"अनुप्रासलो मरणे" - आरती प्रभु ( दिवेलागण) - या काव्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा सुरु केला आहे. मायबोली वरील जाणकारांनी कृपया या कवितेचा अर्थ, संदर्भ, रसग्रहण इथे करावे.
अनुप्रासलो मरणे
मी मातीचे ऋण फेडाया देवाघरून आलो
नक्षत्रांचे क्षेत्र सोडूनी गर्भवासी मी न्हालो
जन्मोजन्मीच्या तळी सांडली वेचित वेचित किरणे
यमाकांमधुनी यमास जोडून अनुप्रासलो मरणे
त्वचा सोलूनी दिधला शेला जिला एक तीच
तीच म्हणाली, "लाल न इतका हवे पांघरू रक्त"
लाटांवरचा केस गुच्छून आली दुसरी
अलगत पाया नव्हती छाया, देह फुलांच्या लहरी
पार जाऊनी ती पापांचे खुडीत होती देठ
घोट मिठाचे घेऊन मिटले पावरीवर मी ओठ
वक्षामधली जळती रेषा : मृगजळ झाले वाफ
ध्रुपद शोधीत पुन्हा निघालो होते; सोबत होते शाप
या जन्माला भेट जाहली... खराच होता सांधा
स्वप्नामधुनी नुकते उठले शिल्पच असला बांधा
स्वप्नकळ्यांचे शरीर छेडित फेडीत वसने बसलो
काचोळीची गाठ कळ्यांची तमात उसवित हसलो
"थांब कळ्यांची फुले होईतो..." असे म्हणाली होती
निरभ्रतनु ती कुस्करली मी तसल्या मलीन हाती
भांगांमधली पिंजर कितीदा घळली मांडीवरती
आणि निखळले गालांवरती आसूच पहिल्या राती
न्हात गरोदर उन्हात माती, मी व्यभिचारी फक्त
नक्षत्रांचे क्षेत्र असे मी बाटविले दिन रात.....
या कवितेचा आणि "कधी तो कधी मी" ह्या कवितेशी आणि "ती येते आणिक जाते" ह्यात बरेच साम्य आहे असे मला वाटते.