पैंजण..! ( शल्य )

Submitted by रूपाली विशे - पाटील on 27 May, 2025 - 10:55

पैंजण ..!( शल्य )
______________________________________

कलत्या तिन्हीसांजेला , तिरप्या उन्हाच्या रेषेसारखी विचारात मग्न असलेली जयु घरात , गॅलरीत एकटीच होती.

तिच्या सुनेचे, शुभ्राचे डोहाळेजेवण आज मोठ्या थाटामाटात , कोड-कौतुकाने पाहुण्या - रावळ्यांच्या गराड्यात यथासांग पार पाडले. शुभ्रा काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली आणि घरात शांतता अगदी कोपऱ्या न् कोपऱ्यात ठाण मांडून राहिली.

शुभ्रा म्हणजे चैतन्याचा, उत्साहाचा ओसंडता झरा आहे जणू... ! काही दिवस तरी तिच्याविना करमणार नाही आपल्याला... तिच्या बडबडीची कानांना सवय झालीयं आता... खरंतर लळाच लागलायं सुनेचा असं म्हणायला हवं .. त्यावरून वृषभही कधीतरी तिला चिडवतो, म्हणतो कसा , जगातलं आठवं आश्चर्य आमच्या घरात आहे ..!

विचारांच्या गुंत्यात अडकलेली जयु स्वतःशीच हसली.

मघाशी मित्रांना भेटून येतो म्हणत वृषभ घराबाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग तिचा नवरा देखील ..! तिच्या नवऱ्याचं तर काय रोजचं ठरलेलं.. कॉलनीतलं गप्पीष्ट मित्रमंडळ सोबतीला घेणार; पाय मोकळे करायला म्हणून घरातून सटकणार आणि बागेत बाकड्यावर बसून पृथ्वीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतच्या गप्पांचे फड जमवणार ... त्या गप्पांना काळ-वेळेचं काही बंधन नाही उरायचं मग..!

" ह्या पुरुषांचा पाय घरात जरा म्हणून टिकत नाही .. पायाला भोवरा बांधून गावभर नुसते उसाटणार... सांगता सोय नाही..! " स्वतःशीच पुटपुटत जड मनाने , सुस्कारत जयुने घरात पडलेल्या पसाऱ्याची आवारा - आवर सुरु केली. गेल्या महिन्याभरापासून मोठ्या हौसेने तिने वृषभ आणि शुभ्राच्या खोलीच्या भिंती सजवायला घेतल्या होत्या. लोभस चेहऱ्यांच्या बाळांच्या, बाळकृष्णाच्या खोडकर लिला असलेल्या , माता यशोदा आणि बाळकृष्णाच्या मायालाप करणाऱ्या तसबिरींनी खोलीच्या भिंतींवर एक अनोखे चैतन्य फुलले होते.

जयुच्या ओसंडत्या आनंदोत्साहाला भरती आलेली पाहून, डोहाळे सुनेला नाही तर तुलाच लागलेत असं म्हणत तिच्या नवऱ्याने तिची फिरकीही घेतली होती. ते आठवताच तिच्या ओठांवर हलकसं हसू फुटलं.

आवरा-आवर करत ती वृषभ आणि शुभ्राच्या खोलीत आली. सजवलेल्या खोलीवरून मोठ्या कौतुकाने नजर फिरवित ती स्वतःवरच खुश झाली.

तिला वाटलं, शुभ्राला पहिली मुलगीच व्हावी..' पहिली बेटी, धनाची पेटी..'!

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात शुभ्राने बर्फी असलेली वाटी निवडली आणि खरंतर ती आनंदून गेली. मज्जा, आनंद लुटण्याचा तो कार्यक्रमाचा एक भाग होता .. वास्तवात सगळं काही तसंच घडते असं काही नाही हे माहीत असूनही ती काही क्षणापुरती तरी हुरळून गेली.

वृषभला बहिण आणि आपल्याला एक तरी लेक असावी असं तिला पूर्वी खूप वाटायचं.. मात्र वृषभच्या वेळी बाळंतपणात झालेली गुंतागुंत इच्छा असूनही तिला पुन्हा मातृत्वाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली नाही ती नाहीच..

" लेकीची माया आभाळाएवढी .. बरं का जयु ...! पुरुष काय मायेच्या बाबतीत आपले खुजेच ! "

तीन मुलींचं मातृत्व मोठ्या दिमाखात मिरवणाऱ्या सासूबाई तिला यावरून नेहमी हिणवत.

सासूबाईंच्या वृद्धापकाळी , शेवटच्या दिवसांत त्यांची सगळी सेवा जयु आणि तिच्या नवऱ्याने केली.. आपल्या संसारात रमलेल्या तीनही मुलींनी आईकडे साधं ढुंकूनही पाहिलं नाही .. मात्र आई गेली आणि तिला जाऊन तीन दिवस देखील झाले नव्हते तर तीनही बहिणींनी आईच्या कपाटाचा कप्पा न् कप्पा तपासायचा मात्र सोडला नाही... लोभ, हाव, लालसा म्हणतात ती हिच...!मायेच्या तराजूत लोभ, लालसेचं पारडं जड झालं होतं. . जयुचं मत पक्क झालं.

तिला खरंतर सासुबाईंचा राग यायचा.. वाटायचं सणकन् त्यांच्या तोंडावर म्हणावं ,

" मायेला खरंतर जबाबदारी आणि कर्तव्याची जोड असावी नाहीतर काय कामाची ती कोरडी , फुकाची माया.. उंटावरून शेळ्या हाकणारी माया हवी तरी कशाला...??"

डोक्याला शीण आणणाऱ्या विचारांच्या जंजाळात अडकत जाण्याआधी जयुने स्वतःला रोखले. ती भिंतीवरचे फोटो मोठ्या उत्सुकतेने न्याहाळू लागली.

" मी येऊ ss का ..?"

अचानक कानावर आलेल्या लहान बाळाच्या बोबड्या स्वराने जयु दचकली. पाठी वळून तिने दाराकडे पाहिलं.. तिथे कुणीही नव्हतं... तिने खोलीत नजर फिरवली... धडधडत्या उराने ती हॉलमध्ये आली. तिच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले.

काही क्षणापूर्वी आपल्याला ऐकू आलेला लहान बाळाचा आवाज खरा होता की आपल्याला तसा भास झाला ..??

ती गोंधळली. तिला काही सुचेना .. डोक्यावर पंखा वेगाने फिरत होता तरीही ती नखशिखांत घामाने डवरली.

दारावरची बेल वाजली अन् ती भानावर आली.

" कधीपासून बेल वाजवतोयं मी...!" नवऱ्याचा वैतागलेला स्वर ऐकून ती सुद्धा तिच्या नकळत त्याच्यावर उखडली.

" किती वेळा म्हटलंय , घराची एक चावी स्वतःजवळ ठेवत जा म्हणून .. पण घरात माझं ऐकतयं कोण..?"

नवराही जयुच्या ह्या प्रतिहल्ल्याने चमकला.

लहान बाळाचा आवाज खरा होता की भास ह्या विचारांच्या गुंत्यात रात्रभर तिला झोप लागली नाही.

झाला असेल आपल्याला एखाद्या वेळेस भास .. शुभ्रा आणि वृषभच्या नव्याने घरी येणाऱ्या बाळाचा विचार सतत आपल्या डोक्यात सुरु असतो .. त्यामुळे असेल बहुतेक....! काही दिवसांनी रोजच्या कामाच्या धबगड्यात ती तो प्रसंग विसरली.

मात्र एके दिवशी जे घडलं त्या घटनेने तिची झोप जवळ- जवळ कायमचीच उडाली. त्या सुस्तावलेल्या दुपारी जयु घरी एकटीच होती. ती अंमळ पलंगावर पडून होती. जरा कुठे तिच्या पापण्या जडावतच होत्या तेवढ्यात घराच्या मुख्य दारावर कुणीतरी थापा मारल्याचा, कडी वाजवल्याचा आवाज तिच्या कानावर पडला. ती वैतागतच बाहेर आली. तिने दार उघडले मात्र बाहेर कुणीही नव्हते...

पुन्हा एकदा भास..!

ती दरवाजा बंदच करत होती तेवढ्यात पुन्हा एकदा तोच बोबड्या बोलीतला, लहान बाळासारखा स्वर तिच्या कानावर पडला.

" मी येऊ ss का...?"

"कोण .. कोण आहे.. तिथे ..?.. कोणाला यायचंय माझ्या घरी..??" ती जोराने ओरडली.

तिचं कपाळ घामाने थबथबले. असले कसले विचित्र भ्रम होऊ लागलेत आपल्याला ..? भ्रमाच्या दुनियेतल्या वेडाचा एखादा प्रकार असू शकेल का हा ...??

नाही.. नाही .. अशी कशी वेडी होईल मी..?? एवढ्या दुबळ्या मनाची मी नाहीये... अचानक अंगावर पडलेले एखादे झुरळ झटकून द्यावे तसे तिने त्या विचारांना झटकत स्वतः ला बजावलं.

जिन्यावरून पळत जाणाऱ्या चिमुकल्या पावलांचा आवाज तिला आला. आवाजाच्या दिशेने ती धावली. त्या चिमुकल्या पायांत पैंजण असावेत कदाचित ... पैजणांचा छुमछुम आवाज तिथे घुमू लागला. तिला वाटलं, सोसायटीत घरकामाला येणाऱ्या एखाद्या बाईचं लहान बाळ बाहेर खेळत असावं.. आणि आपल्या खोडकर बाळलीलांनी तिला सतावत असावं ... मात्र भरदुपारी इमारतीत कुणीही आसपास दिसत नव्हते. ती जिन्यावरून उतरू लागली... खाली वर कुठेही कुणी तिला दिसेना... ना एखादे लहान बाळ ना एखादे मोठे माणूस..

तर मग लहान बाळाच्या बोबड्या स्वरात कोण तिला प्रश्न विचारतंय..?? कुणी मस्करी करतंय की कुणी सतावतंय आपल्याला...??

कोण असू शकेल..??

ती थकून जिन्यावर बसली. तिचं डोकं चक्रावलं.. सर्वांग थरथरू लागलं... ती पदराने कपाळ पुसू लागली. पदर सारखा करत होतीच तेवढयात जिन्याच्या खाली तिची नजर गेली आणि ___

एक विकृत, कातडी अंगावर नसलेली लहान बाळाच्या सांगाड्यासारखी अमानवी आकृती पैंजणांचा छुमछुम आवाज करत तिच्या दिशेने येऊ लागली.

" मी येऊ का...?" पुन्हा तोच प्रश्न विचारणारी आणि खदाखदा हसणारी ती लहान बाळाची विकृत अमानवी आकृती आपल्याकडे झेपावत आहे ... ते पाहून तिची जागच्या जागी शुद्ध हरपली.

तिने डोळे उघडले तेव्हा ती घरात पलंगावर होती.

" आता बरं वाटतंय का जयु ...?" नवऱ्याच्या आश्वासक, प्रेमळ शब्दांनी तिला हुंदका फुटला.

" जिन्यावर कुणीतरी होतं.. लहान बाळासारखं .. मी पाहिलं माझ्या डोळ्याने.. !" ती रडू लागली.

" शांत हो आई, भास झाला असेल तुला . त्या भयकथा वाचायच्या बंद कर पहिल्यांदा.. एकतर दिवसभर एकटीच घरात असतेस... त्यात तुझ्या डोक्यात , मनात सतत तेच विचार सुरु असणार.. !" वृषभ तिला समजावू लागला.

" विश्वास ठेवा रे माझ्यावर.. लहान बाळाची आकृती होती रे... मला सारखं प्रश्न विचारत होतं.. मी येऊ का.. येऊ का .. असं..!"

" तुझ्या डोक्यात सतत बाळाचे जे विचार सुरु आहेत ते मला माहीत आहेत... नातवंडाच्या आगमनाचा इतका अतिरेकी उत्साह तुझ्यात संचारलायं ना की, सांगायला नको .. मग असे भास होणारच तुला ..!" कोसळणाऱ्या धबधब्यासारखा नवरा हसू लागला.

" यावेळी थट्टा नको रवी ... बाळ सामान्य दिसलं असतं तर ठीक होतं पण जी आकृती मला दिसली ती घाणेरडी, विकृत, अमानवी अशी होती... भविष्यातल्या कसल्या तरी अशुभाची चाहूल तर नसेल ना ही...?" तिचे डोळे भीतीने विस्फारले.

जयुच्या तोंडून हे ऐकल्यावर मात्र बाप-लेक दोघेही चमकले.

" असं काही नसते आई... अंधश्रद्धा आहेत सगळ्या.. त्या धारपांच्या भयकथा वाचायच्या सोड आधी आणि दाभोळकर, नारळीकरांच्या विज्ञान कथा वाचत जा यापुढे .. म्हणजे असे चित्र-विचित्र भास तुला कधीच होणार नाहीत..!" आईची समजूत घालत वृषभ म्हणाला.

जयुने दिर्घ श्वास घेतला. वृषभ म्हणतो तसं करायला हवं.. स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायला हवं.. रिकामा वेळ हाताशी नकोच राहायला.

तिने लगेचच योग वर्गाला जायला सुरुवात केली. घराजवळ असलेल्या महानगर पालिकेच्या शाळेत विना मोबदला दोन तासांसाठी कलावर्ग घेण्यास सुरुवात केली... मेंदुला झिणझिण्या आणणाऱ्या विचारांच्या वावटळीत अडकण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी तिने प्रयत्नांची शिकस्त सुरु केली.

सगळं काही सुरळीत घडतयं असं वाटतच होतं तर अचानक एके रात्री जयूसोबत जे घडलं ते पाहून तिचा नवरा आणि लेक दोघेही मुळासकट हादरले.

त्या रात्री जयु शांत झोपली होती... अन् मध्यरात्री अचानक अंगावरून थंड वारं गेल्यासारखं झालं आणि ती झोपेतून खडबडून जागी झाली... रस्त्यावर असलेल्या खांबावरच्या दिव्याचा अंधुक उजेड खोलीत पसरला होता.. खिडकीच्या काचेवर तिला हालचाल जाणवली.. ती अंथरुणातून उठली.. बाजूला रवी पुतळ्यागत झोपला होता.. खिडकीजवळ जात तिने पडदा बाजूला सारला आणि अचानक एक आकृती खिडकीजवळ सरकत पुढे आली... ती मागे सरकली... तिने विचांरावर , स्वतःवर ताबा मिळवला .. ती डोळे टवकारून त्या आकृतीला न्याहाळू लागली... आज त्या आकृतीला आकार होता.. चेहरा होता... दिड-दोन वर्षाच्या बाळासारखा...! त्या बाळाच्या एका पायात पैंजण होते... छुमछुम वाजणारे .. ती त्या आकृतीचा अस्पष्ट चेहरा निरखू लागली... त्या बाळाचा चेहरा हळूहळू तिच्या नजरेसमोर स्पष्ट होत गेला आणि तिला काहीतरी आठवलं जे हळूहळू विस्मरणात जाऊ पाहत होतं.. ... ते बाळ तिच्याकडे पाहून गोड हसलं.. ती दचकून मागे सरकली...

" इतके दिवस तू छळतेस तर मला..?" जयु घाबरून ओरडली.

अचानक तिच्या मानेला थंड स्पर्श झाला.. शहारून ती पाठीमागे वळली... अन्__

" मी येऊ ss का...?? " असं विचित्र आवाजात म्हणत एक विकृत, अमानवी वाटणारी लहान बाळाची आकृती तिच्यासमोर खदाखदा हसू लागली... त्या आकृतीला एक विचित्र दर्प होता... कुजलेला... नाकाला न सोसणारा... एक किंकाळी फोडून जयु खाली जमिनीवर कोसळली.

इस्पितळातल्या बेडवर सावरून बसलेल्या जयुचं वय अचानक दहा वर्षानी वाढल्यासारखं वाटत होतं. डोळ्यांभवती काळी वर्तुळ उमटली होती. आदल्या रात्री एकाएकी रक्तदाब वाढल्याने खाली जमिनीवर कोसळलेल्या जयुला पहाटेच इस्पितळात भरती केलं होतं...

" रवी, ती पुन्हा माझ्या आयुष्यात आलीयं... तिने पुन्हा छळ मांडलायं माझा...!" तोंड हाताच्या ओंजळीत धरून जयु रडू लागली.

" कोण परत आलंय..?? सांग कोण छळतेय तुला ..?" रवीने तिचे हात आपल्या हातात घेतले.

" तीच .. हं आठवलं.. मिनाक्का... मिनाक्का नावं होतं तिचं..!"

" कोण मिनाक्का..?"

" जिने बाबांवर, आमच्या संपूर्ण घरावर करणी केली होती..!"

" जयु , शांत हो जरा, हे काय करणीचं नवीनच खूळ तुझ्या डोक्यात आलंय..?? उद्या आपण मानसरोग तज्ञाना भेटतोयं.. तुला जो मानसिक त्रास होतोय त्यावर इलाज आपण करायला हवा.. चांगली शिकली सवरलेली आहेस तू, परिस्थिती लक्षात घे ..!"

" तुम्हांला वेडी वाटतेय का मी..? मला काहीच उपचार नकोत.. मला माहित आहे सगळं... मी उद्या चिंचणीला जात्येयं .. !"

" कुणीही नाही राहत आता तुझं चिंचणीला.. काय करणार आहेस तिथे जाऊन..?"

" कुणीही नसलं तरी माहेर आहे माझं तिथे..
रेंगाळणाऱ्या भूतकाळातल्या कडू-गोड आठवणी आहेत त्या गावात ... ! घर आहे, शेती आहे .. शेतात घर आहे, बाजूला लहानसं गावदेवीचं मंदिर आहे, तिथे जवळचं एक लहानसं तळं सुद्धा आहे . तळ्याशेजारी जांभळाचं झाड आहे ... त्यावर लटकलेले , जिभेला लालुच दाखवणारे लाल- काळ्या जांभळांचे झुंबर.. !" भूतकाळातल्या आठवणींनी ती दबके हुंदके देत भडाभडा बोलू लागली.

घरी परतल्यावर वृषभ आणि रवी नको - नको म्हणत असताना देखील ती चिंचणीला जाण्यास निघाली. तिची सध्याची मानसिक स्थिती पाहता तिला एकटीला जाऊ देणं योग्य नव्हतं.. शेवटी तिने नकार देऊनही रवी तिच्यासोबत निघाला.

ती चिंचणीला पोचली. तिचं गावातलं घर मोडकळीस आलं होतं.. बऱ्याच वर्षात घराची डागडुगी झाली नव्हती. तिने घराचे दार उघडले. आत येत तिने मोकळा श्वास घेतला.. कितीतरी कडू - गोड आठवणी त्या घरातल्या कोपऱ्या न् कोपऱ्यात दडलेल्या होत्या....तिचा लहान भाऊ संतोष .. तो सुद्धा परदेशात स्थायिक झाला होता. कधीतरी वर्ष- दोन वर्षातून तो गावात एखादी फेरी मारत असे..

घर दुरुस्त करायला हवं.. तिने मनाशी ठरवलं.

दुपार सरू लागली होती.. जून महिन्याची सुरुवात झालेली... पावसाची सर मघाशीच येऊन गेलेली.. रवीचा हात तिच्या खांद्यावर हलकेच टाकलेला.. ती रवीच्या सोबतीने शेताचा रस्ता चालू लागली. रस्ता जवळ जवळ निर्मनुष्य ..!

ओलसर, पोपडे निघालेल्या मातीच्या रस्त्यावरून चालताना तिने आजूबाजूला नजर फिरवली. दुतर्फा झाडांवर हिरवा तजेला चढलेला... पानांच्या मुठीतले उरले- सुरले ओघळून जाणारे, टपटपणारे पावसाचे मोती ...सोनमोहराची पुढे आलेली एकच फांदी.. पिवळ्या धम्मक फुलांनी डवरलेली.. उग्रमोहक. .!

मुख्य रस्त्यावरून वळताना तिला गहिरे, निळे आभाळ दिसले. पुसलेल्या काचेसारखे अगदी स्वच्छ ..!

असं समोर पाहिलं की, घरामागच्या टेकडीवरून खाली उतरणारा लाल लाल रस्ता.. पायघडी पसरल्यासारखा..! उजव्या बाजूला गावदेवीचं लहानसे मंदिर .. घरापासून थोड्याशा अंतरावर लहानसं एक शेततळं .. चिरेबंदी..! त्या तळाच्या जवळ बांधावर आपली मुळं घट्ट रोवून ताठाने उभी असलेली जांभूळ.. आभाळाला झाकोळणारी .. जीभेला लालूच दाखवणारे तिच्या फांद्यांवर लगडलेले काळ्या टपोऱ्या जांभळांचे घोस लहानपणी तिला एखाद्या राजमहालात टांगलेल्या झुंबरांसारखे भासत.

ती शेतात आली. लांबूनच तिला शेतातले घर दिसले. मंगलोरी कौलांचे लहानखुरे घर तिचे खरंतर आवडते होते .. मात्र त्या घराच्या स्मृती दुःखद होत्या.. तिच्या बालमनाला विंचवाच्या दंशासारख्या वेदना देणाऱ्या...!

मिनाक्का त्या घरात राहायची.. सारं गावं म्हणायचं, मिनाक्काने जयुच्या वडिलांवर, घरा-दारावर करणी केली.. ती त्या घरात जादूटोणा करायची .. लोकांकडून कानावर काही बाही पडायचं. बालवयातील जयुला ते सगळं खरं वाटायचं. मिनाक्काचा चेहरा आता जयुला जसाच्या तसा आठवत नाही. खूप वर्ष झाली तिला पाहून. एकदम समोर आली तर जयु तिला ओळखणार नाही.. कदाचित सांगता येत नाही, ओळखेलही..!

ती जांभळीच्या झाडाखालून चालू लागली. आताही ती जांभूळ काळ्या नक्षत्रांचे लेणं अंगावर लेऊन उभी होती.. मात्र अनेक पावसाळे झेललेली जांभूळ पाठीत जराशी वाकली होती..संभाव्य वादळ-वाऱ्याच्या भीतीने , संचित मुद्रेने.. अगतिकपणे..!

काही जांभळे खाली जमिनीवर पडली होती.. काही पिचलेली, काही चिरडलेली... !

जयु जांभळीखाली बसली ... जमिनीवरची जांभळे वेचू लागली...तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले... अगतिकतेने...!

रवीने जाणलं होतं की, भूतकाळातली एखादी दुःखद घटना जयुच्या मनावर कायमची कोरली गेलीयं.. काही तरी घडलंय ज्याचा त्रास तिला आता वर्तमानात होतोयं..

" मिनाक्का कोण होती जयु ..?" तुझा काय संबंध तिच्याशी ..?" रवीने प्रश्न विचारला.

तिने मान वर केली. तिचे डोळे भरून आले. भूतकाळातील वाईट आठवणींची भूते तिच्या समोर फेर धरून नाचू लागली.

" एक नंबरची दृष्ट बाई होती ती.. तिने माझ्या बाबांना आपल्या कह्यात केलं होतं.. सगळ्यांपासून दूर केलं .. आमचे सगळे पैसे, दागिने, शेतजमीन सगळं हडपलं होतं तिने ...!"

तिला आठवू लागलं.

तालुक्याच्या गावी महालक्ष्मीचं मोठं देऊळ होतं. दरवर्षी चैत्रात तिथे मोठी जत्रा भरायची. तिचे वडील घरातल्या सगळ्यांना मोठ्या हौसेने जत्रा फिरवून आणत. मात्र एके वर्षी जरा वेगळं घडलं. त्यावेळी जयु सहा - सात वर्षाची असावी. जत्रेला एकटेच गेलेले तिचे वडील तिथे भेटलेल्या मिनाक्काला गावात घेऊन आले. तिच्याशी त्यांनी महालक्ष्मीच्या मंदिरात बेकायदेशीर लग्न केलं.

नवऱ्याने केलेल्या विश्वासघाताने , फसवणुकीने जयुच्या आईला मोठा धक्का बसला. आईच्या प्रेमाशी, एकनिष्ठेशी जयुच्या वडिलांनी प्रतारणा केली होती. माफ न करता येण्यासारखा गुन्हा त्यांच्या हातून घडला होता.

" जर ती बाजारबसवी स्त्री ह्या घराची पायरी चढली तर माझ्या चितेला तुम्हांला अग्नी द्यावा लागेल .. !" असं म्हणत आईने तिच्या भात्यातले शेवटचे अस्त्र काढले.

__ आणि मग वडिलांनी मिनाक्काची रवानगी शेतातल्या घरात केली.

घरातले पैसे, दागिने मिनाक्काच्या अंगावर झळकू लागले. आपल्याच शेतात , शेतघरात जाणं घरातल्यांसाठी चोरी ठरू लागली. जयुचे वडील संमोहित झाल्यासारखे भारावून मिनाक्काच्या अंमलाखाली जाऊ लागले.

सारं गाव जयुच्या घरची परिस्थिती पाहून हळहळे. म्हणे, जयुच्या घरावर, तिच्या वडिलांवर मिनाक्काने करणी केली .. जादूटोणा करून तिच्या वडिलांना वश करून घेतले.. जयुला त्या वयात काही फारसं कळत नव्हतं पण तिचं घरचं फिरू लागलं होतं. घराचा आधारस्तंभ असलेली आई आतल्या आत खंगू लागली. घरातील शांतता, सुबत्ता बिघडू लागली. हे सारं अजाणत्या जयुच्या लक्षात येऊ लागलं.

तिला तो दिवस अजून आठवतो.. आपल्या बाल मैत्रिणींसोबत ती शेतातल्या जांभळी खालची काळी, टपोरी जांभळे वेचण्यात मग्न होती .. तेव्हा त्या दुष्ट मिनाक्काने तिथे येऊन सगळ्या पोरींना दम भरून पुन्हा तिथे पाय ठेवण्यास सक्त मनाई केली .. त्यांच्या ओटीतली सगळी जांभळे तिने फेकून, चिरडून टाकली.. जयुला खूप रडू फुटलं होतं त्यावेळी .. तिला ओरडावसं वाटलं, हे माझं शेत आहे .. हि जांभूळ माझी आहे.. तुचं आलीयं इथे.. उपरी आहेस तू..तूच चालू लाग इथून...! पण ती हतबल, असाहाय्य होती. तो प्रसंग तिच्या मनावर कायमचा कोरला गेला.

त्यानंतर दुखावलेल्या लहानग्या जयुने बऱ्याच महिन्यात कदाचित एखादं वर्ष - दिड वर्ष तरी शेताचं तोंड देखील पाहिलं नाही. एकदा मात्र मिनाक्काची नजर चुकवून ती शेतात घुसली.. तिला जे दिसलं ते पाहून तिच्या बाल नजरेला नवल वाटलं. मिनाक्काच्या कडेवर एक लहान बाळ होतं. तिला घराच्या ओट्यावर तिचे बाबा दिसले. त्यांनी मिनाक्काकडून त्या बाळाला आपल्या जवळ घेतले. प्रेमाने त्या बाळाच्या गालावर आपले ओठ टेकवत त्या बाळाचे ते लाड करू लागले. ते लहानसं बाळ त्यांना बोबड्या शब्दांत ' बाबा ... बाबा..' म्हणत होतं. तिला धक्का बसला. ती धावत घरी गेली.. मात्र जे पाहिलं ते आईला सांगण्याची हिंमत तिला झाली नाही. तिने ते दृश्य आपल्या डोळ्यांत अश्रूंसोबत जिरवलं.

तिला मिनाक्काचा , त्या बाळाचा तिरस्कार वाटू लागला. मिनाक्का आणि तिचं बाळं आपल्या वडिलांच्या प्रेमात वाटेकरी आहेत .. हे सत्य तिच्या बालवयाला पचवणं जड जाऊ लागलं. त्यात अजून एक भर एका प्रसंगाने घडली.

शाळेत बाईंनी नाचाचा कार्यक्रम बसवला होता. त्यावेळी ती पाचवीत होती. त्यासाठी तिला पैजण हवे होते.. तिने तिच्या वडिलांकडे घाबरतच पैजणांची मागणी केली तर त्यांनी चक्क त्याकडे दुर्लक्ष केले. अगतिक झालेल्या जयुला पैंजण नव्हते म्हणून बाईंनी नाचाच्या कार्यक्रमातून काढून दुसऱ्याच मुलीची वर्णी तिच्या जागी लावली. ती खूप दुखावली. तिला आपल्या वडिलांचा खूप राग आला. मात्र राग आतल्या आत गिळून पोटात पचवून टाकायची कला अजाणत्या वयात तिला जमू लागली होती.

शेताच्या , तळ्याच्या, गावदेवीच्या मंदिराच्या ओढीने ती लपून-छपून तिथे जायची. एके दिवशी घराकडे लपून पाहत असताना ओट्यावर तिचे बाबा त्या लहान बाळासोबत खेळत असलेले दिसले. त्या बाळाच्या पायात चांदीचे पैंजण होते. बाळ ओट्यावर दुडक्या चालीने तुरुतुरू धावत होते. धावताना पैजणांतून निघणाऱ्या ' छुमछुम ' आवाजाची त्याला गंमत वाटत होती. ते अजूनच उत्साहाने बागडत होते. जयुचे बाबा आणि मिनाक्का मोठ्या कौतुकाने बाळाला खेळवत होते. ते पाहून जयुचा इवलासा जीव इर्षेने करपून गेला. तिने तिच्या इवलाश्या मेंदूत काहीतरी पक्कं ठरवलं.

जयुने शेतातल्या घरावर पाळत ठेवली. एके दिवशी संधी साधत ओट्यावर एकट्याच खेळत बसलेल्या लहान बाळाला तिने आवाज न करता गपचूप उचलून घेतले. बाळ तिच्याकडे पाहून गोड हसलं. मिनाक्का कामात गुंतलेली होती. तिचं लक्ष नाही हे पाहून जयु बाळाला घेऊन लांब जांभळी खाली आली. बाळ तिच्यासोबत खेळू लागलं. तिने बाळाच्या पायातले पैंजण काढण्यास सुरुवात केली. एक पैजण निघाले. दुसरे काढत असतानाच बाळ अचानक रडू लागलं. जयुची भीतीने गाळण उडाली. मिनाक्काचा उग्र चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. बाळाचा आवाज मिनाक्काला ऐकू जाऊ नये म्हणून तिने बाळाला तळ्याजवळ ठेवले. ..

__आणि बाळाचे एक पैंजण घेऊन तिने घराकडे धूम ठोकली. ते पैजण तिने कागदाच्या पुडीत बांधुन देवघरातल्या कोनाड्यात लपवून ठेवले. तिने या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही.

दुसऱ्या दिवशी तिला भयंकर बातमी कळली. शेजारच्या हेमाकाकू सांगत आल्या की, मिनाक्काचे बाळ तळ्यात पडून बुडाले.

' बघ रत्ना, देवाची करणी हि अशी असते.. इथेच करा आणि इथेच भरा.. पापांचा घडा शेवटी भरलाच ' असं आईला म्हणत त्या उठून गेल्या. आई निर्विकार होती.

लहान बाळाच्या मृत्यूने जयु घाबरली. तिनेच त्या बाळाला तळ्याजवळ सोडले.. पण तिच्या अजाणत्या वयाला संभाव्य धोक्याची कल्पना आली नाही. तिला भीती वाटू लागली. तिने ते गुपित आपल्या मनात बंदिस्त केले.

पाण्यात बुडून फुगलेल्या बाळाचे निर्जीव कलेवर पाहून मिनाक्का जागीच बेशुद्ध झाली.

आपल्या बाळाच्या अश्या अचानक जाण्याने मिनाक्का पिसाळली. तिच्या डोक्यावर परिणाम झाला. अचानक ओढवलेल्या संकटाने जयुचे वडीलही सैरभैर झाले. काही दिवसांनी वेडाच्या भरात मिनाक्का घर , गाव सोडून निघून गेली. कुणी म्हणायचं महालक्ष्मीच्या जत्रेत मिनाक्का भीक मागते तर कुणी म्हणायचं हायवेवर तिला ट्रकने उडवलं. तिच्याबद्दल नंतर काहीही खबरबात कुणालाही लागली नाही. मिनाक्का गेल्यावर वडील घरी परतले.. मात्र आईने त्यांना मनोमन बहिष्कृत केले होते. वर्षामागून वर्ष उलटत गेली. काळाच्या ओघात ती दुर्दैवी घटना जयुच्या विस्मरणात जाऊ लागली.

__ आणि आता अचानक इतक्या वर्षानंतर अश्या भयंकर रितीने मिनाक्का आणि तिच्या बाळाने जयुच्या सुरळीत चाललेल्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रवेश केला होता.

" बाळाचे ते एक पैंजण आता मिळू शकेल का जयु ...?" रवीच्या प्रश्नाने ती भानावर आली.

तिने गावातल्या घरी जाऊन देवघरातला कोनाडा तपासला. एक कागदाची जीर्ण पुडी तिला सापडली. त्यात काळे पडलेले एक पैंजण होते. तिला हुंदका आवरता आला नाही.

" भूतकाळात अजाणत्या वयात नकळत घडलेल्या चुकीचं शल्य तुझ्या सुप्त मनात अजूनही दडून आहे जयु..! तू ते पैंजण तळ्यात टाक .. माफी माग त्या बाळाची जे त्याचा काहीही दोष नसताना मृत्यू पावलं.. माफी माग मिनाक्काची.. जरी तुला आणि तुझ्या कुटुंबाला तिने त्रास दिला असेल तरीही.. ! तुझ्यासारखीच ती एक आई होती.. तिच्यातल्या आईची माफी माग.. जा जयु..!" रवीने तिला समजून घेतलं.

" तुला माझ्या घरी यायचंय तर ये बाळा, तुझे स्वागत आहे माझ्या घरी.. तुझ्या आगमनाने माझं घर आनंदाने, सुखाने भरू दे...!" असे म्हणत जयुने ते पैंजण तळ्याला अपर्ण केले. बाळाची, मिनाक्काची मनापासून माफी मागितली. त्यावेळी तिला अश्रू रोखणं कठीण गेलं.

जयु आपल्या घरी परतली. तिने मानसरोग तज्ञांकडून समुपदेशन घेतले. काही दिवसांनी शुभ्राने एका गोंडस लेकीस जन्म दिला. नातीच्या आगमनाने जयुच्या घरातला हरवलेला आनंद नव्याने परतून आला.

आणि अचानक एके दिवशी__

" मी येऊ ss का...?"

किचनमध्ये पाठमोरी उभी असलेली जयु बोबड्या स्वरातल्या लहान बाळाच्या बोलाने , पैंजणांच्या छुमछुम आवाजाने जराशी दचकली. शहारून तिने मागे वळून पाहिलं अन् __

" ये राणी .. ये..!"

असे म्हणत तिच्याकडे पाहून गोड हसणाऱ्या , नव्यानेच बोलू पाहणाऱ्या नातीला आपल्या मिठीत घेण्यासाठी जयुने आपले दोन्ही हात फैलावले.

दिवसेंदिवस चंद्राच्या कोरीसारखी जयुची नात वाढत होती. मोठ्या हौसेने जयुने तिच्यासाठी पैंजण आणले होते. दुडूदुडू धावणाऱ्या नातीच्या पायातल्या पैंजणाच्या छुमछुम आवाजाने, तिच्या बोबड्या बोलांनी जयुच्या कटू भूतकाळी स्मृती हळूहळू विस्मृतीच्या वाटेवर गाडल्या जाऊ लागल्या. जयुच्या अंतर्मनात खोलवर काट्यासारखे रुतलेले शल्य आता नाहीसे होऊ पाहत होते.

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com

__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेद्वारे अंधश्रद्धा पसरवणे हा कथा लेखिकेचा हेतू नाही.. )

_________________XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आताही ती जांभूळ काळ्या नक्षत्रांचे लेणं अंगावर लेऊन उभी होती.. मात्र अनेक पावसाळे झेललेली जांभूळ पाठीत जराशी वाकली होती..संभाव्य वादळ-वाऱ्याच्या भीतीने , संचित मुद्रेने.. अगतिकपणे..!"
मस्त जमलीय!

शेतातलं डिटेलींग छान आलंय.
छान जमलीय कथा...
दोन टायपो लक्षात आले...
>>>]बाळ ओट्यावर दोडक्या चालीने>दुडक्या हवं तसंच कागदाची पुढी ऐवजी कागदाची पुडी हवं. पुढी दोनदा आलंय.

धन्यवाद सामो , बाळाचा खरंच काही दोष नव्हता. निष्पाप होते ते... झाडाची शिक्षा पालवीला मिळते दोष नसताना ते असं..!

अबुवा , rmd , केकू, शर्मिलाजी, वावे आपले खूप आभार..!

दत्तात्रेयजी, तुम्ही चूक लक्षात आणून दिलीत खूप धन्यवाद तुम्हांला .. !
वाचताना काहीतरी चुकतंय असं जाणवत होतं पण लक्षात येत नव्हतं. बदल केलायं आता..!

मायबोली व्यासपीठामुळे आणि मायबोलीकर वाचकांमुळे लेखनाला प्रोत्साहन मिळते त्यामुळेच ध्यानीमनी नसताना मी मायबोलीवर पंचवीस कथा लिहू शकले. हि २५ वी कथा..!

मायबोली व्यासपीठाचे आणि सुजाण वाचकांचे खूप खूप आभार..!

>>>हि २५ वी कथा..!>>>>
अभिनंदन, एक कथासंग्रह झाला की... अजून येऊ द्या... शुभेच्छा

छानच आहे कथा , .... रात्रीच्या प्रसंगानं धारपांच्या शैलीची आठवण आली .. अशाच लिहित्या राहा.

२५ वी कथा ............. म्हणजे रौप्यमहोत्सवी बरोबर? Happy
अभिनंदन.

अजून येऊ द्या... शुभेच्छा>> दत्तात्रेयजी, नक्कीच..!

धन्यवाद ...धनवंती, अनघा, San deep ..!

सामो , हो.. तसं मायबोलीवर खूप लेखन आहे इतर दिग्गज लेखकांचं... त्यापुढे २५ म्हणजे काही नाही.. पण आपण काहीतरी लिहू शकलो ह्याचा आनंद आहे.

मस्त कथा.. वाचताना थांबावेसे वाटलेच नाही.
२५ कथांबद्दल अभिनंदन ..
या कथा लिहिताना तुमचे लिखाण आणखी कसदार होत गेले, तुमच्या कथा आणखी खुलून येऊ लागल्यात हे विशेष. बहुधा मागेही हे कुठेतरी एका प्रतिसादात मी लिहिले होते.

मस्त कथा!
२५ कथांबद्दल अभिनंदन!!

हो ऋन्मेष, तुम्ही एकच नाही तर माझ्या अजून इतर लेखनावर तसा प्रतिसाद दिलायं.. खूप धन्यवाद ..!
वाचक खूप हुशार आहेत इथले त्यामुळे जमल्यास जरा चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करते..

आबा, झकासराव , शंशाकजी, केकू, सुगंधी, शिल्पा, Sparkle, आर्च खूप धन्यवाद .. !