
मनोज मोहिते
व्हर्जन वन
जावेद अख्तरांची एक कविता आहे, ‘गली बॉय’ या सिनेमात. शीर्षक, ‘दूरी’. रणवीर सिंग याने ती गायली आहे. संथ... सावकाश. मनाला धीर देत. मनाला सांभाळत. ‘म्हणायला जवळ आहोत, पण किती दूर आहोत. किती ही घालमेल आहे. तुझ्याशी दु:खही वाटून घेऊ शकत नाही. माझ्या क्षमतेच्या परेच ते. वाहते अश्रू पुसण्याचेही बळ ते नाही. ‘मै भी यही हूं, तुम भी यही हो, पर सच ये है, मै हूं कही, तुम कही हो...’
कहने को हम पास है पर
कितनी दूरी है
ये भी कैसी मजबूरी है
म्हणायला जवळ आहोत, पण किती दूर आहोत. अशी कशी ही घालमेल...
म्हणायला जवळ पण आहोत दूर! अंतराचे मोजमाप करता येते. इतकी क्षमता साधली आहे आपण. पण, प्रत्येक अंतराचे मोजमाप करता येत नाही. दूरचे अंतर हे अंतर असतेच, जवळचे अंतरही अंतर असते. हे जवळचे अंतर, खूप दूरचे असू शकते. हा दुरावा काहींना कळतो. अनेकांना नाही. कित्येकांचा तो कळवून घेण्यात कितीकसा काळ निघून जातो. हाती काही लागत नाही. अस्वस्थतेचा हा सारा काळ. दीर्घकाळ. ही अस्वस्थता कधी संपणार, ठाऊक नाही. ठाऊक नाही, म्हणून पुन्हा अस्वस्थता. लेअरवर लेअर. या लेअरही अगदी जवळ. पण तरीही दूर. एकमेकांना चिटकून, तरीही नकोसा तो दुरावा. ‘कितनी दूरी है... ये भी कैसी मजबूरी है...’
एक ही मजबूरी. अवस्थेला चिटकून बसलेली. असहाय्यता. सांगूनही काय सांगणार आणि न सांगण्यात किती अर्थ दडलेले असणार. या अर्थापर्यंत जायचे कसे? पोहोचणार कोण? ती की तो? कुणी पुढाकार घ्यायचा, पैकी कुणी आपले कान आसुसले ठेवायचे. कुणी... कुणी! पुन्हा तीच घालमेल. तेच अंतर. जवळ असूनही पुन्हा दूर. ‘ये भी कैसी मजबूरी है...’
तो आणि ती. या दोघांची एक होण्याची ही धडपड. परिस्थिती विपरीत. जवळचे असे जाणवणारे फार नाही. किंबहुना नाहीच. नसण्यातून असण्याकडे जाण्याचा हा प्रवास. यातलेच एक ‘ट्रेन साँग’. ‘जीवन जीवन, दरिया दरिया, एक जो पार करों, दूसरा दरिया मिले...’ संकटे चुटकीसरशी संपत नाहीत. त्याने आणि तिने काय करावे? कसे परिस्थितीला सामोरे जावे? ‘कहने को हम पास है पर...’
व्हर्जन टू
जावेद अख्तरांची एक कविता आहे, ‘गली बॉय’ या सिनेमात. शीर्षक, ‘दूरी’. जावेदसाहेबांच्या या कवितेत डिव्हाइनचे रॅप आहे. हे रॅप रणवीर सिंग याने गायले आहे. आता यात तडफ आहे. तडप आहे. कविता बेस आहे आणि रॅप पाया. हा अख्खा सिनेमा एका सामान्य मुलाची रॅपर होण्याची कहाणी आहे. यात खूप गाणी आहेत. खूप म्हणजे अठरा. एकूण सेहेचाळीस मिनिटे अडतीस सेकंदांचे हे ट्रॅक्स. यातच ‘दूरी’ कविता. एक मिनिटे पाच सेकंदांची. यातच ‘दूरी’ रॅप. दोन मिनिटे पंधरा सेकंदांचे. रिशी रिच याने संगीतबद्ध केलेले.
‘कुणी मला सांगेल का, का हा दुरावा आहे, का ही घालमेल? काय आहे या जगाची गोष्ट, कुणाच्या हाती कुणाची सूत्रे आहेत? उजवीकडे इमारती आकाशाला भिडताना, डावीकडे मुलगी रस्त्यावर निजत आहे. एका जगात दोन जग; एकीकडे उजेड, अंधार दुसरीकडे आहे...’
घर पे सबके अपने अपने ग़म है
दीवारें ज्यादा और बोले कमरे यहां कम है
सोच में ये वजन है क्यों कि खाली सब बर्तन है
मेरा कर्मा या करम है
अब तो तोड़ा ये भरम है
कविता आणि रॅप येथे ही अशी एकत्र आली आहे. दोन प्रवाह एकत्र आले आहेत. कविता विद्रोहाचीही असते. रॅपसारखी. रॅप विद्रोहाचा आवाज असतो कायम. ही कविता विद्रोहाची नाही. यात तो आणि ती आहे. या दोहोंतला तो दुरावा आहे. ती दूरी आहे. एकत्र येण्याची तीव्र ओढ आहे, पण जगाला सध्या मंजूर नाही.
जगाला बरेच काही मंजूर नसते. जगात बरेच काही मंजूर नसते. या अशा दोन वाक्यांतला, दोन संदर्भांतला, दोन परिस्थितींतला अर्थभेद रॅप कायम सांगत आले आहे. विरोधाभास मांडत आले आहे. कवितेचा प्रवाह उघडसा वाहणारा. रॅपचा प्रवाह प्रवाहाच्या तळाशी आपला नवा रस्ता तयार करीत करीत स्वत:ला पुढेसा रेटणारा. रॅपच्या प्रवाहाला उसळायचे आहे. घुसमटीचा गळा आवेगात आवळायचा आहे. स्वत:ला मुक्त करायचे आहे. बंधमुक्त. मनमुक्त.
कोई मुझको ये बताए क्यू ये दूरी और मजबूरी?
इस दुनिया की क्या है स्टोरी
किसके हाथ मे इसकी डोरी
या उद्वेगाच्या मुळाशी जावेदसाब यांची कविता आहे. त्यात डिव्हाइनने दाभणीने रॅप विणला आहे. डिव्हाइन आजच्या घडीचा भारताचा महत्त्वाचा रॅपर आहे. जावेदसाब हे जावेदसाब आहेत. कवितेत तो आणि ती आहे. या दोहोंतल्या जवळीकतेत न मोजता येणारे अंतर आहे. या अंतरातून निर्माण होणारी घुसमट आहे. हा दुरावा मोठाच जीवघेणा आहे. विरोधाने दाटून भरलेल्या भवतालात घुसमट आहे. कवितेला आधार घेऊन लिहिलेल्या रॅपमध्ये भवताल आहे. या भवतालात आपल्याला बघायच्या नसलेल्या गोष्टी आहेत. जवळच आहे सारे, तरी आपण धरलेला झापडदुरावा आहे.
जावेदसाब, डिव्हाइन आणि ‘दूरी’ ही अशी एकत्र वाट आहे. एकमेकांचा एकमेकांशी आंतरिक संघर्ष आहे. जवळ असूनही दूर आहे, तरीही जवळ आणण्याचा-येण्याचा सोस आहे. गायक नसलेल्या रणवीर सिंग याने ती नस पकडली आहे. तो ‘गायला’ आहे. तो हा सिनेमा ‘जगला’ आहे. रॅपचा पेस वेगळा असतो. त्यात एक वेग असतो. हा वेग ‘गली बॉय’ने धरून ठेवला आहेच!
आवडला लेख. "या उद्वेगाच्या
आवडला लेख. "या उद्वेगाच्या मुळाशी जावेदसाब यांची कविता आहे. त्यात डिव्हाइनने दाभणीने रॅप विणला आहे." हे मस्त लिहिलय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
गली बॉय जेव्हा आलेला तेव्हा "अपना टाइम आयेगा" जास्त फेमस झालं होतं माझंही फेवरेट आहे पण बाकीची गाणीही चांगली होती ,नीट ऐकायला हवी.खरंतर गली बॉय पिच्चर परत बघायला हवाय दुरी कवितेसह, असं हा लेख वाचल्यावर वाटतंय.