विराणी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 September, 2025 - 04:11

आला पाऊस पाहुणा
वाजे मल्हाराची धून
रान पेरते करून
उतरले लिंबलोण

त्याचं गाठोडं सुखाचं
खाऊ पाचूचा घेऊन
बीया रुजता भुईत
गेलं रान हरखून

रान आले बहरात
हिरवाई रानोमाळ
दरीखोरी घुमलेला
निर्झराचाच खळाळ

रानामधी लगबग
पीक कापणीला आले
आला अतिथी परत
शिवारी धिंगाणा घाले

दाटे आवंढा गळ्यात
त्याची मुजोरी थांबेना
अती मैत्रीत अवज्ञा
जीनं पडलं गहाणा

जीव मेटाकुटी आला
दारी पाहुणा उठेना
हिरावले सारे तरी
झिंग त्याची उतरेना

बोल हिरवे सरता
सरे पाखरांची गाणी
मुक्या रानात दाटली
टाहो फोडून विराणी
दत्तात्रय साळुंके
२८-९-२०२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विराणी ही विरहात गातात. इथे तर अतिपरिचयात ओला दुष्काळ आलेला आहे. त्यामुळे शीर्षकाचा संदर्भ कळला नाही.

वास्तवदर्शी! >>>> +९९
या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे काय अतोनात नुकसान झाले असेल याची कल्पनाही करवत नाही...

वास्तवदर्शी कविता..!
दत्तात्रेयजी, तुमच्या कविता वाचताना मला शाळेत शिकलेल्या कवितांची आठवण येते.

वास्तव दर्शी.
इथे कोथरूड मध्ये बसून आपल्याला सगळ्या भारतात काय हाहाःकार झाला आहे त्याची जाणीव असणार नाही.
आमच्या घरी काम करणारी बाई महाराष्ट्र कर्नाटक सीमावरती भागातील आहे. तिच्या गावी अतोनात पावसाने कहर केला आणि रहात्या घरात पाणी शिरल्यामुळे घाई घाईने पळापळ झाली. नुकत्याच त्यांच्या घरी जमिनीच्या वाटण्या झाल्या. त्याची कागदपत्रे घरात होती. त्याचे काय झाले असावे हा जीवाला घोर. एव्हढासा जमिनीचा तुकडा त्यात बिचारीचा जीव अडकलेला. आता पाणी ओसरले आहे तर ती तडक गावी गेली आहे.
अशी एकेकाची विराणी.

शब्द, भाव, सारेच खूप प्रवाही व प्रभावी !

केशवजी खूप धन्यवाद..
तुमच्या मोलकरणीचे वाटप रजिस्ट्रेशन झाले असेल तर रजिस्ट्रेशन सर्व्हरवर हे रेकॉर्ड मिळू शकते. जर कलम ८५ भुमी अभिलेख कायद्याप्रमाणे असेल तर तहसील कार्यालयात संचिका, तहसीलदार आदेश असतो. तलाठीही काही रेकॉर्ड ठेवतो. जर न्यायालयात झाले असेल तर न्यायालयीन कागदपत्रे मिळू शकतात.

वरील सर्व प्रकारात फेरफार रजिस्टर असते ते तलाठी ठेवतो. फेरफार मध्ये सगळी डिटेल्स असतात.

अनन्त_यात्री
ऋतुराज
शशांकजी
रुपालीताई
भाऊ नमस्कर

तुम्हा सर्व रसिकांचे अनेकानेक धन्यवाद

दसा
मलाही असेच वाटतंय. गावावरून परत आल्यावरच कळेल काय झालं आहे ते.
दसा
का कुणास ठाऊक पण मला ही कविता म्हणजे जीवनाचे रूपक वाटते. असे काही तुमच्या मनात होते का?

धनश्री खूप धन्यवाद.
एवढ्यात काहीच सुचलं नाही. कधी सुचेल ते माहीत नाही. कधी, कधी लागोपाठ सुचतं. हल्ली चिंतन, मनन काही नाही त्याचा परिणाम असेल.
अपेक्षा करतो एक कविता सुचावी आणि कवी वैभव जोशींच्या शब्दात सांगायचं तर...
कवीच्या खिशात ज्या दिवशी एखादी कविता असते त्या दिवशी तो श्रीमंत माणूस असतो.
ही श्रीमंती माझ्या वाट्याला लवकर यावी. लोभ असावा. Happy