आता थांबायचं नाय! (मराठी चित्रपट) परीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 May, 2025 - 06:11

माझ्याच्याने निःपक्ष आणि तटस्थ परीक्षण लिहिले जात नाही. आवडीच्या कलाकारांचे किंवा आपल्या मातीतले चित्रपट असले की मी नेहमीच त्यांना झुकते माप देतो. चांगल्या गोष्टींचे कौतुक थोडे जास्त करतो आणि वाईट गोष्टींचे प्रदर्शन मांडत नाही.
पण सुदैवाने यातले काही या चित्रपटाबाबत करावे लागणार नाही कारण चित्रपटाने कथा पटकथा दिग्दर्शन संकलन अभिनय संगीत सर्वच आघाडींवर उत्तम कामगिरी केली आहे. आवर्जून नाव ठेवावे अशी एकही जागा शिल्लक ठेवली नाहीये.

मुंबई महानगरपालिकेचे दहाबारा सफाई कर्मचारी ज्यांनी दहावी पूर्ण न करताच शिक्षण सोडले आहे त्यांनी रात्रशाळेत शिक्षण घेऊन दहावी पास करावी असा फतवा निघतो आणि चित्रपटाची सुरुवात होते.
हे तुम्हाला ट्रेलर बघून सुद्धा समजू शकते. पुढे काय घडते ते चित्रपटातच बघालच, इथे नि आणि काय सांगायचे.

पण चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे ती झाडून सर्वच कलाकारांचा सशक्त अभिनय. बरेच दिवसांनी अशी जमलेली भट्टी बघायला मिळाली आहे. भले स्टारडम का नसेना पण आपले मराठी कलाकार म्हणजे अभिनयाची तोफ असे जे आपण कौतुकाने म्हणतो त्या शब्दांना इथे खरे ठरवले आहे.

भरत जाधवने आजोबांच्या वयाची भूमिका नायकासारखी साकारली आहे. आणि सिद्धार्थ जाधवबद्दल काय वेगळे बोलावे. हसता हसता रडवणे आणि रडवता रडवता हसवणे यात हे दोन्ही कलाकार बाप आहेत. आणि यात तर जणू दिलेली भूमिका जगले आहेत. चित्रपटात साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यात देखील संघर्ष करून यश मिळवलेल्या आणि तरीही पाय त्याच मातीत घट्ट रोवून असलेल्या या कलाकारांनी कदाचित त्यामुळेच भूमिकेत जीव ओतला आहे.

हेच काम प्राजक्ता हनमघर आणि किरण खोजे या दोन महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा चोख बजावले आहे. या चौघांनी एवढा सहज सुंदर उच्च दर्जाचा अभिनय केला आहे की इतक्या नाट्यमय घडामोडी असून सुद्धा चित्रपट बघत आहोत असे वाटत नाही. हल्लीच्या काळात कंबरेखालचे उथळ विनोद हे न्यू नॉर्मल झाले आहे, त्यात काय एवढे म्हणून आधुनिक विचार समजू जाऊ लागले आहेत, तिथे या सर्वांनी निखळ विनोदाचे नाणे खणखणीतपणे वाजवलेले बघून छान वाटले.

कास्टिंग ज्याने केली असेल त्याला सलाम. प्रत्येक भूमिका जणू त्या त्या कलाकारासाठीच लिहिली असावी असे वाटत होते. बीएमसी अधिकारी म्हणून गोवारीकर आपली छाप सोडतात, रात्र शाळेचे शिक्षक म्हणून मुळशी पॅटर्नचे ओम भुतकर येऊन वणवा पेटवतात, यात पर्ण पेठे त्यांना साथ देते, सिद्धार्थ जाधवच्या वडिलांच्या भूमिकेत दिपक शिर्के असो किंवा युनियन लीडर भूमिकेत श्रीकांत यादव, त्यांना बघूनच त्यांचे चित्रपटातील कॅरेक्टर कळते. रोहिणी हट्टंगडी एका दृश्यापुरते अग्निपथ मधील मास्तर दीनानाथ चौहान बनून येतात आणि चित्रपटातील गोडवा वाढवून जातात.

गाण्यांमध्ये सुद्धा हेच तत्व पाळले आहे. शीर्षक गीत अजय गोगावले यांच्या वरच्या पट्टीतील आवाजात जे ऐकूनच स्फुरण चढते, तर सांग सांग भोलानाथसाठी अवधूत गुप्तेच्या आवाजातील अवखळ ऊर्जा वापरली आहे. त्या गाण्याचे चित्रीकरण देखील तितकेच मजेशीर झाले आहे.

पटकथा हाच चित्रपटाचा आत्मा असतो. एकतर ती लूपहोल सापडणार नाही इतकी घट्ट विणली आहे, किंवा तो विचार करायला वेळ तरी दिला नाहीये इतकी वेगवान आहे. कारण संकलन सुद्धा त्याच तोडीचे झाले आहे. एकही अनावश्यक किंवा रेंगाळलेला प्रसंग यात सापडणार नाही. चित्रपटात हास्य फुलवणारे, डोळ्यात पाणी आणणारे, स्फुरण चढणारे, समाधान देणारे असे सर्व प्रकारचे प्रसंग आळीपाळीने येतात पण चित्रपट कुठले तुकडे जोडून केलेला नाहीये.

सफाई कामगारांचे आयुष्य अस्वस्थ करणारे आहेच. पण तरी अंगावर येतील असे भडक प्रसंग चित्रपटात टाळले आहेत. गटारात उतरण्याचे द्रुश्य देखील काठावरूनच आणि किळसवाणे वाटणार नाही याची काळजी घेत दाखवले आहे. किंबहुना बरेच गोष्टी विनोदाच्या अंगानेच पुढे आल्या आहेत. कारण बहुतांश प्रेक्षक थिएटरमध्ये अति-वास्तववादी बघायला जात नाहीत. यात ते प्रबोधन मनोरंजनातून साधले आहे. या कामगारांना सहानुभूती नको तर सन्मान द्या हा संदेश योग्य प्रकारे पोहोचवला आहे.

सुका कचरा आणि ओला कचरा वेगळे करायचा सीन फार छान जमला आहे. जेव्हा आमच्या सोसायटीमध्ये हे नव्यानेच सुरू झाले तेव्हा थैलीतील खाद्यपदार्थ, चटणी वगैरे ओल्या कचर्‍यात ओतून ती थैली वा पिशवी सुक्या कचर्‍यात टाकायची हे काय वैतागाचे काम आहे असेच सुरुवातीला वाटले. पण जर ते आपण केले नाही, तर नंतर सर्वांचा जमा झालेला कचर्‍याचा ढिगारा उपसून ज्या कोणाला ते करावे लागेल, त्यावर किती ते अन्यायकारक होईल हे सुद्धा जाणवले. दुर्दैवाने आजही हे काहींना जाणवत नसावे. ते आपले काम वाटत नसावे. त्यांना चित्रपटात छान "आरसा" दाखवला आहे.

टीटीचे ईंजेक्शन घ्यायचा एक प्रसंग सुद्धा असेच खळखळवून हसवतो. निघताना जेव्हा ती म्हणते हे काही पहिल्यांदा घेत नाहीये तेव्हा त्याला जबाबदार आपणच बेजबाबदार नागरीक आहोत हे चित्रपट बघून घरी गेल्यावर आपल्या लक्षात येते.

आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे तोटे दोन्ही असतात. जिथे गटारात उतरून ते साफ करताना जिवाला धोका आहे तिथे याचा फायदा आहे, तर जिथे दहा माणसांचे काम एक मशीन करते तिथे नऊ जणांचा रोजगार संपुष्टात यायचा धोका आहे. चित्रपटात कथेच्या ओघात हे आले तरी तो चित्रपटाचा विषय नसल्याने त्यात खोलवर शिरणे टाळले आहे. पण त्याचवेळी शिक्षण आणि त्यातून वाढणारा आत्मविश्वास हा जो चित्रपटाचा मुद्दा आहे तोच या समस्येवर देखील तोडगा आहे हा आशावाद सुद्धा दाखवला आहे.

कथा सफाई कामगारांच्या आयुष्यात घडत असली तरी त्या निमित्ताने संविधानातील समान संधी यावर जे भाष्य केले आहे ते तुम्हा आम्हा सर्वांनाच लागू.. आणि तो विचार शेवटचे जय महाराष्ट्र येईपर्यंत व्यवस्थित पोहोचतो.

चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत चढत्या भाजणीने सुंदर होत जातो. शेवटचा संघर्ष अजून थोडा ताणायला हवा होता असे एखाद्याला वाटू शकते, पण कदाचित ती आपली अजून काही काळ चित्रपट बघण्याची, त्या विश्वात रमण्याची भूक असू शकते.

हल्ली मराठी चित्रपट तांत्रिक दृष्ट्या दर्जेदार झाले आहेत. अश्या एखाद्या चांगल्या चित्रपटात त्या अपेक्षा पूर्ण होतातच. त्यामुळे त्या दृष्टीनेही ओटीटीची वाट न बघता थिएटर गाठायला हरकत नाही. मुंबई महापालिकेचे काही एरियल शॉट आहेत, तर कधी तिथून टिपलेली मुंबई आहे. गिरगाव चौपाटी देखील जशी आहे तशी चिखल आणि काळया पाण्याच्या समुद्रासह दाखवली आहे.

हा चित्रपट जर आपण माऊथ पब्लिसिटीवर चालवू शकलो नाही तर प्रेक्षक म्हणून पुढे जाऊन आपलेच नुकसान होईल.

मी राहतो तेथील दोन मल्टीप्लेक्समध्ये दिवसाचे प्रत्येकी फक्त दोन शो होते. त्यातल्या एका थिएटरला फक्त त्या दिवसासाठी म्हणून ९९ रुपये तिकीट होते. ते असे का हे समजले नाही. पण त्यामुळे शो अगदी पहिल्या रांगेपासून हाऊसफुल होता. तेच दुसरे थिएटर घराच्या अगदी शेजारी असले तरी तिथे १८० रुपये तिकीट असल्याने चित्रपटाच्या दोनेक तास आधीपर्यंत फक्त तीन सीट भरल्या होत्या. मी त्यातले दूरचे थिएटर गाठले. तिकीटाचे पैसे वाचवायला म्हणून नाही तर चित्रपटाची खरी मजा हाऊसफुल थिएटरमध्ये बघण्यातच. आणि तसेच झाले. गाडीभाडे आणि वेळ खर्च करून दूरचा प्रवास करणे खरेच वसूल झाले.

अरे हो, चित्रपट संपल्यावर मला समजले की तो सत्य घटनेवर आधारीत होता आणि ते एक भारी वाटले.
बीएमसीच्या चतुर्थ श्रेणीतील २३ कर्मचाऱ्यांनी खरोखरच आता थांबायचे नाही म्हणत हा पराक्रम केला आहे.
जय बीएमसी, जय महाराष्ट्र!

चित्रपट देखील जय महाराष्ट्र म्हणतच संपतो आणि तीच भावना आपल्याही मनात उतरवतो.

-- ऋन्मेऽऽष

----------------------------------------

जाता जाता,
१) वाईट एकाच गोष्टीचे वाटले की लेकीला आग्रह करून सोबत नेले नाही.
२) चांगले एकाच गोष्टीचे वाटत आहे की तिच्यासोबत बघायचा म्हणून पुन्हा एकदा बघता येईल.

सांगायचा मुद्दा असा की मुलांनाही आवर्जून दाखवा Happy
आमचे थिएटर खालील फोटोत दाखवले तसे हाऊसफुल होते. तुमचेही होऊ द्या Happy

IMG-20250514-WA0004.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीक्षण.
पटकथा हाच चित्रपटाचा आत्मा असतो. >>>> हे पटले. पटकथा चांगली असेल तर इतर बाबी किंचित डाव्या असल्या तरी चालून जाते.

या चित्रपटासाठी नवीन धागा काढलात ते बरं झालं. काही चित्रपट इतके चांगले असतात की त्यांची चर्चा व्हायला हवी आणि लोकांनी ते बघावेत.

तुमच परीक्षण आवडलं.. खूप. सविस्तर आहे.
मी मराठी चित्रपट धाग्यावर टाकलेले परीक्षण इकडे डकवते..

आता थांबायचं नाय..

डोळ्यात आसू आणि हसू एकच वेळी आणणारा एक अतिशय तरल आणि हृदयस्पर्शी चित्रपट.

आपण केलेली घाण/कचरा स्वच्छ करणारे, ज्यांच्या दोन एक दिवसांच्या अनुपस्थितीनेही सर्व शहराच रूपडचं पालटत, परंतु ज्यांना स्वतःला मूलभूत सोयी सुविधांपासूनही वंचित रहाव लागत.. ते चतुर्थ श्रेणी कामगार. त्यांना दाखवलेले स्वप्न जे त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी किरण घेऊन येतं, शिवाय बरोबरच आत्मविश्वास, आत्मभान, आणि स्वतःच्या मूलभूत अधिकारांची जाणीवही आणत.

रोबोटिक्सचा उपयोग (खर तर) ही अशी माणसाचा जीव धोक्यात जाईल अशी काम करण्यासाठी केला जावा.. तंत्रज्ञान अशावेळी वरदान ठरते.. असे काहीसे विचार चित्रपट बघताना मनात येत होते.. आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये असं एक जापनीज यंत्र दाखवलंय.. अर्थात मग त्याने नोकऱ्या गेल्या तर हीही एक भीती त्यांच्या मनात येण स्वाभाविक आहे. पण त्यावर तोडगा निघू शकतो, नवी. उद्योग निर्मिती होऊ शकते वगैरे असे पदर त्याला आहेत.. अर्थात हे ह्या चित्रपटाच्या कक्षेत येत नाही..

काथा आवडली- जरी थोडी अस्वस्थ करणारी आहे.. सशक्त आणि संतुलित वाटली. सगळ्यांनीच कामे छान केलीयेत. भरत जाधवने जीव ओतलाय.. ऑल द बेस्ट पासून अनुभवलेला तो त्यांचा विनोदी अभिनय, सही रे सही सारख नाटक करून आता हा चित्रपट… (१०० टाळ्या:))
Hi भूमिका बघताना मला त्यांनी आजवरच्या मुलाखतीत सांगितलेले किस्से - त्यांची तरुणपणची परिस्थिती ते आता मिळालेले यश, आईवडिलांप्रति असलेली भक्तिवजा प्रेम ह्या सगळ्याची नकळत आठवण आली.. वाटलं ह्या वैयक्तिक अनुभवातून असा इतका जिवंत अभिनय साकारला गेला असेल.

नक्की बघावा असा.. आता थांबायचं नाय!!

छन्दिफन्दि
+786 तुम्ही छान लिहिले आहे.

सफाई कामगारांचे आयुष्य अस्वस्थ करणारे आहेच. पण तरी अंगावर येतील असे भडक प्रसंग चित्रपटात टाळले आहेत. गटारात उतरणे देखील किळसवाणे वाटणार नाही याची काळजी घेतली आहे. किंबहुना बरेच गोष्टी विनोदाच्या अंगानेच पुढे आल्या आहेत. बरेच वेळा प्रेक्षक थिएटरमध्ये अतिवास्तववादी बघायला जात नाही. यात तसे काही नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये.

तसेच अश्या कामगारांना सहानुभूती नको तर सन्मान द्या हा संदेश सुद्धा योग्य प्रकारे पोहोचवला आहे.

नवीन तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे तोटे हे या चित्रपटाच्या कक्षेत येत नाही त्यामुळे त्यात खोलवर शिरणे या चित्रपटात टाळले आहे हे तुम्ही बरोबर म्हणालात. पण त्याचवेळी शिक्षण आणि त्यातून येणारा आत्मविश्वास हा जो चित्रपटाचा मुद्दा आहे तोच यावर तोडगा आहे हा आशावाद सुद्धा दाखवला आहे.

चित्रपट ओटीटीवर येऊन सर्वांनी पाहिल्यावर आपल्यालाही खोलात चर्चा करता येईल.

----------

चित्रपट पाहिल्या पाहिल्या चार लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून वेळ मिळेल तसे पटकन लिहून काढले आणि मायबोलीवर धागा काढला.
आज हे मुद्दे वाढवून परीक्षणात भर टाकतो आणि इतरत्र प्रकाशित करतो.

+786>>> म्हणजे काय?
>>>>>
वेगळे असे काही नाही. अनुमोदन देताना +१ ऐवजी +७८६ लिहितो ईतकेच.
यामागचा ईतिहास ऑर्कुटवर आहे. तिथल्या कम्युनिटी मायबोलीसारख्याच होत्या. म्हणजे विविध विषयांवर धागे काढून चर्चा व्हायच्या. तिथे काही कटटर धार्मिक विचारांची लोकं होती. तर मी सर्वधर्मसमभाव मानणारा होतो. त्यांच्याशी माझे नेहमीच प्रेमळ वादसंवाद व्हायचे. याचे डिटेल पुन्हा कधीतरी स्वतंत्र धागा काढून देईन. तिथे मला "अमन की आशा" या नावाने ओळखले जायचे. तेव्हा मी हे +१ ऐवजी +७८६ सुरू केले होते. पुढे ती सवयच पडली.

धन्यवाद कुमार सर !

फेसबुकवरील सिनेमागल्ली ग्रुप वर आज हा रिव्ह्यू शेअर केला.

https://www.facebook.com/share/p/168oQTY2UN/

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली हे छान वाटले.

१२th फेल ऐवजी मला आधी सुपर 30 आठवला. पण त्याचा शेवट फार अचाट दाखवला होता.

पण दोन्हीतील मोठा फरक म्हणजे एकीकडे शिकण्याची इच्छा होती पण परिस्थिती नाही...
तर या चित्रपटात इच्छा निर्माण करण्यापासून सुरुवात होती.

चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली हे छान वाटले. >>>
हो ते करतात, आणि सोमि मुळे डायरेक्ट त्यांच्यापर्यंत कौतुक/ आनंद पोहचतो म्हणून चांगले वाटते. .
समीर चौगुले repost ही करतो.. त्याच्या busy schedule Mike अस वाटत की त्याने PR नेमला असावा. Happy

धन्यवाद..
जरूर बघ

ज्यांना शक्य आहे त्यांनी थिएटर गाठा. अन्यथा ओटीटी वर सर्वांनीच जरूर बघा. सर्वांनाच तो आवडेल आणि त्यावर आवर्जून इथे लिहावेसे वाटेल याची खात्री वाटते.

काल कोथरूड सिटी प्राईडला रात्रीचा शो बघितला. मस्त आहे. आवडला. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, प्राजक्ता हणमघर आणि सगळ्याच कलाकारांचा अभिनय छान. आशुतोष गोवारीकरचं कास्टिंग पर्फेक्ट.
पर्ण पेठे मला फार आवडत नाही, पण इथे जे काही मर्यादित काम आहे, ते तिला जमलं आहे. ओम भुतकरचा प्रश्नच नाही, तो जबरदस्तच काम करतो.
भरत जाधवला खूप दिवसांनी इतक्या सॉलिड भूमिकेत बघितलं. सिद्धार्थ जाधवलाही. 'शिक्षणाच्या आईचा घो'मधे ह्याच दोघांची अशी सॉलिड कामं आहेत.
अधूनमधून नाट्यमय प्रसंग आहेत, पण तेवढं चालतं.
चित्रपट संपल्यावर एक सरप्राईज म्हणजे स्वतः दिग्दर्शक शिवराज वायचळ आणि सिद्धार्थ जाधव थिएटरमध्ये आले होते. सिद्धार्थ जाधवने मागच्या रांगेत टोकाला बसून संपूर्ण चित्रपट पाहिला असं त्याने सांगितलं. तिसऱ्या आठवड्यात हाऊसफुलचा बोर्ड मराठी चित्रपटासाठी लागल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. नंतर सेल्फी वगैरे काढणं सुरू झालं.

दिग्दर्शक शिवराज वायचळ आणि सिद्धार्थ जाधव थिएटरमध्ये आले होते. सिद्धार्थ जाधवने मागच्या रांगेत टोकाला बसून संपूर्ण चित्रपट पाहिला
>>>>
हायला भारी.. इथे मुंबईत असे कुठल्या थिएटरमध्ये येत असावेत बघायला हवे.

बाकी आपला असा एखादा छान जमलेला चित्रपट बघून सर्वच लोकं प्रभावित होताना, भारावून जाताना बघणे, आणि त्या चित्रपटाचा हँगओव्हर असतानाच पब्लिकसमोर येणे, त्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवणे हा त्या दोघांसाठी सुद्धा छान अनुभव असेल.