तलखी

Submitted by रानभुली on 5 June, 2025 - 05:55

आजही नकारघंटाच.

आता सहा महीने झाले स्टुडीओजचे उंबरठे झिजवून.
काम मिळतंय म्हणता म्हणता अचानक ते भुर्रकन उडून जायचं.

सताक्षीच्या डोळ्यात पाणी होतं.
गाण्यासाठी तिने घरच्यांशी पंगा घेतला होता. तिच्या बाबाशी ती बोलत नव्हती.
बाबाने तिला मळलेल्या वाटेने जा म्हणून आग्रह केला होता.

"संगीत, खेळ, साहित्य, अभिनय ही क्षेत्रं आपल्यासाठी नाहीत"
बाबाचं एकच पालुपद असायचं.
आणि वेगळं काही करायचं तर स्ट्रगलला घाबरून कसं चालेल असं सताक्षीला वाटायचं.

सकारात्मक राहण्यासाठी तिने मोटिवेशन गुरूंचे सेमिनार्स अटेण्ड केलेले होते. नैराश्य येईल तसं महागड्या हॉटेलमधल्या अशा सेमिनार्सना ती पैसे भरून जायची.

बाबाकडून पैसे घ्यायचे नाहीत हे ठरवल्यावर मग तिने मिळेल ते काम करायचा सपाटा लावला.
केल्याने देशाटन हा छंद असल्याने आणि ओळखीपाळखी असल्याने मार्केटिंगची कामं मिळत. अगदी सॉफ्टवेअरचा गंध नसताना अशा कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंटचं काम करून ऑर्डर्स देखील मिळवून दिलेल्या होत्या.

पण सताक्षीचा एकच मेजर प्रॉब्लेम होता.
गाणं !
ते आपलं मुख्य करीयर आहे आणि हे काम आपण नाईलाजास्तव करतोय हे ती सतत स्वतःला सांगत असे. त्यामुळं सहा महीन्याच्या वर ती कधीच कुठे टिकली नाही. लोकांना जॉब मिळत नाही कारण शिक्षणाला अनुरूप चांगला पगार देणारी नोकरी मिळत नाही.
सताक्षीला जॉब्जची कमी नव्हती. कारण शिक्षण आणि नोकरी यांचा विवाह जमवण्याच्या भानगडीत ती पडत नव्हती. पुढच्या सहा महीन्यांसाठी पैसे जमतील इतपत मिळाला तरी पगार पुरेसा होता तिला.

याला बाबा धरसोड वृत्ती म्हणायचा.
एक आहे बाबा जेव्हां बोलायचा तेव्हां त्याला विरोध करता येत नव्हता. कारण त्याचं बोलणं एकदम मुद्देसूद असायचं.
मागच्या पिढीला काही कळत नाही असं जे तिला वाटे त्याला छेद जाई.
भले तंत्रज्ञान समजत नसेल, पण व्यवहार बद्लत नाही.

धोपटमार्गा सोडू नको हे म्हणणं काही अगदीच चुकीचं नव्हतं.
बाबाकडे कितीतरी उदाहरणं असायची ज्यांनी रूळलेली वाट चोखाळायचं सोडून वेडं धाडस केलं आणि होत्याचं नव्हतं झालं.

अगदीच काही जमलं नाही तर मग शेवटी आहेच कि लग्न !
पण तो पराभव असेल. स्वतःची ओळख निर्माण करून बरोबरीच्या टर्मवर जीवनसाथी निवडता यावा..
तिच्या आख्ख्या खानदानात हे कुणाला पटण्यासारखं नव्हतं.

***********

खूप दिवसांनी तिला परक्या राज्यातल्या सिनेमासाठी ऑफर मिळाली.
हुरळून गेली होती ती.
पण जोपर्यंत रेकॉर्डिंग होत नाही तोपर्यंत काहीही खरं नाही.
दोन दिवसांनी मात्र चक्क रेकॉर्डिंगही झालं.
स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड झालेली गाणी ऐकताना तिला तिच्या कानांवर आणि नशिबावर विश्वास बसत नव्हता.
हे सत्य आहे कि स्वप्न ?

बॅनर पण चांगला होता. गाणी कॅची होती.
एकदा का अल्बम रिलीज झाला कि नाव होणार होतं.
मग ओळख मिळणार होती.
बस्सं..
ती बाबाला जाऊन सांगणार होती. बाबाच्या डोळ्यात कौतुक बघायचं होतं तिला.
आईला काय कशाचंही कौतुक होतं.
फक्त बाबाचं ऐकत नाही म्हणून नाराजीच्या आठ्या कपाळावर असत.
पण आईला पटवणं विशेष नसायचंच.

महिना झाला पण रेकॉर्डिंग झालेल्या पिक्चरची खबरबात नव्हती.
सारखी चौकशी करणे उतावीळपणाचे दिसले असते.
एक दिवस युट्यूबवर त्याच सिनेमाचं गाणं रिलीज झालेलं दिसलं.
भाषा कळत नसली तरी त्याचं पोस्टर ठाऊक होतं. इंग्रजीतली नावं पाहून खात्री करून घेतली.
गाणं उत्साहाने तिने सुरू केलं..
पण !

कुछ तो गडबड है. माझा आवाज असा नाही.
यांनी सेटींग्ज एव्हढ्या बदलल्या कि काय ?
मग नावं पाहिली.
तिचं नाव कुठंच नाही !

कुणीतरी जयालक्ष्मी म्हणून नाव दिसत होतं.
तिच्या हातापायातलं त्राणच गेलं.
मटकन खाली बसली.

दोन तास फोनाफोनी करूनही तिला कुणीच उत्तर देत नव्हतं.
जणू काही ती अस्तित्वातच नव्हती.
शेवटी ती स्टुडीओत जाऊन आली.
तिथल्या रेकॉर्डिस्टच्या सहकार्‍याने तिला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं कि ही गायिका कुठल्या तरी दिग्दर्शकाच्या शिफारशीवरून आलेली होती. त्यामुळं ऐन वेळी हिच्या ट्रॅकवर तिचा आवाज चढवला गेला.

हा पहिला धक्का होता.
नंतर मग नित्याचंच झालं.

आपल्या स्वतःच्या भाषेतल्या लॉबिंगमुळे काम मिळणं अवघड. तरी तिने जिद्द सोडली नव्हती.
ज्या ज्या राज्यात गाणं आहे तिथे प्रयत्न केले होते.

जास्तीत जास्त नाही म्हणतील.
सुरूवातीला अ‍ॅड मिळत गेल्या. जिंगल्स मधे खूप पैसे मिळत नव्हते. पण दोन दोन ओळींचे पैसे मिळत राहिल्याने खर्च भागत होते.
कुणीतरी डबिंगचा सल्ला दिला. पण ते क्षेत्र निवडलं तर वेळ देणं गरजेचं होतं.
मग मुख्य करीयर करायचं राहून गेलं असतं.
एक दोन म्युझिक व्हिडीओ करून झाले.
कॉन्सर्टची कामं मिळाली.
भरपूर पैसे मिळाले. प्रसिद्दी मिळाली.
पण ती ओळख मिळत नव्हती.
उसनी गाणी म्हणणं आणि स्वतःच्या गाण्यासाठी ओळखलं जाणं.

पैसे संपत आले कि पुन्हा घर गाठायचं.
घरून पैसे पण नको असायचे म्हणून मग काम शोधणं.
झाली कि आता पंधरा वर्ष !

स्ट्रगल खूप झाला.
आता आजूबाजूच्या सर्व नातेवाईकांचं टुमणं चालू झालं होतं.
स्थळं येत होती.
पण नकार देत राहिल्याने नको शंका कुशंका, चर्चा यांना उधाण आलेलं होतं.

बाबाचे पैसे बुडाले आणि त्याला हार्टचा त्रास सुरू झाला.
त्यातच सताक्षीचं काय हा प्रश्न सतावत होता.
तिच्या स्वाभिमानी स्वभावाची त्याला कल्पना होती. कमी जास्त बोललं कि ती कायमची घर सोडून जाईल ही भीती वाटली होती.
पण डोळे मितण्याआधी तिचं सगळं मार्गी लागावं म्हणून एकदा बोलून घ्यायचं होतं.

आईला समजत नव्हतं कसं सांगावं.
आढेवेढे घेत लांबच्या गप्पा काढत ती हळू हळू विषयाकडे यायच्या विचारात होती.
पण सताक्षी आईला ओळखून होती.
" थेट बोल आई काय सांगायचंय ते "
आता एकदम असं बोलल्यावर आईचाही नाईलाज झाला.
मग तिनेही स्वभावाच्या विरूद्ध जाऊन चिडून तिला विचारायला सुरूवात केली.
"सताक्षी तुला जन्म दिला, तर आमचा तुझ्यावर काहीच हक्क नाही का गं ? दर वेळी काय माझं मी बघेन म्हणतेस ? आई झाली कि समजतं सगळं. पण त्या दृष्टीनेही तुझ्याकडून नकारघंटाच आहे. काय समजायचं आम्ही ? उद्या आम्ही वर गेलो तर जाताना समाधानाने जाऊ का ?"

सताक्षीने वैताग दाखवत काय सारखं सारखं तेच तेच लावलंय असे भाव चेहर्‍यावर आणले.
बाबाला बरं नव्हतं.
छातीत दुखत होतं म्हणून आईने जास्त वाद घातला नाही.

बाबा आणि सताक्षी यांच्यात आई पोस्टमन झाली होती.
संवाद कमी होत चालला होता.
बाबाचा रागीटपणा आणि लेकीचा स्वाभिमानी बाणा. फणकार्‍याने निघून जाणं,
आई मधल्या मधे भरडली जायची.

गेली पंधरा वर्षे सताक्षीच्या वाट्याला यश हुलकावण्या देत होतं,
मोटिव्हेशन गुरू नवाजुद्दीन सिद्दीकीची केस स्टडी सांगत होते.
" बीस साल छोटा मोटा काम किया लेकीन डटा रहा. उम्मीद नही छोडी. गेटिंग समथिंग ? येस ऑर नो ?"

हळू हळू या सेशन्स मधला फोलपणा जाणवू लागला होता.
ओयो ब्रॅण्ड कसा यशस्वी झाला याची यशोगाधा सांगणारा वर्षभरात ओयो का फ्लॉप झाला हे सांगायचा.
ओला ब्रॅण्ड असेल, बायजु असेल. ज्यांनी हे ब्रॅण्ड यशस्वी कसे झाले त्यांनीच अपयशाचीही गाथा सांगितली.

नवाजुद्दीन यशस्वी होण्याची कारणं वेगळी असतील. यशाचा एकच एक फॉर्म्युला नसतो.
प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो.
हा विचार मनात आला कि बाबा डोळ्यापुढं यायचा.
"धोपटमार्गा सोडू नको "

आणि मग जिद्दीने सताक्षी पुन्हा निसरड्या वाटेवरचा प्रवास पुन्हा चालू करायची.
आता पंधरा वर्षे झाल्यावर या वाटेवर पाय दमले होते.
पायात काटेकुटे जाऊन ते हुळहुळीत झाले होते.

उद्या कोलकत्यात शेवटचा प्रयत्न करायचा होता.
मोठ्या बॅनरचं काम मिळणार होतं. शक्यता होती.
पण हा चान्स घ्यायचा होता.
शेवटचा.
मग ?
पुढे ?
उत्तर नव्हतं तिच्याकडे.

ढग दाटून आले होते. कुंद हवा होती.
अंगावर शिरशिरी आली म्हणून तिने शाल ओढून घेतलेली.
ढग कि मळभ ?
थोडंसं उन्हं पडलं आणि इंद्रधनुष्य दिसू लागलं..
सात रंगांची उधळण करणारं मनोहारी दृश्य समोर होतं.
कधीच हातात न येणारं चित्र !

फोन वाजत होता.
आईचं नाव होत
" अगं कधीचा फोन करतेय, उचलत नाहीस"
" काय झालं आई ?"
" सताक्षी ताबडतोब असशील तशी निघून ये"
" अगं आई कशी येऊ, उद्या काम मिळणार आहे"
" बास झालं तुझं काम, बाबाला बरं नाही "
" अगं आई, मग घेऊन जा ना डॉक्टरकडे, उद्याचं काय होतंय ते बघून लगेच निघते"
" अगं बाई, बाबा अ‍ॅडमिट आहे, तुझ्याशी बोलायचंय बाबाला "
" आई अगं डॉक्टर्स असतील ना ? ही इज इन सेफ हॅण्डस "
" सताक्षी अगं कसं समजत नाही तुला ? ये गं लवकर, आणि फ्लाईट घे जी असेल ती "
" आई ? अगं काय हे ?
आईने फोन कट केला.

तिच्या आवाजातल्या व्याकुळतेने सताक्षी बेचैन झाली.
पण फायनल चान्स पण खुणावत होता.

काही नसेल झालेलं बाबाला. माझा बाबा आहे तो.
आई एव्हढ्या तेव्हढ्याला काळजी करते.

सताक्षीने निघतेय म्हणून सांगितलं पण दुसर्‍या दिवशीच्या संधीला लाथाडायचं नाही हे ठरवलं होतं.
बाबाला भेटूच. ही संधी आपलं नशीब पालटवणारी ठरेल.
ती आता सकारात्मक होत चालली होती.
आता ती थाबायच्या निर्णयाकडे झुकली होती.

संध्या़काळी फ्लाईट होती. त्यानंतर रात्री एक दिसत होती. तिला पैसे कमी होते.
मग सकाळी पण एक स्वस्तातली फ्लाईट होती.
दुसर्‍या दिवशी सुटी असल्याने संध्याकाळच्या फ्लाईट्सचे दर चढे होते.
काय करावं ?
बघूयात उद्याचं उद्या म्हणत तिने मन रमवण्यासाठी घरातली कामं काढली.
कपडे वाळायला घातले.
वाळलेले इस्त्री करायला घेतले.

कुकर लागलाच होता. आज डाळ भात आणि शेंगदाण्य़ाची चटणी पुरे !
वरून तुपाची धार बंद केली होती.
काम शोधण्याचं काम असलं तरी बाळसं धरलं होतं.
गाल फुलले होते.
आजच्या दिवस भात मग उद्या घरी गेल्यावर जिम लावायची.
बाबाला गुडन्यूज देऊन बरं करायचं.
बाबाच्या मनाला उभारी येईल..

उभारी येईल हा विचार तिच्या मनाच्या वरच्या थरावर तेलाच्या तवंगासारखा पसरला.
म्हणजे बाबा खचलाय हे तिच्या मनात कुठेतरी तिने बॅकयार्ड मधे टाकून दिलं होतं तर..
आणि खचण्याचं कारण ?

काय गुंता आहे हा ?
का हे पॅरेण्ट्स मुलांवर विश्वास टाकत नाहीत ? का अडकून पडतात ?
कुकरने शिट्ट्या मारायला सुरूवात केली तशी ती चटकन उठून गेली.

आजच्या सगळ्या फ्लाईट्सचं रिपोर्टिंग टाईम गेलंच होतं.
आता उद्याच निघायचं हे नक्की झालं होतं.

भात थंड झाल्यावर शेंगदाण्य़ाचा कूट आणि लोणचं घेऊन ती बसली.
आईचा नेमका फोन आला.

"कुठपर्यंत आलीस सताक्षी ?"
" अगं आई फ्लाईट मिळत नाही"
"सताक्षी, अगं पैसे नाहीत का ? ट्रान्स्फर करू का ? क्रेडीट आहे ना ? तू मिळेल त्या फ्लाईटने ये. "
" आई काय झालंय ?"
" अगं तू ये मग बोलू "

आता सताक्षीला पहिल्यांदाच काळजी वाटू लागली.
एकही घास आता गळ्याखाली उतरला नसता. प्लेट तशीच फ्रीज मधे ठेवून ती हरवल्यासारखी बसली.

उद्याचं रेकॉर्डिंग.
गेलेल्या फ्लाईटस..
बाबा ??

मन सैरभैर झालं. आई नीट सांगत नव्हती.
शरीराला कंप सुटला आणि तिला जाणवलं कि बारीक असा घाम येतोय सर्वांगाला.
थोडा ताप असावा असं वाटत होतं.
क्रोसीन घ्यायची तर दोन घास खाणे गरजेचे होते पण आता इच्छाच मेली होती.

ट्रेनचं रिझर्वेशन आणि लागणारा वेळ यामुळे तो पर्याय बाद होता.
आईच्या आवाजातल्या कातरतेने तिच्या मनात काहूर माजलं होतं.

झोप येत होती पण बिछान्यात पडल्यावर बाबा दिसत होता.
सतत जाग येत होती.
तशीच सकाळ झाली.

तिने फ्लाईट बुकींगचा प्रयत्न सुरू केला.
सकाळच्या फ्लाईटमधे एक जागा होती. पण आवराआवर करून पळावं लागणार होतं.
तिने बुकींगचा निर्णय घेतला इतक्यात घोषबाबूंचा फोन आला.

रेकॊर्डिंग आहे लक्षात आहे ना अशा अर्थाचा फोन होता.
तिने ती फ्लाईट नियतीचा इशारा समजून सोडली. आता थेट रात्रीची होती पण अव्वाच्या सव्वा रेट !

दहा वाजता रेकॉर्डिंग होतं.
पावणेदहा वाजता ती स्टुडीओच्या दारात होती.

प्रचंड दडपण आणि कालपासूनचा असह्य ताण त्यातच रात्रीची झोप न मिळाल्याने एनर्जी लो होती.

अरेंजरने तिच्याकडे पाहिलं .
कुणाला तरी बंगालीत विचारलं ही गाऊ शकेल ना ?
आणि कुठून पकडून आणतात सिंगर्स असं काही तरी पुटपुटला.

तिच्या अगदी नाजूक मन:स्थितीची त्याला कल्पना नव्हती.
तिचा संयम सुटला आणि त्याच्यावर ती डाफरली.
शब्दाने शब्द वाढत गेला आणि शेवटी
नको तुमचं असलं काम म्हणत ती फणकार्याने बाहेर आली.

अगदी बाबा समोर निघून यायची तसं.

बाहेर पडल्यावर आपण हे काय केलं हा पश्चात्ताप होऊ लागला.
भिंतीला पोपडा यावा आणि नंतर संपूर्ण भिंतच पोपड्यांनी व्यापून जावी तशी पश्चात्तापाची भावना असते.

आता करीयर संपलंच होतं.
घरी फोन लावला तर बोलणी खावी लागणार होती.

दिवस जायचा होता.
रूमवर येऊन तिने झोपून घेतलं.
रात्रीची फ्लाईट होती.

दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता घरी पोहोचली तेव्हां गर्दी पाहून धाकधूक झाली.
वातावरणच सगळं सांगत होतं.
पण मन मानायला तयार नव्हतं.

साशंक होऊन ती आईला शोधत होती.
तिच्या भोवती चार बाया बसलेल्या. कपाळावरचं कुंकू पुसलेलं आणि केस अस्ताव्यस्त झालेले.
डोळे शून्यात गेले होते.
सताक्षीने आईला हाक मारली.
पण डोळ्यात कसलीही हालचाल झाली नाही.

आजूबाजूच्या बायकांनी रडून आकांत चालवला होता.
काल सकाळीच तिचा बाबा हॉस्पिटलमधे गेला होता.
जाईपर्यंत सताक्षीची वाट बघत होता..

त्या वेळी ती स्टुडीओत !

आणि शोकाची जागा अपराधबोधाने घेतली. गिल्टने तिचा ताबा घेतला.
तिकडे बायका तिच्या आईला रडवायच्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या होत्या.

"वहिनी सताक्षी आलीय "
आईचे डोळे जराशी हलले. तिच्याकडे स्थिरावले.
शून्यवर नजर असली तरीही सताक्षीला त्यात अनेक भाव दिसले.
अपेक्षाभंगाची वेदना दिसली.

आई तशीच बसून राहिली. फक्त आता डोळ्यातलं पाणी खाली ओघळलं होतं.
थोड्या वेळाने बाबा येणार होता, म्हणजे त्याचा अचेतन देह.

हा प्रसंग अनेक सिनेमात पाहिलेला होता.
आता तिच्या बाबत घडत होता.
बाबा तिची आठवण काढत होता. आता त्याचा सामना कसा करायचा ?

कुणाचा तरी आवाज कानावर पडला.
" पोरगी अजिबात रडायला तयार नाही "

ती आता लोकनिंदेच्या पलिकडे गेली होती.
एक वेगळंच द्वंद्व तिच्या मनात चाललेलं होतं.

रागीट असला तरी बाबा मायाळुच होता. आता त्याच्या रागाच्या सर्व आठवणी हरवल्या होत्या.
त्याचा मायेचा स्पर्श, कौतुकाने खुदकन हसणं, तिच्या चिवचिवाटाने चेहयावर आलेलं सूक्ष्म हसू हे जसंच्या तसं फेर धरून नाचत होतं.

लहान असताना आजारी पडल्यावर आई झोपल्यावर हळूच शेजारी येऊन बसणारा बाबा आता तसाच्या तसा आठवत होता.
स्कूटरवर समोर उभं करून आणलेलं चॉकलेट, तीन चाकी सायकल ..
बाबाच्या या आठवणी त्याच्या रागापुढे धूसर झालेल्या.
रागाचा पडदा निवळताच हा ओलावा स्पष्ट दिसू लागला.

गलका झाला आणि बाबाला आणलं गेलं.
शांत झोपला होता. आई अंगावर पडायला गेली तसं लोकांनी तिला खेचून घेतलं.

सताक्षी निर्विकार झाली होती.
एखाद्या संताप्रमाणे तटस्थतेने सगळं बघत होती.
शोकाकुल असल्याचं कुठलंच चिन्ह तिच्या चेहर्यावर नव्हतं.

"हिला रडवा "
कुणी तरी म्हणालं.
किती अडाणी असतात लोक, ती मनात म्हणाली.
बाबाच्या जवळ जाऊन तिने गालाला हात लावला. आत्या ओरडली "अगं , असं नाही करू "
पण तिने लक्ष दिलं नाही.
हळूच तिने ओठ बाबाच्या गालावर टेकवले.
त्याचा तो थंडगार स्पर्श...
" अरे या पोरीला बाजूला करा "
कुणाचे तरी मागून आलेले हात तिने झिडकारले.

विधी संपत आले तसं चार जणांनी बाबाला उचललं आणि आईने हंबरडा फोडला/
लोक म्हणाले " बरं झालं रडली बाई"
सताक्षी शांतच होती.

त्या क्षणानंतर ती शांतच झाली.
रडणं तिच्या बाबाला मंजूर नव्हतं.

काही दिवस माय लेकीत संवाद नव्हता.
"भूक लागली का ?" "नाही"
बस.

हळू हळू लोकही निघून गेले.
तसतसं लाईफ सुरळीत होऊ लागलं.

आई सावरली होती.
एकदाच बोलली होती " आता का आलीस ? जेव्हां बोलावलं तेव्हां आली नाहीस"
मग आत्याने तिला सावरलं होतं.
" माझा भाऊ तर गेला, आता त्याची निशाणी आहे. तिच्यावर कायमचा परिणाम होईल असं नको बोलूस वहिनी. आहे त्याला जप"

सताक्षी गप्प झाली होती.
घरची जबाबदारी येऊन पडली होती.
ती तिने उचलली होती.
ना कुणा मित्रमंडळींशी संपर्क, ना नातेवाईकांशी संवाद.
येऊन जाऊन आई.
पण आता पहिल्यासारखं आईला पटवणं नव्हतं.

सगळे संदर्भच बदलले होते.

बाबाची एक एक गोष्ट आठवत होती.
बाबाचं बरोबरच होतं. ऐकायला हवं होतं.
इगो मुळं ऐकलं नाही.
पण ट्राय नको का करायला ?
उलतसुलट विचारांची गर्दीही आता ओसरू लागली होती.

बाबाच्या आठवणी कमी व्हायच्य़ा ऐवजी जास्त यायच्या.
एकांतात आता बाबा दिसायचा.

स्वप्नात यायचा बाबा.
ती आता स्वप्नांची वाट बघू लागली.
तिच्या लक्षात एक गोष्ट आली.
आधी तिला सकाळी उठल्यावर स्वप्नं लक्षात राहत नव्हतं,

पण बाबाचं स्वप्न लक्षात रहायचं.
मग ती आईला सांगायची. पण आई आता पहिल्याप्रमाणे ऐकायची नाही.
" जे मनात असतं तेच स्वप्नात दिसतं "
लेकीला पश्चात्ताप व्हावा असं कोणत्या आईला वाटेल ?
पण तिच्या या वाक्याचा रोख तोच असावा असं तिला वाटायचं.

मग तिच्या मनातलं ओळखून आई म्हणायची,
"सताक्षी, माणूस गेलं कि संपलं. मला नाही स्वप्न येत. बाबाचं काहीही करायचं ठेवलं नाही बघ. त्यामुळं बाबा स्वप्नात येत नाही "
" सताक्षी जे गेलं त्याचा जास्त विचार करू नये. आपल्या पुढच्या आयुष्य़ाचा विचार करावा. माझीही मनाची तयारी झालीय. बोलावणं आलं कि जायचं"

ती यावर काहीच बोलायची नाही,
कारण मग लग्नाचा विषय निघणार.

तिचा निर्णय होत नव्हता
वेळीच झालं असतं तर बाबा समाधानाने गेला असता. तिलाही वाटायचं.
पण स्वत:ची ओळख जिला बनवता आलेली नाही अशा बाईची अवस्था लग्नानंतर काय होते हे पाहिलेलं होतं. प्रश्न होता आईला कसं सांगणार ?
यावरून अनेकदा रणकंदन झालं होतं.

बाबा गेल्याला वर्ष होऊन गेलं होतं.
नातेवाईक आले. परिचित आले. भाषणं ठोकून गेले.
लोक आपल्याकडे येतात म्हणून मग माय लेकी आता सर्वांच्या कार्याला जाऊ लागल्या हाच काय तो फरक झाला होता.

संगीत शिक्षिकेची नोकरी लागल्याने स्वावलंबी होती ती.
बाबाने आयुष्यात कमी पडणार नाही अशी व्यवस्था लावून दिली होती तरी तिला काही तरी करत रहायचं होतं.

आठवणी कमी होतात म्हणे वर्ष श्राद्धानंतर.
पण तिच्या मनात तर दाटी जास्त होत चालली होती.

गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त जोराचा पाऊस होता.
अलिकडे तिला बाबाचा फोटो पहायची भीती वाटत होती. मग आठवणी येतात.
स्वप्नं पडतात.

पण मुद्दाम टाळाव्यात तर उलट स्प्रिंगसारखी उसळी मारून येतात.

आई आता अगदी नॉर्मल होती.

"सताक्षी तेव्हां तू रडली असतीस तर आता ही अवस्था झाली नसती. आता मात्र काळजीचं होईल बरं का ? आता मन रमवत जा कशातही "

आणि हीच आई पुन्हा म्हणायची,
" कॊलेजला असल्यापासून तुला कधी कशाला नाही म्हणाले नाही. तेव्हां पासून तुझं गाणं, बाहेर फिरणं कधी कशाला रोखलं नाही. आता तिशीला आलीस. बाबाच्या समोर लग्न करून गेली असतीस तर सुटला असता तो. आता किमान माझ्या आनंदासाठी तरी कर लग्न. मार्गाला लागली कि मी डोळे मिटायला मोकळी. आईबापाला एव्हढं तरी सुख द्यावं "

माणूस गेलं कि पुन्हा दिसत नाही. कसलाच मागमूस राहत नाही.
आता लग्न करून बाबाला कळवायची पण सोय नाही.
पण आई तर आहे !

तिची उलघाल होत होती.
असंख्य स्त्रियांप्रमाणे आपल्या अस्तित्वाला आकार न देता तिला कुणाच्या तरी नावाने ओळखलं जाण्याला शरण जायचं होतं.

कुंद वातावरण होतं.
धुकं पसरलं होतं.
हवेत गारवा होता म्हणून तिने आईला आणि तिला कॉफी केली.
कॉफीने तरतरी आली.

युट्यूबवर प्राण्यांचे व्हिडीओ बघण्यात वेळ छान जाई.

सिंहाची प्राईड ती कौतुकाने बघत होती. डौलदार सिंह आणि त्याच्य़ा आजूबाजूला सिंहीणी.
इथेही पुरूषप्रधान संस्कृती का ? ती स्वत:लाच मिस्कीलपणे म्हणाली.

एव्हढ्यात त्या सिंहीणींचे कान ताठ झाले.
त्या धावत सुटल्या.
कॅमेरामनची कमाल होती. त्याने झाडीत आलेला एक चित्ता टिपला.

सिंहीणींनी आता सापळा बनवला.
चित्त्याला पळून जायला रस्ताच नव्हता. तो घाबरून झाडावर चढायच्या प्रयत्नात असतानाच मागून आलेल्या दोघींनी त्याचा गळा पकडला.
जगातला सर्वात वेगवान शिकारी जंगलच्या राण्यांचा शिकार झाला.

जंगलची राणी !
या राण्या राजासोबत राहतात पण यांची ओळख आहे. कुणावरही कसलंही बंधन नाही.
ना त्याचं नाव लावायचं. शिकार करून आणायची. स्वाभिमान जपायचा,,
असल्या भावना त्यांच्यात असतील का ?
तरी पण या मुक्त जीवनाचा हेवा वाटला तिला.

थंडी असली तरी भूक नव्हती.
रात्री दोघींचाही कधी डोळा लागला ते समजलंच नाही.

पहाटे पहाटे सताक्षी आईला हलवून जागं करत होती.
"आई उठ"
आईची झोपमोड झाली.
" काय झालं बाळा ? बरं आहे ना ?"
"आई स्वप्नं पडलं "
" अगं मग सकाळी सांगायचं ना "
" नाही आई विसरून गेले तर ?"
" बरं सांग "
" आई बाबा आला होता "
त्यात काय नवीन असे भाव आईच्या आळसावलेल्या डोळ्यात होते..
" आई ऐक ना, बाबा आला होता. हे बघ इथे या बेडजवळ उभा होता. आणि मी त्याच्या गळ्यात पडले आणि हुंदके देऊन रडत होते आणि तो ओगं ओगं करून हसत होता आणि थोपटत होता मला "
" बरं झोप आता "
" आई ऐक ना गं. हे स्वप्न नव्हतं. मला बाबाचा वास आला, स्पर्श जाणवला. तो ओळखीचा स्पर्श आणि ना त्याच्या चेहयावर समाधान होतं.
आई ऐकतेस ना ? आई मला वाटलं बाबा म्हणले कि माझ्या माघारी आईची काळजी घे, तिच्या मनासारखं वाग..
पण आई बाबा असं काहीच नाही म्हणाला "
" मग ?"
" आई बाबा म्हणाला . सताक्षी नेहमी सेल्फ रिस्पेक्ट ही तुझी प्रायॉरिटी होती बाळा. मनासारखं जग. समाधानी रहा. आयुष्य जग "
आई काहीच बोलली नाही.
" आई सांग ना गं बाबा असं का म्हणाला ?"

आई आता उठून बसली होती.
तिने सताक्षीला जवळ ओढलं. मांडीवर घेतलं.
तिच्या दाट केसातून तिची बोटं फिरू लागली.
" बाळा , बाबाने तुला नाही मला सांगितलं. तुझ्या सुखाच्या, आनंदाच्या आड माझ्या इच्छा येऊ देणार नाही आता. बाबाला हेच बोलायचं होतं बहुतेक.. त्याला कळून चुकलं होतं म्हणून त्या दिवशी तुला फोन करत होते "
"अगं पण आई तू स्पष्ट सांगायचंस ना ? माझ्या मनात सुद्धा बाबाबद्दल अमंगल विचार येणार नाहीत. बाबा हॉस्पिटलमधून खडखडीत बरा होऊन येणार हेच माझ्या मनात होतं "
" बाळा, इतक्या लांब होतीस तू. लांबचा प्रवास, तुला काळजी वाटेल असं कसं सांगू मी ?"

दोघीही गप्प झाल्या.
सताक्षी बोलली.
" आई ते राहीलेलं बाबा सांगायला आला का गं ?"
आणि आईच्या गळ्यात पडून तिने हंबरडा फोडला.

कित्येक दिवस आटलेले तिचे अश्रू आता बांध फुटल्याप्रमाणे बाहेर उसळी घेत होते.
मन हलकं हलकं होत होतं.

"रडून घे बाळा"
म्हणताना आईलाही रडू कोसळलं आणि दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून रडत राहिल्या.

बाहेर फटफटलं होतं आणि पहाटेचं धुकं विरत चाललं होतं.

सताक्षीने आईच्या पुढ्यात एक फाईल टाकली.
बाबाच्या नावाचं संगीत विद्यालय !
तिच्या स्वतंत्र ओळखीत आई आणि बाबाची ओळखही सुरेख गुंफली गेली होती.

आई त्या नावावर हात फिरवत भावूक झाली होती.
तिच्या हातात चहाचा कप देईपर्यंत !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार सुंदर कथा आहे रानभुली. मधे मधे तर काव्यच जाणवतं - ते इंद्रधनु, तेलाचा तवंग वगैरे. तू तल्लीन होउन लिहीलीयेस ही गोष्ट.
शिवाय एका वेगळ्या अनुभवविश्वाची ओळख करुन दिलीयेस.
----------------------
फक्त मला एक कळलं नाही - हे जे संगीत विद्यालय ती बनविणार होती तो तिचा मानस असतो ना? म्हणजे आत्ता तिने तसे ठरविलेले असते ना की आपण विद्यालय बनवायचे व बाबांचे नाव द्यायचे. तिथे आपण गाणे शिकवायचे वगैरे.
म्हणजे मानस असतो फक्त की वास्तव असते?

अ‍ॅक्च्युअली तलखी म्हणजे आग.
तलखी हा शब्द घालमेल, तगमग म्हणून वापरला आहे. अर्थछटा किंचित वाकवून. कारण तगमग पेक्षा आतल्या आत होणारी घुसमट असा शब्द हवा होता.

गद्यरुपी पद्य आवडलं.

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपटमार्गा सोडू नको
संसारामधे ऐस आपुला, उगाच भटकत फिरू नको.‌

हे अनंत छंदींचं म्हणणं ऐकावं की नाही असा प्रश्न बहुतेकांना करिअरच्या एक किंवा अनेक टप्प्यांवर पडत असेल.

त्यावेळीची तगमग, स्वतःशी होणारा संघर्ष, यशापपशाची आंदोलने हे सगळं कथेत चांगले आले आहे.

नवीन प्रतिसाद लिहा