जिनसांची यादी कृतीत दिली आहे.
कोलंबियन एक्स्चेंजच्या कृपेनं बटाटा हे अतिशय उपयुक्त पीक जगभर पसरलं. भारतात ते पोर्तुगिजांनी आणलं, असं आपण मानतो, पण त्यासाठी भरभक्कम पुरावा नाही. सतराव्या शतकात बटाट्याची लागवड सुरतेस इंग्रजांच्या बागांमध्ये होत होती. तिथून तो गोव्यात गेला असावा, कारण तिथे तो सुरतेच्या नावानं ओळखला जात होता. एक नक्की की, भारतात बटाट्याचा प्रसार इंग्रजांनी केला.
या बटाट्याचा सर्वांत महत्त्वाचा आणि उपयुक्त इत्यादी पदार्थ म्हणजे बटाटावडा / बटाटेवडा.
बटाट्याच्या भाजीची कृती रामचंद्र सखाराम गुप्त्यांच्या सूपशास्त्रात आहे. मात्र त्यात बटाटावडा नाही.
बटाटावडा या नावानं पहिली कृती लक्ष्मीबाई धुरंधर यांच्या गृहिणीमित्रात सापडते.
ती पुढीलप्रमाणे -
चण्याचें पिठात मीठ, जिरें, मोहन घालून नरम कणकेसारखें भिजवावे. उकडलेले बटाट्यांच्या चुर्यात थोडें आलें, लसूण, मीठ, मिरची, कोथिंबीर, चिमूट दालचिनी, लिंबाचा रस घालून चुलीवर थोडे तुपांत परतून घ्यावें. मग चण्याचे पिठाचे वाटे वळून त्यांत हे पुरण भरून वाटोळें गोळें करून तुपांत तळावे.
आपण हल्ली करतो तशी ही कृती नव्हे.
तशी कृती प्रभुकुमारी यांनी मासिक मनोरंजनात लिहिली.
ती येणेप्रमाणे -
अर्धाशेर बटाटे घेऊन ते वाफावे. नंतर ते सोलून त्यांत चहाचा चमचाभर जिरें व बेताचेच मीठ घालून पाट्यावर वाटावे. मग त्या गोळ्यांत नारळाच्या एका वाटीचा कीस, ओल्या मिरच्या व कोथिंबीर इतके घालून तो गोळा मळावा. नंतर त्याच्या लहानलहान गोळ्या करून पानावर वळाव्या, व चण्याचें पीठ भज्यांच्या पिठाप्रमाणें कालवून त्यांत बुडवून भरतेलांत तळावें, ह्मणजे वडे चांगले फुगतात.
१९१३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात ही कृती प्रसिद्ध झाली. गृहिणीमित्राची पहिली आवृत्ती १९१० सालची आहे.
प्रभुकुमारी गोरेगावात राहत. त्यांनी लेखनासाठी घेतलेल्या नावानुसार त्या पाठारे प्रभू समाजाच्या होत्या.
लक्ष्मीबाई धुरंधरही या समाजाच्या होत्या. आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या लिहितात - ’कोणतेही पदार्थ करणें झाल्यास चांगल्या साहित्याची आवश्यकता आहें असें म्हटलेंच आहे. तरी तें साहित्य तयार करण्यांतही थोडीशी कुशलता खर्च केली पाहिजे. उदाहरणार्थ, बटाट्यांचा काहीं पदार्थ करावयाचा आहे तर ते सोलले पाहिजेत व कच्चे बटाटे सोलणें म्हणजे एक कुशलतेचेंच काम होय. साल पातळ निघावें, बटाट्यांचा नाश होऊं नये व सालही सोलतांना तुटूं नये ही सोलण्याची कुशलता मुंबईच्या प्रभु लोकांतच फार आढळून येते. इतर लोक बटाटे वाफून नंतर त्यांचें साल काढतात. ह्यांत दोन तर्हेचा तोटा होतो. एक तर पाण्यामध्यें बटाट्याचा स्वाद निघून जातो व दुसरें, शिजविण्यास वेळ व लाकडें लागतात तीं निराळींच. ह्याकरितां बटाटे, आंबे, केसरा वगैरे सोलण्यास प्रत्येक गृहिणीनें अवश्य शिकावें हें बरें.'
असो.
कोणत्याही पद्धतीनं का होईना, बटाटेवडे करा आणि खा.
प्रस्तावनेत साले काढताना
प्रस्तावनेत साले काढताना वाफवू नये लिहुन कृतीत वाफवा सांगितलंय?? आणि आलं लसूण न घालता नारळाचा चव! जैन वडापाव दिसतोय. मुंबईचे जैन बटाटे खातात.
छान कृती पण नेहेमीच्या पद्धातीनेच करेन आणि खाईन.
मस्त आहे एकदम. पहिल्या कृतीत
मस्त आहे एकदम. पहिल्या कृतीत चक्क पराठ्यासारखे उंडे तळलेत, जाड नसेल का होत आवरण! पफ पेस्ट्रीसारखा प्रकार वाटला.
शिवाय आधी शिजवून नंतर साल काढल्याने बटाट्याची चव जाते ही टीप नवीन आहे.
दुसऱ्या कृतीतली भाषा रंजक आहे. करणे आहे, कुशलता प्रभु लोकांमधेच, बटाट्याचा नाश वगैरे.
भारी रेसिपी आहे. आणि तसे फार
भारी रेसिपी आहे. आणि तसे फार बदल दिसत नाहीत आताच्या रेसीपी आणि तेव्हाच्या. फक्त दोन्ही एकत्र करून वापरलेल्या वाटतात.
पाठारे प्रभूंच्या रेसीपी छापील राहिलेल्या आहेत त्याचे कारण त्यांचे असलेले पुढारले पण आणि सुशिक्षितता असू शकते. बाकी महाराष्ट्रात १९१० मध्ये किती साक्षरता होती काय माहिती.
भाषा छान आहे. रेसिपी मात्र
भाषा छान आहे. रेसिपी मात्र आत्ताचीच जास्त आवडते मला
बटाट्यांचा नाश >>> हे विशेष आवडलंय.
मस्त रोचक.
मस्त रोचक.
बटाटेवडे मात्र सध्याचेच आवडतात.
लक्ष्मीबाई धुरंधर यांचं रेसिपी पुस्तक सातवीत असताना बडोद्याला ब्राह्मणसभेच्या लायब्ररीत वाचल्याचं आठवतंय. त्यांचं का दुसरं कोणाचे, ह्याच असाव्यात असं वाटतंय, तोळा वगैरे प्रमाण होतं, इंटरेस्टिंग होतं.
बटाटे मरतात आणि लसूण कोथिंबीर
बटाटे मरतात आणि लसूण कोथिंबीर मिरच्या भाव खाऊन जातात.
१९१० साली किसणी वापरत होते
१९१० साली किसणी वापरत होते का ?
जोपर्यंत हाताने बटाटा सोलता येत नाही तोपर्यंत २३ पेक्षा जास्त बीएमआय असल्यांनी बटाटेवडा खाऊ नये असा संदर्भ जुन्या मासिकातून सापडायला हवा.
छान लेख. रोचक माहिती.
छान लेख. रोचक माहिती.
भाषा आवडली.
बटाटे वाफवून घेतल्यावर पाण्यात स्वाद निघून कसा जाईल? आणि सोलून वाफवले तर जाणार नाही का?
रोचक.
रोचक.
तुपात तळलेले बटाटेवडे काही केल्या imagine होत नाही आहेत.
लक्ष्मीबाई धुरांदरांचे
लक्ष्मीबाई धुरांदरांचे गृहिणीमित्र पुस्तक आहे घरात कुठेतरी.
माझा भर त्यांच्या नॉन-व्हेज रेसिपींवर असल्याने बटाट्याकडे दुर्लक्ष झाले असावे. त्यामुळे ही पाकृ वाचल्याचे आठवत नाही.
त्यांची लिहिण्याची स्टाईल आवडते
तेव्हा साले सोलण्याचे नव्हते
तेव्हा साले सोलण्याचे नव्हते का? कच्च्या बटाट्याची साले काढण्यात काय असे कौशल्य लागते?
बटाटेवडे सध्याचेच आवडतात +१
बटाटेवडे सध्याचेच आवडतात +१
केसरा म्हणजे काय?
आंबे सोलायला काय वेगळं कौशल्य लागत असेल? सालीला गर राहिला तर खाता येतोच.
सध्याचा बटाटेवडा कधी जन्माला
सध्याचा बटाटेवडा कधी जन्माला आला? तोच आवडतो.
तुपात टाळलेला imagine करताच येत नाहीये.
पहिल्या कृतीला तर पासच.
तो पावात कधी घुसला कुणास ठाऊक! बहुतेक शिवसेनेने घुसवलाय
लेख रोचक आहे.
लेख रोचक आहे.
चिनूक्स कुठं वाचता हे पुस्तक?
सध्याचा बटाटेवडा आणि विदर्भातील आलुबोंडा दोन्ही आवडतात. पण फक्त तेच आवडतात, या लेखात दिलेले दोन्ही प्रकार नाही असे ते खाऊन बघितल्याशिवाय सांगु शकत नाही. दिलेल्या कृतीनुसार तेलात तळायला हरकत नसावी.
बटाटेवडे करा आणि खा.
बटाटेवडे करा आणि खा.
मास्तर की आज्ञा सर आंखो पर
गोव्यात आलेला बटाटा, हा
गोव्यात आलेला बटाटा, हा पोर्तूगीजांकडून आला असण्याची शक्यता आहे.. पोर्तूगालमधे 'पटाटा' हाच शब्द वापरला जातो.
सोलाणं वापरत नसत का तेव्हा?
सोलाणं वापरत नसत का तेव्हा? बटाटे सोलणं हे इतकं कौशल्याचं काम का होतं? आणि सालासकट उकडले तर चव जाते आणि लाकडंं जास्ती लागतात? ऐतेन!
शिवाय असा नुसताच पारीत सारण भरलेला उंडा तळायचा म्हणजे बटाटा कचोरी झाली की ही - वडा नाही!
पहिल्या रेसिपीतली दालचिनीची अॅडिशन आणि दुसरीतलं पाट्यावर वाटलेलं सारण इन्टरेस्टिंग आहेत! किती बरबटत असेल पाटा!
एक पिल्लू... ... बटाटा
एक पिल्लू...
... बटाटा सोलणं कौशल्याचं काम आहे आणि पाण्यात उकडले तर चव जाते हे वाचुन हे बटाटे म्हणजे स्वीट पटेटो (रताळी) आहेत की काय? रताळ्याची पातळ साल काढणं थोडं कौशल्याचं (बटाट्यापेक्षा) असू शकतं. तसंच रताळी पाण्यात उकडली तर चव उतरेल, पानचट लागतील. बटाट्यापेक्षा रताळ्यात नारळ, दालचिनी घालून चांगली लागतील. बटाट्यात नारळाचा चव आणि दालचिनी घातलेल्या काही इतर कृती आहेत का?
इन्टरेस्टिंग थिअरी! तशी
इन्टरेस्टिंग थिअरी! तशी रताळीही उकडून खातात खरंतर, पण बटाट्यापेक्षा नक्कीच जास्त प्लॉजिबल वाटतंय हे पिल्लू.

मला पण दालचिनी ऑड वाटली यात.
मला पण दालचिनी ऑड वाटली यात. शिजलेल्या बटाट्याचं सारण करायला पाट्यावर का वाटावं लागत असेल तेही कळले नाही.
आले मिरची आहे पण कांदा लसूण नाही. तेही ठीक आहे कारण अगदी २ पिढ्यापूर्वीपर्यन्त रोजच्या (ब्राह्मणी) स्वयंपाकात कांदा लसूण वापरला जात नसे.
असो, पण जुने डॉक्युमेन्ट म्हणून वाचायला मजा वाटते.
अमितव दालचिनी नाही पण उपासाचे
अमितव दालचिनी नाही पण उपासाचे पॅटिस करताना डायरेक्ट बटाट्यात नाही पण बटाट्याच्या पारीत खवलेलं ओलं खोबरे, दाण्याचं कूट, आलं मिरची कोथिंबीर ठेचा भरते मी, कोथिंबीर आमच्याकडे उपासाला चालते. बाहेरही उपासाच्या पॅटिस मध्ये ओलं खोबरे असतं.
बाकी मला बटाटेवडे म्हणून वरचे दोन्ही प्रकार आवडणार नाहीत, वेगळा प्रकार म्हणून करून बघायला हरकत नाही. करेन असं नाही, केलंच तर सालं काढून मात्र बटाटे उकडणार नाही
पण जुन्या काळी वेगवेगळे प्रयोग करून रेसिपीज लोकांसमोर आणणे कौतुकाची गोष्ट, जुनी पुस्तकं वाचताना मजा वाटते.
जाई फोटो मस्त.
>>> बटाट्यात नारळाचा चव आणि
>>> बटाट्यात नारळाचा चव आणि दालचिनी घातलेल्या काही इतर कृती आहेत का?
नारळ-बटाटा वड्या करतात ना.
आणि अंजूताई म्हणाली तसे उपासाचे पॅटिस.
मी लक्ष्मीबाई धुरंधरांच्या
मी लक्ष्मीबाई धुरंधरांच्या कृतीनं बटाटेवडे करून पाहिलेले नाहीत. पण प्रभुकुमारी यांच्या कृतीनं उत्तम वडे होतात. तुम्हांला सौम्य चवी आवडत असतील, तर हे वडे आवडतील. झणझणीत इत्यादी हा वडा नाही.
आपण हल्ली करतो ती कृती प्रभुकुमारी यांची आहे. लक्ष्मीबाई धुरंधर यांची कृती वेगळी आहे.
१९१० साली किसणी आणि सोलाणं ही दोन्ही आयुधं होती.
लक्ष्मीबाईंची बटाट्याबद्दलची टिप्पणी वाचताना बटाटे सर्वसामान्यांना उपलब्ध होऊन तेव्हा जेमतेम तीनचार दशकं उलटली होती, हे लक्षात घ्यायला हवं. शिवाय आपण आज वापरात असलेल्या जातींशी तुलना करतो.
ऍलेक्झांडर गिब्सननं पुण्यात १८३८ साली निलगिरीच्या पायथ्याहून बटाट्याचं वाण आणलं. त्याआधी जॉन माल्कमनं दापोडीच्या बंगल्यात बटाटे पेरले होते. ते वाण त्यानं सांगलीला पटवर्धनांना दिलं होतं. गिब्सननं आणलेलं वाण जुन्नर, खेड, पाबळ, आणि पुणे इथे लावलं. हे पीक धुळे, औरंगाबाद, हिंगोली, आणि मुंबई इथे पाठवण्यात येई. नंतर १८४५ साली त्यानं आयर्लंडहून वाण आणलं. कलकत्त्याजवळच्या श्रीरामपूरच्या मिशनर्यांनी लावलेली वाणंही पुण्यात आली. नंतर हिवरे आणि पुढे गणेशखिंड इथल्या बागांमध्ये अनेक प्रयोग झाले.
१८६० सालच्या सुमारास पुण्यात दोन प्रकारचे बटाटे होते. एकाचं साल पातळ होतं आणि शिजल्यावर लगदा होई. दुसर्याचं साल जाड आणि खरखरीत होतं. ही जात पहिल्या जातीपेक्षा अर्थातच स्वस्त होती.
बटाटा आल्यावर ब्राह्मणांनी त्याचा लगोलग स्वीकार केला नाही. ख्रिस्ती, मुसलमान, पाठारे प्रभू, सीकेपी, पारशी यांनी बटाटा वापरायला सुरुवात केल्यावर मग ब्राह्मणांच्या स्वयंपाकघरात तो गेला. त्या काळी तो महाग असल्यानं बंगालात बिर्याणीत पडला.
मी त्या काळच्या जातींचा शोध अनेक वर्षं घेतोय. अजून यश आलं नाही. आपल्या हल्लीच्या जाती जास्त उत्प्पादन देणार्या, किटकांपासून सुरक्षित असलेल्या, दिसायला देखण्या अशा असतात. त्यावेळी पिकं वेगळी दिसत. त्यांचा पोतही वेगळा होता.
बटाटा सुरतेहून गोव्याला गेला, असं मानण्याचं एक कारण म्हणजे गोव्यात अठराव्या शतकात Batata surrata असं नाव होतं. म्हणजे सुरतेहून आलेला बटाटा. बटाटा हा शब्द अठराव्या शतकापर्यंत रताळ्यासाठीही वापरला गेल्यानं गोंधळ होतोत तो वेगळा.
<शिवाय असा नुसताच पारीत सारण भरलेला उंडा तळायचा म्हणजे बटाटा कचोरी झाली की ही - वडा नाही!>
होय, पण लक्ष्मीबाई त्याला वडा म्हणतात.
<बटाटा सोलणं कौशल्याचं काम आहे आणि पाण्यात उकडले तर चव जाते हे वाचुन हे बटाटे म्हणजे स्वीट पटेटो (रताळी) आहेत की काय? >
नाही. हा बटाटाच आहे. दुर्गाबाई भटांच्या उपोषणपाकशास्त्रापासून बटाटा आणि रताळे / राताळे असे वेगळे उल्लेख पाकपुस्तकांमध्ये दिसतात. गृहिणीमित्रातही राताळ्याचे वेगळे पदार्थ आहेत.
सुरेख माहीती दिलीत. धन्यवाद
सुरेख माहीती दिलीत. धन्यवाद चिनूक्स .
आपण हल्ली करतो ती कृती प्रभुकुमारी यांची आहे. >>> नवराही हेच म्हणाला. मूळ कृतीत थोडा बदल आहे फक्त.
तो पहिला वाला करायला हवा.
तो पहिला वाला करायला हवा. दालचिनी कशी लागेल हे इमॅजिन नाही करता येत त्यासाठी तरी करेन नक्की. दुसऱ्या पद्धतीचा चांगलाच होईल असे वाटत आहे त्या सारणामुळे. बटाटा काय विळीवर सोलत का? सोलाण कधी सर्रास वापरल जाऊ लागलं? आणि ते आंबा म्हणजे कैरी म्हणायचे असावे का?
बाकी तुझा तो बटाटा व्हिडिओ बघितला आहे चिन्मय युट्यूबवर जो whatsapp स्टेटसला तू इतक्यात लावला होतास. तुझ्या वरच्या प्रतिसादा मधले सगळे उल्लेख आणि माहिती आली आहे त्या व्हिडिओ मध्ये.
>>> त्यावेळी पिकं वेगळी दिसत
>>> त्यावेळी पिकं वेगळी दिसत. त्यांचा पोतही वेगळा होता.
ओह ओके. धन्यवाद.
>>> बटाटा आल्यावर ब्राह्मणांनी त्याचा लगोलग स्वीकार केला नाही.
घ्या! आणि आता मांसाहारी पाककृतींत मांसाऐवजी बटाटा चालेल का विचारतात! काय रे देवा!
कच्चे बटाटे सोलणें म्हणजे एक
कच्चे बटाटे सोलणें म्हणजे एक कुशलतेचेंच काम होय. साल पातळ निघावें, बटाट्यांचा नाश होऊं नये >>>हे बहुधा विळीवर साल काढणे तेही पातळ आणी बटाटा वाया जावु न देता या अर्थाने लिहले असावे.
तरी उकडलेला बटाटा पाट्यावर का वाटला असेल?की नारळ-मिरची-कोथिबिरिच्या वाटणातच बटाटा वाटला तर चान्गल एकजिव व्हाव याविचाराने असेल बहुधा ( पाटा प्रकरण किती चिकट्ट झाल असेल हा पहिला विचार मनात आला)
रोचक माहिती.
रोचक माहिती.
मला खायला बहुतेक आवडणार नाही कारण जिभेला ते वळण नाही. पण आजच्या बटाटेवड्याच्या रेसिपीचा उगम म्हणून भारी वाटले वाचताना. बटाट्याच्या विविध वाणांची पोस्टही भारी आहे. काही वर्षांपूर्वी एक थोडीशी चिकट अशी बटाट्यांची जात मिळायची. भाजी खाताना तो चिकटपणा जरा जास्तच जाणवायचा. पण त्या बटाट्यांचे वडे भारी बनायचे. आता ती जात मुंबईत तरी कुठे दिसत नाही.
ते बटाटे सोलण्याचे प्रकरण मात्र झेपले नाही. मागच्या पिढीतल्या बहुतेक बायका विळीवर साले काढायच्या. आईला विळीवर बटाटेच नाही तर काकडी, गाजर, (जून) दुधी यांच्या साली काढताना बघितले आहे आणि त्यात काही फुकट जात नसे.
इथे अनेक प्रकारचे बटाटे
इथे अनेक प्रकारचे बटाटे मिळतात.
त्यातले जनरल पर्पज आणतो ते युकॉन गोल्ड. स्टार्च कमी असतं, चिकटपणा जास्त (वॅक्सी) असतो, शिजले तरी आकार धरुन ठेवतात (क्रंबल होत नाहीत, फ्लेकी नसतात). फक्त हे जरा गोडसर असतात. म्हणून बटाटेवड्यात, पावभाजीत नाही आवडत फार. गोडसर चव येते.
रसेट : हे फ्लेकी, शिजले की क्रंबल होणारे, जास्त स्टार्ची असतात. चिकटपणा कमी असतो. हे बेक्ड बटाटे मध्ये खाच पाडून क्रिम आणि कांद्याची पात, मीठ इ. घालून बार्बेक्यूवर खायला छान लागतात. फ्रेंच फ्राईज ला ही हेच वापरतात. चिकट जास्त नसले तरी गोड नसल्याने हे जरा 'बटाटे' वाटतात. साईड बाय साईड प्रयोग केले नाहीत, पण रसेट वड्यांना जास्त बरे लागत असतील. तसंही बाईंड करायला बेसनाचे आवरण असते. पण पराठ्यात फार क्रंबल बरं नाही वाटत.
बाकी लाल बटाटे, रंगबिरंगी बटाटे इ. असतातच.
काय मस्त मस्त प्रतिसाद आलेत.
काय मस्त मस्त प्रतिसाद आलेत. आपल्याबद्दल एवढ्या आस्थेने लोक बोलतायत ऐकले तर बटाटा धन्य होइल
Pages