Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 19, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » त्यांची कहाणी » Archive through June 19, 2007 « Previous Next »

Zelam
Monday, June 18, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका कहाणीचे अनेक पैलू असू शकतात. तेच प्रत्येकाच्या दृSटीकोनातून.

Zelam
Monday, June 18, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२० जानेवारी २००७
दैनिक वार्ताहर
---------------
प्रसिद्ध गिर्यारोहक श्री अश्विन वर्तक यांचे अकाली निधन
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिर्यारोहक आणि लोकप्रिय गिरीभ्रमण आयोजक श्री. अश्विन वर्तक (३०) यांचा काल दि.१९ जानेवारी रोजी वज्रगडावरील इंद्रकड्यावरून पडून मृत्यू झाला. ते आपल्या काही मित्रमंडळींसमवेत या मोहिमेस गेले होते. अधिक चौकशी चालू आहे.सह्याद्रीत आणि हिमालयात अनेक यशस्वी मोहिमा करणार्‍या तरूण गिर्यारोहकास अशा प्रकारे मृत्यू यावा याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

१९ जानेवारी, २००७

अश्विन

कसला मस्त दिवस आहे आज! Perfect !
चढाईला अगदी योग्य दिवस. थंड हवा. आत्ता चढताना सुद्धा थकवा
जाणवत नाहीये.
वज्रगड - सह्याद्री रांगेतील माझा सर्वात आवडता. बेलाग चढाई पण तीही दाट जंगलातून. निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेलं सौंदर्य आणि त्याचा उच्च्बिंदू म्हणजे इंद्रकडा. वरून पाहिलं की direct ३००० फ़ूट free fall . रौद्र गूढ सौंदर्य. इतकं की कधीकधी वाटतं झोकून द्यावं त्यावरून...
आज मोठ्या कष्टाने जुळून आलंय सगळं. आज पौर्णिमेची रात्र असती तर काय मजा आली असती! हात वर केला तर स्पर्श करता येईल इतक्या जवळ दिसणारा, आटीव दुधाच्या रंगाचा चंद्र आणि त्याचं दरीत झिरपत जाणारं टिपूर सायीसारखं चांदणं! पण हरकत नाही. आज अमावास्या असली म्हणून काय झालं? लाखो तारकांनी भरलेलं आभाळाचं पांघरूण तरी ओढता येईल.
आज इतके काव्यमय विचार कसे सुचतायत आपल्याला? बहुतेक मनाची
पूर्वतयारी चाललीय. आज, शेवटी आज तरी सांगता येईल का तिला? एरवी इतक्या गप्पागोष्टी करतो आपण पण अजून धैर्यच नाही झालंय. पण आज काहीही झालं तरी तिला सांगायचंच. तेवढ्याच साठी तर ही जागा ठरवली ना आपण! ह्या मनोरम वातावरणात तिला प्रेमाच्या आणाभाका घातल्या तर ती नाही म्हणूच शकणार नाही. आणि नाही म्हणण्यासारखं आहे तरी काय आपल्यात? उत्तम शिक्षण आहे, अगदी वेगळी वाट चोखाळून निवडलेला व्यवसाय आहे, लहान वयात झालेलं नाव आहे, आपली छान मैत्री आहे, हे वज्रगडाचं setting आहे, मग नाही म्हणायचा प्रश्न येतोच कुठे?
पण...पण समजा..तरी ती नाही म्हणाली तर? कुठलंही कारण शोधून काढू शकेल ती..ंआही...कल्पनाच करू शकत नाही आता तिच्याशिवाय
जगायची...शक्यच नाही...मग काय करायचं अशा वेळेस?...खरोखरच इंद्रकड्यावरून झोकून...

क्रमश


Zelam
Monday, June 18, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२५ जानेवारी, २००७

शशांक

अश्या गेला. अश्या गेला? खरंच?
भणाणून गेलंय डोकं. छे! गेले आठवडाभर क्षणाची फुरसत नाहीये आणि त्यातून हे येणारे फोन. आजचा हा शंभरावा तरी असेल. मी काय बोलतोय, काय करतोय काही कळतच नाहीये.

अश्या आणि आपण. अश्या आणि शश्या म्हणूनच ओळखायचे सगळे. शाळेत ५वी पासून बरोबर. पुढे college मध्येही एकत्र. काय जादू होती त्याच्यात माहिती नाही पण अश्या जाईल तिथे आपण जाणार हे नक्की होतं. आपल्याला खरच काय आवडतं ह्याचा पण विचार नाही केला तेव्हा. हं, अभ्यासाव्यतिरिक्त भटकंतीची आवड मात्र आपण जोपासली होती. दर रविवारी एखाद्या गडावर जायचोच. आपल्यामुळेच अश्या जायला लागला. सुरुवातीला कंटाळायचा, दमायचा. मग लागला चस्का त्यालापण. नंतर तर इतकी सवय लागली की सह्याद्रीतले सगळे गड्-किल्ले पिंजून काढलेच आपण पण मनालीला जाऊन mountaineering institute मध्ये रीतसर शिक्षण देखील घेतलं. त्याच्या घरनं पण full support . अर्थात विरोध व्हायचा प्रश्नच नव्हता माझ्यासारखा. तो
अभ्यास वगैरे सांभाळून करायचा ना हे सगळं! आमच्यासारखं नाही. त्याचं शिक्षणही सुरळीत झालं म्हणून आमच्याकडे त्याला भाव. माझं
म्हणजे... असो. आपल्याला फिरतीचीच आवड. त्यानेच अनेकदा तीर्थरूपांना समजावलं म्हणून निभावलं. Thanks रे अश्या. तेव्हढे मात्र उपकार आहेत तुझे.

पण नंतर हळूहळू बदलत गेला तो. म्हणजे तो बदलत गेला का मलाच उशीरा लक्षात आलं देवजाणे? तसंही शक्य आहे. म्हणजे idea काढावी मी पण श्रेय लुटावं याने. एकदा मनालीला आम्ही असताना काही foreigners भेटले. तसा खूपसा अनुभव नव्हता त्याना पण लडाखी शिखर सर करायची होती त्यांची इच्छा. मी अश्याला म्हटलं घेऊया का यांची जबाबदारी? अश्या नाही कबूल करणार पण त्यातूनच आमच्या 'शिवालीक adventures ' चा जन्म झाला.

त्या परदेशी लोकांची मोहीम एकदम फत्ते झाली आमच्या सहकार्याने. आजकाल देशातही सॉलिड fad आहे ना. त्यातून अश्याचं लाघवी बोलणं, ऐटदार
व्यक्तिमत्व त्यामुळे ओळखी खूप. सगळी marketing skills ठासून भरलेली. मग अशाच सोप्या-कठीण मोहिमा आम्ही आयोजित करायला लागलो. देशा-परदेशातून माणसं यायला लागली. नाव झालं. कष्ट खूपच होते म्हणा पण भरपूर पैसाही मिळायला लागला. पण सगळ्यात माझा फायदा किती तर २५%. बाकी सगळं त्याचं. माझं काम field मध्ये, त्याचं बहुतांशी ऑफिसात. माझं स्थान? कुणास ठाऊक, बहुतेक senior group leader आणि तो managing director .
त्रास झाला तसा मला पण त्याने भागीदारी केली हेही खूपच. सगळे त्याच्या नावाने यायचे ना म्हणून. बरं बाहेर तरी कसं पडणार? कोण देणार मला नोकरी? २५% झाले तरी पैसा वाईट नव्हताच. आणि field मधलं काम माझ्या आवडीचं. त्यामुळे थोडं खटकलं तरी थांबलोच.
हो पण एवढं सोडलं ना तर अश्या नेहमीसारखाच मस्त बोलायचा, मी पुण्याला गेल्यावर खूप धमाल करायचो आम्ही. तसं बोट दाखवण्यासारखं काही नव्हतं म्हणूनच थांबलो खरं तर.

अशाच एका मोहिमेत भेटली देवयानी. ती आणि तिच्या २ मैत्रिणी आल्या होत्या. अश्याला काही प्रत्येक poject (तो मोहिमेला project म्हणायचा). वर यायला जमायचं नाही पण त्यावेळेस नेमका तो आला. नेमकं कुठच्या वेळेस कुठे हजर रहावं हे बहुतेक त्याला चांगलं माहिती होतं.

देवयानी! आता मी काय कप्पाळ वर्णन करणार तिचं! पण आपण तरी अशी मुलगी पाहिली नाही अजून. कसली दिसते! काय सही बोलते सटासट बंदूकीतून गोळ्या सुटल्यासारखं. हिंदी मे बोले तो एकदम छा जाती है. मला तर खूप आवडली ती. पण अश्या असताना ती मला का बघणारे? पण आमची सॉलिड मैत्री मात्र झाली. आता अशा मोहिमांमध्ये मैत्री होतच असते पण ती ट्रीप काही special च होती. नंतरही ती जणू सावलीच बनली होती त्याची. कधीही पुण्याला गेलो की असायचीच त्याच्यासोबत. त्याला विचारूनही पट्ठ्याने ताकास तूर लागून दिला नाही. बोलला नाही की मुद्द्याचं तिच्याशी माहीत नाही. जरा कविमनाचा होता तो. कविता-बिविता करायचा.

यावेळेस मी घरी आलो तर हुक्की आली साहेबांना वज्रगडावर जायची. त्याला फार आवडायचं तिथे. मी तयार होतोच. देवयानीशीही बोलणं झालं असेलच त्याचं. अश्याने तिला निक्षून सांगितलं की मुक्कामाला जायचं असल्याने एकटीने अजिबात यायचं नाही. एखाद्या मैत्रिणीला आण. मग आरती आली तिच्याबरोबर.

अजून आठवतोय तो दिवस. मजल दरमजल करत आम्ही गडावर पोचलो. मस्त जेवणं आटपली. मग आम्ही फिरत फिरत इंद्रकड्यावर आलो. चांगलीच थंडी होती. वर आकाशात लाखो चांदण्या. कसलं सही दिसत होतं. अश्या मात्र जरा शांत शांतच होता. थोडा वेळ तिथे बसल्यावर म्हणाला, "आरती, थंडी वाजतेय का तुला? शश्या जरा जा रे तिच्याबरोबर, स्वेटर घेऊन या." आता त्याला
देवयानीशी काहीतरी बोलायचंय हे न कळण्याइतका मी काही दूधखुळा
नव्हतो. आम्ही परत येताना आम्हाला देवयानीच्या जोरजोरात किंकाळ्या ऐकू
आल्या. "अश्विन, अश्विन". कड्यावरून आवाज चांगलाच घुमत होता. आम्ही धावतच वर गेलो. देवयानी वेड्यासारखी रडत होती. अश्या कुठेच दिसत नव्हता.
देवयानीने फक्त खाली बोट दाखवलं. अश्विन! प ड ला??? ३००० फ़ूट खोल दरीत?

पुढचं फार कमी आठवतंय. या दोन मुलीना सांभाळणं, गड उतरून नंतर
पोलिस स्टेशनात वर्दी देणं, परत गडावर 2-3 गिर्यारोहकांबरोबर येऊन अश्याला शोधण्याचे निष्फळ प्रयत्न, पोलिसांच्या चौकश्या.
अश्या, इतका अनुभवी गिर्यारोहक. त्याच्या बाबतीत हे कसं शक्य आहे? तरी मी त्याला म्हणायचो की कधीही अती आत्मविश्वास दाखवू नये. कड्याच्या टोकावर जायची काही गरज होती का?

एक मात्र झालंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडं क्रूर, अमानवी वाटेल,
म्हणजे मला तरी वाटतंय, पण काय करणार, मानवी मन आहे शेवटी. आता तरी मला दुय्यम स्थान मिळणार नाही. अश्या-शश्याची जोडी. त्यातही नंबर दुसराच, शश्या-अश्या नाही. आता अश्याच्या व्यक्तिमत्वाचं दडपण नको, आपल्या कल्पनांवर दुसरंच कुणी कळस चढवतंय ते पहाणं नको. नाही म्हणजे अश्या मित्र होता आणि राहीलच पण ते स्वतःबद्दल न्यूनगंड वाटणं नको.

'शिवलिक adventures ' आता मलाच सांभाळायचीय. personality development चा class लावतोय. डोकंदूखी विसरून फोन घेतोय. आता देवयानीचीच काळजी आहे. त्या घटनेपासून एक शब्द बोलली नाहीये ती, अगदी पोलिसांनी चौकशी
करूनही. भेटतो तिला थोड्या वेळाने. तसा रोजच जातोय मी तिथे.
Goodbye dear Ashya, may your soul rest in peace .

क्रमश


Marhatmoli
Monday, June 18, 2007 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zelam ,

छानच लिहलयस. सुरुवातिपासुनच पकड घेतलिये कथेने. पुढ्चे भाग लवकर टाकशिल please .


Zelam
Tuesday, June 19, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ फेब्रुवारी, २००७

आरती

दोन आठवडे झाले आज. अजूनही विश्वास बसत नाहीये. कसं सावरायचं यातून? का? का अश्विन सारखा तरुण काळाने हिरावून घेतला? कधीकधी कशाला अर्थच उरत नाही ना तसं वाटतंय.

अश्विनला पहिल्यांदा भेटले ते हिमालयाच्या भटकंतीत. खरं तर जाणारच नव्हते मी. देवयानीने खूप आग्रह केला म्हणून गेले. भीतीच वाटत होती मला. हे असलं ट्रेकिंग्-बिकिंग कधी केलं नव्हतं. देवयानी नेहमीप्रमाणे म्हणालीच, "जरा dashing हो गं आरती. यायलाच पाहिजे तुला माझ्याबरोबर. यावेळेस आई बाबांपुढे काही चालत नाहीये माझं. एकटं जायचं नाही म्हणे. तू नाही तर कोण येणार माझ्याबरोबर? अगं चांगले नावाजलेले आयोजक आहेत आणि tour काही फार कठीण नाहीये. मी आहे ना."
देवयानी एकदा बोलायला लागली ना की आपलं काही चालतच नाही. कधी साखर पेरत, कधी दमबाजी करत आपलं काम साधण्यात तिचा हात कोणीच धरू शकत नाही. पण माझ्या आईचा पण तिलाच पाठिंबा. आईच्या मते मी लाजाळूचं झाड आहे, नेहमी मागेमागे रहाते, थोडी तरी धडाडी दाखवली पाहिजे, आता देवयानी बरोबर असल्याने मी एकटी पडणार नाही, काळजी वाटणार नाही वगैरे वगैरे. शेवटी मी हो म्हटलं नाही तर या दोघी थांबणारच नाहीत या भीतीने दिला एकदाचा होकार.
आता वाटतय किती बरं केलं मी! आयुष्यातले किती सुंदर पंधरा दिवस होते ते!


Zelam
Tuesday, June 19, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्रीपमध्ये आमचे ५ - ५ जणांचे गट पाडले गेले. अश्विन आमचा group leader होता. मला पहिल्याच दिवशी भांबावलेलं पाहून तो म्हणाला "आपल्याकडे ८ वर्षांच्या मुलीपासून ते ६५ वर्षांच्या आजोबांपर्यंत लोक आहेत. मग कशाला घाबरतेस? आपल्या आपल्या गतीने चाल. इथे काही शर्यत नाही लागलेली. Take your own time . जाताना आजूबाजूला बघ. निसर्गाचा आस्वाद घे. Enjoy. "
मग देवाचं नाव घेऊन केली सुरुवात. देवयानी इतकी चपळ. धडाधड पुढे निघून जायची. नेहमी पहिली पोचायची. मी तर सुरुवातीला खूपच हळू चालायचे. पण नंतर झाली खरी सवय.

गवताची हिरवीगार कुरणं, त्यावर चरणार्‍या चुकार मेंढ्या, देवदारांची बनं, पावलोपावली लागणार्‍या नद्या आणि झरे, ते ओलांडायला टाकलेले लाकडी झुलते पूल, नंतर बर्फाच्छादित चिंचोळ्या वाटेवरून आधारासाठी काठी टेकत चालणं, मुक्कामावर पोहोचल्यावर सरबताने होणारं स्वागत, रात्री शेकोटीभोवती म्हटलेली गाणी, जोडलेले मित्रमैत्रिणी. केवळ अविस्मरणीय!

तेव्हाच तर आपल्याला जाणवलं की आपल्याला बर्‍यापैकी गाता येतं, आपण काढलेले फोटो खूप छान येतात, नवीनच ओळख होत होती माझी मला. एकदम जमलं नाही हे. अश्विनची खूपच मदत झाली, अर्थात प्रत्येकालाच. पण तो आमचा लीडर असल्याने सगळ्यांकडे त्याचं नीट लक्ष असायचं. कोण दमलंय, कुणाला मदत हवीय, त्याला सांगावच लागायचं नाही. प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झाला होता तो.


Zelam
Tuesday, June 19, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवयानीची तर त्याच्याशी लगेच गट्टी जमली. ती जिथे जाते तिथे आपला ठसा उमटवतेच. पण अश्विनशी तिची मैत्री काही खास आहे असं वाटायला लागलं मला. खरं तर असं जाणवलं तेव्हा काहीतरी तुटलं आत. मलापण अश्विनविषयी काही वेगळं जाणवत होतं का? मैत्रीपेक्षा काही अधिक? पण कुठे मी आणि कुठे तो! छे! हा असा विचार करणं पण बरोबर नाही. नाहीतर त्याच्या मैत्रीलापण मुकू आपण. ते नाही सहन करू शकणार मी. काहीही काय विचार येतात मनात आणि का येतात? असल्या विचारांना थाराच द्यायचा नाही. आणि देवयानीच अनुरूप आहे त्याला. किती छान दिसतात दोघं एकत्र! आता देवयानी आहे थोडी हट्टी पण अश्विन बरोबर असताना तिच्यातही केवढा बदल होतो! They are made for each other .
जड मनानेच tour संपवून आम्ही पुण्याला परत आलो. आल्यावर आईला घट्ट मिठी मारून मी एकच शब्द म्हटला "Thanks!"
त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे अश्विन पुण्याला बरेचदा असायचा. इथूनच काम बघायचा. मला वाटलं आता कसचा भेटतोय तो.
आपण तर स्वतहून फोनही करणार नाही त्याला. पण त्याचाच फोन आला एकदा. मग मी, तो आणि देवयानी भेटलो. गप्पा मारल्या. नंतरी काही भेटी झाल्या. फिरण्याची हौस वाढलेली असल्याने २ trek झाले. अर्थात देवयानीशी जास्तं भेटणं व्ह्यायचं त्याचं. पण माझी आणि त्याची मैत्री कायम राहिली हेही नसे थोडके.


Zakasrao
Tuesday, June 19, 2007 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिली ओळ वाचली ते जितक लिहिलस ते धडाधड वाचत गेलो.
मस्त लिहिलस. पुढचा भाग येतोय ना लवकर. :-)


Zelam
Tuesday, June 19, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यादिवशी देवयानीचा फोन आला आणि आमचा वज्रगडाचा बेत ठरला. इंद्रकड्याच्या सौंदर्याबद्दल अश्विन नेहमीच भरभरून बोलायचा. त्यादिवशी प्रत्यक्षच पाहिली ती जागा. नेमका नेहमीच्या वेंधळेपणाने स्वेटर घ्यायचा विसरलेले. थंडी खूप वाजत होती पण बोलले नाही मी. अश्विनच्याच लक्षात आलं ते. त्याने शशांकबरोबर जाऊन मला स्वेटर आणायला सांगितलं. आम्ही परत येतच होतो तर देवयानीच्या जोरजोरात हाका कानावर आल्या "अश्विन, अश्विन!" कड्यासमोर काहीच नसल्याने प्रतिध्वनी उमटत होते. मी देवयानीच्या आवाजात ऐकलेले हे शेवटचे शब्द.
वर जाऊन पहातो तर सारं संपलं होतं. मन मानायलाच तयार नव्हतं. पण माझ्यापेक्षाही देवयानीचं दुःख मोठं होतं. काय प्रसंग गुदरला असेल तिच्यावर? आपल्या डोळ्यांसमोर त्याचं क्षणात नाहीसं होणं कसं वाटलं असेल तिला? मी तिच्या जागी असते तर? शहाराच आला अंगावर. मग कदाचित मीही उडी टाकली असती त्याच्या मागून. आता तिच्याकडे बघायला हवं. तिने काही बरं वाईट करायचा प्रयत्न करण्यापूर्वी. मी पटकन तिचा हात धरला. चेहरा पाषाणवत झाला होता तिचा. वाटलं तिने भरभरून रडावं पण आतापर्यंत हूं का चूं केलं नाहीये तिने. रोज भेटते मी तिला, बोलतं करण्याचा प्रयत्न करते पण यशच येत नाहीये. देवयानीला असं पहाणं म्हणजे मोठे शिक्षाच आहे.
अश्विन का गेलास रे आम्हाला सोडून? पहातोयस का आमची, तुझ्या घरच्यांची, काय अवस्था आहे ते? देवयानीची काय अवस्था आहे ते? कसं सावरायचं यातून?
काय करायचं? रोज रात्री उशी अश्रूंनी ओली करून परमेश्वराला तुझ्या सद्गतीसाठी प्रार्थना करणं एवढंच हातात आहे आता.

क्रमशः


Zelam
Tuesday, June 19, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९ फेबुवारी, २००७
देवयानी

एक महिना. आज बरोबर एक महिना झालाय. पण अश्विन, तू पाठ सोडत नाहीयेस. ती महिन्यापूर्वीची रात्रच का आली आयुष्यात?

कसं fairy tale life होतं लहानपणापासूनच. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली मी, लाडाकोडात वाढलेले मी. देवयानी म्हणजे सौंदर्य आणि हुशारीचा संगमच आहे असं लोक म्हणत असताना अहंभाव जपणारी मी. आरती खरं तर तशी अबोलच, पटकन उलटूनही न बोलणारी. एकदाच आपल्यावर रागावून म्हणाली होती की "देवयानी नाव अगदी शोभतं तुला. तशीच ययातीमधल्या देवयानीसारखी आहेस, हट्टी आणि दुराग्रही." खरंच हट्ट मला शोभून दिसला आणि मी तो जोपासला. मग मी म्हणते तेच खरं अशी वृत्ती झाली. dominating . असं असताना आजूबाजूला शब्द झेलणार्‍यांची का कमी होती? असल्या लोकांचा मात्र तिटकारा यायला लागला. खरे मित्रमैत्रिणी खूप कमी होते, खरं तर नव्हतेच. मग आरती भेटली कॉलेजात. साधी, सर्वसामान्य मुलगी. तिने कधीच भाव दिला नाही आपल्याला. या गोष्टीचा थोडा राग येऊनही त्यामुळेच ती आवडली.
घरातही आईबाबाना तिच्याबद्दल विश्वास वाटायला लागला. इतका की मी एकटीने हिमालयाcत फिरायला जायचा हट्ट धरल्यावर पहिल्यांदाच आईबाबानी आरतीशिवाय जायचं नाही असं निक्षून सांगीतलं. आता आरती साधी पर्वती तरी चढली होती का? पण आईबाबा मानायलाच तयार नव्हते. मग आरतीला पटवणं आलं. काकू बाजूच्या होत्या म्हणून बरं. झाली कशीबशी तयार. मनाविरुद्धच. केवढी हळूहळू चालायची. थोडसं काही झालं की डोळ्यांत पाणी. रडूबाई कुठली. ती आणि तिचा camera . आधीच हळू चालणार आणि हा एवढा वेळ घेणार फोटो काढायला. Sometimes it was impossible to bear with her . अश्विन होता म्हणूनच निभावलं.


Zelam
Tuesday, June 19, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विन! ऊंचापूरा, राजबिंडा, tall, dark, handsome category त मोडणारा dream man . मला तर पहिल्यांदा त्याला पाहताक्षणीच कळलं की माझ्या आयुष्यात कुणी असेल तर हाच. तो इतरांसारखा नव्हता. कुणालाही एकाच भेटीत आपलसं करण्याचं कसब होतं त्याच्यात. एक अनोखी अदब होती. माझ्या हट्टीपणाला, दुराग्रहाला त्या ट्रीप मध्ये कणभरही भाव मिळाला नाही. मग मात्र मी सावध झाले. अश्विनला मिळवायचं तर हे वागणं सोडायला हवं. तात्पुरतं तरी. एवढं कळल्यावर सगळं जमून आलं. group leader असल्याने व्यस्त असायचा तो पण रात्री campfire ला केवढ्या गप्पा मारायचो आम्ही! मला तर वाटतं मी तो सोडून बोललेच नाही कुणाशी जास्त. पण किती बदलून गेले मी त्याच्या सानिध्याने! हट्टीपणा आपोआपच सुटला. जग सुंदर वाटायला लागलं. यालाच प्रेमात पडणं म्हणतात का? नंतरही मी contact ठेवले त्याच्याशी. त्याला गमवून चालणारच नव्हतं. तसंही बर्‍याचदा पुण्यात असायचाच तो. त्याच्या साहसी, वेगळ्या वाटेवरच्या career ची भूल पडली होते. त्याचा दिनक्रम त्याच्या गावात असण्या-नसण्याच्या वेळा सारं माहिती करून घेतलं मी. जास्तीत जास्त वेळा मी त्याला भेटायचा प्रयत्न करायचे. काही वेळेस त्याने आरतीलाही बोलावलं होतं आवर्जून. त्याचा एकच वाईट गुण होता, म्हणजे दुर्गुण असा नाही पण माझ्या दृष्टीने वाईटच. अख्ख्या जगाला कळलं असेल आम्ही एकत्र असतो ते पण ह्याची गाडी पुढे सरकायलाच तयार नाही. काही बोलायचाच नाही त्या बाबतीत. मी पण जाम हट्टी. म्हटलं तो बोलल्याशिवाय आपणही काही दाखवायचंच नाही. पुढाकार त्यानेच घ्यायला पाहिजे.

Zelam
Tuesday, June 19, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी तो दिवस आला. वज्रगड trek . पण ताबडतोब त्याच्याकडून सूचना आलीच, एकटं यायचं नाही, मैत्रिणीला आण. आरतीलाच विचार ना!
कधीकधी बोअर करायचा पण हीच वृत्ती तर आवडलेली ना! आईबाबानी थोडं कां कूं केलं पण म्हटलं माझ्यावर विश्वास आहे ना? शेवटी हो म्हणाले. somhow आरती मात्र विचारल्या विचारल्या तयार झाली.

दिवसभराच्या चढणीनंतर रात्रे जेवून वगैरे आम्ही इंद्रकड्यावर गेलो. आकाशात एवढे तारे होते की मधलं आकाश दिसतच नव्हतं. चंद्र मात्र कुठेच नव्हता त्यामुळे फारसा उजेड नव्हता. torch घेऊन गेलो होतो पण गप्पा मारताना ते बंद केले होते. पहिल्यांदाच अश्विनला जरा शांत शांत बघत होते. मग अचानक म्हणाला "आरती थंडी वाजतेय का?" आणि मग शशांकला तिच्याबरोबर पाठवलं स्वेटर आणायला. Oh god! आता नक्कीच विचारणार हा.


Zelam
Tuesday, June 19, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि खरंच की माझ्याकडे बघून seriously बोलायला लागला.
"देवयानी तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं. तू माझी best friend आहेस म्हणून काही विचारायचं होतं.
"बोल ना." पहिल्यांदाच माझा आवाज फुटत नव्हता.
उत्तरादाखल त्याने एक कागद काढून दाखवला. torch च्या उजेडात मी तो वाचला. त्यावर फक्त तीन ओळी होत्या.

आयुष्याच्या वाटेवरती आठवणींचे एक गाव
रसरसलेल्या पाऊलखूणा घेती मनाचा ठाव
ती ओठांवर मिरवेल का फक्त माझेच नाव?

किती सुंदर! propose करण्याची ही किती आगळी तर्‍हा!
मग म्हणाला "काही कळलं?"
घ्या, आता अजून काय कळायचं बाकी होतं?
मी त्याला होकार देणार तेवढ्यात तो म्हणाला आता प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर वाच.
आणि मी वाचलं.


ती

काळ क्षणभर थांबला. आ र ती. आरती? How can this be happening? No no, stop it.. .

त्याचे शब्द नुसतेच कानावर आदळत होते.
"तिला पहिल्यांदा पाहिलं आणि आवडूनच गेली ती. किती साधा स्वभाव. हृदयाचा वेध घेणारे डोळे, संवेदनशील मन, तिचा साधेपणा."

माझ्या अहंकारी मनाचा विषारी फणा डोकं वर काढत होता.
मनात घुमत होत्या त्याच्या आरतीबद्दलच्या निरूपद्रवी वाटणार्‍या चौकश्या आणि आज आरतीलाच विचार ना हे शब्द. म्हणजे तिला येता यावं म्हणून फक्त माझं प्रयोजन.

त्याचं बोलणं सुरूच होतं.
"किती दिवस विचार करतोय तिला सांगायचा पण somehow जमतच नाहीये मला. देवयानी तूच सांग ना काय करू. तिचा नकार पेलण्याची ताकद नाहीये ग माझ्यात."
आवाज शांत ठेवून कशी काय बोलू शकले मी काय माहीत. म्हटलं "एक idea आहे. प्रेम करतोस ना तिच्यावर? रहा या कड्याच्या टोकावर उभा आणि जोरात जगाला ओरडून सांग तुझ्या जीवनात तिचं स्थान काय आहे ते. अशाने तुझी भीती जाईलच आणि जगाला नाही पण इथे उमटणार्‍या प्रतिध्वनींनी नक्कीच कळेल तिला."
खरोखरच पागल झाला असावा तो किंवा विचार करण्याची त्याची शक्ती पार गोठून गेली असावी त्या थंडीत कारण तो चक्क तयार झाला.

अंधारी रात्र. तार्‍यांचा जेमतेम उजेड. आम्ही दोघंच. बाकी सगळं सामसूम.

अश्विन तू माझा नाहीस तर कुणाचाच नाहीस.
आणि मी..

कळलंच नसेल त्याला काय होतंय ते. खाली ३००० फ़ूट खोल दरी.

तो गेल्यानंतरही काही सेकंद शांतच होते मी. कशी काय?

मग मात्र हे विष उतरू लागलं.

हे हे काय करून बसले मी. नाही, मला हवायस रे तू. "अश्विन, अश्विन, अश्विन!"

२ मिनिटात आरती आणि शशांक येऊन फोचले. दोघंही प्रचंड shocked पण आरती मला सावरायचा प्रयत्न करत होती. त्या क्षणी स्पर्शही नको वाटला तिचा.

तेव्हापासून शांतच आहे मी. रडलेही नाहीये. सगळ्यांचे सगळे प्रयत्न थकले. शशांक, आरती रोज यायचे. कशाला मला त्या काळरात्रीची आठवण करून देत होते ते? शशांक यायचा बंद झाला आता. आरती मात्र अजूनही येते. तीही थांबेल एके दिवशी.

आता बोलणारच नाहीये. कट्टी सगळ्यांशी. स्वतःशीपण.

कारण बोलले तर रोखू शकणार नाही. स्वतःविरुद्धच बंड करून उठेन मी.

पण अश्विन तू कधी थांबणार यायचा? आणि तो कवितेचा कागद तर अजिबात दाखवू नकोस मला. Leave me alone .
देवा! कधी संपणार हे? Please, please मुक्त कर रे त्याला म्हणजेच संपेल हा रोजचा छळवाद.

समाप्त.



Yashwardhan
Tuesday, June 19, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरद्स्त आहे. शेवट पर्यंत खिळवुन ठेवले..

Abhijat
Tuesday, June 19, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaleidoscopic view आणि मतकरींची गूढ भाव निर्माण करणारी अशी एकत्रित शैली खरेचच मन मोहून गेली. सुंदर!

Ajjuka
Tuesday, June 19, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मस्त गं. मला सुरुवातीला 'राशोमान' ची आठवण येत होती. अर्थात पहिल्या वाक्यच 'राशोमान' च्या कथेचं सार आहे त्यामुळे ते अपरीहार्य आहे म्हणा. असो... साम्य तिथेच संपतं. actual कथेचा 'राशोमान' शी काही संबंध नाही. आणि शेवटच्या म्हणजे देवयानीच्या बोलण्यात 'राशोमान' पुसलं गेलं.

ता.क.: राशोमान ही एक जपानी लोककथा आहे आणि त्यावर अकिरा कुरोसावा नावाच्या महान जपानी दिग्दर्शकाने 'राशोमान' याच नावाची अजरामर फिल्म केली आहे. सर्वांनी जरूर पहावी.


Sneha21
Tuesday, June 19, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह, केवल अप्रतिम...काय जबर्दस्त लिहिलय. अगदि मनापासुन आवड्लय...पुढ्च्या लेखनासाठी अनेक शुभेcछा

Mi_anu
Tuesday, June 19, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडली. शेवट थोडा अपेक्षित होता. असे वाटते की शशांक पुढे देवयानीशी सूत जुळवेल.

Gs1
Tuesday, June 19, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, अगदी उत्कंठावर्धक शैली. कथा आवडली.

Sanghamitra
Tuesday, June 19, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम,
सुरेख लिहीलीयस. एकदम perfect कथा.
प्रत्येकाच्या view मधून सांगितल्यानं सगळी पात्रंही अगदी clear समजत जातात.
आधी छानपैकी शशांकवर संशयही येतो. :-)
नंतर थोडी कल्पना येते पण तरीही शेवटपर्यंत त्याच उत्सुकतेने वाचावीशी वाटतेच.
भाषा छान आहेच आणि flow पण सही आहे कथेचा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators