पुंडलीका भेटी परब्रम्ह आले, असे ज्याचे वर्णन, सकल मराठी संतांचे अवघे साहित्य फक्त ज्या एकाच देवा भोवती गुंफलेले आहे, गायक आणि संगीतकार यांना देखील ज्याने कायम मोहिनी घातली त्या पंढरी च्या पांडुरंगाचे वर्णन मज पामराने काय करावे.
संतांनी वेगवेगळ्या ओव्यांमधून ज्याला वर्णीले आहे, कवी, गीतकार यांना देखील त्याचे वर्णन करण्याचा मोह आवरला नाही. तो सावळा विठ्ठल मला कधी गाण्यातून, तर कधी आईच्या हरीपाठातून भेटत आला आहे. सासुर वाशिणीला जशी माहेरची ओढ असते तशीच या सर्व संतांना पंढरीची ओढ असते, ‘माझे माहेर पंढरी’ असे भीमसेनजींचे स्वर कानात घुमत राहतात., ते ही त्याच मुळे. मला वाटत पांडुरंगाचे हेच गाणे मी कळायला लागले तेव्हा पासून ऐकत आले आहे. त्यामुळे पुनः पुनः जिथे जावेसे वाटते असे तीर्थ क्षेत्र म्हणजे पंढरपूर आणि तिथला विठोबा राया. होय कधी तो विठोबा असतो, तर कधी विठू माऊली असतो, कधी कानाडा राजा असतो तर कधी वैकुंठी चा राया असतो. आपण त्याला ज्या नावाने बोलावू तो त्याच भावाने आपल्याला भेटतो.
संत वाङमया चा फारसा अभ्यास नाही त्यामुळे संतांच्या ज्या ओव्या प्रसिद्ध झाल्या त्या भक्ति गीतांमधून मला तो भेटला, आणि परब्रम्ह असलेले हे सावळे रूप वेगवेगळ्या शब्दांमधून, विशेषणातून माझ्या डोळ्यासमोर उभे ठाकले. असा हा पंढरीचा राजा. महाराष्ट्रातील संगळ्यांच् संत वाङमयातून आपल्याला भेटत असतो. सगळे संत त्याचे एवढे गुणगान का बरे करीत असावेत, असे म्हणून त्याच्या बद्दल अधिकच ओढ वाटू लागते. मात्र परब्रम्ह म्हणजे तर निर्गुण निराकार असलेले रूप, जेव्हा ‘पुंडलिकास भेटायाला त्याच्या घरी प्रगटले. आणि भक्त पुंडलिकाने त्याला सगुण साकार रूपात भक्तांच्या प्रतीक्षेत उभे ठेवले. त्यानंतर संतांनी त्याच्या साकार रूपाला सावळे रूप बहाल केले आहे.
असा हा भक्तांच्या वाटेला डोळे लावून विटेवर उभा असलेला विठ्ठल. त्याचे वर्णन मी त्याच्या वरील भक्तिगीतातून ऐकत ऐकत मोठी झाली. अभ्यासतील कविता पाठ होण्या आधी ही भक्तिगीते च अधिक जवळची वाटली, त्यामुळे संतांनी रचलेल्या ओव्या जेव्हा भक्ति गीते म्हणून कानावर पडली त्यावेळी संतांना तो कसा दिसला असेल, त्यापैकी मला आठवत असलेली काही निवडक भक्तिगीते जी त्या सावळ्या चे वर्णन करतात. आणि त्याचे रूप आपल्या समोर उभे करून आपल्याला नतमस्तक होण्यास भाग पडतात.
रुपे सुंदर सावळा गे माये, असे संत एकनाथ त्याचे वर्णन करतात.
ज्ञानेश्वर माऊली त्याला बघताच म्हणतात
‘रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी’ किंवा ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती,’
तुकाराम महाराजां चे अवघे आयुष्य म्हणजेच पांडुरंग, म्हणूनच तुकोबांना त्यांचे हे रूप सुंदरच दिसते.
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.” किंवा
‘सावळे सुंदर रूप मनोहर, कारण त्यांना एका पांडुरंगा शिवाय या जगात काही सुंदर आहे असे वाटतच नसावे, असेच् वाटते.
फक्त संतच नाही तर अनेक कवींना देखील त्याने भुरळ घातली आहे, कवी रा ना पवार म्हणतात,
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो, विसरून गेलो देहभान,
अशीच आपली ही अवस्था होते, नाही का.
#सुरपाखरू # #प्रयोग२०२५
शिवानी बलकुंदी