खरच.
एका टप्प्यात इतरांना आपल्याकडून काय पाहिजे पेक्षा आपल्याला काय पाहिजे, कशात आनंद वाटतो आहे हे महत्वाचे वाटू लागते.
खूप छान लिहिलेत. विचारयोग्य, कृतीयोग्य>>>>> +११११
लिहित रहा

छान लेख आहे. आवडला हा विचार आणि मांडणी.. आणि आयुष्यातला मेंटेनन्स मोड ही संकल्पना.+११
Welcome बॅक
काल भेट झाली आणि आज लेख आलाच की!
आता येऊ देत असंच नवनवीन लिखाण Happy

वाह!
बऱ्याच दिवसांनी इथे व्यक्त झालीस. कालच्या गटगचा परिणाम? Happy

rmd इथे बरेच दिवस येतेय फक्त कमेंट्स करायला . सगळं नवीन पब्लिक आहे त्यामुळे लिहिण्याचे धाडस नव्हते होत .

दक्षिणा, प्रजा बदलली तरी क्वीन क्वीनच असते.
विम्बल्डनला खेळाडू बदलले पण राणी तीच राहिली. राणीने असं म्हणावं धाडस होत नाही, तर मग आम्हा गरीबांनी काय करावं ?

छान लिहिले आहे दक्षिणा. Happy
मी खूप वर्षं सगळे जुजा आहेत म्हणून लिहिले नव्हते आणि तू सगळे नवीन आहेत म्हणून- हे नाही चालणार. आपण एकदाच - एकत्र राहून लिहू शकतो.

नवीन पब्लिक कसली येतेय मायबोलीवर. तीच तीच लोक नवीन आयडी घेऊन येतात म्हणा हवे तर. सक्रिय सभासदात पंचवीस तर माझेच असतील Happy

अरे काय छान लिहिलंय!
_______________________________
>>मेंटेनन्स मोडमध्ये आता पोहोचलो हे >> कधी समजते?
१. प्रथम इतरांच्या लक्षात येते. म्हणजे आपण एरवी चालतच असतो पण ते मेडिकल टेस्टमध्ये त्या एका पट्ट्यावर चालतात तसे चालतोय हे लोक ओळखतात.
२. परिस्थिती वेगळेच वळण घेते मग अंगणात ठेवलेले झाड घरात ठेवल्यावर जसे निस्तेज होत जाते तसे होते.
३. आजुबाजुचे लोक अगोदर कौतुकं करत असतात ते टाळताहेत ही एक गोष्ट कारण झालेली असते.
४. कधी लोकांकडून काहीच विरुद्ध होत नाही पण कुठेतरी आर्थिक मार खाल्लेला असतो किंवा खरेदी केलेली वस्तू समाधान देत नसते.
५. कुटुंबातील कुणाचा मृत्यू होतो किंवा आजारपणही कारण होते.
६. कुटुंबात किंवा बाहेर आपल्यापेक्षा अधिक क्षमतेच्या व्यक्तिचं पदार्पण म्हणजे रेषा तीच असते पण त्या बाजूला दुसरी अधिक मोठी रेषा कुणी काढतं आणि आपली रेषा छोटी ठरते. हे मनाला उभारी देत नाही.
७. काही व्यक्ती फक्त मी माझे असाच विचार करण्यात कायम गुंग असतात त्यांना हे स्थित्यंतर येऊ शकते पण जे कायम दुसऱ्यांचाच विचार करण्यासाठीच जगत आहेत त्यांना ही व्याधी सतावत नाही.

छान लिहीलय;
पण
The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

Pages