Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 17, 2006 « Previous Next »

Kshipra
Monday, October 16, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी, अंदाजे एक वर्षाने कविता पोस्ट करते आहे.

फुलपाखरू

लोकान्ताचा मार्ग आपला नाही
हे कळल्यावर
बांधून घेतला आहे
एकान्ताचा कोष
मी माझ्याभवती !
माझ्या ताकदीचा अंदाज आला की
यथावकाश
येईन स्वबळावर कोष फोडून बाहेर,
स्वत:च्या अंगभूत सौंदर्याने झळाळणारं,
दोषांचे काळे ठिपके सहजतेने स्वीकार करून
अंगावर मिरवणारं
एक बंधमुक्त, स्वच्छंद फुलपाखरू म्हणून !



Bhramar_vihar
Tuesday, October 17, 2006 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा वैभव, श्यामली! क्षिप्रा, कोष फोडुन आलीस म्हणायचं!

Meenu
Tuesday, October 17, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तन-मनाच्या शीवेशी, झांजझांज येईवेरी
उन्मनीशी रासक्रीडा, खेळतेस का? >> याचा अर्थ नाही गं कळला शलाका .. उन्मनी म्हणजे काय ..

पण फारच गोड आहे ही कविता ..? वाचताना अगदी जाणवतो गोडवा .. नाव दे की त्या कवितेला ...

क्षिप्रा पुनरागमनाला साजेशी सुंदर कविता ..
दोषांचे काळे ठिपके सहजतेने स्वीकार करून
अंगावर मिरवणारं .... हे फुलपाखराचं वर्णन सुंदरच गं

श्यामली पुस्तक मस्तच .. मी पण दिनेश प्रमाणे वाट पाहते गं पुस्तकाच्या नावाची ..


Devdattag
Tuesday, October 17, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु.. माझ्या माहितीनुसार.. उन्मनी ही एक मनाची अवस्था मानली जाते.. ध्यानात गेल्यावर मनाला कुठल्याही गोष्टीच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही.. ती अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था.. बुद्धाच्या शुन्यता वादात ह्या संकल्पनेला महत्वाचे स्थान आहे..

Daad
Tuesday, October 17, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु
हा एक भक्तीमार्गावरला प्रवास आहे... त्यात मीरेनं केलेली भक्ती इथे अभिप्रेत आहे. उन्मनी ही ध्यानधारणेतली मनाची एक अवस्था आहे. नाव तूच सुचव, आता!!

क्षिप्रा छानच
'लोकान्ताचा मार्ग आपला नाही हे कळल्यावर
बांधून घेतला आहे एकान्ताचा कोष ...
मी माझ्याभवती ! '

वैभवची 'माणसे' वाचल्यावर सुचलेलं हे मुक्तचिंतन.... अगदी वेगळीच दिशा धरून... मला हे असं मुक्त लिहायची सवय नाहीये... पण प्रयत्न करते आहे!

आपण आणि आपला!

आपण आपल्याशीच बोलू पाहतो तेव्हा....
शब्द नसतात त्या संभाषणात
नुसतेच अर्थ असतात...
खरं किंवा खोटं दोन्ही खुपतातच
बिंब नाही अन प्रतिबिंबही नाही
'तो मीच.... मीच तो' पटवायचं
आपण आपल्याशीच बोलतो तेव्हा....

आपण आपल्याला भेटू बघतो तेव्हा
हा सोहळा सत्याच्या उजेडातच व्हायचा
म्हणुनच जरा आत पाहिलं तर
किर्र अंध:कारच दिसतो
कारण सत्याच्या उजेडाने डोळे दिपतात
आपले आणि त्या आपल्याचेही!
हरवू मात्र द्यायचं नाही कुणिच कुणाला
आपण आपल्याला भेटू बघतो तेव्हा....

आपला आपल्याशी संवादू लागतो तेव्हा....
बोलणं गौण होतं आणि उरीचा कल्लोळ मौन होतो
जेव्हा अर्थ शब्दांना लुटतात....
आणि रिक्त होतो आपण...
हे त्या आपल्याचे आपल्यावरले कर्जं
फेडलेच पाहिजे...
आपला आपल्याशी संवादू लागतो तेव्हा....

-- शलाका



Jayavi
Tuesday, October 17, 2006 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा....... वा काय पुनरागमन आहे! खूप खूप आवडलं तुझं स्वच्छंद फुलपाखरु!

Sarang23
Tuesday, October 17, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा, सुरेख आहे फुलपाखरू!

Sarang23
Tuesday, October 17, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

       साज

सूर नाही साज नाही काय गावे?
मी तुला आता नव्याने काय द्यावे?

ऐकते तू जे कधी ना बोललो मी :
सांग आता काय मी याला म्हणावे?

चाहुलींचा माग मी सोडून देता,
तू पुन्हा का पैंजणांना वाजवावे?

ही कटाक्षांना तुझ्या माझी विनंती;
काळजाचा वेध घेणे थांबवावे!

एकट्याने जागण्याचा छंद जडता,
चांदण्या रात्री मला भेटून जावे!

सारंग


Mrudgandha6
Tuesday, October 17, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शलाका,.......:-)काय केलेस हे???

हं...काय बोलू ग..माझ्या अगदी जीव्हाळ्याचा विषय लिहीलास..मीरा आणि तो शामसुंदर...आणि गोपींशी त्या काळ्याची रासक्रिडा.. हं...
अप्रतीम आहे..खुपच सुरेख लिहीलं आहेस.. अगदी त्या उन्मनी अवस्थेचेचा अनुभव आला थोडा तुझी कविता वाचताना... मला आता बासरी ऐकू येवू लागलीय.. आता मला काही सुचत नाहीय...पुन्हा या जगात यायला वेळ लागेल..
माफ़ कर,आता तुझी दुसरी कविता नंतर वाचेन.. अभिप्राय ही कसाबसाच लिहीतेय..:-)

क्षिप्रा,
तरी बरे..तुझी कविता मी शलाकाच्या "त्या" कवितेच्या आधीच वाचली..
अप्रतीम आहे..पुनरागमन छानच केलेस..कोष फ़ोडून... असले सुंदर फ़ुलपाखरु कुणाला आवडणार नाही..??:-)


Mrudgandha6
Tuesday, October 17, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका,हं परत परत वाचतेय ग कविता..आता उतरुनच घेते वहित..:-)
दुसरी पण छानच.. पण समाधीसुखापुढे स्वर्गसुख फ़िकं वाटतं, :-)

सारंग..
सूर नाही साज नाही काय गावे?
मी तुला आता नव्याने काय द्यावे?

व्वा!!



Me_anand
Tuesday, October 17, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षिप्रा व्वा!!! क्या बात है..!!!
मला एक सांग फुलपाखरू तू की तुझी कविता... का दोघिही?
तुझी कविता एकान्त सोडून अगदी स्वच्छंद (मुक्तछंद....) बाहेर पडली आहे. :-)


Me_anand
Tuesday, October 17, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजून घेतो कुणी भाकरी
आज इथे या सरणावरती...
सांडून जातो अश्रू कोणी
आज इथे या सरणावरती...
सरणावरच्या ज्वाळेमध्ये जळून गेली,
आयुष्याची मळकी चिंधी.
अशाच चिंध्या किती जळाल्या
सत्तांधांच्या वणव्यामध्ये,
कणाकणाने; मुकेपणाने;

कसे कुणाच्या मनीं न आले?
जोडून द्यावी चिंधी चिंधी,
महावस्त्र आणि एक विणावे...

झाकून घेण्या
इथे नग्नता दारिद्रयाची;

ठिगळ करावे
फाटून गेल्या आभाळाला,
वरचे वरती झेलून घेण्या.
फिरून धरण्या शितल छाया;

जखमेवरची पट्टी व्हावे
स्वच्छ करावी जुनाट, फुटकी, ओंगळ गळवे;

शुद्ध करावे, गंगाजलाने
न्यायाच्या अन समतेच्या....

आधी आमच्या मनात यावे,
जोडून द्यावी चिंधी चिंधी
महावस्त्रा अन एक विणावे
नव्या युगाचे; नव्या जगाचे;



Mrudgandha6
Tuesday, October 17, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



उघड तुझ्या गाभार्‍याचे दार
घमघमूदे तुझे दिव्य अत्तर
ज्याने चंदनासम, मज गंधीत केले होते!!

हरपूदेत माझे भान
बरसूदे तुझी सुरेल तान
कितिदा जिने मजला, दिवाणे केले होते!!

ऐक माझी साद ही आर्त
भिजूदे माझे ओठ तृषार्त
कधी ज्यांनी तव ओठांचे, चांदणे प्याले होते!!

ओसंडूदे आता हर्ष
होऊदे तुझा परिसस्पर्श
कधी ज्याने मज, शुद्ध कांचन केले होते!!

ढळू दे हृदयीचा कानन
होऊदे तुझे दिव्य दर्शन
कधी ज्याने मज, सुर्यासम उजळले होते..

उघड तुझ्या गाभार्‍याचे दार..





Bee
Tuesday, October 17, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परजून धारदार झाली
रानगवताची पोपटी पात,
तट्तटल्या काचोळीची
नकळत सैलावली गाठ

देठावर झुलणार्‍या फ़ुलांवर
फ़ुलपाखरांचा यौवन भार,
माघाच्या लख्ख आरशात
मोहरल्या रानजाईचा श्रुंगार

स्पर्शपातीचा हळुच उमटला
तरण्या कांतीवर ओरखडा,
रंगारंगात पाकळ्या गळल्या
उरला मधुकोष तळातला..


Shyamli
Tuesday, October 17, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी.....
शलाका
दिनेशदा, मीनु.....
एक पुस्तक असं नाही, हा बर्‍याच वेळा येणारा अनुभव आहे

सारंग ते शुभेच्छांबरोबरच्या आभाराच काय झालं?


Chinnu
Tuesday, October 17, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MG अगदी दिव्य भक्ती रसात ओथंबुन गेलिये तुझी कविता. छान ग.
क्षिप्रा, आनंद मस्तच.
बी, सगळ ठीक आहे ना! रानजाईचा शृंगार =shRu.ngaar , फ़ार सुंदर!
आणि उन्मन म्हणजे अंतर्मन किंवा मनातले मन. ध्यानस्थ असतांनाच उन्मन उलगडते, म्हणुनच उन्मनाचा संबंध ध्यानधारणेशी असतो. cbdg!


Lopamudraa
Tuesday, October 17, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ.. अगदी सुंदर.. !!! आनंद, क्षिप्रा शलाका... श्यामली..,सारन्ग.. एकसे बढकर एक..!!!

Kedarjoshi
Tuesday, October 17, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नामे त्याच्या गंधाळले, उमळले श्वास कळे
वेचुनिया सारे, हार गुंफतेस का?>>>>>

शलाका,
सुंदर, अप्रतिम.


Swaatee_ambole
Tuesday, October 17, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, दोन दिवसांत बरीच बरसात झाली की इथे. :-)

मीनू, ' समई'तली कल्पना छान आहे. विझण्याची शक्ती.. रवींद्रनाथांची कविता आहे अशी, त्याची आठवण झाली.

श्यामली, असं होतं खरंच.

शलाका, सुंदर आहे तुझी कविता. भवसागरा सामोरी, साधनेच्या सौधावर.. तनमनाच्या शिवेशी.. कल्पना पण छान आहेत आणि तसेच शब्ददेखील.

सारंग, साज चांगली आहे.

मृद्गंधा, ' ढळू दे ह्रदयीचा कानन' म्हणजे काय?


Avikumar
Tuesday, October 17, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाहुलींचा माग मी सोडून देता,
तू पुन्हा का पैंजणांना वाजवावे?

वाह, वाह सारंग
एकदम मस्त रे. काय लिहिले आहेस, एकदम झक्कास! आवडली आपल्याला 'साज' एकदम. लिहीत रहा रे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators