एप्रिल मे ९९ - तीन मित्रांची कहाणी!

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 May, 2025 - 12:04

.
एप्रिल मे ९९ - तीन मित्रांची कहाणी!

IMG-20250528-WA0074.jpg
.

कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागते!
कोकणात कायमस्वरुपी राहणारेच नाही तर कोकणातला मुक्काम काही दिवस अनुभवलेले देखील असेच म्हणतात.
चित्रपटात दाखवलेला कोकण याला अनुमोदन देतो Happy

कोकणातला निसर्ग, कोकणातला समुद्र, कोकणातली महान खाद्यसंस्कृती, सणवार, खेळ, कौलारू घरे, त्यासमोरचे अंगण, ओसरी, हिरवेगार रस्ते, नारळी पोफळीची बाग आणि आमराई, विहीरी, कोकणातली जीवनशैली, गोड गोड शिव्यांनी नटलेली कोकणातली बोलीभाषा, आणि यासारखे बरेच काही आपण या आधीही कित्येक चित्रपटात अनुभवले असेल. या चित्रपटात हे सारे एकत्रितपणे येते. आणि ते ईतके ऑथेंटीक, ईतके अस्सल वाटते की हा आमच्या कोकणचा चित्रपट म्हणून एखाद्याला बघायची शिफारस करावी.

मी स्वत: देखील कोकणी असलो तरी तिथे स्थायिक नाही, तर पाहुणा म्हणूनच कधीतरी जाणे होते. तिथे गेल्यावर मला जे काही भावते, जे काही माझी नजर टिपते, ज्या गोष्टींचे मला अप्रूप वाटते ते सारे काही या चित्रपटात आले आहे. आणि कॅमेर्‍याच्या ईतक्या सुंदर अँगलने टिपले आहे की हे सगळे बघून आणि जगून झालेल्यानेही पुन्हा प्रेमात पडावे. याबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर आणि सर्वच तंत्रज्ञ टीमचे भरमसाठ कौतुक आणि एक कोकणी माणूस म्हणून विशेष आभार.

बरे हे सारे मुद्दाम दाखवावे म्हणून येत नाही तर कथेच्या बॅकग्राऊंडला येते, त्या ओघात येते. हा चित्रपट म्हणजे काही नुसता कोकण दर्शन नाही, तर चित्रपटाची कथा आपल्या जागी घट्ट आहे. ती कोकणात घडते ईतकेच.

ट्रेलर पाहून तीन ईंग्लिशची बोंब असणारी मुले, त्यांची शाळा घेणारी एक मुलगी आणि त्यातून घडणार्‍या गमतीजमती इतकाच चित्रपट आहे असा काहीसा समज झाला होता. पण खरा चित्रपट त्या पलीकडे आहे. तीन मुलांच्या घट्ट मैत्रीच्या भावविश्वात त्यांच्यातील नात्याची वीण जराही न उसवता अलगद शिरणारी एक नवीन मैत्रीण हा या चित्रपटाचा आत्मा आहे. पण अगदीच अलगद नाही शिरत, तर घडतात बर्‍याच घडामोडी आणि हे सारे घडते एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत म्हणून चित्रपटाचे ते नाव.

श्रेयस थोरात, आर्यन मेंघजी, मंथन कानेकर - या तिन्ही मुलांचा अभिनय कमाल तर आहेच, पण तोडीस तोड आहे. म्हणजे तिघात डावे उजवे ठरवणे दूरच, पण मुळात ते तीन वेगळे कलाकार न वाटता त्या तिघांचे मिळून एक पॅकेज वाटते. ईतके त्यांचे कॅरेक्टर एकमेकात मिसळलेले आहेत. कोणी एक नाही तर तिघे एकत्र भाव खाऊन गेले आहेत.
खास मित्रांचे असेच असते. त्यांचे गुणस्वभाव काहीही असोत, म्हणजे कोणी शांत तर कोणी बड्बड्या, कोणी रागीट तर कोणी समजूतदार, पण सरतेशेवटी त्यांचे किडे जुळतात म्हणून ते एकमेकांचे खास असतात. आणि म्हणूनच त्या तिघांची मैत्री आणखी खरी, आणखी विश्वासार्ह वाटते, ज्यावर कथेचा पुर्ण डोलारा आहे.

आणि त्या मुलीच्या अभिनयाबद्दल काय बोलावे. ही ऋजुता देशमुखची मुलगी आहे हे ओळखायला दोन पैश्याची हुशारी लागू नये. जणू तिला घेऊनच ९९ साली हे चित्रीकरण केले असावे ईतकी हुबेहूब. बघताक्षणीच कानात "सारे कळत नकळतच घडते" ची रिंगटोन वाजू लागली. तेच गोड दिसणे आणि तितकेच मोहक हसणे. आयुष्यात अशी मैत्रीण यायलाही भाग्य लागते. पण या चित्रपटानंतर साजिरी जोशी हे नाव विशेष लक्षात राहील एवढे मात्र नक्की.

या चार मुलांच्या व्यतिरीक्त त्यांचे जे ईतर कुटुंबीय दाखवले आहे त्यांचे कॅरेक्टर ईतके छान जमले आहेत की नंतर नंतर थिएटरमध्ये लोकं विनोद घडायच्या आधीच तो घडणार यावर विश्वासून हसत होती. जणू त्या दोनचार कुटुंबांशी एकरूप झाली होती.

चित्रपटात सर्वात जास्त आवडलेला भाग म्हणजे - तीन मुले आणि एक मुलगी, सुरुवातीच्या तक्रारीनंतर जेव्हा ती तिघांना आवडायला लागते, तेव्हा वाटले फिस्कटला आतापर्यंत छान जमून आलेला चित्रपट. आता हे सारे पौगंडावस्थेतील भिन्नलिंगी आकर्षणाच्या ट्रॅकवर जाणार.. पण ते टाळून, किंबहुना टाळून म्हणण्यापेक्षा योग्य प्रकारे हाताळून, त्यांच्यात ऊमलणार्‍या मैत्रीच्या आणि विश्वासाच्या नात्याला कुठलेही गालबोट न लावता चित्रपट वेगळ्याच ऊंचीवर जातो. कसे ते चित्रपटातच बघा. पण याचा मुद्दाम आवर्जून उल्लेख करावासा वाटला कारण या गैरसमजातून कोणी चित्रपटावर फुल्ली मारू नये किंवा मुलांना सोबत न्यायचे टाळू नये.

गाणी सगळीच मस्त कोरीओग्राफ केली आहेत. जिथे नाच आहे तिथे स्टेप्स सुद्धा छान आहेत. मराठी चित्रपटात खरे तर हे अभावानेच बघायला मिळते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता!

मन जाईs जाईs जाईss हरवून वाट.. या गाण्यात आपणही सोनू निगमच्या आवाजात हरवून जातो. चित्रपट संपल्यावर आणि तो आवडल्यावर आपण नेहमी एक गाणे गुणगुणत घरी घेऊन येतो. ते गाणे आणि ती ओळ कदाचित हिच असावी.

ऐंशीच्या दशकात जन्म घ्यायला सुद्धा भाग्य लागते म्हणतात. आज तीच मुले नाईंटीज किड म्हणून ओळखली जातात. चित्रपट कोकणात घडत असल्याने आणि माझे बालपण काही कोकणात गेले नसल्याने नव्वदीच्या दशकातील कोकणाशी रिलेट करता आले नाही. पण त्याने काही अडले नाही. जे एका अर्थी चांगलेच आहे. कारण चित्रपट ठराविक वयोगटालाच नॉस्टेल्जिक फिलींग देण्यात अडकून पडला नाहीये. नव्वदीतल्या ईंग्लिशची बोंब असणार्‍या आणि मुलींपासून चार हात दूरच राहणार्‍या मराठी माध्यमाच्या मुलांची कथा वगळल्यास ९९ ऐवजी २००९ ते १९ काही असते तरी फार फरक पडला नसता.

शहर आणि गावातील जीवनशैली आणि आचारविचारातील फरक, विभक्त विरुद्ध एकत्र कुटुंब पद्धती, काही परंपरा तर काही त्यातूनच येणार्‍या अंधश्रद्धा, स्त्रियांना पाळीच्या दिवसात येणारी बंधने, तर अभ्यासाचे भूत मानगुटीवरून काढून प्रत्येकाची हुशारी वेगवेगळ्या गोष्टीत असते हे ओळखणे.. या आणि अश्या कित्येक विषयांना चित्रपट बारीकसे तरंग उमटतील ईतपत हलके बोट लाऊन जातो जे आपल्याला तेव्हा कळतही नाही. हे नंतर मग असे परीक्षण लिहीताना डोक्यात येते, किंवा घरी येऊन चित्रपटावर चर्चा करताना जाणवते.

असो, परीक्षण फार लांंबवत नाही,
पण चित्रपटात एप्रिल मे नंतर जूनपर्यंत मुक्काम लांबवला असता तर कोकणातला पाऊस आणि पावसातले कोकण अनुभवता आले असते. काय माहीत असेलही कदाचित नशीबात. कारण आमच्याकडे याचा दुसरा भाग येणार यावर पैजा लागल्या आहेत. आणि आल्यास त्याचे अ‍ॅडवान्स बूकिंग आधीच झाले आहे.

कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागते तसे या एकाच महिन्यात तीन एकापेक्षा एक छान मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, जे तिन्ही थिएटरात बघायला देखील भाग्य लागते म्हणू शकतो.
मी "त्या" भाग्यवानांच्या यादीत देखील स्थान पटकावले आहे.
मग वाट कसली बघता, हे तुम्हीही करू शकताच Happy

- तुमचा अभिषेक

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय. कोकण जिव्हाळयाचा विषय. ट्रेलर आवडला ह्याचा.

साजिरी जोशीचे बाबाही कलाकार आहेत, फार पूर्वी गजरा वगैरे मध्ये असायचे, कागद टंचाई विषय होता तेव्हा होते. दूरदर्शनवरच बघितलं होतं काही वेळा. त्यानंतर ते कुठे काम करताना दिसले नाहीत, एकदम कन्यादान सिरीयल मध्ये व्हिलन म्हणून दिसले, आधी मी अजिबातच ओळखलं नव्हतं. नंतर ऋतुजाचा (ऋजुता) एक vlog बघितला, मग ओळखलं.

तिचे आजी आजोबाही कलाकार (आजोळचे) त्यामुळे साजिरी कडे अभिनयाचे सर्व गुण उतरले असणार.

अरे वा! काल एक व्हिडिओ दिसला त्यात शूटिंग आमच्या श्रीवर्धनला झालंय असं ऐकलं. त्यासाठी तरी नक्की बघावासा वाटत होताच, पण तुझं परीक्षणही आवडलं.

एकाच महिन्यात तीन एकापेक्षा एक छान मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत >> ह्या चित्रपटाचे reviews बघताना माझ्याही तेच डोक्यात आलं.. कधी नव्हे ते (?) लागोपाठ चांगले चित्रपट

सुरुवातीला पोस्टर बघितलं तेव्हा वाटलं की ऋजुता ( इतके वर्ष झाली तरी तशीच दिसते हे खर असलं तरी आता उलट अजून लहान / तरुण कशी झाली.. मग १-२ दिवसांनी कळलं की तिची मुलगी आहे. Happy

अभिप्राय आवडाळा. वाचून श्वास मध्ये पहिल्या सीन का कोकण दाखवलाय त्याची (उगाच) आठवण झाली.
चित्रपट बघायचा ठरवलं तरी आहे..

शूटिंग आमच्या श्रीवर्धनला झालंय असं ऐकलं
>>>>
हो. कॉलेजला असताना सुट्यांमध्ये आम्ही चार मित्र श्रीवर्धनाला एका मित्राच्या गावी गेलो होतो. आठवडाभर मुक्काम होता. नदीवर जाऊन खेकडे पकडून आणायचे आणि खायचे. कोलंबी आणि इतरही माश्यांची चंगळ होती. तिथल्या लोकांनी केलेला पाहुणचार कमाल होता. आम्हा चौघांमध्ये मी खेकडे खाण्यात पटाईत आणि वाया न घालवता खायचो म्हणून त्या मित्राची आज्जी फार खुश होती माझ्यावर. मला अगदी मायेने नातवासारखे खाऊ घातले आठवडाभर. इतर मित्र पिण्यात पटाईत होते, त्यांची सोय मित्राच्या मामाच्या मित्रमंडळींनी केली. मुरूड जंजिरा आणि जवळपासच अजून कुठलातरी गड किल्ला फिरलो. बोटीत बसून फिरलो. हरिहरेश्वरचा फेमस स्पॉट अर्थात केलाच जो चित्रपटात सुद्धा आला आहेच. जेव्हा कुठे तो बघतो तेव्हा तीच ट्रिप आठवते. एकूणच परीसर सुंदर आहेच.

साजिरी जोशीचे बाबाही कलाकार आहेत >>> हे माहीत नव्हते. पण तिच्या मुलाखतीची क्लिप पाहिली होती. तिला नाचाची आवड होती. म्हणजे आहे. ते शिकत होती. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयाकडे वळली. पण आता यातच रमेल असे वाटते. कारण फार छान करते.

छान परिचय . बघण्याचा प्रयन्त करीन.
मराठीत नेमक्या चांगल्या सिनेमाचे प्रोमोशन कमी पडते . असे चांगले सिनेमे कधी येतात आणि जातात हेही कळत नाही . नंतर ओटीटी वरच हिट होतात . नाहीतर भंकस सिनेमे मराठी पाचकळ इन्फ्लुएन्सर्स कडून किंवा टीव्ही शो वर जिकडे तिकडे प्रमोट होतात .

खरे आहे. पाचकळ सिनेमे प्रमोशन करू शकतात तर चांगल्या सिनेमाचे घोडे कुठे अडतं. बहुधा आपल्या कलाकृतीवर जास्त विसंबून राहायचा हट्टीपणा सुद्धा होत असेल. पाचकळ चित्रपट बरोबर इंस्टा फेसबुक शॉर्ट रील यावर वायरल होईल असे एखादे मटेरिअल टाकतात. पुढे ते चित्रपट चालतात अशातला भाग नाही, पण निदान पोहोचतात तरी.. त्यापेक्षा हे चित्रपट पोहोचले तर नक्की चालतील.

मस्त परिक्षण..!
एकाच महिन्यात तीन चित्रपट थेअटरमध्ये तेही मराठी.. खरंच भाग्यवान आहात..!
९९ म्हणजे रिलेट होणारा काळ .. त्यामुळे आवडेल चित्रपट पाहायला..

मंजूताई आणि रूपाली धन्यवाद,
काळ आणि कोकण काहीही रिलेट न होताही आवडावा असा चित्रपट आहे.. कारण मैत्री आणि इतर नात्यांमधील भावना जगाच्या पाठीवर कोणालाही रिलेट व्हाव्यात Happy