शहाणा मुलगा आणि ( असलाच तर ?) देवबिव

Submitted by पॅडी on 17 April, 2024 - 23:41

घराघरातून चिवचिवणाऱ्या
प्रत्येक शहाण्या मुलाला
आखीवरेखीव चाकोरीत ढकलून
बोन्सायगत वाढवण्यालाच
आपण संस्कारा-बिंस्काराचे
बिरूद चिकटवून देतो,
अवास्तव अपेक्षांचे वेताळओझे
कोवळ्या खांद्यांवर लादून
समजुतीच्या (त्याच त्या!) गोष्टी सांगत
त्यांना जन्मभर हाकारत जातो

आई म्हणते:
शहाणा मुलगा नेहमी
स्वत:च्या हाताने जेवतो
टाकत नाही उष्टेबिष्टे
करत नाही पसारा घरभर,
- आम्हाला असते एवढे स्वातंत्र्य
सुख सुविधा तर
आज कुठच्या कुठे असतो!
करवादल्या बाबांची टकळी
चालूच असते दिवसभर

थोरली बहीण;
धाकट्या भावाच्या भांडणात
शहाण्या मुलाची
नेहमीच होते परवड,
- अक्कल वाटली तेव्हा
नक्कीच असशील गैरहजर!
मारकुट्या मास्तरचे अंगावर येणे
जिव्हारी झोंबणारी आगपाखड

वाळीत टाकले जायच्या भीतीने
सर्वांची नजर चुकवून
उनाड; टवाळखोरांच्या कंपूत
शहाणा मुलगा झळकतो कधीमधी,
मनोमन खात्री असते त्याला
लाख झाले तरी आटणार नाही
आजीच्या मायेची नितळ नदी...

मांडायचीयत गार्‍हाणी-बिऱ्हाणी
कराबिरायची आहे तक्रार
पडलीच कधी जर देवाशी गाठ,
ह्या एका भाबड्या लालसेपोटी
निमूटपणे; शहाणा मुलगा करतो-
स्तोत्र; शुभं करोती मूकपाठ...

देवघरातल्या मेणचट प्रकाशात
शहाण्या मुलासारख्या गप्प बसलेल्या
शांतचित्त , सस्मित मूर्तीचा
त्याला नेहमीच वाटतो हेवा,
कुणी ऐकत नसल्याची खातरजमा करून
चटकन विचारतो शहाणा मुलगा;
देवाशप्पथ खरं खरं सांग :
लहानपणी तुला तरी -
मनासारखे खेळायला, वागायला मिळाले का देवा..?
****

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy

14 - 15 वर्षं पूर्ण झाली की आई वडलांना अलगद गुंडाळून हक्काचं स्वातंत्र्य घेतलं जातं .. ते स्किल डेव्हलप होईपर्यंतच फक्त हुकूमशाही चालवून घेतली जाते .. मग आईवडिलांना त्यांच्याच नाण्यात उत्तर दिलं जातं - त्यांचंच बघून शिकून घेऊन ... अभ्यासाचा सिरियसनेस तोपर्यंत आलेला असतो बहुतेकांना . नसेल आला तर हुकूमशाही घरातली मुलं आईवडिलांना हँडल करायला कठीण तरी होतात , 2 - 4 वर्षं मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगून मग आपणहूनच योग्य मार्गाला लागतात किंवा 4 - 5 वर्षं बाद करून घेतात .. काही थोडी शिस्त - अपेक्षा यामुळेही योग्य मार्गावर राहतात .. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिली आहेत ..

प्रत्येक मूल ही वेगळी केस असते .. कोणी अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जातात तर कोणी अपेक्षा झुगारून देऊन आईवडीलांनाच वाकवतात , अपेक्षा कमी करायला भाग पाडतात / थोडक्यात समाधान मानण्याची वेळ आणतात ..

संस्कारा-बिंस्काराचे - उष्टेबिष्टे -कधी मधी - गार्‍हाणी-बिऱ्हाणी - कराबिरायची

या शैलीवरुन, खालील काव्य आठवले -

उसकी कत्थई आँखों में है जंतर मंतर,
चाकू वाकू छुरिया वुरिया खंजर वंजर सब.
जिस दिन से तुम मुझसे रूठी उस दिन से रूठे हैं,
चादर वादर तकिया वकिया सब.
मुझसे बिछड़ कर वो भी कहाँ अब पहले जैसी है,
फीके पड़ गए कपड़े वपड़े जेवर वेवर सब.

उसकी कत्थई आँखों में है जंतर मंतर,
चाकू वाकू छुरिया वुरिया खंजर वंजर सब.
>>>>>
@ सामो,
वाह काय आठवण काढलीत. या ओळी मी बॅचलर असताना ऑर्कुटवर मुलींना इंप्रेस करायला वापरायचो Happy

@ धागा आणि कविता.. छान आहे
विषयावरचे मत नंतर मांडतो..

सर्व रसिक वाचकांचे खूप खूप आभार..!

राधानिशा - आपण मांडलेल्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे...

सामो- गजब वजब की कविता शेयर वेयर की हैं..! पहले वहले सुनी वुनी नहीं थी ..!! Happy

पुन्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार...

सामो
कुठून आणले हे रत्न?
पॅडीची मूळ कविता, हा धागा आणि ही सामोची कविता. "भयंकर" छान आहे. "भयंकर" अफलातून.
निवडक दहात साठवून ठेवतो.

>>>> मायबोलीकरांचं आणि देवाचं काय वाकडं आहे तेच कळत नाही.

शब्दब्रम्ह- फक्त त्याच्याशीच आपण बेधडक, बिनधास्त वाट्टेल तसे, वाट्टेल तेवढे भांडू शकतो... Happy Happy :- )

कविता आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले..!

>>>>फक्त त्याच्याशीच आपण बेधडक, बिनधास्त वाट्टेल तसे, वाट्टेल तेवढे भांडू शकतो...

हे मात्र खरंय

फक्त त्याच्याशीच आपण बेधडक, बिनधास्त वाट्टेल तसे, वाट्टेल तेवढे भांडू शकतो>>> Bw

सामो, काव्य पंक्ती छान आहेत.

सगळी कविता नाही पटली... पण काही ओळी चांगल्या आहेत >>>

अवास्तव अपेक्षांचे वेताळओझे
कोवळ्या खांद्यांवर लादून
समजुतीच्या (त्याच त्या!) गोष्टी सांगत
त्यांना जन्मभर हाकारत जातो

कविता आवडली. पुन्हा पुन्हा वाचली

@सामो... जबरदस्त.... एक शेवटाची ओळ राहिली...
आखिर मैं किस दिन डूबूँगा फ़िक्रें करते हैं
कश्ती-वश्ती, दरिया-वरिया लंगर-वंगर सब

उसकी कत्थई आँखों में है जंतर मंतर सब
चाकू -वाकू, छुरियां - वुरियाँ, खंजर-वंजर सब...

सगळी कविता नाही पटली... पण काही ओळी चांगल्या आहेत >>> @ छन्दिफन्दि - स्पष्टवक्तेपणा आवडला. Happy आभार..!

मनिम्याऊ - खूप खूप आभार प्रतिसादासाठी..!! कोटी कोटी धन्यवाद @ सामो च्या कवितेत मोलाची भर घातल्याबद्दल..!!

पटली असे नाही
पण छान आहे.
कधी कधी back bencher नसण्याचे आणि आपण ना कॉलेज ना शाळा कुठलेही कांड न करता, एन्जॉय न करता सरळसोट बाहेर पडल्याचे आठवून मनात सल राहतो.
करायला पाहिजे होती दंगा मस्ती. शहाणं बाळ life फार बोरिंग असतं सांगायला किस्से सुद्धा नाहीत

सांगायला किस्से सुद्धा नाहीत>>> म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की हे किस्से खरे ळूरे आहेत म्हणून. शहाणी मुलगी! हलके घ्यालच.

एन्जॉय न करता सरळसोट बाहेर पडल्याचे आठवून मनात सल राहतो.
करायला पाहिजे होती दंगा मस्ती. शहाणं बाळ life फार बोरिंग असतं सांगायला किस्से सुद्धा नाहीत >>>> Lol Lol Lol

बारावी पर्यंत शहाणं बाळ, कॉलेज मध्ये धमाल..
पण त्यामुळे आठवणी जास्त (मजेशीर ) कॉलेजच्याच आहेत..

काही नाही होत ओ !!
साधी सरळ मुलं असतात ती, जरी वाट चुकली तरी आपली मर्यादा नाहीत सोडत !

आपल्या चाकोरीत पुन्हा येतात परत शहाण्या मुलांसारखी.
आपण उगाच टेन्शन घेतो !
.

किल्ली , केशवकूल, छन्दिफन्दि , राजा मनाचा - रसिक मित्रहो, आपली छान मैफल रंगली होती हे सर्वांच्या प्रतिक्रियांवरून समजतेय. ..

बाकी, शाळेत असेपर्यंत मी ही शहाणा बाळ होतो.. आणि कॉलेज मधे येत येता वळू झालेलो...!!! आमचे एक त्रिकुट होते जे सर्वांना सळो की पळो करुन सोडत असे.. so much so that... अस्मादिकांची आठवड्यातून किमान एकदा तरी प्रिन्सिपॉल च्या कॅबिन मधे मीटिंग ठरलेली असे... Happy Happy Happy
पुन्हा आपणा सर्वांचे आभार..!