रानमेवा

Submitted by किरण कुमार on 29 May, 2025 - 03:15

"साळा सुटल्यावर सरळ घरला या इहिरीवर उलथू नका,कालच आमुश्या झालीय,करी हाय आज"
आबानी भरलेला दम कानावर पडताच अंकुशने दप्तरात कोंबलेला टॉवेल परत खुंटीला अडकवला. उन्हाळ्याची सुट्टी असली तरी दाहावीचे वर्ष असल्याने शाळेने जादा तास ठेवले होते,दुपारी हे तास संपले की दहावीची बहुतेक टाळकी पाटलाच्या विहिरीवर लाडूवर माश्या बसाव्या तशी जमायची.चांगली तीन परस खोल आणि पस्तीस चाळीस फूट रुंद असलेल्या त्या विहिरीला बारमाही पाणी असायचे.पाण्यातला लपंडाव ते एखादी जड वस्तू लपवून पुन्हा शोधणे वगैरे असे बरेच खेळ तिथे रंगायचे.गेल्या काही वर्षात आमवस्या पौर्णिमेला घडलेल्या काही वाईट घटनांमुळे सहसा या दोन्ही दिवशी विहिरीवर जाण्यासाठी घराघरात अघोषित बंदी होती.पोरं मात्र 'काय अंधश्रध्दा आहेत' असे म्हणून गपचूप का होईना पोहायला जायची. आबाचा स्वभाव तसा कडक होता,राग आला तर निब्बार हाताचे तडाखे द्यायला आबा विचार करायचा नाही याची जाणीव असल्याने अंकुशने आज पोहायला जायचे नाही असे ठरवले.

अहमदनगर सारख्या शुष्क आणि कोरड्या जिल्ह्यातही निळवंडा धरणाच्या कालव्याचे पाणी गावात पोहचल्यामुळे पिंपळगाव सारखे दुष्काळी गाव सुजलाम सुफलाम झाले होते.कधी काळी फक्त जोंधळयावर जगणारे गावकरी आता गहू आणि ऊसही पिकवू लागले होते.कर्मवीर भाऊराव पाटलांच्या उपकाराने उभ्या झालेल्या गावातील न्यु इंग्लिश स्कूलच्या एका दगडी बांधकाम असलेल्या वर्गाच्या खिन्न खिडकीजळच्या बाकावर अंकुशने दप्तर टेकवले तोच त्याच्या कानावर चंद्रकांतचे स्वर धडकले."अंक्या, डोंगराला जायचे का आज सांगवीच्या,संध्याकाळपर्यंत येऊ परत,जाळीला लय भारी करवंद लगाडल्यात"
"आरं पण क्लास ........, सरांना कळाले तर इथही फटके पडतील आणि घरी आबाचे वेगळे"
"कुठं कोणाला कळणार हाये,वढ्याच्या वाटंनं गेलो तर दुपारीच परत येऊ,आन एक दिवस नाही क्लास केला तर काय हुतय" जेमतेम काठावर पास होणारा चंद्या काय पिछा सोडत नव्हता.
"हमम... तसपण आज पव्हायला जायला जमणार नाय,चल निघू लगेच कोणी इथ बघायच्या आत " अंकुशने दप्तर खांद्यावर टाकले.

दोघेही ओढ्याच्या बाजुने असलेल्या पायवाटेने चालू लागले. जवळचा रस्ता असला तरी भरपूर वेळ खातो हे चंद्याला माहीत होते पण त्याने हवेत सोडलेले बाण योग्य ठिकाणी लागले होते.अंकुश तसा अभ्यासात चांगला होता,दिनु मास्तरचा तर फार लाडका विद्यार्थी होता कारण गणितात बहुतेक वेळा पैकीच्या पैकी गुण घेणारा तो एकमेव विद्यार्थी होता.दिनु मास्तरचे शिक्षणही त्याच शाळेत झाले होते आणि आता शिक्षक म्हणून तिथेच नोकरी मिळाल्यामुळे गेली चाळीस वर्षे त्यांचे शाळेशी ऋणानुबंध जोडले गेले होते.मुलांवर त्यांचा फार जीव होता. दहावीचे जादा वर्ग सुरु करयाची शक्कल पण त्यांचीच. गावातल्या प्रत्येक घरात त्यांना आदर होता. अंकुश आज जरा वेगळ्याच धुंदीत होता.अभ्यास करायची इच्छा तर अजिबातच नव्हती कदाचित म्हणूनच चंद्याबरोबर डोंगराकडे निघाला होता.'आपण कितीही लपवले तरी आबांना कळणार' ही शंका अजूनही त्याच्या डोक्यात घोळत होती. 'बघू पुढचे पुढे' असे पुट्पुटत पावलांचा वेग वाढला होता.
दगडगोट्यांच्या मधून निघालेले खुरटे,वाढलेले गवत तुडवत आणि निरभ्र आकाशात तापणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून तासाभरातच हे दोन मावळे डोंगर पायथ्याला पोहचले. पुढचा प्रवास जरा दमवणारा आणि वेळ खाणारा असला तरी गावच्या मातीत तयार झालेल्या त्यांच्या शरीराला त्याची सवय होती. तसे करवंद मिळविण्यासाठी अगदी डोंगरमाथ्याला जायची गरज नव्हती कारण अर्ध्या वाटेत पाहिजे तेवढी करवंद डोंगर उताराला लगडली होती. डोंगरावर खंडोबाचे छोटे मंदीर असल्यामुळे डोंगरावर आलेला कोणीही माथ्यावर जाऊन खंडोबाचे दर्शन घ्यायचा. अंकुश आणि चंद्रकांत त्याला अपवाद नव्हते.दर्शन घेऊन येताना त्यांनी काळ्या मैनेवर ताव मारला.बाहेरून लालसर काळीकुट्ट आणि आतून लाल पांढरी रसरशीत फळे पाहूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते.नुसत्या ओठांनी दाबून टचकन फूटणारी आणि जीभेवर तुषार उडवत अमृताचा आनंद देणारी ती फळे आज त्यांना भलतीच आवडली होती.
"यंदा लय गॉड लागल्यात बघ,मागल्या बारीनं वाईस कडवट हुती" चंद्याने दप्तरातून दोन पिशव्या काढल्या तेव्हा हे महाशय तर सकाळपासून डोंगराला जायचे आहे हे ठरवून आल्याचे अंकुशच्या लक्षात आले.
म्हणता म्हणता दोन्ही खताच्या पिशव्या जरा अर्ध्याच्या वर त्यांनी भरल्या,राहीलेल्या भागाला मस्त पिरगाळून दोन्ही पिशव्या धान्याच्या गोणी उचलावी तशी फिरवून खांद्यावर चढविल्या , गायरानाच्या जवळच एक झाड आपल्या प्रत्येक फांदीला चांगली बोटाच्या दोन पेराएवढी टपोरी जांभळं घेऊन उभे होते. झाड कोणाच्या शेतात नसल्यामुळे कुणी हटकणारे नव्हते. दप्तराच्या रिकाम्या जागेत जमतील तेवढी जांभळे कोंबून मावळे परतीच्या प्रवासाला लागले. दूपार टळून गेली होती येताना आमराईच्या रस्त्याने गेलेले बरे असा विचार करुन त्यांनी दुसऱ्या बाजूने डोंगर उतरायला सुरुवात केली.सूर्य अस्ताला जाऊ लागला तेव्हा आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याचे त्यांना कळून चुकले होते.त्यात आज गुरुवार असल्यामुळे म्हणजे आबाला सुट्टी होती त्यामुळे घरी गेल्यावर जोड्याने जंगी स्वागत होण्याची शक्यताही जास्त होती.

घराजवळ गेल्यावर अंकुशचा धाकटा भाऊ पळतच जवळ आला आणि म्हणाला "आबा आणि दिनु मास्तर तुझी वाट बघत्यात घरी,चल आबानी तुला शोधायला पाठवलय मला"
अंकुशच्या खांद्यावरची काळी मैना खताच्या पिशवीसह गळपटली,चंद्याने मागच्या मागे न सांगता धूम ठोकली होती.आता मास्तर आणि आबाचे फटके एकत्र खायला लागणार हा विचार करुन त्याचेही अवसान गळायला लागले.
'च्यायला एक दिवस क्लास बुडविला तर मास्तरने घरी यायची गरज आहे का?'त्याला त्याच्या लाड करणाऱ्या दिनु मास्तरचा राग आला होता.
'पण झाले ते झाले,काय होईल ते बघू ,सांगू सरळ खरं खरं,काय खायचा तो मार एकदाच खाऊ' अंकुशने मनाचा निर्धार केला आणि घरात शिरला .
"या सरदार या,कोणता किल्ला जिंकून आले आपण ?, पिशवीत काय,अरे वा खजिना पण लुटला आहे वाटते ?" दिनु मास्तरचे ते उद्गार गरम तेलाप्रमाणे कानावर आदळले तशी अंकुशने मान खाली घातली.
"अरे तुम्हा पोरांना दाहावीला चांगले मार्क पडावे म्हणून आम्ही जादा क्लास फुकटात घेतो आणि तुम्ही क्लास बुडवून डोंगराला फिरता,आम्हाला काय हाऊस आहे का बिनपगारी क्लासचे धंदे चालवायची" बोलता बोलता दिनु मास्तर अंकुशच्या जवळ आले होते, हात वर करुन कान पकडतात की असा भास अंकुशला झाला पण .....
"शाब्बास" पाठीवर थापवर थाप पडत गेली ……
"नाव काढलस तू शाळेचे आणि माझे, हे घे तुझ्यासाठी हे पेन बक्षिस म्हणून आणले आहे मी "
अंकुशचा चेहरा कावराबावरा झाला होता, काय चालले आहे त्याला काही कळाले नाही.
"म्हणजे?" प्रश्नार्थक नजरेने त्याने दिनु मास्तर आणि आबाकडे पाहिले.
"म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे,कुत्र्याचे कान आणि उंटाची मान …….."
"अरे तू प्रधाशोध परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आला आहे आणि ते ही गणिताच्या दोन्ही पेपेरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून"
"आण ती पिशवी इकडे, मी पेढे तर नाही आणले पण हा रानमेवा वाटून आपण आनंद द्विगुणित करू, काय म्हणताय विलासराव" दिनु मास्तरने आबांकडे नजर टाकली.
"चालतय की" आबानी ठसक्यात उत्तर दिले.
आबाची छाती अभिमानाने फुलली होती,टपोऱ्या जांभळांनी घरातल्या सगळ्यांची जीभ निळी पडली होती. रसदार काळ्या मैनेने चिकट झालेले हात उगाचच बोटं एकमेकांवर घासत होते.
"माझा गुणाचा अंकु" असं पुटपुटत चुलीपुढं पदराच्या आत दोन डोळे आनंदाने भिजले होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कथा
सुरवात वाचून पुढे काहीतरी अभद्र घडतंय का भिती वाटलेली.
बाकी हे असे सुमडीत केलेले प्लान आणि ते घरच्यांसमोर उघडकीस येऊन खावा लागलेला ओरडा अश्या आठवणी आठवल्या

नवीन प्रतिसाद लिहा