|
हल्लीच घडलेल्या घटनांवरून आणि वाचलेल्या एका धड्यावरून सुचलेली कथा मांडतेय. कृपया प्रतिक्रिया कथा सम्पल्यावर लिहाव्यात ही नम्र विनंती! धन्यवाद!
|
सल दादाचा फ़ोन येऊन गेल्यापासून मन बेचैन झालं होतं . कारण पक्कं माहित असताना देखील उलटसुलट विचार मनात थैमान घालत होते . गेल्या काही वर्षात बर्याच वेळा अशा विचारांचं वादळ मनात उठायचं पण मी ते जाणुनबुजून दाबून टाकायचो आणि सगळ काही ठीक, योग्य चाललय असं मनाला समजावायचो. खरंतरं माझ्याकडे या सर्वासाठी पूरेसा वेळच नसायचा, की मला ते विचार त्रासदायक वाटायचे? परत गोंधळ सुरु! असो. बाबांच्या वर्षश्राद्धासाठी मी जाणारच होतो. पण जरा वेळ काढून लवकर ये असा दादाचा फ़ोन आला होता. गावच्या घरी फ़ोन नसल्याने तो बूथवरून बोलत होता, त्यामुळे जास्त काही स्पष्टीकरण अपेक्षित नव्हतं . बाबांच्या दिवसातच माधव आणि त्याच्या बायकोच्या वागण्यावरून लवकरच वाटण्या होणार हे स्पष्ट दिसत होतं . त्यामुळे त्या संदर्भातच काहीतरी असणार हे आम्हाला कळलच . तो फ़ोन आल्यापासून गावच्या कुठल्याही गोष्टीत स्वारस्य नसलेल्या माझ्या सहचारिणीला एकदम स्फ़ुरण चढलं गावच्या मालमत्तेची काय किम्मत येइल, त्या पैशाचा विनियोग कसा करायचा इ . इ . तिची बडबड सुरु झाली . गावातल्या रहाणीमानाला, घराला, लोकांना नावं ठेवताना तिची जीभ थाम्बत नसे . त्या घरासाठी कष्ट घेण्याची गोष्ट दूरच त्या घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल एक प्रेमाचा शब्दही तिच्या तोंडून बाहेर पडत नसे . गेली कित्येक वर्ष तिथे दादा, वहिनी, त्यांची मुलं आणि आईबाबाच रहात होते . मी बारावीनंतर शिक्षणासाठी गावं सोडलं तसा माझा आणि गावाचा संबंध सुट्टीपुरताच राहिला आणि नोकरी, लग्न मुलंबाळं यानंतर तो हळूहळू इतका कमी झाला की असुन नसल्यासारखाच होता. मी बरीच वर्षं गुडगांव इथे स्थायिक होतो. एका मोठ्ठ्या MNC मधे Executive Director म्हणुन काम पहात होतो. मोठ्या कष्टाने व अक्कलहुशारीने मी इथपर्यंत येऊन पोचलो होतो. पण हे सर्व कमावताना मी बरचं काही गामवलय असं आता चाळीशी ओलंडल्यावर जाणवू लागलं होतं मी माझ्या माणसांना, माझ्या भावनांना कधी समजुनच घेतल नाही, कधी वेळचं दिला नाही. शर्यतीत सश्यासारखा धापा टाकत धावत राहिलो. काळ किती मागे पडला हे समजलचं नाही . प्रत्येकजण आपापल्या संसारात, नोकरी धंद्यात गुंतलेला आहे असं वेळप्रसंगी स्वतःलाच सांगत गेलो. लग्नाकार्यात भावंडांच्या भेटी होतं आईबाबाही भेटत . पण हळूहळू आईबाबा प्रवास झेपत नाही म्हणुन कुठे यायचे नाहीत, मीही कधी फ़िरतीवर असायचो. माझ्याघरीही आईबाबा सात - आठ वर्षात आलेच नव्हते . मुलं लहान होती तेंव्हा आवर्जून यायचे पण आता इथली भाषा वेगळी, वेळ जात नाही, प्रवास झेपत नाही अश्या सबबी सांगून ते यायचेच बंद झाले . खरंतर मला कारण माहित होत पण वादाला तोंड फ़ुटायला नको, घरातलं वातावरणं बिघडायला नको, आधीच मला घरात वेळ खूप कमी मिळतो या सबबीखाली मी कळून न कळल्यासारखं दाखवायचो. आईबाबाही कधी तक्रार करायचे नाहीत. तसे माझ्याघरी माझे नातेवाइक कमीच येतात, नाही म्हणायला प्रशांतची बदली इथे झाल्यापासून कधीमधी आरती येते . पण मी घरी असतानाच आणि फ़ोन करुनच! म्हणजे आमच्याकडे ते must आहे ! मी foreign-returned, higher post वरचा, माझी बायको शहरात वाढलेली श्रीमंत (?) घराण्यातली एकुलती एक मुलगी, माझ्याबरोबर परदेशात राहिलेली , त्यामुळे आमच्याकडे येताना या formalities न पाळणार्याना तशा सुचना मिळायच्या. खरचं आरतीला पण लवकर बोलावलं असेल दादानं तिला फ़ोन करुन विचारावं दोघानी मिळुनच जावं! आरती आमची तशी अबोलच. (हीच्या भाषेत अजागळ, गावठी वगैरे ) ती काही आपणहून विचारायची नाही. विचार येताच मी लगेच तिला फ़ोन केला आणि दोन तिकीटं बुक केली. प्रवासात सुरुवातीपासूनच मला जाणवतं होतं की आरतीला मला काहीतरी सांगायचय. शेवटी मीच म्हंटलं 'काय चलबिचल चाललेय मनात? मला नाही का सांगणार?' आणि माझं वाक्य सम्पायच्या आधीच आरती माझा हात घट्ट धरुन बांध फ़ुटल्यासारखी रडू लागली. किती दिवसानी मी तिचा स्पर्श, जवळीक अनुभवत होतो! किती वेदना, प्रेम, विश्वास होता त्या स्पर्शात! पाठोपाठची भावंड आम्ही! सगळीकडे एकत्र वावर - शाळेत, खेळात, भांडण्यात वर्ष कशी निघून गेली कळलच नाही. किती अंतर पडलं होतं आमच्यात! एका स्पर्शात आरतीने ते दूर केलं . 'मनू, ताई येणार नाही या वेळेस, सहन नाही होणार तिला! म्हणुनच तिनं तुला निरोप दिलाय.' (मी लहान म्हणुन सगळे मला मनू, मन्या याच नावाने हाक मारत.) आम्ही पाच भावंडं, ताई सर्वात मोठ्ठी, मग दादा, मग माधव, आरती आणि मी! ताई आणि दादा म्हणजे अगदी आदर्श मोठ्ठी भावंडं शांत समजुतदार, जाबाबदार! माधव पहिल्यापासून चिडका, घरापेक्षा बाहेर रमणारा, आरती अबोल पण तरतरीत, मी सगळ्यात धाकटा आणि सर्वात हुशार म्हणुन लाडावलेला! आई स्वभावानं शांत पण खम्बीर, बाबा म्हणजे जमदग्नीचा अवतार! त्यांच्यासमोर उभं रहायची देखील भीती वाटायची. फ़क्त माधवच त्यांच्याशी काहीबाही वाद घालायचा, मार खायचा. तरी बर्याच वेळा दादा त्याला वाचवायचा. मला तर आईइतकचं दादा आणि ताईनेच वाढवलं आणि ताईचं लग्न झाल्यावर तिची जागा वहिनीने घतली. 'काय निरोप आहे?' मी एकदम भानावर आलो. 'वाटणीमधे मला आणि ताइला काहीही नको, आम्ही तसं दादाला स्पष्ट कळवलयं पण त्याला ते आवडलेलं नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. तू लहान म्हणुन तुला इतके दिवस आम्ही काहीच सांगितलं नाही पण आत्ता तू दादावर अन्याय होऊ देऊ नकोस.' आरतीला हुंदके आवरत नव्हते, मी मात्र एकदम गप्प होतो. मनातल्या मनात खूप अपराधी वाटू लागलं . क्रमश .....
|
continued ... प्रवास खूप कठीण वाटू लागला. गावी पोचल्यावर नेहमीप्रमाणे दादा बसस्थानकावर हजर होता. मला काही कळायच्या आत नेहमीच्या सवयीने दादाने माझी बॅग हातातून घेतली, आरतीचीही दुसर्या हातात घेतली व 'चला' असं म्हणुन तो चालू लागला. चालता चालता 'प्रवासात त्रास झाला नाही ना, मी लवकर बोलावल्यामुळे गैरसोय नाही ना झाली?' वगैरे विचारपूस अगदी आपुलकीने करत होता. दादात इतक्या वर्षात काहीही बदल झाला नव्हता. ना स्वभावात ना राहणीमानात! तो झपाझप चालत होता, मी आणि आरती मागे पडत होतो. वाट नेहमीचीच! याच रस्त्यावर दादा रोज मला शिकवणीला सोडायला व न्यायला जातीने हजर असायचा, हौशीने दप्तराचं ओझं आपल्याकडे घ्यायचा. मी मागे पडलो की 'दमलास का रे?' म्हणुन माझा हात धरायचा. मला या क्षणी त्यानं तसचं करावं असं वाटंत होतं . मी सगळ्यात हुशार याचा त्याला खूप अभिमान होता. माझा अभ्यास चांगला व्हावा म्हणुन तो सर्वतोपरी मदत करायचा. स्वतः दहावी पार करताना नाकी नऊ आले असले तरी मी दहावीला बोर्डात आल्यावर हा वेड्यासारखा गावभर पेढे वाटत फ़िरला होता. आता वाटतय बरं झालं दादा तू फ़ार शिकला नाहीस, नाहीतर माझ्यासारखा ... आई थकायला लागली म्हणुन दादाचं लग्न लवकर केलं पण त्यामुळेच मला वहिनीचा सहवास लाभला. आमची वहिनी म्हणजे (अकरावी पर्यंत शिकलेली) साधी, सोज्वळ मुलगी, ती ही वयानं लहानच होती (माझ्यापेक्षा तीन वर्षानी मोठ्ठी असेल). पण मनानं पहिल्याच काही दिवसात तिनं सगळ्याना आपलसं करुन टाकलं (माझ्या आणि माधवच्या बायकोसारखी उच्चशिक्षित smart lady नव्हती म्हणुन तिला ते सहज जमुनही गेलं असेल, हा केवळ खोटा समज!) वहिनीच्या हाताला चवही छान होती. माझी आवडंनिवडं दादाने तिला आधीच सांगून ठेवली होती. त्यात मी बारावीला म्हणुन माझ्याकडे जास्त लक्ष! बारावीनंतर गावं सोडून जाताना दादा - वहिनीला सोडून कसं रहायचं हाच प्रश्न मनाला भेडसावत होता. नंतर पण सुट्टीत आल्यावर माझे भरपूर लाड व्हायचे . अचानक आत्ता का आठवतय मला हे सगळं? दादा समोर मला फ़ा sss र 'लहान' वाटायला लागलं . माझ्या शिक्षणाचा माझ्या घरच्याना काय उपयोग झाला? का झटले ते माझ्या प्रगतीसाठी? सगळे कष्ट सम्पल्यावर का त्यानी मला त्रयस्थाच्या हवाली केलं? आणि मी ही एव्हढा अलिप्त कसा राहिलो? मी जणू या सगळ्यांपासून स्वतःला तोडून टाकलं होतं . उगाच बायकोला तरी कशाला पूर्णपणे दोष लावू, मुळात मीच माझ्या लोकांना, नात्यांना जपायला हवं होतं . कोणाला किती, केंव्हा जपायचं , किती महत्त्व द्यायचं हे मीच जातीनं पहायला हवं होतं . म्हणजे निदान थोडंतरी संतुलन राखता आलं असतं . गोष्टी एव्हढ्या हाताबाहेर गेल्या नसत्या. मनाचा ताण वाढायलाच लागला. दादा मात्र रस्त्याने येणार्याजाणार्यांना माझी ओळख करुन देत होता. जणू काही झालचं नाही असं दाखवतं होता. घरी पोचल्यावर स्वागत नेहमीसारखं झालं नाही. दादाची मुलं 'आत्या', 'काका' म्हणत जवळ आली नाहीत की वहिनी स्वैपाकघरातून 'प्रवासानं शीणला असाल, पटकन तुमच्या आवडीचा चहा करून आणते' म्हणत पदराला हात पुसत बाहेर आली नाही. आई मात्र संथपणे चालत येऊन आमच्याजवळ उभी राहिली. एका वर्षात एकदम दहा वर्षानी म्हातारी झाल्यासारखी दिसत होती आई! माधव आणि मंजिरीवहिनी आतल्या खोलीतुनच बाहेरच्या खोलीतल्या हालचाली निरखत होते . घरातलं चैतन्यच हरवून गेलं होतं, दिवस गम्भीर वाटत होता. अंघोळ करून जरा fresh झाल्यावर जेवायला बसलो. माधव आणि त्याची बायको आमच्याबरोबर बसले नाहीत. हलकीशी झोप काढल्यावर मी माधवच्या खोलीत जायचा विचार केला. मी माधवच्या मनातलं जाणून घ्यायचा, मनमोकळी चर्चा अरायचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या तयारीतच नव्हता. त्याची बायको सतत पहारा देत असल्याने मला जास्त काही बोलाताही येइना. Basically मी गावच्या भानगडीत नाक खुपसू नये असा त्यांचा पवित्रा होता. माधवची भुमिका एकदम ताठर कशी? त्याचा स्वभाव हेकेखोर असला तरी इतका कडवा कधीच नव्हता. वकिली मनासारखी न चालल्यामुळे किंवा गावात परतल्यावर दादाचं गावातलं स्थान, त्याला लोकांकडून मिळणारा मान, प्रेम हे सगळं त्याला खपत नव्हत की काय? तसं माधवचंही काही वाईट चाललं नव्हतं . एक मुलगा होता, गोरागोमटा, हुशार! तो शहरात होस्टेलला राहून शिकत होता. पण बायकोनं त्याचं डोकं शांत ठेवण्या ऐवजी जास्त भडकावं अशीच परिस्थिती निर्माण केली होती. तिची पक्कड एकदम घट्ट होती. खरंतर ते तिथं गुण्यागोविंदानं राहू शकले असते . पण .... काय विचित्र असतात नाही ही नाती? वयाच्या २८ व्या, २९ व्या वर्षी जीवनात येणारी त्रयस्थ व्यक्ती आपल्याला एव्हढी असहाय्य बनवू शकते . सगळं कळंत असून देखील कधीकधी खूप उशीर झालेला असतो. मन शेवटी हाच विचार करतं की बाकी कोण येणार आपल्याला साथ द्यायला? पण ही खरी 'साथ' होऊ शकते का? अशी अपराधी भावना मनात ठेवून कुणी म्हातारपणी सुखी राहू शकतं का? पण आपल्याला एव्हढा विचार करायला वेळच नसतो. शेवटी काय 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा .... ' . प्रभू श्रीराम वेगळ्या अर्थी पराधीन होते आणि आम्ही .... मला तरी काय हक्क होता त्याला समजावायचा? त्याचा स्वार्थीपणा किंवा बेफ़िकिर स्वभाव स्पष्ट दिसत होता आणि माझा इतके दिवसाचा तुटकपणा ... शेवटी गुन्हा तो गुन्हाच, त्यात लहान मोठ्ठा असं काही अंतर करणं म्हणजे आपण स्वतःची भुमिका justify करण्यासारखचं! म्हणजे त्याच्यापेक्षा मी बरा! अशा विचारानी जास्तच अपराधी वाटू लागलं . काहीतरी केलं पाहिजे काहीतरी उपाय, ज्यानी मनाला लागली टोचणी जरातरी कमी होईल. संध्याकाळी वाटण्यांची formal procedure सुरु झाली. माधव त्याच्या अजुन एका वकिल मित्राला घेऊन आला होता. तो जे काही सांगत होता ते सगळ दादा निमुटपणे यादीमधे लिहित होता. घराची, शेताची कागदपत्रं पिढीजात चालत आलेली भांडीकुंडी, देव, दागिने - अगदी काहीकाही शिल्लक ठेवलं नाही. मनातल्या मनात देवाचं पवित्र मंदिर कोणीतरी फ़ोडतय असा भास होत होता. आरतीला मी काही बोलू नकोस असं आधीच बजावलं होतं दादा काही बोलणारच नव्हता. तो शांत सागरासारखा दिसत होता. त्याच्या चेहर्यावर कुठेही विषाद, राग दिसत नव्हता. आई विषण्ण मनाने सर्व पहात होती. शेवटी तिने आपलं मंगळसुत्र माधवजवळ दिलं आणि ती दादाजवळ येऊन उभी राहिली. आरतीला अश्रू आवरेनात. मी तिच्या डोक्यावर थोपटलं आणि अचानक मला मोठ्ठं झाल्यासारखं वाटू लागलं . 'तीन समान वाटण्या झाल्या पाहिजेत.' माधव म्हणाला आणि मी एकदम म्हणालो 'तीन कशा, पाच समान वाटण्या झाल्या पाहिजेत.' सगळे एकदम दचकले 'अरे पण ताईला आणि आरतीला काहीही नकोय' माधव मला समजावू लागला. 'अरे नको कसं त्यांचाही समान हक्क आहे . उद्या त्यांना गरज पडली तर त्या काय आपल्याकडे हात पसरणार का? घरच्या परिस्थितीमुळे त्यानाही लग्न झाल्यावर फ़ारसं काही मिळालेलं नाही. आणि उद्या त्यांची मती फ़िरली तर, कोर्टात खेपा कोण घालणार?' मी एका दमात सर्व शक्यता बोलून मोकळा झालो. माझं मलाच आश्चर्य वाटलं . 'पाहिजे तर त्याना त्यांचा हिश्याची जमीन दादाला किंवा तुला विकू दे !' पुढे कोणालाच काही बोलता आलं नाही. पाच वाटण्या झाल्या. माधवने आमच्या तिघांच्या वाटची जमीन विकत घेण्याची तयारी cum इच्छा दर्शविली. दादाची आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर दिसंतच होती. शेतीचं उत्पन्न तेव्हढं काही खास नव्हतं आणि बाबांच्या आजारपणात उरलीसुरली शिल्लकही सम्पली होती. मुलांची शिक्षणं पैशा अभावी रखडली होती, घराची डागदुजी झालेली नव्हती . पण त्याने कधी याबद्दल कोणाजवळ अवाक्षर काढलं नव्हतं . आपलं कसं होणार ही चिंताही त्याच्या चेहर्यावर दिसत नव्हती . मला इतक्या वर्षात हे सगळं कसं नाही दिसलं ज्या दादानं मला सदैव मायेची पाखरं घातली त्याच्यासाठी मी काहीच केलं नाही . बाकी काही नाही तरी आर्थिक मदत तरी मी नक्कीच करू शकलो असतो. मी शांत बसलेला पाहून दादाच माझ्या खांद्यावर थोपटत होता. त्याक्षणी तो एखाद्या महान तपस्व्यासारखा दिसत होता, स्थितप्रज्ञ! कुठलीही गोष्ट त्याला विचलित करू शकत नव्हती. सगळ्यात कमी शिकलेल्या दादानं आज आम्हां सगळ्याना लाजवून टाकलं . त्याला साष्टांग नमस्कार घालावा असं वाटंत होतं 'चल शेतावर फ़ेरफ़टका मारून येऊ! ' शेतावर गेल्यावर दादाने कुठंपर्यंत आपली जमीन आहे कुठं काय पेरलं जातं , जमीनीचे वाटे कसे होतील इत्यादी माहिती द्यायला सुरुवात केली. मला काहीचं कळतं नव्हतं . जागोजागी मला दादाच्या कष्टकरी हातांचा स्पर्श जाणवत होता, त्याने गाळलेल्या घामाचे मोती दिसंत होते, त्याच्या मायेनं ती जमीन कृतार्थ झाल्यासारखी भासत होती. दुसर्या दिवशी बाबांच वर्षश्राद्ध यथासांग पार पडलं . संध्याकाळी जमीनीचे व्यवहार पार पडले . आरतीची आणि ताईची जमीन माधवनी विकत घ्यायची आणि मी माझी जमीन विकणार नाही असं ठरलं आम्हाला कोणालाच तोडायचं किंवा दुखवायचं नव्हतं . पहाटेच्या गाडीने मला आणि आरतीला निघायचं होतं , दादाला शांत झोप लागली होती, मी खुणेनच वहिनीला उठवू नको असं सांगितलं आईला आणि वहिनीला नमस्कार केला आणि वहिनीच्या हातात काही पेपर्स आणि एक चिठ्ठी ठेवली, मी गेल्यावर वाचा असं सांगितल. गाव सोडताना प्रथमच दादाला काहीही न सांगता सटकलो. माझ्या वाटणीची सर्व जमीन मी दादाच्या नावावर केली होती आणि आरती व ताईने त्यांना मिळालेली रक्कम दादाच्या मुलांच्या नावावर ठेवली होती. त्या पेपर्सच्या मागे दोनच ओळी लिहिल्या होत्या 'दादा, हे सर्व आमचं कधी नव्हतच! आमचा हिस्सा म्हणजे तूच! तूच आमची 'भूमी' आहेस, जिच्यापासून आम्ही खूप काही मिळवलय, जे अनमोल आहे. तू हे स्विकारलं नाहीस तर मी परत कधीच तुला भेटणार नाही.' समाप्त
|
Aaftaab
| |
| Friday, July 20, 2007 - 6:40 am: |
| 
|
खूप छान लिहिलय.. असे प्रसंग कुणावरही यायला नकोत.
|
Bee
| |
| Friday, July 20, 2007 - 8:44 am: |
| 
|
अभिश्रुती, शेवट खूप करुण झालाय ह्या कथेचा. ही वास्तविक कथा आहे म्हणून जरा जास्तच जीव तुटला वाचताना. सख्ख्या भावंडांवर वाटणीची वेळ येऊच नये इतके प्रेमळ नाते असावे आणि कुटुंबातील जोडीदारानी रक्ताचे नाते जपण्यास मदत करावी.
|
Psg
| |
| Friday, July 20, 2007 - 8:45 am: |
| 
|
predictable आहे, पण छान लिहिली आहेस कथा. माधवचं नक्की काय बिनसलं हे खुलवायला हवं होतंस. कथानायकाचं character व्यवस्थित उभं केलं आहेस
|
खूप सुंदर. मनातली चल बिचलता छान रेखाटली आहेस,
|
Princess
| |
| Friday, July 20, 2007 - 10:05 am: |
| 
|
करुण कथा... वाटण्या होताना नेहमी शांत असणार्या भावावर अन्याय होतो. तू मात्र कथेत त्याला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न तरी केलास. बरे वाटले.
|
Jaijuee
| |
| Friday, July 20, 2007 - 10:15 am: |
| 
|
छान कथा आहे, शेवटी बर्याच कलहांच कारण पैसाच असतो. लेखकाला हे जाणवले ते ही योग्यच आहे की आपण किती कोणाचं ऐकायचं? जोडीदार आपल्याला काय सांगतो ते सगळं आपण ऐकलं पाहिजे असं थोडच? आपली जमीन आपल्या भावाला देण्याचा त्याचा निर्णय आवडला मला, नुसते विचार न मांडता त्यानुसार कृती दाखवली आहे हे पण योग्यच आहे! छान कथा!
|
Jo_s
| |
| Friday, July 20, 2007 - 10:46 am: |
| 
|
अभीश्रूती, छान लिहीलयस, शेवट काय असेल त्याची कल्पना येते तरीही वाचत रहावस वाटत सुधीर
|
Manogat
| |
| Friday, July 20, 2007 - 12:09 pm: |
| 
|
अभीश्रुती, खुप छान आहे कथा... शेवटी डोळे पाणावले...
|
Bgovekar
| |
| Friday, July 20, 2007 - 12:10 pm: |
| 
|
श्रुती खुप छान गं! खुप दिवसांनी काही आलं तुझ्याकडुन. पण अपेक्षेप्रमाणे परिपुर्ण! पाणावले डोळे.
|
Amruta
| |
| Friday, July 20, 2007 - 12:18 pm: |
| 
|
छान आहे कथा. मनाला हवा असलेला शेवट वाचुन बर वाटल.
|
धन्यवाद! पूनम, खर्या घटनेत माधवचं काय बिनसलं हे आम्हाला अनाकलनीय आहे, पण त्याची बायको आणि तिच्या माहेरचे लोक फ़ार त्रासदायक किंवा भावनाशून्य आहेत . वाटण्या ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवायला खूपच त्रासदायक आहे (अगदी वैर्यावरही तो प्रसंग येऊ नये). म्हणुनच आपल्या मुलांसाठी चांगली शिकवण आणि आशिर्वाद याखेरीज काहीच ठेऊ नये . पण तरीही आपल्या हातात काहीच नसतं हेच खरं !
|
Pancha
| |
| Friday, July 20, 2007 - 4:11 pm: |
| 
|
अतिउत्तम, कथा अशी असावी, साधी सोपी मनाला भिडणारी भाषा
|
खुप सुन्दर लिहलियियस कथा अभिश्रुति.
|
अभिशृती मस्तच. असे माधव व त्यांचा सहचारिन्या बर्याच ठिकानी दिसुन येतात. खुप कमी घरात वाटन्या होऊन देखील भांडन नसतात.
|
Zakasrao
| |
| Saturday, July 21, 2007 - 5:31 am: |
| 
|
खुप छान कथा. अगदी सहज मनातुन आलेली. घर आणि आइ वडील यापासुन काही कारणास्तव लांब राहाव लागणार्याने स्वत्:लाच स्वत्:च आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे हे सांगणारी. मनातील चल बिचल, विचार, सो कॉल्ड आधुनिक बायका आणि त्यांची विचारसरणी,माधव आणि त्याच वागण, स्वत्:च कुठे चुकल याच आत्म परिक्षण करणारा कथा नायक आणि त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणुन निर्णय घेणे सर्व आवडल. छान!
|
T_pritam
| |
| Saturday, July 21, 2007 - 6:30 am: |
| 
|
एकदम मस्त कथा आहे....
|
Daad
| |
| Saturday, July 21, 2007 - 9:57 am: |
| 
|
श्रुती, साधा-सरळ विषय पण छान हाताळलायस. पॉझिटीव्ह एन्ड मलाही भावतो. माणसातली माणुसकी शिल्लक असल्याचा छोटासा जरी पुरावा दिसला तरी बरं वाटतं. आतमपरिक्षणाचा भागही सहज आणि परिणामकारक आलाय. कुठेही संवादांचा सहभाग नसूनही पात्रं जिवंत होतात. मला हे तितक्या सहज जमत नाही. मी प्रयत्न केलाय पण मलाच मी लिहिलेलं आवडल नाही. एक खरच सुंदर कथा. लिहीत रहा!
|
|
|