ग्रंथालयातील एक नेहमीचे दरवर्षीच करावे लागणारे काम म्हणजे जुनी झालेली, बांधणी खिळखिळी झालेली पुस्तके काढून टाकणे, किंवा नव्याने बांधणी करायला देणे.
हे करत असताना अनेक पुस्तके, एकदा पुनरबांधणी झालेली असली तरी आता त्यांची परत बांधणी करण्याची वेळ आलेली असते. पण ते करता येणे शक्य नाही अशा वेळी अशी पुस्तके ग्रंथालयातून कायमची काढून टाकावी लागतात, असे पुस्तके काढून टाकणे मला फार जड जाते.
आमच्या ग्रंथालय शास्त्र यामधील पंचसूत्री नुसार प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळायला हवा. मग या सूत्रानुसार जर एखादे पुस्तक ग्रंथलयातून कायमचे बाहेर गेले तर त्या पुस्तकाला केवळ रद्दी म्हणून बघितले जाईल. हे एका ग्रंथपालासाठी फारच वेदनादायी आहे.
असे पुस्तके बांधणी साठी काढताना आणि त्यांना हातळताना ग्रंथालयातील जुनी पुस्तके नजरेखालून जात असतात. त्यावेळी कितीतरी वेळा एखाद्या पुस्तकाला हातात घेऊन त्यासोबत किती वेळ जातो, कळत पण नाही, आणि मग असे पुस्तक आपण ग्रंथालयातून बाहेर काढून टाकतो आहे याची खंत वाटतेच.
ग्रंथामधील लेखकाचे विचार वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुस्तके हे माध्यम आहे. आणि ते विचार आता वाचकांना उपलब्ध होऊ शकणार नाही, त्यामुळे त्या विशिष्ट पुस्तकातील माहितीसाठी, आलेल्या वाचकाला देखील हवे असलेले पुस्तक मिळू शकणार नाही.
कारण ग्रंथालय शास्त्र यामधील आणखी एका पंचसूत्री नुसार प्रत्येक वाचकाला देखील त्याला हवे असलेले पुस्तक मिळायला हवे.
पण आता आधुनिक तंत्राच्या मदतीने ही सगळी पुस्तके डिजिटल रूपात उपलब्ध होऊ शकतात. आणि आपल्याला ती ऑनलाइन वाचायला पण मिळू शकतात.
यामधे पण एक गंमत अशी आहे की प्रत्येक ग्रंथालयात असलेली जुनी पुस्तके ऑनलाइन डिजिटल पद्धतीने उपलबद्ध असतीलच असे नाही त्यामुळे अशी कितीतरी जुनी पुस्तके, आपल्याला बघायला पण मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांचे अस्तित्व पण वाचकांपर्यन्त पोचत नाही. शिवाय हवे असलेले पुस्तक ऑनलाइन उपलब्ध असले तरिही ते वाचणे प्रत्यक्ष पुस्तकाची जागा नाही घेऊ शकत, याचेही शल्य आहेच.
असो..
पुस्तकांची जीर्ण झालेली पाने बघून मन हळवे होते. कारण ते पुस्तक परत नव्याने बाजारात उपलब्ध होणार नसते. त्या ऐवजी नवी पुस्तके तर येतात, पण त्यांना या पुस्तकांची सर येऊ शकत नाही. पुस्तकांची नवी आवृत्ती येते, मग जूने, जीर्ण झालेले पुस्तक काढून च टाकावे लागते.
अशीच जुनी पाने आपल्या आयुष्यात देखील असतात. कधी ती आठवणींच्या रूपात असतात तर कधी माणसांच्या जी आपल्याला जिवापाड जपावीशी वाटतात. तसेच आपल्या आयुष्यातील ही जुनी पाने आपल्या साठी अशीच खूप महत्वाची, जिव्हाळ्याची असतात. पण त्यांची वेळ झाली की त्यांना गळून पडावेच लागते. ना झाड त्यांना बांधून ठेऊ शकत ना ते झाडाला चिकटून राहू शकत.
#सुरपाखरू #अक्षरयात्री
शिवानी बलकुंदी