Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 09, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Radiochya junya aathawani » Archive through March 09, 2008 « Previous Next »

Dineshvs
Saturday, March 08, 2008 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण आज त्या रेडिओच्या लायसन्स बद्दलच लिहिणार होतो. याचे एक छोटे पुस्तक असायचे आणि दरावर्षी पोस्टात जाऊन त्याचे नूतनीकरण करावे लागत असे. दरवर्षीच्या बजेटमधे त्याचे दर जाहिर होत असत. ( अगदी पहिल्यांदा दूरदर्शन संचासाठी पण असेच लायसन्स लागत असे )
मग एका बजेटमधे दोन किंवा कमी बॅंड असणार्‍या रेडिओ संचासाठी माफ़ी जाहिर झाली आणि पुढे ते रद्दच झाले.

रेडिओपेक्षा मग ट्रान्झिस्टर जास्त लोकप्रिय झाला. अनेकजणांकडे तो असे, खास करुन सहलीला जाताना किंवा शेतावर जाताना तो सोबत असे.

मग लवकरच कॅसेट प्लेयर्स आले. रेडिओ चालु नसेल त्यावेळी किंवा खास गाणी ऐकण्यासाठी कॅसेट्स प्लेयर वापरले जात. मग लवकरच दोघांचा संकर होऊन टु इन वन आले. ते तर फारच लोकप्रिय झाले. रेडिओवरचे कार्यक्रम रेकॉर्ड करण्यासाठी त्याचा छान उपयोग व्ह्यायचा. वन टच रेकॉर्डिंग हि पुढची पायरी, नाहितर कॅसेटमधे बटणाचा खाट खुट आवाज सहन करावा लागत असे.
हे टु इन वन प्रकरण, अतिलोकप्रिय होते. पहिलांदा याच्चीच जास्त तस्करी व्हायची.सोनी,नॅशनल वगैरेचे टु इन वन, घेण्यासाठी लोक उड्या मारत असत.

रेडिओचे प्रसारण दिवसेंदिवस जास्त निर्दोष होवु लागले आहे. आता तर देशभर विविधभारतीचे कार्यक्रम एकाचवेळी प्रसारित होतात. रेडिओच्या जाहिराती कधीही डोईजड झाल्या नाहीत आणि त्यानी मूळ कार्यक्रमावर कुरघोडी केली नाही.

ऑफ़िशियली एफ़ एम ट्रान्स्मिशन सुरु व्हायच्या आधी त्याच्या चाचण्या सुरु होत्या. त्यावेळी एफ़ एम बॅंड असणारे सेट बाजारत होते. एकदा चाळा करता करता मला हे कार्यक्रम ऐकु आले. खुपच छान प्रसारण होते ते. ( पहिला विचार आला तो अर्थात आता रेकॉर्डिंग छान करता येईल हाच )

नंतर त्याचे पेवच फ़ुटले. WIN 94.6 or win 92.4 असे एक चॅनेल होते. त्यावर अंजली कुलकर्णी, सकाळी पाच ते सात असा लाईव्ह मराठी कार्यक्रम सादर कार्त असे. तिची माझी मैत्रीही झाली होती. परत तिने एफ़ एम ला खानदानी आब आणुन दिला होता. ( एकदा प्रबळगडावर रात्र काढली होती त्यावेळी तिथेही मी तिचा कार्यक्रम ऐकला होता आणि तिला तसे कळवलेही होते ) आधी तासभर विविध स्तोत्रे, भक्तिगीते आणि मग भावगीते, नाट्यगीते असे त्याचे स्वरुप होते. त्याच चॅनेलवर मलिष्का पहिल्यांदा आली. त्या दोघी दोन मिनिटे एकत्र निवेदन करत असत. काहि कारणाने ते चॅनेल बंद पडले, मग मी कधी एफ़ एम च्या वाटेला गेलो नाही.


Hkumar
Saturday, March 08, 2008 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. आपण अजूनही मनानी किती रेडिओत गुंतलो आहोत हे दिसून येत आहे. रविवारी सकाळी लहान मुलांचा मनोरंजक कार्यक्रम असे. त्यात 'मी नाही अभ्यास केला' सारखी मुलांना आवडणारी खूप गाणी असत.

Sameer_ranade
Saturday, March 08, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई बेला के फूल हा कर्यक्रम ऐकायची. मझ्यामते हा कर्यक्रम रात्रि ११.०० ते ११.३० अजुनहि असतो. सगळी जुनी गणी असतात. मी हा कर्यक्रम ऐकत ऐकत झोपायचो, अजुन अठवतय. अजुनहि बरेच कर्यक्रम उदा. आपकी फ़र्माइश, फ़ौजी भैयों के गीत, छायागीत, जयमाला..

आमच्याकडे व्हॉल्व्ह चे रेडिओ खुप असायचे. माझे बाबा रेडिओ repair करायचे side business , अजुनही करतात. पण आता डेक, DVD प्लेयर. transister repair Knob replace करायला. मला बरेच झटके बसलेत हे सगळं करताना. :-). ह्या रेडिओ मध्ये वेगवेगळी designs पण असायची कंपनी वाइज. आणी त्यातलं कुठलं design आवडल कि मी बाबान्ना म्हणायचो हा रेडिओ मी उघडणार. :-).


Tulip
Saturday, March 08, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहेत सगळ्यांच्या रेडिओच्या आठवणी. माझ्या सगळ्या आठवणी फ़क्त आणि फ़क्त हिंदी गाण्यांच्या. माझी आई अगदी रेडिओ भक्त. आमच्या कडे कायम रेडिओ काही ठराविक वेळांना सुरु असणारच.
बेला के फ़ूल आणि सकाळचा रसवंती तर मी कधीच चुकवला नाही तिकडे असे पर्यंत. सुट्टीत गेल्यावरही कधी ऐकायचे पण एफ़ेमशी नाही नाळ जुळली अजून. मे बी मी इथे नसताना सुरु झालं ते बहुतेक म्हणूनही. पण एफ़ेमच्या ऍन्कर्सची बडबड असह्य वाटते. बेला के फ़ूल मधे काय सुंदर गाणी लावायचे. आणि कमेन्टरी पण सुरेख. रेडिओवर लावल्या जाणार्‍या गाण्यांच एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गाणं कोणत्या सिनेमातलं, गीतकार, संगितकार, गायक वगैरेंची नावं न चुकता देत. एफ़ेमवर ते काही नसतं आणि नुसतीच फ़ाल्तू बकबक.
मला नुसतं नावं ऐकलं रेडीओचं तरी शाळा, कॉलेजातले दिवस आठवतात.
आणि कार्यक्रम सुरु व्हायचे संपायचे ते काय अचूक वेळेवर! सगळी तयारी अगदी रेडिओच्या काट्यावर. आणि अभ्यासही. समहाऊ कॅसेट किंवा आयपॉड वर अभ्यासाला लय कधी जमली नाही.
अजुन एक रेडिओची आठवण म्हणजे मी त्या टीनएजर्स साठीच्या कॉफ़ी हाऊस मधे दोनवेळा कार्यक्रम केला होता. आमच्या इथे रविंद्र पिंगे रहायचे त्यांच्या सांगण्यावरुन. एक लाईव्ह ग्रूप डिस्कशन सारखं होतं आणि दुसरा मी बेस कॅम्प करुन आले त्यावेळचे माझे अनुभव सांगण्याचा. आणि इतक्या ओळखीच्यांचे फोन आले होते मला ते ऐकून की मी मग स्वत्:ला अनेक दिवस आपण कोणी जागतिक महत्वाची व्यक्ती वगैरे समजत होते. खूप वर्षं रेकॉर्डिंग ठेवलं होतं त्याचं. नंतर काय माहीत कुठे हरवल्या कॅसेट्स.
रेडिओच्या आठवणी मात्र इतक्या ताज्या आहेत डोक्यात अजून!.


Hkumar
Saturday, March 08, 2008 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वीचा रे. सकाळी व दुपारी कशी छान विश्रांती घ्ययचा! अजूनही तो रात्री योग्य वेळेस झोपी जातो. नाहीतर TV च्या २४ तास बोंबलणार्‍या वाहिन्या कशा छळत असतात!

Mukund
Saturday, March 08, 2008 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच बीबी!

माझ्या अगदी लहानपणी ७३-७४ च्या सुमारास आमच्याकडे फिलिप्सचा रेडिओ आला. वर बर्‍याच जणांनी लिहिलेले वाचुन माझे लहानपण डोळ्यापुढे नाचु लगले. मला आठवत असलेल्या रेडिओच्या जुन्या आठवणी म्हणजे टेकाडे भाउजींचा कार्यक्रम. त्यात प्रभाकर जोशी बहुतेक टेकाडे भाउजी होते व त्यांची एंट्री नेहमी.... काय पंत!.... असे म्हणत व्हायची... अतिशय मस्त कार्यक्रम होता तो. लहानपणी घरात सगळे असताना... जेवण झाल्यावर... नऊ वाजता...वडिलांचे पाय चेपत चेपत तो कार्यक्रम आम्ही सगळे रोज ऐकायचो. नऊ वाजताच हे मुंबई ब वर टेकाडे भाउजी चालले असताना विवीध भारतीवर सव्वा नऊ वाजता हवामहल हा कार्यक्रम असायचा.. त्याचे टायटल म्युझीक मला खुप आवडायचे.तसेच आमच्या बाजुला केरळी कुटुंब राहत असल्यामुळे रोज संध्याकाळी ४.३० ते ५.३० आम्हाला विविध भारतीवर चालु असलेली मल्याळी व तामीळ गाणी ऐकु यायची.सगळ्याच गाण्यात..... वडक्कम वडक्कम... इंडे इंडे यळक्कम... असेच काहीतरी ऐकु यायचे... तसच वर रवि उपाधे यांनी म्हटल्याप्रमाणे सकाळी ११ चे कामगार सभेचे टायटल म्युझीक... ट्यांव ट्यांव... तेही अजुन आठवते. शनिवारी आमची बालमोहन शाळा सकाळची असायची व १०.४५ ला सुटायची. बरोबर ११ वाजता मग आम्ही रानडे रोडवर मनोहर बिस्कीट वाल्यासमोर.. भंडारी हॉलसमोर येउन पोहोचलो असायचो व त्यावेळेला ते कामगार सभेचे म्युझीक व कधी कधी शाहीर साबळेचे विंचु चावला.. हे गाणे किंवा बाजीप्रभु पडला.. हो.... जी जी जी..... हा पोवाडा दुकानातुन ऐकु यायचा.... आजही कामगार सभेचे टायटल म्युझीक मनात आले की शनिवारची शाळा आठवते..

पुणे केंद्रावरचा दत्ता कुलकर्णींचा स्पष्ट व खणखणीत आवाज अजुनही माझ्या कानात घुमत आहे.... हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे.. सकाळचे सात वाजले आहेत व दत्ता कुलकर्णी... आपल्याला बातम्या देत आहेत....काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत द्रविड मुनहेत्र कळघम पक्षानी १८ जागा मिळवल्या असुन अखिल भारतिय अण्णा द्रविड मुनहेत्र कळघम पक्षानी १२ जागा मिळवल्या आहेत... आत्ताच आलेल्या ताज्या बातमीनुसार इंदिरा गांधी यांनी अमेठीमधुन प्रचंड बहुमताने निवडुन येउन आपली जागा राखली आहे.... वगैरे वगैरे...

जाहीरातीबाबत एक जाहीरात माझ्या लक्षात कायमची राहीली आहे.. ती म्हणजे लाइफ़बॉय साबणाची.... तंदुरुस्ती.... की.... रक्षा........ करता है लाइफ़बॉय.. लाइफ़बॉय है जहां..... तन्दुरुस्ती है वहां.... टण!

आणी जसदेवसिंगची हॉकीचे समालोचन कोणाला आठवते का? माझ्या मते त्या माणसाला खास पुरस्कार दिला पाहीजे त्याच्या त्या समालोचनाच्या कसबासाठी.. मला स्पष्ट आठवत आहे... १९७५ च्या हॉकी वर्ल्ड कप फ़ायनलचे समालोचन ऐकायला आम्ही सगळी बाळगोपाळ मंडळी मोठ्या मुलांबरोबर आमच्या शेजारच्या घरात रेडिओभोवती गोळा झालो होतो कोंडाळे करुन... जीव मुठीत घेउन जसदेव सिंगचे ते धावते (अक्षरश्: धावते!) समालोचन आम्ही ऐकत होतो... हे पुढचे वाचताना प्रोग्रेसिव्हली वाचनाचा वेग वाढवत वाढवत वाचा..

"और ये अजितपालसिंगने गेंदको अपनी दाही तरफ़ एक हलकासा पास करके हरचरण सिंग को सोंप दी... हरचरणसिंग ने उस पासको लेकर गेंदको सेंटर फ़ॉर्वर्ड गोविंदा के पास उछालके पास कर दिया... और ये गोविंदा.... बहोतही तेजीसे दौडते हुए... उस गेंद को लेकर अपनी पचास गज कि रेखा को पार कर के... ड्रिबल करते हुए... पाकीस्तान के हाफ़मे पहुचे है.... और अब पाकीस्तनके डिफ़ेंडरको चकमा देकर..उसके दोनो पैरोंके बिचमेसे उन्होने गेंदको ढकेला और तेजीसे आगे बढके गोविंदाने वापस गेंदका कब्जा किया है... और ये... गोविंदा गेंदको लेकर पाकीस्तानके पचीस गज की रेखा पर पहुचे... पाकिस्तानका का डिफ़ेंडर वहा मौजुद... गोविंदा तेजीसे अभीभी दौडते हुए.. पाकीस्तानकी डी पर पहुचे....... उन्होने इधर उधर देखा.... और..... गेंदको तेजीसे ढकेल दिया सुरजीत सिंग के पास"......... हुस्श!... असे ऐकत असताना गोविंदाचे नेमके चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे... हॉकी एक तर इतका वेगवान खेळ.. पण जसदेव सिंगचे समालोचन त्यापेक्षाही वेगवान असायचे... त्याला गोविंदा इधर उधर देखतोय.... हेही सांगायला वेळ मिळायचा.. त्याचेच मला नवल वाटायचे..

आणी रात्री अकरा वाजता बेला के फुल हा कार्यक्रम विविध भारतीवर असायचा. आणी त्यानंतर ११.३० ला हवामानाचा अंदाज ऐकवुन स्टेशन बंद व्हायचे... तो विविध भारतीवरचा हवामान अंदाज करणारा कोण होता याचा मला नेहमी प्रश्न पडायचा.. तो एक अतिशय ढ हवामान अंदाजवर्तक असावा हा माझा ठाम विश्वास झाला होता... रोज... कुलाबामे आजका उचतम तापमान... ३४ डिग्री सेल्सीअस और निम्नतम तापमान..२३ डिग्री सेल्सीअस था. सांताक्रुझ मे आजका उचतम तापमान.. ३३ डिग्री सेल्सिअस और निम्नतम तापमान २२ डिग्रीज सेल्सीअस था.(था! हे लक्षात घ्या.... म्हणजे आज काय होउन गेले याची माहीती ते रोज सांगायचे.. पण उद्याचे उचतम व निम्नतम तापमान काय असेल हे सांगण्याची जरुरी त्यांना कधीच भासली नाही.... मग याला हवामान अंदाज कसा म्हणायचा हाच प्रश्न माझ्या लहानपणी मला पडायचा!) आणी पावसाळ्यात शेवटी रोज... और मछवारों के लिये कोइ सुचना नही है......... असे ऐकुन झोपायचो व दुसर्‍या दिवशी पेपरमधे हमखास बातमी असायची.... हर्णे बंदरातील ६ बोटी अजुन परत आलेल्या नाहीत व बहुतेक १२ मछमार वादळात सापडुन मृत झालेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे....:-(

टोणगा.. एकदम हुबेहुब फ़र्माइश... कब्बन मिर्झाचा अदावत मलाही आठवतो. दिनेश.. तुमच्याकडे नेहमीच डिटेल माहीती असते.. तुम्ही सांगीतलेले बहुतेक कार्यक्रम व नावे मलाही आठवतात... आणी अथक.. सत्तरीच्या दशकात जे वाढले त्यांना बिनाका गीत माला माहीत नसणे ही जवळ जवळ अशक्य बाब आहे...:-)


Hkumar
Saturday, March 08, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याकाळी घड्याळे 'रेडिओ टाईम' नुसार लावली जात. HMT घड्याळाच्या पुस्तकात दिले होते की रे. बातम्यांच्या आधी जे टिक टिक असे आवाज असतात त्यातल्या तिसर्‍या आवाजाची वेळ ही बरोब्बर वेळ.

Hkumar
Saturday, March 08, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हाचा एक शालेय विनोद्:
रेडिओवर बातम्या चालू असतात ''भुट्टो इंदिरा गांधींना म्हणाले...'' आणि घरातले कोणीतरी लगेच रेडिओचे स्टेशन बदलते आणि ऐकू येते ''मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू..'' :-)


Psg
Saturday, March 08, 2008 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संस्कृत बातम्यांबद्दल नाही लिहिलं कोणी? :-) सकाळी बरोब्बर ६.५५ ला "इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता शूयंताम. प्रवचक: बलदेवानंद सागर:" हे शब्द कित्येक वर्ष ऐकले आहेत :-) अजूनही संस्कृत बातम्या असतातच रोज, अर्थातच 'प्रवाचक' बदलले आहेत :-)

आणि आम्हाला प्रचंड आकर्षण असायचं ते 'चित्रलोक'चं. सकाळी ८.१५ला सुरु व्हायचं (अजूनही होतं)- का? तर त्यावर नवीन गाणी लागायची. 'चित्रलोक'ची गाणी ऐकत ऐकतच अभ्यास व्हायचा सकाळी.

सकाळी ११ ला 'मधुमालती'. अप्रतिम गाणी. सुमधुर, अवीट गोड चालींची हिन्दी गाणी. आणि वर म्हणलं तसं, गाण्याची सर्व माहितीही देतात- गीतकार, संगीतकार, गायक, गायिका आणि चित्रपट. एक आड एक दिवस एकाच थीमवरही गाणी ऐकवत. आता 'हॅलो मधुमालती' असतं आठवड्यातून ३ वेळा आणि तेही अर्धाच तास :-( त्यात फ़र्माईशीनुसार गाणी असल्यामुळे कोणतीही गाणी लागतात. मधुमालती नंतर मराठी गाण्यांचा असाच सुरेख कार्यक्रम लागायचा. नाव विसरले.. कोणाला आठवतंय?


Hkumar
Saturday, March 08, 2008 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं की रेडिओचा परवाना व कर वसंत साठे मंत्री असताना रद्द झाला होता. CBDG

Limbutimbu
Saturday, March 08, 2008 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या जन्माच्या कितीतरी आधी म्हणजे ५० ते ६० च्या दरम्यान कधीतरी वडीलानान्नी रेडीओ आणला होता, त्याला खुप सारे बॅण्ड होते! अनेक स्टेशने लावुन चित्रविचित्र आवाज ऐकणे हा आमचा खेळ असायचा ३५० वर जवळपास पुणे आणि ५५० जवळ मुम्बई केन्द्र लागायचे असे पुसटसे आठवते! त्यावेळेस कामगारविश्व म्हणुन कार्यक्रम व सकाळचे वनिता.... असच काहिश्या नावाचे कार्यक्रम असायचे
एक धुन आठवते, गम्मत जम्मत य र ल व गम्मत जम्मत.... फारच पुसट! पण त्यावेळेस भावगीते व सुमधुर मराठि चित्रपटगीतान्चा जमाना होता व आमचे बालपण त्यात न्हाऊन निघाले! :-)
ठराविक वेळेस बातम्या ऐकणे हे रोजचेच आन्हीक होते! पण या सर्व आठवणि सत्तरच्या आधीच्या
पुढे १९७३ - ७४ मधे आम्ही स्वतःच जेटकिन्गचे सेट आणुन एक व दोन बॅण्डचे ट्रान्झिस्टर घरीच तयार केल्यावर रेडीओचे अप्रुप सम्पले त्यात ७४ साली घरी EC Tv आला!
अर्थात पुढे बराच काळ म्हणजे १९९० पर्यन्त व हल्ली गेली एकदोन वर्षे पुन्हा परत एकदा रात्रिचे बेलाके फुल ऐकेस्तोवर रेडिओवरील विविधभारतीची साथ काही सुटली नाही मधली काही वर्षेच तेवढी सन्गत सुटलि होति

सन्स्कृतमधिल बातम्यान्ची ती सुरवात अगदि तशीच लक्षात हे!
इयम आकाशवाणी, संप्रती वार्ताः शुयंताम प्रवाचकः बलदेवानद सागरः....... अक्षरष अजुनही कानात जशीच्या तशी ऐकू आल्यासारखी भासताहेत :-)
सातला दहा मिनिटे असताना की सात दहा पर्यन्त या बातम्या असायच्या, अन लगेच नन्तर मराठीतून बातम्या असायच्या! त्या मोस्टली सुधा नरवणे द्यायच्या!
श्श्याऽऽऽऽ! गेले ते दिवस!
हल्लीच्या पोरान्ना...... जाऊदे....!
रेडीओ ऐकला तरी ऐकतात तो रेडिओ मिर्चीवरला फाल्तू धुडगुस अन विव्हळणी! शीट!


Jo_s
Saturday, March 08, 2008 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, पुर्वीचा परवाना आठवतोय.
पुर्वी रेडीओवर रविवारी रात्री युअववाणीत कॉफी हाऊस असायच. लक्ष्मीकांत बेर्डे असायचा त्यात.मजा यायची ऎकायला. मग तो नाटक आणि सिनेमात गेला.

दिनेश रेकॉर्ड प्लेअरचा टप्पा राहीला. कॅसेटच्या आधी ते फेमस होते.


Raviupadhye
Saturday, March 08, 2008 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या (म्हणजे १९७० च्या) आधी आकाशवाणी वर प्रसारीत होणार्‍या बातम्यांवर बरेच राजकीय निर्बन्ध असायचे. अनेक बातम्या दाबण्याचा अथवा विलंब करून प्रसारीत करण्याचा सरकार प्रयत्न करीत असे.त्यामुळे इन्दिरा गान्धींचा पराभव, चीन बरोबर व पाकिस्तान बरोबरील युद्धातील खरी स्थिती इ. बातम्या बी बी सी वरून ऐकल्या-आकाशवाणी आधी.ते ब्रह्म वाक्य आहे असे मानणारे बरेच जण होते कांही अन्शी ते खरे ही असायचे पण त्यात ब्रिटिश खोड्साळ्पणा ही असायचा.बी बी सी चे रेसेप्शन मात्र ए एम असून ही ग्रेट होते;
दुपारी साडेतीन पासून इन्ग्लन्ड मध्ये म्याच चालू असली तर कॉमेन्टरी असायची बी बी सी वर.
आणखी एक आठवण.विशेष परवानगी घेवून आकाशवाणीकेन्द्र पहाता यायचे. मी धारवाड केन्द्र बघितले आहे.तिथला ग्रुन्डिग चा स्पूल चा टेप रेकॉर्डेर कुतुहलाचा केन्द्र बिंदू होता.-:-)


Upas
Saturday, March 08, 2008 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी.. मस्तच बी बी.. रेडिओ आणि चाळीतलं बालपण ह्याच अतूट नाटक आहे.. आमच्या चाळीतच एक छोटा रेडीओ श्रोता संघ होता म्हणा ना..
मुकुंद तू टेकाडे भावजींचा कार्यक्रम म्हणतोयस तो बुधवारी सकाळी असायचा.. मीनावहिनी पण असायच्या त्यात असं आठवतय.. एकदम खुसखुशीत!
सकाळ पूर्ण पणे रेडीओच्या सहवासात न्हाहून निघाय्ची.. अजूनही तिथे असलो की निघते.. पहाटेचा तो बिगुल वाजयचा तो कित्येक वर्षात आता ऐकला नाही.. मग वंदेमातरम, दिल्ली केंद्रावरून हिंदीतून, बातम्या, सहा दहाला शेतकरी बांधवांसाठी कार्‍यक्रम.. सव्वासहाला भक्तिगीते, सहा पस्तीसला समूहगान.. आणि मग दिवसभराच्या कार्यक्रमांची माहिती, पर्यावरणावर एक पाच मिनिटांचा कार्‍यक्रम की मग सुषमा हिप्पळगावकरांचं आरोग्यंधनसंपदा... आम्च्या सगळ्यांचाच खूप लाडका कार्यक्रम.. आणि मग पुणे केंद्रावरच्या बातम्या..
दुपारी आमच्या इथे महिलावर्ग़ चाळीत एकत्र जमून वनिता मंडळ ऐकायचा.. कौटुंबिक शृतिका लागायच्या चांगल्या..
तेव्हा आयुष्य इतक वेगवानही नव्हतं आणि खरच लहान लहान गोष्टींमधला आनंद घ्यायला वेळही असायचा.. पुढे टीव्ही आला तरी आमची रेडीओची अपरीहार्यता तसूभरही कमी झाली नाही..
मुकुंद, मला रेडीओवरची करमरकर, संत ह्यांची कृकेटची मराठी कोमेंट्री सुद्धा आवडायची..


Shyamli
Saturday, March 08, 2008 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) सही आठवणी,
सकाळी शाळेत जायला ऊठणं व्ह्यायचं तेच स्वरांजली कार्यक्रमानी(हे आकाशवाणीचं औरंगाबाद परभणी केंद्र आहे) आज पाठ असणा-या कित्येक गाण्याच श्रेय या स्वरांजली कार्यक्रमाला. इथेच एकनाथांच्या भारूडापासून सुधीर फडकेंच्या गीत रामायणापर्यंत सगळं ओळखीचं झालं.



Bee
Saturday, March 08, 2008 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला 'बालविहार' हा साडेदहाला सुरू होणारा कार्यक्रम आठवतो का? त्यात नेहमी शाळेतील धडे वाचून दाखवत असतं. त्यामुळे शाळेत तेच धडे समजायला सोपे जात.

Raviupadhye
Saturday, March 08, 2008 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक आठवण्-आमची शिफ्ट फ़्याक्टरीत ७-४५ ला सुरू व्हायची.पूर्ण बिल्डिन्ग मध्ये एकाच कम्पनीत जाणारे,त्यामुळे दिवस असा सुरू व्हायाचा
सहा वाजता रेडियो सुरू-मराठी भक्तिगीते सम्पली की ६-३० ला चहा.६-४० ला देशभक्तीगीत सुरू झाले की दाढी.६-५० ला बादलीत बम्बातून(हा एक अस्तन्गत झालेला अवशेष्- कुमार्-यावर बा फ्-कसें-:-) पाणी सोडणे-६-५५ ते ७ न्हाणीघरातून बाहेर.७-०५ ला बातम्या सुरू,न्याहारी सुरू,७-१५ ला न्याहरी संपली सुधा नरवणे बातम्या सम्पवतात,पहिले गाणे सुरू, ७-१९ ला युनिफ़ोर्म चढवून तय्यार,७-२० ते ७-२२ ला दुसरे गाणे चलू असताना स्कूटेरला कीक्-:-)


Hkumar
Sunday, March 09, 2008 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, हरकत नाही, करा सुरू बा.फ़.!
मेडिकल काॅलेज मधील १ मजेदार आठवण. आमचे हृदयाचे ठोके stethoscope ने ऐकायचे pract चालू अन त्याच वेळी भारत पाक क्रि. सामना रंगात आलेला. एका मित्राने त्याच्या एप्रनच्या खिशात छोटा transistor ठेवलेला व stetho त्यावर खिशात ठेवून तो कानात नळ्या घलून मस्तपैकी commentry ऐकतोय! थोड्या वेळाने प्राध्यापकांनी त्याला पकडले. असे, रेडिओ व stetho यांचेही एक नाते!


Hkumar
Sunday, March 09, 2008 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'आकाशवाणीचे आबा' असा व्यं. माडगूळकरांचा एक लेख आहे. ते 'आबा' म्हणजे नाना चाफेकर. 'गावकरी फड' या कार्यक्रमात ते कृ. सपाटे(गणपा) यांच्याबरोबर असत. 'राम राम मंडळी' हा त्यांचा गाजलेला आवाज. आबा-गणपा जोडीने हा फड गाजविला होता. रवी, तुम्हाला बहुधा हे माहित असेल.

Dhondopant
Sunday, March 09, 2008 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दहावीत असताना एक " आम्ही संशोधक सारे " असा काहीतरी कर्यक्रम लागयचा. त्यात खुपच चांगली माहीती असायची आणि त्या कार्यक्रमाच्या नोटस काढायचो कारण नंतर त्यावर स्पर्धा असायची...

बालोद्यान हा कार्यक्रम ही छान असायचा. शेवेटी एक लहान मुल " वा वा वावावा " असे म्हणायचे.

आमच्या घरी १९८८ ला टीVही आला.. त्यापुर्वी मी रविवारचा सिनेमा वगैरे बघायला शेजारी जात असे. साडेसात वाजता बातम्या साठी ब्रेक असायचा.. पंधरा मिनिटे.. त्या दरम्यान घरी आलो की हमखास सांगली केंद्रावर कीर्तन चालु असायचे... नि आजी ते ऐकत असायची.. त्यावेळा असे वाटायचे की काय हे असले ऐकतात...

कार्यक्रमाची रुपरेषा ही ऐकायचो... आणि तो पत्रोत्तरांचा कार्यक्रम.. ताई आणि दादा..

दादा हे पत्र आलय कोल्हापुरहुन.. ते अस म्हणताहेत की त्याना आपला आपली आवड हा कार्यक्रम खुप आवडतो पण या कार्यक्रमात आपली पसंत कशी कळवावी हे त्याना जाणुन घ्यायचय..

मग दादा..

.. ताई खुपच सोपय.. पोस्टकार्डावर आपले नाव आणि गाण्याचे नाव लीहुन आमच्याकडे या पत्त्यावर पाठवा.. आमचा पत्ता.. ताई आणि दादा, आकाशवाणी सांगली केंद्र...

आमालाबी लई वाटायच की आपन बी आपली पसंद कळवावी आनि आपल नाव ऐअकाव पर कदी जमलच न्हाई.. एक गाण मात्र सांगली केंद्रावरच्या आपली आवड मधे असायचच

गंध फुलांचा गेला सांगुनी..



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators