......... सायको........

Submitted by मिलिंद महांगडे on 4 January, 2012 - 02:10

होस्टेलच्या आमच्या रूमवर अभय आला तेव्हा प्रथम तर मी त्याला ओळखलाच नाही ... त्याचा डावा डोळा काळानिळा पडला होता , उजवा गाल लाल झाला होता . केस विस्कटलेले , उजव्या बाजूचा शर्ट मळलेला .....
-- " काय रे ..? हे काय...??" मी त्याला काळजीने विचारलं तर तो सांगायला तयारच होईना .... त्याच्या निळसर डोळ्यातून पाणी आल्यासारखं वाटलं मला....
-- " अरे काय झालं ते तर सांगशील..... " दिप्या , माझा रुमपार्टनर त्याला म्हणाला . मी दिप्याला डोळ्यांनीच शांत राहा असं खुणावलं आणि अभयला पाणी प्यायला दिलं.
-- " रणपिसे सरांनी मारलं ... मी लेक्चरमध्ये खिडकीतून बाहेर बघत होतो म्हणून...." अभयने खुलासा केला....
-- " काय ...? रणपिसेने मारलं.....?? साला हरामखोर ..... बघू कुठे लागलंय....? आईशप्पथ ...!! " म्हणत दिप्या त्याचा डोळा निरखू लागला....
-- " च्यायला त्या रणपिसेच्या ....थोडक्यात वाचला , नाहीतर डोळा गेला असता कि रे ह्याचा ....! " मलाही राग आला होता.
-- " हे आता अति झालं सालं.... ह्या रणपिसेचं काहीतरी केलंच पाहिजे...." दिप्या निर्धाराने बोलला...
-- " काय करणार रे त्या राक्षसाचं...?? " मला तर काहीच सुचत नव्हतं....
-- " आता एकच उपाय ......-- वध......"
दिप्याचं हे अशा प्रकारचं उत्तर येण्यामागे त्यासंबंधीची पार्श्वभूमीही होती .
रणपिसे सर वर्गात आले कि सगळा वर्ग एकदम चिडीचूप ...! इतका शांत कि टाचणी पडली तरी आवाज येईल... त्यांचा दरारा होताच तसा ....दररोज कुणाला न कुणाला धोपटल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नसे . हा माणूस मुलगा , मुलगी काही बघत नसे .... मागे एकदा त्यांनी एका मुलीच्या कानफटात मारली . तिच्या कानाला बरीच मोठी इजा झाली ...... त्यानंतर तिच्या पालकांनी कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली पण रणपिसेला फक्त ताकीद देऊन सोडण्यात आलं.... का कुणास ठाऊक ...?? विद्यार्थ्यांबद्दलच त्यांना राग होता असे नाही तर इतर शिक्षकांशीही ते तुसडेपणाने वागत . रणपिसे हा इतका भयानक माणूस होता कि तो नुसता दिसला तरी लोकांचा दिवस खराब जायचा. एक प्रकारच्या प्रतिकूल लहरी त्या माणसापासून निघत असाव्यात , त्यामुळे हा माणूस दिसू नये अशीच सगळे जण प्रार्थना करत..... रणपिसे सरांबाबत एक आख्यायिका सबंध कॉलेजभर प्रसिद्ध होती , ती म्हणजे काही वर्षापूर्वी कॉलेजच्या एका मुलाचं आणि रणपिसे सरांच्या बहिणीचं प्रेम प्रकरण होतं. हे जेव्हा त्यांना कळल तेव्हा त्यांनी त्या मुलाला ताकीद दिली , पण त्या मुलाने काही ऐकलं नाही . त्यानंतर एका रात्री तो होस्टेल बाहेर पडला तो पुन्हा आलाच नाही. असं म्हणतात कि रणपिसेने त्याला मारलं आणि त्याचं प्रेत कॉलेजच्या ग्राउंड मध्ये पुरलं , खरं काय आणि खोटं काय, देवालाच ठाऊक ...!
पण हे इतकं जरी खरं असलं तरी रणपिसेचा वध वगैरे करण्याचा दिप्याचा विचार मला जरा अतिरंजीतच वाटला ... कदाचित दिप्यानेही कधीतरी त्याच्या हातून मार खाल्ला असणार..... पण काहीही झाल तरी आम्ही सामान्य विद्यार्थी होतो , कोणी खुनी, सीरिअल किलर वगैरे नव्हतो... आम्ही करून करून काय करणार......??
-- " दिप्या हे तुझं जरा जास्तच होतंय बरं का....." मी त्याला म्हणालो....
-- " जास्त माझं नाही.... त्या नराधमाचं झालंय .... आता त्याला बघतोच मी....." दिप्या इरेलाच पेटला होता.... तो वर चढून कपाटावर काहीतरी शोधू लागला....त्याच्याशी आत्ताच बोलून काही फायदा नाही असं मला वाटलं... मी अभयला त्याच्या रूम वर जाऊन आराम करायला सांगितलं. तो निमुटपणे निघून गेला. बिचारा अभय ...! कॉलेजमधला ज्युनियरच्या वर्गातला सगळ्यात गोंडस मुलगा... गोरा वर्ण , तांबूस केस , निळसर डोळे ह्यांमुळे तो कोणीतरी युरोपियनच वाटायचा ... आणि ते काही अंशी खरंही होतं... एकदा बोलता बोलता त्याने सांगितलं कि त्याच्या आजोबांनी एक युरोपियन बाईशी लग्न केलं होतं ... त्यांचेच काही जीन्स अभय मधेही उतरलेले दिसत होते. सुरुवातीला कॉलेज मध्ये आल्या आल्या तर मुलांऐवजी सिनियर मुलींनीच त्याची रागिंग घेतली होती. काही जणींनी तर खोटं खोटं त्याला प्रपोजही केलं .....तो इतका लाजला कि त्यानंतर तो २-३ दिवस कॉलेजलाच आला नाही .... अशा शांत , पापभिरू मुलाला त्या राक्षस रणपिसेने क्षुल्लक कारणावरून गुरासारखं मारलं होतं , साहजिक कुणालाही राग येईलच....
-- '' माधव , हे बघ ..." दिप्याच्या बोलण्याने माझी विचार साखळी तुटली ... तो एक पुस्तक दाखवत होता....
-- " हं..... काय आहे हे ...? कसलं पुस्तक....?? " मला काही कळेना....त्याने ते पुस्तक माझ्या हातात दिलं , नाव होतं , ' द परफेक्ट मर्डर '
-- " हि गोष्ट फक्त आपल्या दोघातच ठेवायची ....आता बघ मी काय करतो ते ..... रणपिसे, तू तर गेलासाच आता...!! " दिप्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक आली होती..... सायको लोकांच्या डोळ्यात असते तशी .....
-- " दिप्या तुझं डोकं फिरलंय वाटतं...."
-- " अरे हट्ट.... ह्या कॉलेजला लागलेलं हे रणपिसे नावाचं ग्रहण आता मीच सोडवणार..." ते पुस्तक घेऊन दिप्या कुठेतरी जायला निघाला .... मी त्याला काही बोलणार त्याच्या आधीच तो बाहेर गेलाही ....
दुसऱ्या दिवशी सकाळी जोरजोरात धडधड वाजणाऱ्या दरवाज्यामुळे मी जागा झालो... मी वैतागून दरवाजा उघडला तर बाहेर शेजारच्या रूम मधला संजू उभा होता...
-- " अरे तुला कळलं का त्या रणपिसेचं काय झालं ते....?? " तो घाईघाईत बोलत होता .
-- " का ?? काय झालं...?? " माझ्या डोळ्यांवर अजूनही झोप होती.
-- " अरे काल रात्री मेला तो ....!! "
-- " काय....??? " माझ्या डोळ्यावरची झोप झटक्यात उडाली .... साहजिकच नजर दिप्याच्या बेड कडे गेली . दिप्या तिथे नव्हताच...." आईशप्पथ ...!! काही पण काय बोलतो.... तो कसा मरेल...?? तुला कोणी सांगितलं...?? " माझा तर विश्वासच बसेना...
-- " अरे खरंच.... काल रात्रीच त्याचा accident झाला , त्यातच तो गेला .... आजच्या पेपर मध्ये पण आलीय बातमी ....बरं झालं साला गेला ते... कॉलेजची ब्याद गेली ..... " संजू हे सांगून निघून गेला . मी कसातरी माझ्या बेडपर्यंत आलो . कालचं दिप्याचं तावातावाने बोलणं.... , ते त्याच्या जवळचं ' द परफेक्ट मर्डर ' पुस्तक ....., आजची रणपिसेच्या मृत्यूची बातमी..... , आणि आता दिप्याचं गायब होणं .... ह्यातून एकच निष्कर्ष निघत होता .... दिप्या इतका सायको असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.... माझं डोकं काम करेनासं झालं .... दिप्या कुठे गेला असेल....?? इतका कसा हा मूर्ख माणूस.....?? बराच वेळ झाला तरी दिप्या आला नाही.... काय करावं ते मला कळेना..... रूम मध्ये तर बसवत नव्हतं... मी अभयच्या रूम मध्ये गेलो ... काल दिप्या वधा- बिधाच्या गोष्टी करत होता तेव्हा अभय आमच्या रूम मध्ये होता ... त्याला कदाचित काही माहित असेल .... आणि असंही त्याच्यामुळेच हे प्रकरण उद्भवलं होतं...
-- " अरे तुला कळलं का त्या रणपिसेचं काय झालं ते....?? " मी अभयच्या रूम मध्ये शिरता शिरता घाईघाईत त्याला विचारलं. तो शांतपणे पेपरमधली तीच बातमी वाचत बसला होता. त्याने तो पेपर मला दाखवला ... मी ती बातमी वाचली , कोणत्या तरी अवजड वाहनाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं लिहिलं होतं... त्यांचा फोटोही होता... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणपिसे सरांचा क्रूर चेहरा मेल्यानंतर तर आणखीनच भयानक दिसत होता ....
-- " अरे दिप्याला पाहिलास का तू कुठे...?? काल रात्रीपासून तो रूम वर आला नाही.... आणि काल बघितलस ना कसा बोलत होता ते .....?? " मला काय बोलावं ते सुचत नव्हतं....
-- " माधव सर, लहानपणी शाळेत असताना एका मुलाचं आणि माझं भांडण झालं होतं...माझी काही चूक नसताना त्याने मला मारलं.....नंतर मी त्याला सांगितलं कि माझी माफी माग.... तर तो माझ्यावर हसायला लागला ...." अभय शांत आवाजात बोलत होता...
-- " अभय , हे तू काय बोलतोयस....?? " मला कळेना तो काय बडबडतोय ते ...
-- " तो माझ्यावर हसला म्हणून मी त्याला आमच्या शाळेशेजारच्या विहिरीत ढकलून दिलं .... " अभय एकटक पेपरमधल्या त्या फोटोकडे बघत म्हणाला ...
-- " काय...?? " मला काय बोलाव ते कळेना ...
-- " काल रात्री मी रणपिसे सरांना भेटलो आणि माझी माफी मागायला सांगितली .... तर ते पण तसेच हसले...." मी अभयच्या डोळ्यात पाहिलं... त्याचे ते निळसर डोळे चमकल्यासारखे वाटले मला.... " त्यांनी तसं हसायला नको होतं .... " अभय त्या पेपरमधल्या फोटोकडे खुनशी नजरेने बघत म्हणाला .... इतक्यात दरवाज्यातून कोणीतरी आत धावत आलं . " अरे तुम्हाला कळलं का त्या रणपिसेचं काय झालं ते....?? " दिप्या धापा टाकत आम्हाला विचारात होता.....

गुलमोहर: 

आवडेश Happy

मस्त

कथा छान जमली आहे .

एक चांगली कथा वाया जाउ नये म्हणुन म्हणतोय ,
कॉलेज मधे विद्यार्थ्यांना मारणे हे थोडे खटकण्या सारखे आहे , अपवादात्मक प्रकार घडतात पण आजचा तरी सार्वत्रीक अनुभव नाही .
त्या जागी सर्वां समोर जिव्हारी लागणा-या अपमानाचा प्रसंग टाकला तरीही तेव्हढाच प्रभावी होइल असे वाटते .

कॄपया गैरसमज करुन घेउ नये , कथा मनापसुन आवडली म्हणुन म्हणतोय , चांगली नसती तर काहीच बोललो नसतो .

पुढच्या कथा ही नक्कीच वाचील .
पु . ले .शु .

सर्वांचे मनापासून आभार....:)

@ जयनीत,
स्पष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद ....

कॉलेज मधे विद्यार्थ्यांना मारणे हे थोडे खटकण्या सारखे आहे >>>> हे मान्य ....

रणपिसे सरांनी केलेल्या खुनाची आख्यायीका पण गाळता येण्यासारखी आहे .>>>>>> ह्याबादल सांगायचं झालं तर , प्रत्येक कॉलेज मधे कसल्या न कसल्या आख्यायिका असतातच , मग त्या तिथल्या वातावरणाबद्दल... इमारतींबद्दल... माणसांबद्दल ही असू शकतात ... खास करून जर कॉलेजला होस्टेल असेल तर जास्तच.... त्या सगळ्या खऱ्या असतीलच असे नाही .... पण मुलांमध्ये त्याबाबत चर्चा असते हे मात्र खरं . हा अनुभव आहे

छान

छान

छान कथा Happy

Pages