दोन घटना

Submitted by Meghvalli on 18 March, 2024 - 04:08

१. दूर कुठेततरी हिमालयाच्या पायथ्याशी जंगलांत वसलेला एक छोटेसे आदिवासी गाव . गाव तुरळक वस्तीचे . घनदाट जंगलाने , दर्या खोऱ्यानी घेरलेले .शहरा पासून , लोक वस्ती पासून तुटलेलं. जंगली श्वापदांची शिकार आणि फळे खाऊन निर्वाह चालत असे . जोगिया त्यांचा मुखिया आणि चंपा त्याची बायको . त्यांच्या बरोबर जोगियाची वृद्ध आजी .

आज वस्तीचा शिकारीचा दिवस असल्याने जोगिया आपल्या लोकांना घेऊन तिन्ही सांजेलाच शिकारी साठी बाहेर पडला होता. चांगली मोठी शिकार मिळाल्यास उद्या मोठं गाव जेवण होणार होतं. मार्गशीर्ष महिन्याची कडाक्याची थंडी . दिवस अमावास्येचा . बाहेर कुट्ट काळोख . मध्य रात्र उलटून गेली तरी जोगिया चा पत्ता नव्हता .आजी थोडी काळजीतच होती ,चंपाचे दिवस भरत आले होते व केव्हाही बाळंत झाली असती . रात्री पासूनच चंपाच्या पोटात कळा सुरु झाल्या . अमावस्या होतीच त्या मुळे बाहेर मिट्ट काळोख पण त्यात भर म्हणून कि काय अचानक वीज़ेच्या कडकडाटासकट घनघोर पाऊस पडायला लागला .त्यात झोम्बरे वारे आणि कडाक्याची थंडी . वारा सु सु करत झोपडीत घुसण्याचा प्रयत्न करत होता. चंपा अडली होती . वृद्ध आजी तिला धीर देत होती . या थंडीत सुद्धा चंपाच्या मुखावर धर्म बिंदू ओघळत होते .आजी मनातून घाबरलेली होती . तिचा जीव वर खाली होत होता . अश्या ह्या परिस्तितीत मदतीला कोणीच येऊ शकत नहव्ते .चंपा असहाय वेदनेने तळमळत होती . सुटकेच्या प्रतीक्षेत. प्राण कंठाशी आले होते . रात्र उलटून केहवचं ब्रम्ह मुहूर्त आला होता . चंपा सुटकेसाठी तळमळत होती पण सुटका होत नव्हती .रात्र वैऱ्याची होती . तिचा धनी तिच्या सोबत नव्हता .क्षणा क्षणा ला वेदना असह्य होत होत्या . आजीने घरातल्या देवाला दिवा पेटवून साकडे घातले . फडफडत्या ज्योतीच्या प्रकाशात चंपा लढत होती . वेळ सरत होती . युद्ध संपत नव्हते . चंपेला ग्लानी येऊ लागली . ती थकली होती लढून. तिने हार मानली व स्वतःला मृत्यूच्या हवाली करण्यास तयार झाली. डोळे मिटताना फक्त एकच दुःख मनात होते . तिचं बछडं कसं असेल , मुलगा का मुलगी , वाचेल कि तिच्या बरोबरच मृत्यूच्या दाढेत जाईल हे तिला कळणार नव्हते . परमेश्वरा का रे असे करतोस ? या विचारताच तिने डोळे मिटले , तिला मृच्छा आली .प्राण जाऊ पाहत होते . इतक्यात आजी ने केविलवाण्या रडण्याचा आवाज ऐकला. आजीचे डोळे चकाकले . जोगियाचा वंश पुढे नेणारा जन्माला आला होता .रात्र केव्हांच उलटली होती , पाऊस संपला केव्हांच होता , वारा शांत वाहत होता . दूर दरीतून प्रतिपदेचा सूर्य नारायण उगवत होता . पक्ष्यांचा किलबिलाटात झोपडी बाहेर शिकारीहून परतलेल्या लोकांचा विजयी जल्लोष ऐकू येत होता . आज बऱ्याच दिवसांनी वस्तीत मेजवानी होणार होती .

२. हिमालयाचा अती दुर्घम उंच परिसर .ढगांच्या हि वर उंचच उंच बर्फाळ शिखरांनी वेढलेला .खाली दूर खोल दर्या पसरलेल्या . जंगली श्वापदांनाही दुर्घट असणारा मग मनुष्य प्राण्याची ते थे काय गाथा . मनुष्य व प्राण्यां पासून निसंपर्क असा तो प्रदेश पण अतिशय अलौकिक निसर्ग सौंदर्याने नटलेला .

संध्या कधीच उलटून गेलेली व रात्रीचा प्रहार केव्हाच सुरु झालेला . माधव ने गुफे बाहेर व आंत धुनी पेटवली . थंडी खूपच बोचरी व कडाक्याची होती . आज जरा जास्तच . ह्या दिवसांत अशी थंडी असतेच अर्थातच माधवला त्यांत काही नवीन नव्हते . मार्गशीर्ष महिना आणि त्यात अमावास्या . थंडी नाही तर काय असणार ? गेली बारा वर्ष त्याच्या सोबतीला हा निसर्ग रम्य मनुष्य निसंपर्क परिसर , दिवस ,रात्र आणि थंडी इतकेच होते . गुरुदेवांबरोबर इथे येऊन उद्या बारा वर्षे पूर्ण होणार होती .गुरुदेवांना भेटून हि तितकीच वर्षे लोटली होती . तो उत्साहात होता कारण गुरुदेवांचा मानसिक संदेश त्याला मिळाला होता की उद्या ते त्याला भेटायला येहार आहेत .बारा वर्ष तो गुरुदेवांच्या आज्ञे चे काटेकोर पालन करीत निःसंग , निसंपर्क आयुष्य व्यतीत करीत होता . शरीर , मन आणि तो या शिवाय आणि कोणीच नव्हते इथे . सर्वत्र शांतता आणि स्तब्धता . हळू हळू शरीर आपले ओझे विसरून गेले व मनाच्या सर्व व्याधी गळून पडल्या . मन निरिच्छ कधी झाले हे त्याचे त्याला ही कळले नाही . मन , शरीर आणि तो एकच झाले होते आणि तो या निसर्गाशी एक रूप झाला होता . अंतर बाह्य द्वैत उरले नव्हते . उरली होती ती फक्त जाणीव असण्याची .

तरीही आज काही तरी वेगळेच होते . गुरुदेवांच्या येणाच्या संदेशाने काही तरी वेगळाच उत्साह व उर्मी आले होती . त्यामुळे माधव ला निद्रा येत नव्हती . तो मुर्ग जिनावर धुनी शेजारी पद्मासनात बसला होता . डोळे मिटलेले होते . मन शांत होतं तरीही त्या शांत मनावर हलकेच आनंद तरंग उठत असलेले तो पाहत होता .ब्रह्म मुहूर्त जवळ येत होता इतक्यात दूर खाली दरीत कुठेतरी विजा कडाडल्याचा आवाज घुमला . माधव चे डोळे आपोआप उघडले व आवाजाच्या दिशेने पाहू लागले . दूर खाली ढगांतून विजेचा प्रकाश प्रथम दिसला व नंतर आसमंतात व श्रोतांत आवाज घूमला . दृश्य अजब होते . खाली दारींत वादळ वाऱ्या सकट पाऊस आणि इथे ढगांच्या हि वरती असलेली ही जागा . इतक्या वरतून आणखीनही वरती दिसणारं अमावस्येचे चांदण्यांनी भरलेले निरभ्र आकाश

खाली त्या खोल दरीत निसर्ग आक्रोश करत होता आणि इथे वरती निरव शांतता जाणवत होती . दोन वेगळी विश्व इथून एकाच वेळी दिसत होती आणि माधव स्तीतप्रज्ञा प्रमाणे फक्त पाहत होता . वेळ सरत होती . दृश्य सरकत होते , पालटत होते . माधव चे डोळे फक्त ते दृश्य पाहत होते , मन मात्र निर्विकार . इतक्यातच गुरुदेवांचा संदेश मनांत अलगद विसावला. माधवा अरे तयार आहेस ना ? हा बघ मी आता पोहचणारच आहे .

माधव भानावर आला . दूर दरीतून प्रतिपदेचा सूर्य नारायण उगवत होता . त्याच क्षणी माधवच्या नजरेत शुभ्र बर्फातून वर सरकत येणार एक छोटा ठिपका भरला. तेच गुरुदेव होते . बारा वर्षांचा काळ सरकला होता . माधव ला आपले डोळे ओले झाल्याचे जाणवले . तो चपापला . आनंद अश्रूंचा बांध फुटला होता .

अजय सरदेसाई ( मेघ )

https://meghvalli.blogspot.in

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users