मराठी : लेखन घडते कसे?

Submitted by कुमार१ on 26 February, 2024 - 22:20

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ (https://www.maayboli.com/node/83383) या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :

ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.

या उपक्रमाद्वारे इच्छुक लेखक आपले मनोगत इथे व्यक्त करतील. ते कशा प्रकारे व्यक्त करायचे याची पूर्ण मुभा लेखकांना आहेच. तरीसुद्धा उपक्रमात एक सुसूत्रता असावी म्हणून काही मार्गदर्शक प्रश्न खाली देत आहे. ते योग्य वाटल्यास त्या प्रश्नांचा जरूर आधार घ्यावा. आजच्या दिनाचे औचित्य लक्षात घेऊन फक्त मराठी भाषेतील लेखनासंबंधीच लिहावे.

प्रश्न

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.

२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही

३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी

४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.

५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?

६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.

निव्वळ लेखन या कलेमध्ये लेखक त्याच्या वाचकांसाठी व्यक्ती म्हणून अदृश्य असतो; तो त्याच्या शब्दांमार्फतच वाचकांपुढे येतो. सध्याच्या युगात ‘निव्वळ लेखन’ या कलेपुढे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत निव्वळ लेखन ही कला भविष्यात किती काळ स्वीकारली जाईल, यासंबंधी तुमचे विचार जरूर लिहा.

वरील मनोगताची सुरुवात माझ्यापासून करत नाही. ते मी चर्चा समारोपाच्या वेळेस लिहीन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !

टीप : जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही.

अग्रिम धन्यवाद !
*************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रम खूपच आवडला आहे. चार-दोन जणांनी लिहिल्यावर लिहिते. पाचवा प्रश्न विचारांना उद्युक्त करतोय.

१. शाळेत असतानापासून. अर्थात तेव्हा कसं लिहिलंय ह्यापेक्षा मी किती छान गोष्ट / निंबंध लिहिला आणि स्पर्धेत पहिला नंबर आला ह्याचं कौतुक होतं. नंतर ते बंद झालं. मागच्या पाच सहा वर्षांपूर्वी परत सुरु केलं.. आता पुन्हा बंद झालं आहे. लिखणासाठी बैठक आणि वेळ हवा असतो. तो नाही मिळत. पण हा माझा ह्या वर्षीचा संकल्प आहे. करेन नक्की पुन्हा सुरुवात.
२. आणि ३.मायबोली आणि माझी website (तीही बंद झाली आहे)छापील नाही अजून तरी
४. कथा, अनुभव लिहिते, लेख शक्यतो लिहीत नाही.. जमत नाही मला. जास्त intense नाही, हलकं फुलकं लिखाण करायला आवडतं.
५.प्रेरणा असं काही नाही. मनात आलं, सुचलं, लिहिलं. Share केलं असं आहे ते.
६. स्वतःला लेखक म्हणावं इतकी मोठी नाही. वाचक छान स्वागत करतात. वाचतात तेच खूप आहे. टीका करतच नाहीत. करायला पाहिजे.
अजून काही आठवलं तर लिहिते नंतर

किल्ली,थोडक्यात आणि छान सांगितलस. मी लिहायला घेतलं, आणि मी.. मी.. च्या नादात एक जरा मोठाच लेख तयार झाला.

उत्तम सुरुवात !
मी.. मी.. च्या नादात एक जरा मोठाच लेख तयार झाला.
>>>
काही हरकत नाही . जसे व्हायचे तसे अगदी मनापासून व्यक्त व्हा.
प्रश्नांचाही बोजा घेण्याचे कारण नाही

डॉ. कुमार ह्यांनी "लेखक म्हणजे कोण?" ह्याची फारच सोपी व्याख्या दिली आहे, त्यामुळे त्यात स्वतःला बसवून जरा "मी - मी" करून घेतो. Happy

आमच्या शाळेमध्ये एक हस्तलिखिताचा वार्षिक उपक्रम होत असे. प्रत्येक वर्ग आपापला विषय निवडून त्यावर आधारीत साहित्य स्वतः लिहून किंवा संकलित करून त्याचं हस्तलिखित बाढ तयार करत असे. मग ते बाईंड करून त्याचं पुस्तक तयार होत असे. शाळेच्या ग्रंथालयात अनेक वर्षांची अशी हस्तलिखितं आहेत. ह्याला जर सार्वजनिक लिखाण म्हंटले तर इयत्ता पाचवी पासून लेखन केले आहे. (म्हणजे साधारण ३० वर्षांपूर्वी पासून). माझी आई लेखिका आहे. ती कथा, ललित लेखन, प्रवासवर्णने वगैरे लिहिते. तिची एकूण सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तिने लिहिलेल्या जवळजवळ प्रत्येक लिखाणाचा पहिला वाचक मी असतो. मनातले विचार कागदावर उतरवून बघायचे जीन्स तिच्याकडून मिळाले. पुढे कॉलेजातल्या मॅगझिनमध्ये, चित्तपावन ग्रुपच्या मासिकात काही-बाही लेख छापून आले होते. ह्या सगळ्यांत चाळणी, संपादन वगैरे काही नसायचं. आपण दिलं की ते छापून यायचं. पुढे अमेरिकेत आल्यावर ब्लॉग ह्या माध्यमाचा शोध लागला. तसेच मराठी टाईप करता येण्यासाठी 'बरहा' ह्या सॉफ्टवेअरचाही शोध लागला. तेव्हा म्हणजे २००६/७ साली फारच तुरळक मंडळी मराठीत ब्लॉगिंग करायची. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी माझा ब्लॉग सुरू केला आणि त्यावर मराठीतून काही-बाही लिहायला लागलो. (आता ते लिखाण वाचलं की हे का लिहिलं होतं नक्की? असा प्रश्न पडतो!). मराठीतून ब्लाँगिंग करणार्‍या सुरुवातीच्या मंडळींपैकी मी होतो हे आता आठवून छान वाटतं. पुढे स्टार माझा ह्या वाहिनीने मराठी ब्लॉगर्सची दखल घेऊन त्यावर काहितरी कार्यक्रम केला होता. त्यात माझ्या (तसेच मायबोलीकर पूनम हिच्या) ब्लॉगची निवड झाली होती. त्यांनी स्टुडियोत वगैरे पण बोलावलं होतं पण मी बाहेर असल्याने जायला जमलं नाही. पण त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात ब्लॉगची माहिती आणि माझं 'मनोगत' सांगितलं होतं. पुढे मायबोलीचा शोध लागला. इथे दिवाळी अंक तसेच काही लिखाण स्पर्धांमध्ये/उपक्रमांमध्ये लेख लिहिले होते. तसेच बाकीही काही खरडलं होतं. संपादकांच्या चाळणीतून गेलेलं माझं पहिलं लिखाण हे मायबोलीवरच्या दिवाळी अंकातलच म्हणता येईल. नंतर माझ्या अतिशय आवडत्या 'मुशाफिरी'च्या दिवाळी अंकात तसेच 'पुण्यभुषण' ह्या अंकात लेख छापून आले होते. तेव्हा खूप मस्त वाटलं होतं.

मला कथा हा साहित्यप्रकार फार आवडतो. त्यामुळे आपल्यालाही इथल्या लेखकांसारख्या छान छान कथा लिहिता याव्या असं फार वाटतं. म्हणून इथे एक-दोन कथा लिहायचा प्रयत्नही केला. पण ऑफिसातल्या टेक्निकल डॉक्युमेंट्स सारख्याच त्या कथाही अगदी स्पष्ट, सरळ, मुद्देसुद आणि त्यामुळे फार बोर झाल्या होत्या. Proud मग पुन्हा कधी त्याच्या वाट्याला गेलो नाही! नॉन फिक्शन प्रकारातलं म्हणजे पुस्तके, सिनेमा, खेळ, प्रवासवर्णन (ट्रॅव्हलॉग) किंवा मग इथे विषय देऊन लिखाणाचे जे उपक्रम होतात तसं लिहायला आवडतं.

लेखन का करावसं वाटतं तर ते व्यक्त होण्याचं माध्यम वाटतं. नेमक्या शब्दांमध्ये नेमके विचार व्यक्त करता येणं (मग ते कुठल्याही साहित्यप्रकारात असो) ही एक कला आहे आणि ती जशी येईल/जमेल तशी जोपासावी असं वाटतं. मी आठ-नऊ वर्षांचा असताना आईने 'आवर्त' नावाची पहिली कथा लिहिली होती. म्हणजे आठवतय तेव्हापासून आईला लिहिताना बघतो आहे. त्यामुळे मलाही कधीतरी काही लिहून बघावं असं वाटलं असावं. नंतर ब्लॉग वरच्या इथल्या मंडळींकडूनही प्रेरणा मिळत असते.

माझ्या लेखनाचे वाचक म्हणजे घरची तसच इथली मंडळी आणि माझे मित्र-मैत्रिणी! इथल्या प्रतिक्रिया म्हणजे "अगदी तुझी खास शैली" , "समोर बसून गप्पा मारल्यासारखं लिखाण" किंवा "खूप मुद्देसुद, विषयाला धरून" वगैरे असं काही वाचलं की फर म्हणजे फार भारी वाटतं. Happy ब्लॉगिंगच्या काळात बरेच दिवस ब्लॉग अपडेट केला नाही की नेहमी वाचणारे जुन्या पोस्ट्सवर "नवीन ब्लॉग पोस्ट लिही की आता" अश्या लापियुक्त कमेंट टाकायचे, तेव्हा अगदी गुददुल्या वगैरे व्हायच्या! Proud

आधी मी डॉ. कुमारांनी दिलेल्या प्रश्नांवरून लिहायला सुरूवात केली पण नंतर तो क्रम सोडून देऊन असं काहितरी विस्कळीत लिहिलं आता गोड मानून घ्या आणि हो! मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप शुभेच्छा. Happy

पराग,
खूप सुंदर मनोगत !

प्रश्नांवरून लिहायला सुरूवात केली पण नंतर तो क्रम सोडून देऊन असं काहितरी विस्कळीत लिहिलं
>>>
हो, हो ! किंबहुना लेखकांनी त्या प्रश्नांमधला फक्त आशय लक्षात घेऊन तुमच्यासारखेच व्यक्त व्हावे असे वाटते Happy

प्रतिक्रियेत नं टाकता स्वतंत्र टाकलाय.
>>>
वाचला. प्रतिसाद दिलाय.
या उपक्रमामुळे तुम्हाला मोकळेपणाने आणि सविस्तर व्यक्त व्हावेसे वाटले याचा आनंद वाटला.

हा उपक्रम खूपच छान आहे. त्या निमित्ताने मला परत लिहायची स्फुर्ती आली (निदान आत्तातरी) आहे. वरच्या प्रश्नांची उत्तरं प्रतिसादात बसणार नाहीत याची भीति असल्यामुळे लवकरच यावर काही तरी लिहायचा मानस आहे.

१. पंचवीसेक वर्षे पर्यटनाचे तपशील नोंदवले आहेत. त्याही अगोदरचे वीस वर्षे लिहून ठेवले नाहीत.

२. तसं प्रकाशित झालेल्या चार ओळी फक्त एकदाच वाचकांची पत्रे ( खरंच पोस्टाच्या कार्डावर सुवाच्य! ढोबळ होते) मध्ये मटात '७५ मध्ये. छापून आलेलं.

३. घरीच कागदावर लिहितो. पण गेली बारा वर्षे मराठी संस्थळांवर लिहीत आहे. देवनागरी मराठी टंकलेखन पद्धतीनेच.

४. पर्यटनविषयक फक्त. ललित प्रकारचे साहित्यिक फाफटपसारा टाळून मुद्द्यांचे .

५. एके काळी लोक स्वतः सहल आयोजन करत तेव्हा इतरांनी सांगितलेल्या माहितीचा उपयोग करत असत. तर आपणही अशी माहिती का देऊ नये हा उद्देश. इंग्रजीत अशी बरीच पुस्तके सापडतात. Lonely Planet हे त्यापैकी एक. नकाशे आणि फोटोंसह अगदी बारीक सारीक तपशील असतो. त्यातून प्रेरणा घेऊन संस्थळांवर लिहिणे शक्य झालं.
आता यूट्यूबवर विडिओ टाकून हीच गोष्ट बऱ्याच जणांनी वरच्या पातळीवर नेली आहे. काही भाग description मध्ये देतात.

६. संस्थळावरच्या लेखनाच्या प्रतिसादांतून संवाद होतातच. हल्ली काही वाचून तसं पर्यटन नियोजन करणे फारच मागे पडले आहे. निरुपयोगी म्हणता येईल. कारण आयोजित सहलीच्या जाहिराती पहायच्या, दिवस आणि कोणता प्रदेश ठरवायचे आणि ओनलाइन पेमेंट करून गप्प बसायचे एवढेच काम असते. कुणी मला वैयक्तिक निरोपातून विचारतात पण शेवटी आयोजित सहलीलाच जातात. थोडक्यात माझे लेखन माझ्या समाधानासाठी आणि एक कायम सर्वांना उपलब्ध असलेले लेखन एवढेच महत्त्व राहिले आहे.

७. पुढे काय?
आहे तो उद्योग सुरू ठेवणे.

छान धागा... लोकं लिहिताहेत का याची वाटच बघत होतो.
छान प्रतिसाद आलेत. अजून येऊ द्या. वाचायला छान वाटत आहे.
मी लिहायला घेतले की वाहावत जातो. तरी जमल्यास दोन चार वाक्यात वरील प्रश्नांना उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन..

आता धाग्याला गती आली असून त्याने दुसरा गिअर टाकला आहे असे म्हणता येईल Happy
वाचायला छान वाटत आहे.

१. त्या निमित्ताने मला परत लिहायची स्फुर्ती आली >>> छान वाटले ! जरूर लिहा..

२. थोडक्यात माझे लेखन माझ्या समाधानासाठी आणि एक कायम सर्वांना उपलब्ध असलेले लेखन
>>>> अगदी अगदी . 'माझ्या समाधानासाठी ' हे तर सर्वात महत्त्वाचे !

धन्यवाद. Happy

शर्मिला, एसआरडी, किल्ली तुम्हीही छान लिहिलय.

धनुडी
"उपक्रम होता" नव्हे; चालू आहे !
तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. Happy

माझ्या मातुल आणि पितुल घराण्यात मिळून गेल्या दोन पिढ्यांमध्ये चार लेखक होते. ते पुस्तके लिहून स्वतःच प्रकाशित करीत. त्या पुस्तकांच्या छपाईदरम्यान घरी एकत्र बसून मुद्रितशोधन केले जाई. ही कौटुंबिक पार्श्वभूमी लेखनाला फारच पोषक होती. माझ्या लेखनछंदाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी, पदवी शिक्षणाच्या अखेरच्या वर्षात.

आपल्या आजूबाजूस घडणाऱ्या व मनाला भिडणाऱ्या असंख्य घटनांवर आपण समाजात कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि दैनिकातील वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली. त्या काळी पत्रलेखकाला आपले नाव पेपरात छापून आलेले पाहण्याचा आनंद काही औरच असे. जशी माझी पत्रे क्रमाने प्रकाशित होऊ लागली तसा तो आनंद वाढत गेला. मग या प्रकाराची गोडी लागली

दरम्यान पदवी शिक्षण संपताना लिहीलेला ‘’ मुक्काम पी. एच. सी.” (https://www.maayboli.com/node/82475) हा कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झालेला माझा आयुष्यातील पहिलावहिला लेख अर्थात अनुभवकथन.
नंतर सुमारे १५ वर्षे अगदी व्यसनासारखे विविध विषयांवर दैनिकांतून फक्त पत्रलेखन केले. एकदा एका कुटुंबीयाच्याच पुस्तकाला 25-30 ओळींचे प्रास्ताविक लिहीले आणि त्याला “पान उलटण्यापूर्वी..” हे शीर्षक दिले होते.

पुढे कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून, “आता फक्त पत्रे बास झाली, स्वतंत्र लेख लिही पाहू” असा सल्ला दरडावून मिळाला ! मग हळूहळू वृत्तपत्रांमधून काही लेख लिहिले त्या काळी दैनिकांत अनाहूत लेखनाच्या प्रसिद्धीचे प्रमाण बऱ्यापैकी कमी असायचे. परंतु जे काही मानधनासह प्रसिद्ध झाले त्याने लेखनाला प्रोत्साहन मिळत गेले.

साधारण १९९५च्या सुमारास मासिकांमध्ये लेखन चालू केले. त्यापैकी प्रमुख मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ त्यात वीस वर्षे मनमुराद लेखन करून अक्षरशः अंतर्नादमय झालो होतो. तसेच ‘पुरुष उवाच, ‘अपेक्षा’ आणि अन्य काही दिवाळी अंकांमध्येही लिहिले.
पुढे 2015 च्या सुमारास हळूहळू छापील साहित्यिक मासिके बंद पडू लागली. मग मलाही बदलणे भाग होते आणि त्यानुसार लेखन इ-माध्यमात- म्हणजेच मायबोली या आपल्या संस्थळावर करू लागलो. सुरवातीस फक्त ललितगद्य या प्रकारात रमलेलो होतो. पण पुढे आरोग्य आणि मराठी व इंग्लिश भाषाविषयक लेखनातही पदार्पण केले. सन 2018 नंतर छापील माध्यमातले लेखन केलेले नाही; आता फक्त माबो व मिपा ही संस्थळे.

पूर्वी मोजून ६ कविता केल्या होत्या आणि त्यातल्या दोनांना वाचक आणि श्रोत्यांची पसंती मिळाली होती. परंतु आपल्यात काव्यगुण नाहीत हे वेळीच जाणवल्याने ते खाते बंद करून टाकले.

सातत्याने लेखन करण्यामागे, मनातील विचारांचा निचरा होणे, लेखनउर्मी आणि वाचकांशी संवाद साधणे हे हेतू आहेत. लेखनाच्या गेल्या ४२ वर्षांत वाचकसंवाद एकंदरीत समाधानकारक आणि आनंददायी आहे. “कला ही टीका व स्तुतीची सारखीच धनी असते” या उक्तीनुसार या दोन्हीही गोष्टी अनुभवल्यात.

आता उर्वरित आयुष्यात लेखन हाच छंद चालू ठेवायचा परंतु त्याचे प्रमाण हळूहळू कमी करत जायचे असा मानस आहे. स्वतःच्या मन:चक्षूपुढे एक तराजू ठेवलेला आहे. त्याच्या एका पारड्यात निरीक्षण, वाचन, चिंतन आणि मनन ही ४ गाठोडी तर दुसऱ्या पारड्यात फक्त लेखन आहे. या दोन पारड्यांपैकी पहिले पारडे जितके जड राहील तितके ते लेखकाच्या हिताचे असेल.

भविष्यकाळात दृकश्राव्य माध्यमांमधील धोधो सादरीकरणामुळे निव्वळ लेखनाला किती महत्त्व राहील, हा गांभीर्याने विचार करायचा प्रश्न आहे. यावर प्राथमिक विचार केला असता,
“टीव्ही आणि इंटरनेटच्या झंझावातानंतर रेडीओ किंवा सर्व जुनी लेखनमाध्यमे संपुष्टात आली का?
हा प्रश्न मनात येतो आणि त्याचे उत्तर आपल्या सगळ्यांसमोर आहे.
ते पाहता, बऱ्याच सादरीकरणांसाठी सुद्धा मूलभूत लेखन ही गोष्ट लागतेच. त्यामुळे ती पायाभूत कला म्हणून अस्तित्वात राहील असे वाटते; निव्वळ त्याचा वाचकवर्ग बऱ्यापैकी कमी होईल. वाचकांपेक्षा प्रेक्षकवर्ग भरपूर वाढल्याचे चित्र आता आपल्यासमोर आहेच.

.. असा हा ४ दशकांचा लेखनप्रवास !

खूप छान लेखन प्रवास आहे.

तुमचे सगळेच वैद्यकीय लेख अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले असतात. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना चांगली माहिती मिळते.
"टीव्ही आणि इंटरनेटच्या झंझावातानंतर रेडीओ किंवा लेखनमाध्यमे संपुष्टात आली का?">> माझ्यासारखे अनेक लोकं अजूनही सकाळी उठल्यावर पहिल्यांदा रेडिओ ऑन करतात.
पण.. हो, पुढची पिढी मात्र ह्यात असेलच असं नाही.
छापील लेखन वाचण्याचं प्रमाण आपल्या आजूबाजूला तरी खरंच खुपच कमी झालंय.
पण अजून आपल्या सारखे वाचणारे आहेतच.
"बऱ्याच सादरीकरणांसाठी सुद्धा मूलभूत लेखन ही गोष्ट लागतेच. त्यामुळे ती पायाभूत कला म्हणून अस्तित्वात राहील असे वाटते" >> हे महत्वाचे.
तुम्ही लिहीत रहा.
पु. ले. शु.

१.माझे लेखन सुरु होऊन आता तीस वर्षे झाली. सार्वजनिक म्हटले तर 15 वर्षे झाली. माझे पहिले स्वगत म्हणा, मनोगत म्हणा मी नैनिताल पाशी असलेल्या नौकुचाताल या निसर्गरम्य जागी अनुभवलेले निसर्ग सौंदर्य, मग रात्री आलेला पाऊन अन त्याच बरोबर यजमानीण बाईंनी गायलेला मारवा, काळॊख अंधारात अनुभवलेले रोमांच होते. तेव्हा मला अनुभूती झाली की मी लिहू शकतो अन लिहिताना असीम आंतरिक आनंद होतो. पुढे जाऊन हे मायबोली, मुसाफिरी अशा स्थळांवर प्रकाशित झाले.
२. : सुरुवातीस हस्तलिखित स्वरूपात आणि मग अनुवाद विश्वात प्रवेश केला तेव्हा इलेक्ट्रॉनिक रूपात.
३. : मी नियतकालिके आणि मित्रमंडळींसाठी लिहितो तसेच मायबोली साठी देखील.
४. स्फुट, प्रवासवर्णन, कथालेखन, कविता
५. स्वांतसुखाय तसेच लोक पाहणे हा माझा छंद आहे. त्या मागील प्रेरणा पुल आहेत, विशेषत: प्रवास वर्णतील व्यक्तीचित्रे रेखाटताना माझ्या मागे ते असतात अशी अनुभूती येते. तर कथा लिहिताना अनेक इंग्रजी लेखक प्रेरणा देतात. पर्ल बक, गाय दे मोपासां, श्टाइनबेक इ.
६. : माझा अनुभव नात्यातले वाचक आणि मायबोली इतपत सीमित आहे.
मला लोक आणि त्यांच्या वेदना, सुख दु:खे स्पर्सश करतात. मला प्रवासाची प्रचंड आवड असल्याने प्रवास वर्णन सहजासहजी जमते.
मी आयुष्यात खूप खडतर प्रवास केला आहे पण नो रिग्रेट्स, मला हे अनुभव शब्दरूपात मांडायचे आहेत. विशेषत: माझ्या कुटुंबियांसाठी व मुली व नातवंडांसाठी.... तो उपक्रम कूर्मगतीने चालू आहे. आता वय 72 ...
.............. घाई करायला हवी!!!!!!!

किल्ली, शर्मिला, पराग व कुमार सर सर्वांनी छान लिहिले आहे.
पराग, तुमच्या आईचे कौतुक वाटले.
कुमार सर, घरातच चार लेखक... किती भाग्यवान आहात. Happy तुमचा लेखनाचा अनुभव दांडगा आहे.

धनुडी
"उपक्रम होता" नव्हे; चालू आहे !
तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. Happy>> नाही हो डॉक्टर, इथले सगळ्यांचे लेख, मनोगतं वाचून तर मी त्यात अजिबात बसत नाही याची जाणीव झाली. मी इथे गणेशोत्सवापुरतीच "लेखिका" (?) होते . शतशब्दकथा लिहील्या होत्या तेवढ्याच. नाही म्हणायला मी जी ग्रीटिंग कार्ड तयार करते त्यातला मजकूर मी लिहीते. अशी कार्ड तयार करायला मला खूप आवडतं. ज्यांना द्यायचं आहे त्यांच्याबद्दल ची माहिती घेते आणि ज्या प्रसंगासाठी देणार आहे त्याबद्दल चं छान सं वाक्य लिहीते. मराठी किंवा इंग्रजी किंवा हिंदी त.
अत्ता हल्लीच माझ्या भाच्याचं लवमॅरेज झालं. ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये "डिझाईन"ला होते तर कार्डात सगळ्यात शेवटचं वाक्य मी लिहीलं होतं They were Designed to meet"
बाकी कार्ड खूप पर्सनल आहे त्यामुळे फोटो देऊ शकत नाही, हे एक पान आहे कार्डाचं

Screenshot_2024-03-01-00-43-59-707_com.google.android.apps_.photos.jpg

Pages