ठमीची गोष्ट - भाग १

Submitted by हौशीलेखक on 10 April, 2024 - 22:24

बरोबर तीस वर्षांनी पुन्हा कलकत्याला आलो होतो - आठ दिवसांच्या बिझनेस ट्रीपसाठी. आयुष्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा वाटलंही नव्हतं ह्या शहरात कधी पाऊल पडेल. आठवडाभर राहिल्यावर वाटलं होतं पुन्हा कद्धी इथे पाऊल टाकणार नाही... आणि दोनच वर्षात परत आलो, पुढची दोन वर्ष राहिलो, प्रेमात पडलो - कलकत्त्याच्या, बंगाली भाषेच्या, संस्कृतीच्या... तेव्हा सोडतांना वाटलं होतं, आता मात्र शंभर टक्के खात्रीने परत काही येत नाही मी! म्हणतात ना, पुरुषस्य भाग्यं!

बिझनेस ट्रीप संपली कालच; पण ओल्ड टाइम सेक, वीकेंडचे दोन दिवस इथेच राहून सोमवारी पहाटे परत जाणार. आज सकाळपासून फोन करायचा सपाटा लावलाय. तिचं लग्नानंतरचं नांव बरोबर आहे का ह्याची सुद्धा खात्री नाही. तीस वर्षांपूर्वी एवढी जवळीक, की नांव घेऊन हाक मारायचीच वेळ येत नसे. आलीच तर तोंडाला येईल त्या नांवाने - रंभा, ठमी, साळकाई, देवीजी... - काहीही चालत असे. ओ द्यायला ती तत्परच होती, ह्या नावांमधलं ओ का ठो समजत नसलं तरीही. मग परकी झाली ती एवढी, की नांव सुद्धा लक्षात नाही आता. आणि एवढं आहे, तर मग भेटायची एवढी उत्सुकता तरी कशाला?

पण काहीतरी आहे खरं! काल त्याच जुन्या रस्त्यांवरून गेलो ना? मधल्या काळात गर्दी पंचवीस पटींनी वाढल्यासारखी जाणवत होती. संध्याकाळच्या गर्दीत गाड्या, भॉम्पभॉम्प वाजवत पुढे सरकायची घाई करणाऱ्या सायकल रिक्षा, माणसं, रडणारी मुलं, फेरीवाले, वैतागून हॉर्नवर पंजा दाबून बसलेले टॅक्सीवाले - गोंगाटाची परिसीमा होती. ठेच गर्दीने ओसंडून वाहणारे, खरं तर गलिच्छच म्हणावं असे रस्ते. बाजूला गाडीमध्ये सूझनचा (माझी बॉस; तिला कलकत्ता दाखवायला घेऊन गेलो होतो) अविरत जप चालला होता, 'ओ माय गुडनेस! हाऊ क्राऊडेड! कान्ट बिलीव्ह इट. हाऊ कॅन दे लिव्ह लाईक धिस?' पण त्यामध्ये सुद्धा तिच्या कॅमेऱ्याचा क्लिक्लीकाट काही थांबत नव्हता. ह्या रस्त्यांवर फोटो काढण्याएवढं खास काही आहे कॉलेजात असतांना जाणवलंच नव्हतं, नाही? आणि कॅमेरा कोणाकडे होता तेव्हा; आणि हवा होता कशाला? ठमीचा चेहरा आजही तस्साच डोक्यात आहे, त्यासाठी कागदी फोटोंची काय गरज! सुझनला माझी कॉलेजची बिल्डींग बाहेरून दाखवली. तिने अमेरिकन सराईतपणे झटदिशी चेहऱ्यावर आठवं आश्चर्य बघत असल्याचा कौतुकाचा भाव फासला. म्हणाली 'तुझे तेव्हाचे मित्र मैत्रिणी असतीलच ना इथे? मग, क्लास री-युनियन नाही का?' आणि एकदम लक्ख ट्यूब पेटावी तसं झालं - अरेच्या! फोन तरी करून बघता येईल. म्हणजे, मुळात डिरेक्टरी मधून शोधून काढायला हवे नंबर, त्यासाठी नावं आठवायला हवी. तेव्हा दोन-पाच मिनिटं विचार करून ठमीचं खरं नांव आठवलं - पहिल्या दिवशीच, तोंडाचा फुगा करत. 'आमार नाम शुचिश्मिता चोट्टोपाध्दाय' म्हणून ओळख करून दिलेली. कोण एवढं मोठं नांव घेत बसणार! म्हणून थोडी ओळख वाढल्यावर 'ठमी'! म्हटलं आमच्या मराठीतही असतात तुमच्याचसारखी डाकनामं... इतकी गोड हसली होती. आता पुढचा प्रश्न - लग्नानंतरचं नांव काय? सगळी ओळखीची गांगुली, चॅटर्जी, बॅनर्जी, सेन, ठाकूर.. आठवून बघितली - गुहा! हां, गुहा आडनांव होतं तिच्या नवऱ्याचं... म्हणजे आता तिचं पण, नाही का.

गुहा नांवानी भरलेली पाच सहा पानं बघूनच छाती दडपली. पण, नेटाने फोन फिरवायचा सपाटा लावला. प्रथमग्रासे मक्षिकापातः! म्हाताऱ्या बाईंनी उचलला. त्यांना फक्त बंगालीच येतं. मग काय, एवढ्या वर्षांपूर्वीचं, मोडकं तोडकं, गंज चढलेलं बंगाली घासून पुसून झाडलं त्यांच्या तोंडावर! दुसरी पंचाईत म्हणजे घरातल्या 'बौ' (सूनबाई)ची चौकशी धेडगुजरी बंगालीत करणारा हा कोण अ-बांगाली - हा संशय फोनच्या कर्ण्यामधून माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होता. हा अनुभव त्यांनतर अनेकदा आला. बारा-पंधरा वेळा अशा ठोकरा खाल्ल्यावर हा वेडगळ नाद सोडून द्यावा अशी सद्बुद्धी झाली होती, पण 'अजून एकदाच' च्या मोहाने विजय मिळवला... आणखी तीन-चार वेळा. आणि शेवटी एकदा 'हालो, आमी शुचिश्मिता' कानावर पडलं. तोच आवाज! थोडा थकलेला... 'ठमी?' काही सेकंद स्तब्ध शांतता. माझा विचार चालू, फारफार तर काय, प्रॅन्क कॉल म्हणून बाई धाडकन फोन ठेऊन देईल; व्हिडीओ फोन तर नाही ना हा, आणखी काय होणार! पण तब्बल वीसेक सेकंदांनी आवाज आला 'के? के बोलचे? की बोल्लेन आपनी? (कोण? कोण बोलतंय? काय म्हणालात?)' मी म्हटलं 'चीनते पारो ना (ओळखलं नाहीस)?' 'ना, बिश्शाश कोरते पारिनी (विश्वास नाही बसत).' - आता मात्र उत्तर तत्क्षणी आलं, तस्संच फटकन, तस्संच खट्याळ.

ते खरंय! कसा विश्वास ठेवणार? एकेकाळी पाठ फिरवून आयुष्यातून निघून गेलेलं, आपलं वाटलेलं, एकदाही मागे वळून न बघता निघून गेलेलं माणूस! एक पत्रही लिहावंसं वाटलं नाही कधी ह्याला, का एका पत्राचं उत्तर द्यावंसं नाही वाटलं. अस्तित्वात तरी आहे का नाही ह्याचीही शंका असतांना अचानक धूमकेतू सारखं उगवेल? कशाला परत दार ठोठावेल... फोनची घंटी वाजवेल?

का? ते त्यालाच माहिती नाही.

एकदा ओळख पटल्यावर तिच्या प्रश्नांचा महापूर पार अवाक करतोय. 'कुठे होतास एवढी वर्ष? कुठून बोलतो आहेस? मी ऐकलं परदेशी गेलास? मला साधं कळवता सुद्धा आलं नाही तुला? मी कोण अर्थात, काय गरज आहे ना मला सांगायची?' मधली तीस वर्षं एखाद पान उलटावं तेवढ्या सहजपणे मागे पडली. अश्शीच भांडायची - रुसायची - कद्धी सुद्धा बोलणार नाही म्हणायची - आणि नॉनस्टॉप बोलत सुटायची. त्या परिस्थितीतही, तिचं ते फाडफाड बंगाली अजून आपल्याला समजतंय ह्याचा आनंद झाला.

प्रॉब्लेम तेव्हापासून आतापर्यंत तोच - समजतं सगळं, पण बोलता येत नाही! उत्तर देण्याएवढं बंगाली तर तेव्हाही येत नव्हतं, आणि आता? मुळात कुठच्या का भाषेत, उत्तर असायला हवं ना!

आम्ही अतिशय चांगले मित्र होतो, दिवसाचा बराच काळ एकत्र घालवत होतो; अखंड एकदुसऱ्याची टिंगलच करत होतो. ती हुशार होती, खट्याळ होती, एक अवखळ, इर्रिप्रेसिबल म्हणावं असा, स्पार्क होता, छान विनोदबुद्धी होती तिच्यात. सुंदर?... त्याचं उत्तर शेवटी बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं, नाही का? ‘आकर्षक' वर तरी बहुतेकांचं एकमत झालं असतं. पण मलाच कुठच्याही कमिटमेन्टची फार भिती होती. माझा मी काही करू शकेन, कुठेही जाईन आणि कसाही राहीन; पण मला बरोबर इमोशनली सुद्धा अवलंबून असलेलं कोणी नको होतं. गाठ बांधून स्थिर राहण्यापेक्षा, मी गाठी सोडून निर्लेपपणे कुठेही जाऊ शकतो ह्या स्वातंत्र्याची ओढ जास्त असते त्या वयात, निदान मुलांच्यात तरी! कशाकडेही म्हणताक्षणी पाठ वळवून मी एकदाही मागे न बघता निघून जाऊ शकतो हा ताठा होता माझ्यात. हे सगळं, कुठच्याही भाषेत सांगणं कठीण होतं, तिला समजणं त्याहूनही कठीण - असं निदान मला वाटलं होतं. त्यामुळे, जेव्हा नोकरीच्या निमित्ताने आपोआपच फारकत झाली, तेव्हा 'हो, पत्रं लिहू' एवढ्या वायद्यावर वेगळं होता आलं - करार-मदार, वेड्या शपथा आणि आणाभाका नसण्याचा तो एक फायदा, की प्रत्यक्ष तोडायला असं काही नसतंच! तिने वर्षभरात पत्रांमधून, घरचे लोक लग्नाच्या मागे लागले आहेत असं कळवलं, तेव्हा मी उत्तरात नुसती तिला बघायला येणाऱ्या स्थळांची, बंगाली बाबूंची, बंगाली लग्नसोहळ्याची थट्टा केली. वधूला डोक्यावर उचलून आणण्याची त्यांची पद्धत असल्याने चार पैलवानांना आतापासूनच खुराक देऊन तालीम करून घे असा सल्ला दिला. माझ्या उत्तरात तिचं असं बघून, दाखवून लग्न होणं गृहीतच धरलेलं सूचित होतं, आमच्या दोघांच्या संबंधी काहीच सूचना नव्हती. ना तिने विचारलं, ना मी सांगितलं. ताठा तिच्यात काही कमी नव्हता. काहीही स्पष्ट बोलायच्या किंवा लिहायच्या ऐवजी, तिने फक्त उलटी माझी 'एकदा लग्न होऊन गेले सासरी, की मग बसशील तळमळत. कित्ती बोलावलंस तरी मी काही येणार नाही. बीएरपोड आमार श्श्यामि ऍका आमार शोबाई (लग्नानंतर नवरा हेच माझं सर्वस्व!)' अशी टिंगल केली होती. एवढ्यावर मी समजून घेऊन काही सरळ डोक्याने विचार करून उत्तर देईन अशी कल्पना असेल तिची.

म्हटलं ना, अचाटच होती तिची कल्पनाशक्ती!

'बरं मग! समजतंय तरी का मी काय बोलतेय, का विसरलास सगळं बंगाली एव्हांना? पारच अबोल झालास एकाएकी! उद्या संध्याकाळी आमच्याकडे ये जेवायला आणि गप्पा मारायला. नाही, फालतू कारणं नको आहेत मला. रात्री आमच्याच इथून जा एअरपोर्टला. मी आणि पूर्णेन्दू येतो पाच वाजता तुला न्यायला.' तीच पूर्वीची इमोशनल बळजबरी!

(क्रमश:)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान