शॉर्टकट
मुंबईचा पाऊस. नवी मुंबई झाली म्हणून काय झाले, पाऊस जुन्या मुंबईसारखाच होता.
खरं म्हणजे इतक्या उशिरा घराबाहेर . पडायलाच नको होते. पण बायकोची कटकट आणि पावसाची रपरप ह्यात पाऊसच परवडला . निदान आडोसा तरी घेता येतो.
काम तिच्या मामेबहिणीच्या चुलतभावाच्या भाच्याचे असल्यामुळे तिच्या दृष्टीने अति महत्वाचे होते. आमच्या घरापासून अंतर बरेच दूर होते, पण नवीन पूल झाल्यामुळे ते ४-५ किलोमीटरवर वर आले होते. पण रात्री तशी वर्दळ कमीच असायची. पूल बांधताना ३ कामगारांना बळी दिले होते म्हणे.
तिच्या नातेवाईकाचे घर सापडेपर्यंत साडे दहा वाजले होते आणि १५० रिक्षा भाडे झाले होते. रिक्षा जास्त भाडे घेऊनही थांबायला तयार नव्हता. त्याचे काम संपेपर्यंत ११ वाजून गेले होते,
आता ह्या गल्ली बोळातून महामार्गापर्यंत पोहोचायला अर्धा तास सहज जाणार होता. मग पुलापर्यंत अंतर पाऊण किलोमीटर, पूल एखादा किमी कि लगेच गाव , त्यातील महामार्गावरील बार , हौटेल्स दिसतातच आणि मग तिथून माझं घर दीड अशा प्रवासाची मानसिक तयारी करून ठेवली.
' चला निघतो आता , फार उशीर झालाय.'
'हो ना परत याल तेव्हा वेळेत या' असे म्हणून दार लागले सुद्धा
पावसात आणि भटक्या कुत्र्यांशी सामना करत करत एकदाचा महामार्गावर पोहोचलो. लांबवर पूल दिसत होता.
रिक्षा मिळण्याचा संभवत नव्हता. अशा प्रसंगी सर्व रिक्षांना उलट दिशेलाच जायचे असते. कुठलेही वाहन थांबायला तयार नव्हते पुलाच्या अगोदर दोन मोठी वळणे होती. पुलावरून ह्या वाऱ्या पावसात जाणे शक्यच नव्हते . अजून एखाद्या भुताची भर पडली असती. पण वळणाकडे जाणे भाग होते.
एकला चालो रे! म्हणत मी पुढे चालू लागलो. रात्रीचे १२ वाजत आले होते. मनात म्हणले जर त्या कुणा भुताने मला पुलापलीकडील नगमा बार मध्ये सोडले तर त्याला दारू, कोंबडी, दहीभात काय हवं ते देईन. भुताला नवसच केला म्हणाना. पावसाचं जोर फारच वाढला होता. दोन हातावरचे पण काही दिसत नव्हते. नशिबाने माझा रेनकोट पिवळा भडक होता. लाईनमन सारखा . त्यामुळे निदान अपघात तरी झाला नाही.
तेवढ्यात एक गाडी हळूहळू डावीकडून येताना दिसली. त्यालाही पावसामुळे ड्रायविंगचा त्रास होतच असणार. वळणाच्या अगोदर मी गाडी जवळ आली कि बिनधास्त मागचे दार उघडून घुसायचे ठरवले. गाडी जवळ आलीच . वळणा करता वेग कमी केला असावा. आत शिरून धाडकन दार लावले. हातांनीच चेहरा पुसला.
थँक यु म्हणायला तोंड उघडलं ते उघडच राहिलं गाडी चालत होती पण ड्राइवर नव्हता. गाडीत मी एकटाच होतो. वळण तर जवळ आले होते. पुलावरच भूत माझा बळी घेणार होते. रामरक्षा आठवेना. तेवढ्यात एक मनगट आत आले आणि गाडी वळाली. आता मात्र माझे अवसान गळाले. धाडकन सीट वर आडवा झालो आणि डोळे गच्चं मिटून भीमरूपी सुरु केले.
गाडी पुलाच्या पलीकडे जाताच उडी मारून पळायचे ठरवले. तसा मारुतीला नवसही केला. नवस फेडायला मी जगात राहणार होतो का? हे पण महीयत नव्हतं . पुलाचा शेवट जवळ आला होता. पूल संपताच मी उडी मारली आणि दार लावायचे कष्ट न घेता नगमा बारकडे पळालो.
नगमात बारजवळच उभा राहिलो. कारेकर आत होताच,
'अरे जरा पतियाळा भर'
'ओला झालायस. अंग तरी पूस'
'ते नंतर '
निम्मा पेग पोटात जाताच जीवात जीव आला. कारेकर माझ्याकडे पहात उभा होताच. त्याच्याकडे वळून मी काही त्याला बोलणार इतक्यात माझ्या पाठीवर थाप पडली
एक ओलाचिंब माणूस दुसऱ्याला म्हणत होता ' हा बघ मूर्ख माणूस. आपण गाडी ढकलत असताना आत शिरून बसला होता'
मी लगेच कारेकर सांगून दोन ग्लास भरले. अरे पण तुम्ही काही बोलला का नाहीत?' 'पुलावरचे भूत आम्हालाही माहित आहे ना,'
शॉर्टकट
Submitted by अविनाश जोशी on 6 June, 2025 - 06:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच. भन्नाट किस्सा.
मस्तच. भन्नाट किस्सा.
हाहाहा खूप छान.
हाहाहा खूप छान.