चुटपुट लावून गेलेली आठवण..(पु. ल. देशपांडे)

Submitted by हरिहर. on 11 September, 2018 - 08:46

(व्यक्तिचित्रण स्पर्धेचा मजकुर वाचून हे लिहावे वाटले.)
पुलं.jpg

तसं माझं लग्न दहावीला असतानाच ठरलं होतं म्हटलं तर वावगं होणार नाही. ठरलं होतं म्हणजे आमचं दोघांचंच ठरलं होतं. पुढे कॉलेजला असताना घरच्यांना थोडी कुणकून लागली होती पण त्यांची एकूणच प्रतिक्रिया पहाता त्यांचा फारसा विरोध नसावा हेही स्पष्ट झालं होतं. फक्त दोघांच्याही घरुन ‘अगोदर शिक्षण पुर्ण करा मग पाहू’ अशी अट घातली गेली होती. अर्थात त्यांनी नसतेही सांगीतले तरी आम्हादोघांचे ‘अगोदर पदवी’ मग लग्न हे ठरलंच होतं. दोघांनीही डिप्लोमा पदरात पाडून घेतला पण डिग्रीची ओढ दोघांनाही गप्प बसू देत नव्हती. पण आता परिस्थिती उलट झाली होती. घरचे लग्नासाठी मागे लागले होते. तिच्या घरचे तर जरा जास्तच. कारण आम्हा दोघांच्याही वयात फार तर दोन-तिन महिन्यांचेच अंतर होते. त्या काळाप्रमाणे तिच्या वडिलांना थांबणे अयोग्य वाटत होते. त्यामुळे दोन्ही घरुन “लग्नाचं पहा अगोदर. शिक्षण काय, आयुष्यभर सुरुच असते.” अशा सुचना सुरु झाल्या होत्या. त्यावेळी होस्टेलचं फारसं प्रस्थ नव्हते. अगदीच नाईलाज असेल तर होस्टेलचा विचार केला जाई. ॲडमिशन घ्यायच्या वेळी नातेवाईक ज्या शहरात असतील त्या शहराला प्राधान्य दिले जाई. (काका, मामा, मावशी आनंदाने शिक्षणासाठी मुलं ठेऊन घेत त्या काळी.) त्यामुळे तिने मुंबईला आणि मी पुण्याला ॲडमिशन घेतले. पुण्यात लहानपणापासूनच येणेजाणे असल्याने मला घरीच आल्यासारखे वाटले.

मी पुण्यात चांगलाच रमलो होतो. ते वयच वेडेपणा करायचं, झपाटून जायचं असल्याने आठवडाभर सपाटून अभ्यास आणि शनिवार रविवार दोघांनी सिंहगड, पुरंदर अशी पुण्याजवळची ठिकाणे पालथी घालायला सुरवात केली. लग्नानंतर कळालं की पाऊस रिपरीप पडतो. पण त्यावेळेस तो रिमझीम पडायचा. थंडीही कडाक्याची न पडता गुलाबी पडायची. एकूनच दिवस मखमली होते. एकमेकांच्या आवडीनिवडी पुरवण्यात कोण आनंद वाटायचा. मखमली दिवस फुलपाखरासारखे उडाले. दोघांनीही उत्तम मार्कांनी डिग्री मिळवली. पण मी स्कल्पचरला ॲडमीशन घेतले. म्हटलं निदान वर्षभर करु. मग आहेच जॉब किंवा व्यवसाय. लग्न वर्षभर लांबल्याने तिनेही मुंबईतच जॉब पाहीला आणि मीही मातीत रमून गेलो.

पावसाळा नुकताच सरला होता. निसर्ग खुलला होता. या शनिवार-रविवारी कोकणात उतरायचा प्लॅन होता. ती शनिवारी सिंहगडने पुण्यात पोहचली. पण तिला काही कामासाठी गावी जायचे असल्याने कोकण बारगळले. हातात फक्त शनिवारच असल्याने मग पानशेतला गेलो. चारपर्यंत भटकून, धाब्यावर जेवन उरकून पुण्यात पोहचलो. तिची तुळशीबागेतली किरकोळ खरेदी उरुकन तिला एसटी स्टॅंडवर सोडायला गेलो. बसला अजुन अर्धातास वेळ होता. त्यामुळे तेथेच गप्पा मारत बसलो.
बोलता बोलता तिने मधेच विचारलं “तुझी आणि पुलंची ओळख आहे ना रे?”
“हो, कागं?”
“माझं छोटसं काम करशील?”
“हो, सांग की.” मी तोंडभरुन होकार दिला तरी टेन्शन आलंच. पोरींचा काही भरवसा नाही, कधी काय मागतील सांगता येत नाही.
तिने पर्समधून पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ बाहेर काढले आणि म्हणाली “प्लिज, यावर पुलंची सही घेशील. मी मैत्रीणीला प्रॉमीस केलय तसं.”
माझा जीव भांड्यात पडला. “ह्या! एवढच ना. दे पुस्तक. पुढच्या शनिवारी येशील तेंव्हा सही झालेली असेल.”
तिने डोळे मोठे करत इतक्या कौतुकाने आणि अभिमानाने माझ्याकडे पाहीले की काय सांगू? तिच्या अश्या एका कटाक्षासाठी मी पुस्तकावरच काय पुस्तकाच्या प्रत्येक पानावर भाईंची सही घ्यायला तयार झालो असतो.(लग्नाअगोदरचा बावळटपणा हो, दुसरं काय?)

मी तिला गाडीत बसऊन दिले आणि रुमवर आलो. सवयीप्रमाणे सही घ्यायचे विसरुन गेलो. त्यादिवशी गावावरुन मित्र यायचा होता मला भेटायला. त्यामुळे त्याला आणायला कॉलेजवरुन सरळ एसटी स्टॅंडवर गेलो. पाच दहा मिनिटात गाडी आली. मित्र नेहमीप्रमाणे दोन्ही हातात भरपुर पिशव्या घेवून गाडीतुन उतरला. हा खुप जिवलग मित्र माझा. शाळेचे अन् याचे पटले नाही की गुरुजींशी ते त्यालाच माहित पण सातवीतून याने शाळेशी, सगळ्या गुरुजनांशी फारकत घेतली आणि वडीलांबरोबर शेतात नांगर धरला. आताही त्याच्या हातात असंच गावाकडून आणलेली भाजी भाकरी, इतर खाऊ, खरवस, लाडू, मध असं काही बाही असलेल्या पिशव्या होत्या. मला पाहूनच त्याला इतका आनंद झाला की भर स्टॅंडवरच त्याने भरतमिठी मारली. मलाही आनंद झाला होता. पण त्याने मिठी मारताच मला ‘भावी पत्नीने सोपवलेले’ काम आठवले. कंबख्तको भी किस वक्त खूदा याद आया.
“च्यायला, मेलो आता.” म्हणत मी मित्राला पिशव्या उचलायला घाई केली.
मित्र गोंधळून म्हणाला “कायरं, पुन्यात मिठ्या मारत नाय का कुनी दोस्ताला?”
“तू बस रे गाडीवर पटकन. रुमवर गेल्यावर सांगतो सगळं.” म्हणत मी बाईक एसटी स्टॅंडबाहेर काढली.

रुमवर पोहचलो. पुस्तक सॅकमध्ये टाकले. मित्राने आणलेला चिवडा थोडा थोडा खाल्ला आणि पटकन निघालो. खरं तर मध्ये थांबून भाईंना फोन करायला हवा होता ‘येतोय’ म्हणून पण टाळले. कॉलेजच्या आणि इतर बिनकामांच्या उद्योगांमुळे मी मालती-माधवला जवळ जवळ चार पाच महिने चक्कर मारली नव्हती. मध्ये ताईंनी निरोप पाठवला होता “भाईची तब्बेत बरी नाहीए” म्हणून पण त्यावेळीही काही तरी कामाच्या नादात राहूनच गेले होते. तसे दोन तिन वेळा फोन केला होता पण प्रत्येक वेळी भाई कसल्या ना कसल्या कामात असल्याने ताईच फोनवर आल्या होत्या त्यामुळे भाईंशी बोलणे झालेच नव्हते. मग आता कोणत्या तोंडाने फोन करणार होतो की ‘येतोय’ म्हणून. उशीर झाला होता. अभिनव चौकातून फुलांचा बुके घेतला, काही फळे घेतली आणि मग कुठेही न थांबता सरळ भांडारकर रोड गाठला. मित्राचे सारखे चालले होते “अरं पन चाल्लोत कुठं ते तं सांग.” पण त्याला काय सांगणार. गुरुजींनी ‘नको वैताग’ म्हणत याला वरच्या वर्गात चढवत चढवत सातवीपर्यंत आणला होता. नंतर यानेच ‘गुरुजींना दिला तेवढा त्रास खुप झाला आता हायस्कूलमधे सरांना वैताग नको’ म्हणत शाळाच सोडली होती. दोनशे पानांच्या पुस्तकाला तो ग्रंथ म्हणायचा. एव्हढं वाचून काय मिळतं तुमाला? असं विचारायचा. त्याला पुलंविषयी सांगून कुठं हसं करुन घ्यायचे, म्हणून त्याला “तू गप बस रे, अर्धा तासाचे काम आहे फक्त” म्हणत त्याला चुप करत होतो.

गाडी कशीबशी रस्त्यावरच लावली आणि मित्रासोबत मालती-माधवमध्ये घुसलो. पहिल्याच मजल्यावर भाईंचा फ्लॅट होता. मित्राला तोंड बंद ठेवायची सुचना देऊन मी बेल वाजवली. बेल वाजणार आहे हे अगोदरच माहीत असावे इतक्या पटकन काम करणाऱ्या बाईनी दार ऊघडले. तिच्या चेहऱ्यावर “आता कोण आलं?” असे भाव पाहून लगेच लक्षात आलं अगोदर कुणीतरी येऊन गेलं असणार. मी आत येऊन सोफ्यावर बसलो. मित्र आरामात सोफ्यावर टेकला. “कोणे गं?” म्हणत ताई बाहेर आल्या.
त्यांनी मला पाहील्यावर “आज वेळ मिळाला का तुला, की रस्ता चुकलास बाबा?” म्हणत पाणी आणायला सांगीतले. मी कसंनुसं हसलो.
माझं अवघडलेपण पाहून ताईच हसुन म्हणाल्या “अरे, होणारी बायको आणनार होतास ना दाखवायला? की केलं परस्पर लग्न?”
“नाही अजुन. असं कसं लग्न करेन तुम्हाला न सांगता?” मी जरा लाजतच म्हणालो.
“मग काही काम काढलय का?”
“नाही हो ताई. काम कसलं. आज सकाळपासुन भाईंकाकांना भेटावं वाटत होतं म्हणून आलो, इतकच.”
“बस थोडा वेळ. भाई बातम्या पहातायेत. येतील बाहेर इतक्यात.” म्हणत ताई उठून आत गेल्या. बुके आणि फळांची करंडी सोफ्यावरच राहीली. मला आश्चर्य वाटलं. मी जेंव्हा जेंव्हा मालती माधवला आलो होतो तेंव्हा तेंव्हा ताईंशी चार शब्द बोलून सरळ भाईंच्या खोलीत जायचो. बरेचदा ते हॉलमध्येच बसलेले असायचे. पण आज भाई हॉलमध्येही नव्हते आणि ताईंनी मला आत जावू न देता “बस थोडा वेळ” म्हणत बाहेरच थांबवलं होतं. मित्राची चुळबूळ सुरुच होती. आता मलाही अस्वस्थ झाल्यासारखं झालं. पाच दहा मिनिटेही मला तासाभरासारखी वाटली. इतक्यात ताई भाईंची व्हिल चेअर ढकलत बाहेर आल्या. हसल्या. मग त्यांनीच भाईंच्या तब्बेतीची माहीती सांगीतली. भाईंच्या फक्त डोळ्यात हालचाल दिसत होती. बाकी शरीराची फारशी हालचाल होत नव्हती. बोलणंही बंद होतं. मी नकळत उभा राहीलो. आवाक होऊन भाईंकडे पहात राहीलो. रस्त्यावरुन चालताना कल्पना नसताना पायाखाली खड्डा आल्यावर सगळ्या शरीराला जसा झटका बसतो तसा झटका मला बसला होता. मी गुडघ्यावर बसुन व्हिलचेअरच्या दांडीवर हात ठेवत विचारलं “कसे आहात भाईकाका?” खरं तर अत्यंत निरर्थक प्रश्न. पण मी मलाच अजुन सावरू शकलो नव्हतो. भाईंचं असं काही रुप कधी काळी पहावे लागेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझा प्रश्न त्यांच्या कानावर पडला होता की नाही माहीत नाही. बहुतेक त्यांना काहीतरी बोलायचं असावं पण त्यांच्या डोळ्यांची फक्त केविलवाणी हालचाल झाली. आम्हा मित्रांना त्यांची ‘बटाट्याची चाळ’ अक्षरशः मुखोद्गत होती. अगदी संगीतकासकट. चाळीची व्हिडीओ कॅसेट आम्ही अगदी उगळली होती पाहून पाहून. भाईंची असंख्य रुपे डोळ्यापुढे येऊन गेली. ज्यांच्या घरी शब्द पाणी भरायचे त्यांच्या तोंडून एक शब्द ऐकायला जीव व्याकूळ झाला. ज्या जिभेवर सरस्वती ‘माहेरवाशीन पोरी’सारखी अवखळपणे खेळायची ती जीभ आता हलायलाही तयार नव्हती.
माझी अवघडलेली स्थिती सुनिताताईंच्या लक्षात आली. त्यांनी वेगळा विषय काढत विचारलं. काय आणलय रे? मी “काही नाही” म्हणत पुस्तक लपवलं. पण ते त्यांच्या लक्षात आलं. “सही हवीय की काय तुला? तू कधी पासून सह्या गोळा करायला लागला?” असं म्हणत त्यांनी पुस्तक मागीतलं. मी दिलं.
म्हणाल्या “मी पहाते, जमली तर करतील संध्याकाळी. नाहीच केली तर माझी चालेल ना?”
मी कसाबसा हसलो. मी अजून सगळ्यातून बाहेरच आलो नव्हतो. माझे डोळे सारखे भरुन येत होते. ताईंपुढे रडायचीही सोय नव्हती. मी बाहीने डोळे पुसत सोफ्यावर बसलो होतो. मित्र गोंधळला होता. काय चाललय हे त्याला काहीच समजत नव्हते. ताई काहीतरी ‘सरबत घेणार का?’ असं विचारीत होत्या. त्यांचा आवाज मला अगदी दुरुन यावा तसा ऐकायला आला. मी काय करतोय हे मलाच समजायच्या अगोदर मी ऊठलो आणि पंढरपुरच्या पांडूरंगाचे धरावेत तसे भाईंचे पाय धरले. दंडवत घातला आणि झपाट्याने चप्पल घालून बाहेर पडलो. खाली रस्त्यावर मित्राची वाट पहात थांबलो. तितक्यात तोही आला.
त्याने विचारलं “कोणी बाबा आहेत का रे हे? त्याच्या या प्रश्नावर मी एकतर खुप हसलो असतो नाहीतर रागावलो तरी असतो. पण मी त्याला म्हणालो “हो फार मोठे सत्पुरुष आहेत”
तो म्हणाला “चला, बरं झालं. तुझं पाहून मिही पाया पडलो ते”

दोन दिवसांनी ताईंचा निरोप आला. पुस्तक घेऊन जा म्हणून. सकाळी लवकर गेलो. दारातूनच पुस्तक घेतलं. येईन परत म्हणत मागे फिरलो. रुमवर येऊन पाहीलं तर पहिल्याच पानावर लाल स्केचपेनमधे भाईंची वेडीवाकडी सही होती आणि त्या खाली सुनिताताईंची निळ्या पेनमधे. अशा अवस्थेतही भाईंनी मला नाराज केलं नव्हतं.

दोन दिवसांनी मी एका वर्कशॉपच्या निमित्ताने पुणे सोडलं. आता महिनाभर तरी पुणे दिसणार नव्हतं. दहा बारा दिवस झाले असतील. सोमवार होता. रविवारचा कंटाळा अजुन गेला नव्हता. मित्राचा फोन आला “भाई गेले”
मला पुण्याला लगेच निघनं शक्य नव्हतं. एकच विचार मनात आला “भाई तुमचं ते हसरं, मिश्कील, रुपडं मनात ठसलं होतं तेच बरं होतं. का अशा अवस्थेत भेटलात?”

(फोटो आंतरजालावरून.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, उत्तुन्ग आहे तुमच लिखाण.
पुलप्रेमी आहात, त्यांना भेटला आहात म्हणजे मोठे व्यक्तिमत्व आहात तुम्ही!
ओळख ठेवा Happy
बाकी काय बोलु अजुन, ही आठवण मनाला भिडली Happy

Sad तुमची त्यावेळी काय अवस्था असेल ते तुम्हालाच माहीत. पण त्या दोघांच्या मनाचा मोठेपणाच सर्व काही बोलुन जातो.

लिखाणाबद्दल बोलायचं तर नेहमीप्रमाणे तुमच्या शैलीत छान लिहिलंय अगदी! Happy प्रसंग अगदी डोळ्यासमोर मांडला जातोय , अगदी जिवंत उतरलाय! Happy

हा प्रसंग अगदी भिडला मनाला. शब्दांवर आपलं अधिपत्य गाजवणारे पु.ल. अशा अवस्थेत पाहून तुम्हाला झालेलं दुःख कळून येतंय!

मला शब्द सुचत नाहीयेत प्रतिसाद द्यायला. तर तुमची अवस्था काय असेल? समजू शकतो.
-एक पुलप्रेमी.

वाचता वाचता डोळे भरून आले! माझे आईवडील पु. लं ना त्यांची तब्येत बरी नसताना भेटले होते. तेव्हा पु. लं माझ्या बाबांचा हात हातात घेऊन थरथरत्या आवाजात फक्त "सॉरी" एवढंच बोलले. हा प्रसंग मला बाबांनी फोनवर सांगितला तेव्हा मला ते ऐकून अश्रू आवरता आले नाहीत. तुम्ही तर त्यांना प्रत्यक्ष भेटलात. तुमची काय अवस्था झाली असेल!

लकी यू Happy पण वाचुन तुटलं आतुन Sad

तुम्ही कसे ओळखायचात त्यांना? काय नातं होतं? जमलं तर सांगा.

मला देवाच्या गोष्टी वाचायला फार आवडतात

एक सांगू का, एवढ्या मोठया माणसांचं मोठेपण आपल्याला दिसून आलं या प्रसंगातून , या आठ्वणीला नकोशी आठवण नका म्हणू. ही आठवण तुम्ही विसरू शकणार नाही कधीच. जमलं तर फोटो टाकाल का त्या पुस्तकाचा?
पाणी आलं डोळ्यात वाचून.

सगळे प्रतिसाद सुंदर आणि मनापासून दिलेले आहेत. पुलं ची किमया !
रिया तुझी शेवटची ओळ खूप आवडली ग।

किल्ली, गोल्डफिस, रश्मी, Namokar, भुत्याभाउ, जुई, पाफा सगळ्यांचेच आभार!

जिज्ञासा, तुमची आठवण खुप हळवी करणारी आहे.

रीया, वसंतराव शिंदे (चित्रपट कलाकार. भाईंच्या 'तुका म्हणे आता' या नाटकात त्यांनी काम केले होते.) यांच्याबरोबर माझे फार जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे प्रथम भाईंची आणि माझी ओळख झाली.

वेडोबा, त्या पुस्तकावर मी पत्नीच्या आग्रहावरुन सही घेतली होती. तिला ते तिच्या मैत्रीणीला द्यायचे होते. ती सही बहूधा भाईंची शेवटची सही असावी. अजुन एक आठवण. त्याच दरम्यान व्यक्ती आणि वल्लीवर (बहुतेक) दै. सकाळ मधे एक लेख आला होता. त्यात प्रत्येक वल्लीचे कॅरीकेचर होते. मी ते कॅरीकेचर्स कापून पुस्तकात चिकटवले होते. त्याचे सुनिताताईंनी फार कौतुक केले होते. मी ते पुस्तक परत मिळवायचा प्रयत्न केला पण पत्नीला आणि तिच्या मैत्रीणीलाही त्या पुस्तकाची फारशी किंमत न कळाल्याने ते मिळू शकले नाही. माझे दुर्दैव.

लिहलंय छानच.
रिया +१
हे वाचून असं वाटतंय की काश मै शाली होता मी पण त्यांना भेटलो असतो. फार म्हणजे फार नशीबवान आहात तुम्ही Happy

मला शब्द सुचत नाहीयेत प्रतिसाद द्यायला. तर तुमची अवस्था काय असेल? समजू शकतो. >>>>> +999

खूपच जिवलग मैत्रीण असेल की जिच्यामुळे तुमच्या बायकोने तुम्हाला इतका आग्रह करून या प्रसंगात टाकले.
फार राग आला असेल ना त्या मैत्रिणीचा तुम्हाला ☺️

लकी यू Happy पण वाचुन तुटलं आतुन Sad>>> अगदी अगदी ...आणखी काय लिहावं सुचतच नाहीय.

आणि हा मित्र म्हणजे मैत्र मधले दत्तूकाकाच वाटले...

मला शब्द सुचत नाहीयेत प्रतिसाद द्यायला. तर तुमची अवस्था काय असेल? समजू शकतो. >>> खरय

ओह Sad

छान वाटलं वाचुन..तुम्हाला त्यांची सही मिळाली ते.
पण त्याला नकोशी आठवण का म्हणता?
नवीन Submitted by Chaitrali on 12 September, 2018 - 16:41
>>>>>>>
१. भावनिक गुंतवणूक जी कधीही भरून निघणार नाही.
२. मनाला लागलेली बोचणी. सुनीताबाईंनी निरोप पाठवूनही भेटायला गेले नाहीत.

शालीजी तुमच्या वतीने तुमच्या परवानगी शिवाय मला जाणवलेले उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. राग नसावा.

किंवा त्यांनीच लेखाच्या शेवटी उत्तर दिलंय -
“भाई तुमचं ते हसरं, मिश्कील, रुपडं मनात ठसलं होतं तेच बरं होतं. का अशा अवस्थेत भेटलात?”

हे खुप खरं आहे, माझी आजी गेली तेंव्हा मी तिच्या जवळ नव्हते त्यामुळे मला कायम चालती फिरती, बोलणारी आजी आठवते. पण हेच माझ्या बहिणीने आजीचं तिच्या शेवटच्या दिवसांमम्धे सगळं केलं होतं त्यामुळे तिला आजीचं तेच रूप आठवतं आणि तिला आजीच्या जाण्याचा , नसण्याचा त्रास माझ्यापेक्षा जास्त होतो.

शालींना काय म्हणायचंय ते मला अगदी पोहचतंय.

वेडोबा Happy खरं आहे की नाही?

@रिया बरोबर आहे. आपल्या अगदी जवळच्या माणसाना हतबल अवस्थेत बघणं असह्य होऊन जातं. पण त्यातही भाई आणि सुनीताताईंचं मोठेपण आणखी एकदा कळलं म्हणून नकोशी म्हणू नका असं वाटलं। आणि अजून एक कि शीर्षक बदलल तर जास्त वाचकापर्यँत लेख पोचेल असं मला वाटतं।

तुम्ही पुलंना भेटला होतात, त्यांच्याशी बोलला होतात कसले ग्रेट आहात तुम्ही.
सॉरी बाकीचा लेख वाचलाच नाही. त्याची प्रतिक्रिया नंतर देते.

खरंच वेदनादायक आठवण आहे शालीजी.
आपल्या जवळच्या व्यक्तीला अश्या अवस्थेत बघून खूप त्रास होतो हे खरंय.पण त्यावेळी भेटून आलात म्हणून तुमची शेवटची भेट तरी झाली असा विचार करा ना.

Pages