Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » आई कुणा म्हणू मी.....? » Archive through March 02, 2007 « Previous Next »

Jayavi
Monday, February 26, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचानक आभाळ भरुन येतं आणि इतके दिवस साचलेलं सगळं झडझडून कोसळतं. तसंच झालं काहीसं. शर्वरीच्या मनात इतक्या दिवसापासून साठून राहिलेलं मळभ आज मोकळं झालं. आपल्या आईबद्दल तिला नितांत आदर आणि अभिमान होता पण एकेक गोष्ट अशी काही घडत गेली की तिच्या मनातला आईच्या आदराचा कोपरा हळुहळु लहान लहान होत गेला आणि त्याऐवजी आईबद्दलची चीड त्याची जागा घ्यायला लागली.

खरं म्हणजे आई म्हणजे शर्वरीचा जीव की प्राण. तिला आईबद्दल असलेला अभिमान सगळ्यांनाच माहित होता. तिच्या सगळ्या मैत्रिणीनासुद्धा शर्वरीची आई म्हणजे आपली जीवाभावाची मैत्रिण वाटायची. त्यांची कितीतरी गोड गुपितं शर्वरीच्या आईला माहित असायची.

शर्वरीची आई, निशीगंधा सुद्धा छान रमायची आपल्या लेकीच्या ह्या गोतावळ्यात. निशीचं लग्न तसं लवकरच झालं. अवघी वीस वर्षाची निशी नवरी बनून निशांतच्या आयुष्यात आली. खूपशी बावरलेली, बरीचशी गोंधळलेली पण मनातून आनंदलेली निशी बघून निशांत हरखला होता. निशीचा बालिशपणा, अल्लडपणा त्याने अगदी तसाच जपला होता. मुंडावळ्या बांधून जेव्हा निशी बोहोल्यावर चढली तेव्हाच ती त्याच्या मनात अगदी खोल खोल उतरली होती.

दोघांच्या त्या गुलाबी विश्वात शर्वरी नावाचं गोंडस बाळ जेव्हा आलं ना….. तेव्हा त्यांचं सगळं विश्वच शर्वरीमय झालं. दोघांच्या प्रेमाचं इतकं गोड प्रतिक समोर असताना दुसरं काही सुचेलंच कसं….?

शर्वरी जसजशी मोठी होऊ लागली तशी तिची दुनिया सुद्धा मोठी व्हायला लागली. घरच्या इतकीच ती तिच्या बाहेरच्या विश्वातही रमायला लागली. शर्वरी मधे गुंतलेली निशी सुद्धा आता थोडी मोकळी झाली. आतापर्यंत तिचं वेळापत्रक फ़क्त शर्वरीसोबतच होतं. आता मात्र तिला स्वत:साठी सुद्धा वेळ मिळायला लागला.

अंगभूत कलांना बाहेर यायला काही वेळ लागला नाही. निशी सुरेख लिहायची. वाचनाचंही विलक्षण वेड होतंच. तशी लायब्ररी सुरु होतीच म्हणा पण वेळ काढून लिहायला झालंच नाही इतक्या दिवसात. जेव्हा थोडा निवांतपणा मिळायला लागला तेव्हा निशीनं मनातलं सगळं कागदावर उतरवायला सुरवात केली. निशांतचा मनापासून पाठिंबा होताच. तसाही आपल्या गोड आणि हुशार, हळव्या मनाच्या बायकोवर निशांत अगदी फ़िदा होता.

हळुहळु शर्वरीचं जसं जग वाढत होतं, तसंच निशीचंही वाढायला लागलं. तिचे लेख, कथा, कविता….. वर्तमानपत्र, मासिकांमधून यायला लागल्या. तिची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली. आता निशीला एक साहित्यिक म्हणून मान्यता मिळाली. तिला कार्यक्रमांची आमंत्रणं यायला लागली. निशीच्या लिखाणात एक प्रकारची तॄप्ती होती. संसारातली तॄप्तीच कदाचित डोकावत असणार लिखाणात सुद्धा…..!

शर्वरीपण आपल्या आईच्या या नव्या यशामुळे अगदी मनापासून खुष होती….तिचं होणारं कौतुक ती अगदी मनापासून enjoy करत होती. तिच्या मैत्रिणींमधे आता तिच्या आईची एक वेगळीच इमेज तयार झाली होती.

सगळं इतकं मस्त सुरु होतं ना……..! शर्वरी कॉलेजात जायला लागली. आणखी नवे मित्रं, नवे विषय…….! बाहेर घडणारं सगळं ती आईसोबत शेअर करायची. रोज कॉलेजमधून घरी आली की आईच्या हातचं गरम गरम जेवताना तिची टकळी सुरु असायची. दिवसभरात जे काही घडलं त्याचा पूर्ण फ़्लॅशबॅक आईसमोर दिसायलाच हवा. शर्वरीचा तो अगदी हक्काचा वेळ असायचा.

त्यादिवशी निशांत घरी आला ती एक आनंदाची बातमी घेऊनच. त्याला प्रमोशन मिळालं होतं आणि अमेरिकेत ५ वर्षांचं वास्तव्य ! सगळे जण फ़ारच आनंदात होते. शर्वरी आणि निशीनं मस्तपैकी पार्टी उकळली निशांतकडून. पंधरा दिवसातच निशांत अमेरिकेला गेला. आता मात्र दोघी मायलेकी जरा जास्तच जवळ आल्या. एकमेकींच्या अगदी पक्क्या मैत्रिणी झाल्या. शर्वरीसुद्धा आता समंजस झाली होती. चांगल्या वाईटाची समजही तिला यायला लागली होती. निशीनंही स्वत:ला मस्तपैकी गुंतवून घेतलं होतं. परिसंवाद, चर्चासत्र, समिक्षा ह्यात तिनंही स्वत:ला बिझी ठेवलं होतं. पण निशांतची उणीव मात्र फ़ारच जाणवायची. अशा तीव्र आठवणीतूनच जन्मायची एखादी आर्त कविता !

क्रमश:



Suvikask
Monday, February 26, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त सुरुवात आहे... ओघवत वाटतय...

Jayavi
Tuesday, February 27, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हा दुरावा आता दूर होणार होता…..! पाच वर्ष संपवून निशांत पुढच्याच आठवड्‍यात येणार होता. सगळे जण खूप खूप आनंदात होते. पण …….!!! निशांतला घेऊन येणारं विमान अपघात होऊन कोसळल्याची बातमी कळताच त्या दोघी अगदी वेड्‍यापिशा झाल्या. इतके दिवस वाट पाहून…….जेव्हा आपल्या जीवलगाला भेटायची वेळ आली नेमका तेव्हाच दैवानं घाला घातला होता. पाच वर्ष फ़क्त दोघीच होत्या सोबत एकमेकींना. पण आता तर उभा जन्म काढायचा होता निशांतशिवाय.

दिवस जसे पुढे सरकत होते…तशी दु:खाची धारही बोथट होत होती. निशांतशिवाय जगण्याची सवय व्हायला लागली होती. त्यातही शर्वरीच्या achievements मुळे मनाला थोडी उभारीही येत होती. शर्वरीच्या आयुष्यात सुद्धा गुलाबी किरणं डोकवायला लागली होती. मॅनेजमेंट करताना काही लेक्चर्स द्यायला आलेला उन्मेष तिला तिच्याही नकळत आवडला होता. हळुहळु तिच्या स्वप्नातही तो अगदी हक्कानं यायला लागला होता. ह्या नव्या जाणीवेनी ती मोहरली होती. मनाशीच हसणं, कारण विचारल्यावर गोरंमोरं होणं…. हे आपसूकच सुरु झालं. निशीच्या पण लक्षात यायला लागलं होतं……. पोरगी कुणावर तरी जीव लावून बसलीये वाटतं. मग एक दिवस तिनंच मुद्दाम विषय काढला.
‘शर्वरी, तुझ्या गालावरची लाली जरा जास्तच वाढलीये हं…..‘
‘आईऽऽऽऽ तू चिडवू नकोस हं!
‘शर्वरी, आपल्या मैत्रिणीपासून लपवणार मनातलं…..?’
‘आई…. अगं कुठं काय….. मी काय लपवतेय तुझ्याकडून….‘
‘तू ही जी नजर चुकवते आहेस ना….. त्यावरुनच कळतंय… काहीतरी नक्कीच आहे. कोण आहे तो …..?’
‘आई, अगं खरंच सांगतेय…….कोणी नाहीये गं….‘
‘जाऊ दे….. नको सांगूस….. ‘
‘ए आई, अशी रागवू नकोस ना गं…….! तुला सगळं सांगते. अगं आमच्या क्लासला ते उन्मेष सर आले होते ना…..(मोठ्ठा पॉझ)‘
‘हं तर मग त्यांचं काय…….!‘
‘आईऽऽऽऽ आता सगळंच सांगायचं का गं…..?’
‘अच्छा…..म्हणजे त्या उन्मेषनं लेक्चर घेता घेता माझ्या शर्वरीचं काळीज पण हिरावून घेतलेलं दिसतंय‘
‘आई प्लीज थट्टा नको हं. अगं त्यांना तर मी कोण हे ही माहीत नाहीये. पण आई….. मला मात्र तो खूपच आवडलाय.‘
‘हं……. म्हणजे तुझं उगाचंच झुरणं सुरु आहे तर….!‘
‘आई… तू एकदा बघ त्याला आणि मग सांग मी चुकतेय का. आज येतेस का मला घ्यायला…….आज उन्मेषचं लेक्चर आहे शेवटचं.‘
‘आज…… बरं….. पण शर्वरी, तुला एक सांगते…..फ़क्त दिसण्यावरुन तू कोणाची परिक्षा करु नकोस. अगदी लगेच निर्णय घेऊन मोकळी होऊ नकोस. नाहीतर पुढे पश्चातापाची वेळ येईल. मलाही सगळी माहिती काढायला वेळ दे.‘
‘पण आज तर तू येणार आहेस ना….?’

आईकडून होकार मिळाल्यावर तर शर्वरी फ़ारच खूष झाली. दिवस फ़ारच लांबतोय असं वाटत होतं. शेवटी उन्मेष सरांच्या (नको….सर नको…..नुसतं उन्मेष जास्त चांगलं वाटतंय ) लेक्चरची वेळ झाली. पण आज मात्र त्यात तिचं अजिबात लक्ष नव्हतं. कधी एकदा लेक्चर संपतं आणि आई उन्मेषला बघते असं तिला झालं होतं. यथावकाश लेक्चर संपलं. सगळे जण सोबतच बाहेर पडले. शर्वरी मात्र आईला शोधत होती. आई दिसल्याबरोबर लगेचच ती आईकडे धावली. निशीची नजर सुद्धा ‘कोण असेल तो उन्मेष‘ हेच शोधत होती. पण तिला शोधायची जरुरच पडली नाही. शर्वरी तिच्या जवळ पोचणार एवढ्यात एक छानसा देखणा मुलगा तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
’ सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री…….. निशिगंधा….?’निशी हसली. म्हणाली, ‘सुप्रसिद्ध नाही हं….. !‘
‘पण आपण इकडे कुठे……. इतक्या अरसिक जागी…..?’
तेवढ्यात शर्वरी तिथे पोचलीच.
‘आई…….हे…..हा….हे उन्मेष सर !‘
‘शर्वरी, अगं हे काय……. सर वगैरे फ़क्त लेक्चरला…….इथे मी फ़क्त उन्मेष‘म्हणजे…….. ह्याला माझं नावही माहित आहे…….! शर्वरीला अगदी मनातून आनंद झाला.
‘तर तू आहेस तो उन्मेष…….हं…..! मी शर्वरीची आई ‘
‘अरे वा…..! म्हणजे शर्वरी तुझ्यामुळे मला माझ्या आवडत्या लेखिकेला भेटायला मिळालं. निशी जी….. मला तुमचं सगळंच लिखाण खूप आवडतं. मी तुमचा सगळ्यात मोठा फ़ॅन आहे असं म्हटलं तरी चालेल ‘
‘अरे फ़ॅन वगैरे असण्याइतकी मी मोठी नाहीये रे‘
‘हा मात्र तुमचा विनय आहे हं…..! शर्वरी, निशीजी तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला कॉफ़ी ऑफ़र करु शकतो का?’
हे मात्र अतीच होतंय….आज आई उन्मेषला बघायला येते काय……..आणि उन्मेष तिचा फ़ॅन निघतो काय…….. आणि आता चक्क कॉफ़ीची ऑफ़र…..! सगळंच स्वप्नवत ! आता आई काय म्हणते ह्याची ती वाट बघायला लागली.
‘अरे…..तू पण कमालच करतोस…..! ह्याची काहीच गरज नाही‘
‘प्लीज निशीजी……..नाही म्हणू नका…..आपल्या चाहत्याचा हट्ट समजा हवं तर…….शर्वरी, तू तरी सांग ना तुझ्या आईला…‘
‘ओके ओके…….! चल जाऊया कॉफ़ी घ्यायला….‘

कॉफ़ी शॉपमधे गप्पा मस्तच रंगल्या. हळुहळु भेटी वाढायला लागल्या……. गप्पांचे रंगही घरगुती आणि अनौपचारिक व्हायला लागले. उन्मेष हा एक अनाथ मुलगा होता. स्वत:च्या हुशारीच्या जोरावर तो इथपर्यंत पोचला होता. आता तो इंडस्ट्रीयल कन्सल्टन्ट म्हणून काम करत होता. फ़ारच लाघवी व्यक्तिमत्व होतं त्याचं. निशीला सुद्धा उन्मेष अगदी मनापासून आवडला आपला जावई म्हणून. मनातल्या मनात तिला आपल्या लेकीच्या आवडीवर तिनं शिक्कामोर्तबही करुन टाकलं.

क्रमश:

Jhuluuk
Wednesday, February 28, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान चालु आहे कथा..
बहुतेक उन्मेषला निशी लेखिका म्हणुन आवडते, याचा complex शर्वरीला झाला असावा.. त्याचाच 'चीड' म्हणुन पहिल्या पोस्टमध्ये उल्लेख आहे?
माझा आपला एक अंदाज..


Maku
Wednesday, February 28, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो Jhuluuk राव कशाला सांगता तुम्ही अंदाज. जयवी जरी अंदाज खरा असला तरी म्हनु नकोस आई ग ग तुम्हाला कसे कळाले .

Supermom
Wednesday, February 28, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयू,
अग कुठे गुप्त झालीस? आम्ही वाट बघतोय पुढच्या भागाची.


Jayavi
Thursday, March 01, 2007 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आले आले.... ही बघा पुढची कथा :-)

Jayavi
Thursday, March 01, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्मेष आणि शर्वरी सुद्धा एकमेकांच्या जवळ येत होते. उन्मेषला नाटकं, काव्यवाचन, गाण्याचे कार्यक्रम खूप आवडायचे. तो अशा कार्यक्रमाची तिकिटं अगदी जातीनं घेऊन यायचा. शर्वरी सुद्धा आवडायचं ते. निशीचा तर तोच प्रांत होता. निशीला वाटायचं..... की अशा कार्यक्रमांना त्या दोघांनी जावं...त्यांच्यामधे उगाच आपण कशाला.....! म्हणून ती काही ना काही कारणं सांगून जाणं टाळायची. पण उन्मेष मात्र हट्ट धरायचा....... की निशीनं यायलाच हवं म्हणून. शर्वरीला सुद्धा मनातून बरं वाटायचं की आपल्या आईचा तो इतका विचार करतो म्हणून. पण पुढे पुढे सगळीकडे आईला नेण्याचा उन्मेषचा हट्ट तिला नको वाटायला लागला. कारण प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर तो निशीसोबत त्यावर चर्चा करायचा. सुरवातीला ती सुद्धा अगदी हिरीरीनं त्यात भाग घ्यायची. पण नंतर तिला ते टॉपिक्स बोअर व्हायला लागले. तिला वाटायचं उन्मेषसोबत आपण मस्तपैकी बागडावं.... बाईकवर दोघांनीच लॉंग ड्राइव्हला जावं. मस्त पावसात भिजावं.... फक्त दोघांनी !

पण प्रत्येक वेळी बाहेर कुठे जायचा कार्यक्रम ठरला की उन्मेष निशीला पण यायचा आग्रह करायचा. सुरवातीला आई नाही म्हणायची..... पण आजकाल तिलाही आवडायला लागलंय हे! का आम्हाला ती मोकळं फ़िरु देत नाही....! आईबद्दलचे तिचे हे विचार मनात नाही म्हटलं तरी डोकवायला लागले होते. आई तिची अगदी जवळची मैत्रिण होती. पण इथे मात्र आईची जवळीक आता तिला नकोशी वाटायला लागली. उन्मेषनी कुठला कार्यक्रम ठरवला तर ती परस्परच आईचं जमणार नाही असं सांगायला लागली. पण मग घरी आल्यावर उन्मेष पूर्ण वेळ निशीसोबतच घालवायचा. शर्वरी मनातून खट्टू व्हायची.

उन्मेष आणि आपल्यामधला आईचा वावर तिला जाचक व्हायला लागला. मग आईवर विनाकारण तिची चिडचिड वाढायला लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरुन तिचे आईशी खटके उडायला लागले. निशीला मात्र कळतंच नव्हतं.......ही अशी का वागतेय.....! उन्मेष आल्यानंतरचा तिचा खुललेला चेहरा........आपण तिथे गेल्यावर बदलतो.......हे तिच्याही लक्षात यायला लागलं. मग ती ही दोघांसोबत जाणं शक्यतोवर टाळायला लागली. दोघींमधला संवाद मात्र आता पहिलेसारखा मोकळा राहिला नव्हता. शिवाय उन्मेषचा विषय शर्वरीनं काढणंच बंद केलं होतं. उन्मेष आला की आईशी त्याची भेट व्हायला नको म्हणून तिची चाललेली धडपड बघून निशीला खूप वाईट वाटायचं. उन्मेष मात्र ह्या सगळ्यात अनभिज्ञ होता. त्याला शर्वरीच्या मनातल्या वादळाची काहीच कल्पना नव्हती.

एक दिवस उन्मेष आला तो एका वेगळ्याच मूडमधे....! आल्या आल्या त्यानं शर्वरीला फ़र्मान सोडलं..... 'शर्वरी........आईला लग्गेच बोलाव!'
'अरे तिला कशाला.....ती तिच्या कामात असेल रे.....'
'काम बगैरे सगळं सोड.......आधी आईला बोलाव........ नाहीतर मी जातो तिला बोलवायला आत.......'
'नको.....मी बोलावते आईला '
'आई....... तुला उन्मेष बोलावतोय....बाहेर ये' लेकीच्या आवाजातली नाराजी निशीला लगेच कळली. पण उन्मेषला नाराज करायला नको म्हणून ती बाहेर आली.
'अरे काय गोंधळ घातला आहेस....... कशासाठी बोलावणं हे.....?'
'आई....... मी तुमच्या लेकीला मागणी घालायला आलोय'
उन्मेषच्या त्या वाक्यानं शर्वरीचा चेहरा एकदम फ़ुलला..... तिच्या गालावरचे फ़ुललेले गुलाब बघून निशी सुद्धा खूप खुष झाली.
'काय.......उन्मेष अरे मी किती दिवसांपासून ह्या शब्दांची वाट बघतेय रे....! खूप वाट बघायला लावलीस हं तू.....काय शर्वरी....तुझी तयारी आहे ना.......?'
आईच्या त्या वाक्याने शर्वरी लाजली.......'काय गं तू...' असं म्हणत ती आईच्या कुशीत शिरली. इतक्या दिवसांचा दुरावा अगदी क्षणात नाहीसा झाला. इतके दिवस खुपत असलेलं आईचं अस्तित्व तिला अचानक हवंहवंसं वाटायला लागलं.

क्रमश:


Bsk
Thursday, March 01, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

haay jayavi.. katha lihiliy chaan.. pan shevati jarra gundaLalyasarkhi vatli.. thoda vadhvayla hava hota.. pan tumchi shaily khup mast ahe!

Princess
Thursday, March 01, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु... मस्त चाललय ग. लवकर लवकर लिही. मजा येतेय.

अहो bsk असे काय करताय? क्रमश: लिहिलय तिने. समाप्त नाही काही:-)


Bsk
Thursday, March 01, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oops.... thanks princess! mala kaa vatla kathaa sampliy, kunas thauk! :-(

Jhuluuk
Thursday, March 01, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय जयवी, छान आली पुढची पोस्ट.. उरलेली पण लवकर टाका हं :-)
आणि इशिका, मी आपला माझा अंदाज वर्तवला.. जो इथपर्यंतच होता, आता बघु पुढे काय होतेय :-)


Jayavi
Friday, March 02, 2007 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यादिवशीनंतर सगळं वातावरणच बदललं. लग्नाची तयारी सुरु झाली. खरेदी, पत्रिका ह्या सगळ्याच बाबतीत उन्मेष निशीचं मत घ्यायचा. पत्रिकेतले शब्द सुद्धा निशीचेच असायला हवेत हा त्याचा आग्रह. संसाराच्या स्वप्नामधे रमलेली शर्वरी पण सगळं मनातलं किल्मिष काढून मोकळी हसायला लागली होती. अगदी धडाक्यात लग्न झालं. निशीच्या डोळ्यातल्या अश्रूंना मात्र खंड नव्हता. निशांत गेल्या नंतर शर्वरीच तिच्या आयुष्याचा आधार होती.....जगण्याला कारण होती. आता तीच सासरी निघाली होती. पण उन्मेष सारखा इतका समंजस जोडीदार तिला मिळाला होता म्हणून समाधान सुद्धा होतं.

लग्न झाल्यावर फ़िरायला जायचा बेत जेव्हा ठरवला गेला तेव्हा उन्मेष म्हणाला.....
'आपण आईला पण घेऊन जाऊया'.
झालं....... शर्वरीच्या सगळ्या आनंदावर विरजण पडलं.
'उन्मेष.....अरे हनीमूनला निघालोय ना आपण..........तिथे आई कशाला...?'
'अगं.... आता ती अगदीच एकटी पडली असेल गं.... तुझे पप्पा गेल्यानंतर आईनं तुलाच आपलं सर्वस्व मानलं....... आता तुला जेव्हा तिच्या एकटेपणात थोडी साथ करायची वेळ आलीये.....तेव्हा तू नाही का म्हणते आहेस ? आपण दोघं तर आयुष्यभर एकत्र आहोतच. आपण पुन्हा कितीतरी वेळा असे फ़िरायला जाऊ शकू..... पण आईला सध्या एकटं सोडणं मला तरी बरोबर वाटत नाहीये'
'ठीक आहे...तुझ्या मनात जे असेल तेच तू करणार.....!'
'शर्वरी अगं उगाच कशाला इश्यू करतेस.......ती तुझीच आई आहे ना.....? मला असं वाटतं की आज तू आईकडे जा.......सामान बांधायला तिला सुद्धा मदत होईल. मी संध्याकाळी आईकडेच येतो. आपण उद्या तिकडूनच निघूया.'

शर्वरी आईकडे आली तेव्हा बघितलं तर आईला थोडं बरं नव्हतं. पण शर्वरीला आलेलं बघून आईला काय करु आणि काय नको असं झालं. पण तिचा उतरलेला चेहरा बघून मात्र निशीला काळजी वाटली.
'अगं...तुझा चेहरा असा काय दिसतो आहे.....? नवी नवरी ना गं तू..... मग अशी काय.....? शिवाय आता काय बाई.......एक जोडी मस्तपैकी फ़िरायला जाणार....... मजा आहे बुवा.....!!' शर्वरीचा मूड थोडा खुलवायचा प्रयत्न करत निशी बोलली.

इतका वेळ धुमसत असलेली सगळी आग एकदम बाहेर पडली.....सगळी साठलेली मळमळ बाहेर पडली. शर्वरी आईला नाही नाही ते बोलली, आरोप केले.
'आपल्या मुलीच्या संसारात नको तितकी लुडबूड करतेस.... उन्मेषचं लक्ष वेधून घ्यायला काय वाटेल ते करतेस....... कधी मोकळा श्वास घेऊ देणार आहेस आम्हा दोघांना .............?'
शर्वरीचं एकेक वाक्य निशीचं काळीज चिरत होतं. आपल्या लेकीचं आपल्या बद्दलचं इतकं भयंकर असलेलं मत ऐकून तिला धक्काच बसला. ती आतून कोसळली. पण शर्वरीचं तिकडे लक्षच नव्हतं. तिची बडबड सुरुच होती. इतके दिवसाचा राग अतिशय विचित्र तर्‍हेने बाहेर पडला होता. निशीला हा धक्का सहनच झाला नाही. आपल्या लाडक्या कोकराला आपण इतके नकोसे झालो आहोत........ इतका द्वेष आपल्याबद्दल.....! नाही..... नाही..... हे ऐकण्याच्या आधीच माझे डोळे बंद का झाले नाहीत? आता आयुष्याला अर्थच काय.....?
तिकडे कोण दिसतोय तो.....निशांत....... आपल्याला जवळ बोलावतोय.......!

शर्वरीला जेव्हा दिसलं की आई कोसळतेय...तेव्हा मात्र ती घाबरली.....आपण हे काय करुन बसलो.....'आई.....आई....बोल ना गं........मी चुकले गं.... माझ्या चुकीची मला येवढी मोठी शिक्षा देऊ नकोस गं..... आईऽऽऽऽऽऽऽ ! '
आईचा काहीच प्रतिसाद येत नाही हे बघून ती रडायला लागली........रडत रडतच तिनं उन्मेषला फ़ोन केला....! धावत पळत उन्मेष पोचला. ऍम्ब्युलन्स धडाडत आली..... शर्वरीला काय होतंय काहीच कळत नव्हतं.......ती सारखी रडत होती.... तिला पश्चाताप होत होता.... आता प्रायश्चित्त घ्यायलाही वेळ नव्हता. ती देवाकडे एकच प्रार्थना करत होती...........देवा मला आईची क्षमा तरी मागायला मिळू दे ! पण नाही........ देवाला तिचा गुन्हा अजिबात मान्य नव्हता. त्यानं शर्वरीला माफ़ी मागायची संधीच मिळू दिली नाही. आता आयुष्यभर ती आपल्या चुकीचं प्रायश्चित्त भोगणार होती.

आपल्या गुन्ह्याचं ओझं जेव्हा तिला पेलवेनासं झालं तेव्हा उन्मेषजवळ जेव्हा तिनं आपल्या चुकीची कबुली दिली.
'अगं हे काय करुन बसलीस तू शर्वरी.......? अगं मला सांगायचंस तरी तुझ्या मनात काय चाललंय ते.....! आई वडीलांचं महत्व तू माझ्यासारख्या अनाथ मुलाला विचार. मला जे सुख मिळालं नाही ते मी तुझ्या आईमधे शोधत होतो आणि तिनं सुद्धा मला अगदी भरभरुन आईचं प्रेम दिलं. पण आता मात्र आपण दोघंही अनाथ झालोत गं ! आता कितीही पश्चाताप करुनही आई परत येणार नाहीये....... ! आता आपल्या दोघांना एकच शिक्षा.... पूर्ण आयुष्यभर तडफ़डायचं.....!

शर्वरीला बोलायला काही शब्दच उरले नाहीत. तिच्या मनात एकच आवाज टाहो फ़ोडत होता, 'आई कुणा म्हणू मी.........आई कुणा म्हणू मी.......? '


समाप्त.


Psg
Friday, March 02, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh!
हंऽऽऽऽ

छान जया!


Princess
Friday, March 02, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु... too good काय धक्का दिलयेस ग शेवटी :-(

Sanghamitra
Friday, March 02, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! जया सही लिहीलीयस. खूप वाईट वाटलं शेवट वाचून.

Jhuluuk
Friday, March 02, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sad....
अजुन काय बोलायचे...
:-(


Manogat
Friday, March 02, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान :-)
छोटि अणी सुरेख,


Zakasrao
Friday, March 02, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया छान गोष्ट होती. शेवट मात्र sad .

Swaatee_ambole
Friday, March 02, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, सुंदर!! सुंदर!!! सुंदरच!!!! :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators