|
Dineshvs
| |
| Saturday, September 01, 2007 - 7:40 am: |
| 
|
जवळजवळ गेली दहा वर्षे मी फ़ॅमिली कोर्टाच्या वार्या करतोय. तिथला स्टाफच नव्हे तर तिथे येणारे पक्षकार देखील माझ्या परिचयाचे आहेत. प्रत्येकवेळी कुणीतरी माझ्याकडे मन मोकळं करतच. गेल्या आठवड्यातला अनुभव मात्र खुपच अस्वस्थ करुन गेला. नेहमीप्रमाणेच पक्षकारांची गर्दी. साधारणपणे मॅटर्निटी हॉस्पिटल्स सोडली तर बाकिच्या हॉस्पिटल्समधले उदासीचे सावट तिथेही जाणवते. एक बर्यापैकी वयस्कर गृहस्थ एका बारा तेरा वर्षांच्या मुलीसोबत आले होते. मुलगी खुपच गोड होती पण तिच्याही चेहर्यावर उदासी दिसत होती. त्यांच्यासोबत एक मध्यमवयीन गृहस्थ होते, पण ते त्या मुलीचे बाबा वाटत नव्हते. नाव पुकारल्या नंतर ते तिघे आत गेले व समोरची पार्टी म्हणुन एक मध्यमवयीन बाई व तिच्यासोबत एक मध्यमवयीन पुरुष आत गेले. थोड्याच वेळात ती मुलगी त्वेषाने बाहेर आली. चेहर्यावर राग दिसत होता. माझ्या बाजुला येऊन बसली. तिच्यासोबत कुणीच नव्हतं म्हणुन मी तिची विचारपुस केली. त्या बरोबर ती मोकळेपणी बोलु लागली, मला नाही जायचं मम्मीकडे, तो माणुस मला मारतो. इतके बोलल्यावर मी विषय बदलला, तिच्या शाळेची वैगरे चौकशी करु लागली. तिला बाथरुमला जायचे होते, पण तिथल्या लेडीज टॉयलेटला कुलुप होते. मी तिथल्या बाईंकडे चौकशी करुन तिला ते उघडुन दिले. ( एका लहान मुलीला, हे विचारण्यासाठी तिथे कुणीही असु नये !) काहि वेळानी ती सर्व मोठी माणसे बाहेर आली. त्या मुलीची आजी, जिने चढता न आल्याने खाली थांबली होती. तिला बघायला म्हणुन ते वयस्कर गृहस्थ आणि ती मुलगी खाली गेली. तिच्यासोबतचा दुसरा माणुस म्हणजे तिच्या आत्याचा नवरा. त्यानी मला थोडक्यात सांगितले ते असे. त्या मुलीचे वडील चार वर्षांपुर्वी अपघातात वारले. त्यानंतर वर्षभरातच तिच्या आईने दुसरे लग्न केले. त्यावेळी तिला आजी आजोबा म्हणजे, तिच्या वडीलांच्या आईवडिलांकडेच ठेवले होते. हे लग्न त्या लहान मुलीला अजिबात पसंत नव्हते. तिची आई अधुनमधुन येऊन भेटत असे. शाळेतही जात असे, पण त्या मुलीच्या मनातली अढि कायम होती. एकदा जबरदस्तीने तिची आई तिला घरी घेऊन गेली तर त्या मुलीला, सावत्र वडिलानी मारहाण केली ( असे त्या मुलीने सांगितले ) तिचे सावत्र वडील नोकरी करत नाहीत, घरीच असतात. आई नोकरी करते. आता तिची आई व तिचे सावत्र वडील यानी तिची कष्टडी मिळावी म्हणुन दावा केला आहे. कायदा व साधारण जज लोकांचा कल बघितला, तर आईलाच त्या मुलीचा ताबा मिळणार हे नक्की. पण त्या मुलीची अजिबात तयारी नव्हती त्या गोष्टीला. सांगुन मुलीला पाठवत नाहीत. ( भेटीला आजी आजोबानी कधीच आडकाठी केली नव्हती तसेच ती त्यांचा एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. ) म्हणुन आईने व सावत्र वडीलानी, कष्टडीचा दावा केला आहे. मग बराचवेळ मी त्या मुलीशी बोललो. खुप समजुतदार होती ती. तिला आपल्या आजी आजोबांची खुप काळजी वाटत होती. दर अर्ध्या तासानी ती चार मजले खाली उतरुन आजीला बघुन येत होती. आजोबाना बसा, पाणी प्या असे सांगत होती. तिच्या आजोबाना मी धीर दिला. या दाव्यात तुमची बाजु कमकुवत आहे असे समजाऊन दिले. ते खुपच दुखावले पण सावरलेही. या बाबतीत आणखी काय पर्याय निघु शकेल ते मी त्याना समजाऊन सान्गितले. आत्याच्या नवर्यानेही समजाऊन घेतले. पण पुढे मोठेपणी मुलीने दुषणे देऊ नये म्हणुन ते कायदेशीर लढाई लढणार आहेत, असे त्यानी सांगितले. सकाळच्या केसेस आटपल्यावर जज नी परत त्याना पुकारले. त्याना समुपदेशांकडे पाठवले. तिथे निदान आठवड्यातुन एकदातरी भेट द्यावी, ( घरी नेता यावे ) अशी मागणी आईने केली. आजोबाना ती मान्य नव्हती पण दुसरा पर्याय नवता. काहिच तोडगा निघत नसल्याने, जज नी त्या मुलीला चेंबरमधे बोलावले. दोनच मिनिटात ती मुलगी तिथुन बाहेर आली आणि थेट माझ्या कुशीत शिरुन रडु लागली. ( तिथे असणार्या एकाही स्त्री वकिलाला पुढे यावेसे वाटले नाही ) मला नाही जायचं मम्मीकडे. मला तो माणुस आवडत नाही. तो म्हणतो माझे नाव लाव. मी माझ्या पप्पांचेच नाव लावणार. माझ्या परीने मी तिला शांत केले. तिचा निषेध कश्या प्रकारे व्यक्त करता येईल ते समजाऊन सांगितले. काहि त्रास झाल्यास १०९८ या नंबरवर फोन करता येतो ते समजाऊन सांगितले. आजी आजोबांची काळजी तिने घ्यावी, अभ्यासात लक्ष द्यावे. शाळेतल्या बाईंशी बोलावे असे सुचवुन पाहिले. ती शांत झाली. तिचे आजोबा खुप दुःखी चेहर्याने बाहेर आले. त्या मुलीनेच त्याना समजावले. मी तुम्हाला सोडुन कुठेच जाणार नाही असे सांगितले. समुपदेशाकडे आठवड्यातील एका भेटीची मागणे करणार्या आईने जज समोर मात्र कष्टडीचाच दावा कायम ठेवला. इंटरिम ऑर्डर म्हणुन, जज नी आठवड्यातील एका भेटीची ऑर्डर केली. विजयी मुद्रेने आई बाहेर आली. जाताना मुलीचा पापा घेतला. तो तिने लगेच पुसुन टाकला. आईकडे वळुनही बघितले नाही. आई गेल्यावर ती माझ्याजवळ आली. हसली. मग आजोबांचा हात धरुन खाली गेली. मी हतबल होवुन बघत बसलो. कायदा XXXXX असतो.
|
दिनेशदा.. खूप चान वर्णन केलंअत. आणि एकाच वाक्यातलं तुमचं conclusion सुद्धा खरे आहे.
|
Ana_meera
| |
| Saturday, September 01, 2007 - 10:53 am: |
| 
|
दिनेशजी, खुप आवडली कथा. मुलीची व्यक्तीरेखा, भावानिक आंदोलन चांगल रंगवलेत.
|
Itgirl
| |
| Sunday, September 02, 2007 - 10:46 am: |
| 
|
त्या लहान मुलीसाठी खूप वाईट वाटले... कायदा त्या लहान मुलीचे मत विचारात नाहीच का घेणार? १२-१३ वर्षांच्या मुलीचेही नाही? अगदीच लहान मूल नाही सांगू शकणार कुठे रहायला आवडेल ते, पण १२-१३ वर्षांची मुलगी / मुलगा नक्कीच सांगू शकेल, असे वाटते..
|
Jo_s
| |
| Sunday, September 02, 2007 - 11:02 am: |
| 
|
दिनेश, छानच लिहिलय, हा खरा अनुभव आहे का?
|
Dineshvs
| |
| Sunday, September 02, 2007 - 3:14 pm: |
| 
|
दोस्तानो हा एक खराखुरा किस्सा आहे. वास्तव कथेपेक्षाही दाहक असते. फक्त खरी नावे दिली नाहीत, इतकेच.
|
Runi
| |
| Sunday, September 02, 2007 - 4:34 pm: |
| 
|
दिनेशदा, खुपच र्ह्दयद्रावक अनुभव. किती फरफट होत असेल तिच्या आजी आजोबा आणि बाकीच्यांचीपण. मुलगी १२-१३ वर्षाची आहे म्हणल्यावर खरे तर कोर्टाने तिचे म्हणणे ऐकायला हवे आणि तिला जिथे आवडेल तिथे राहु द्यावे.
|
Daad
| |
| Sunday, September 02, 2007 - 10:45 pm: |
| 
|
दिनेशदा, खरच आतडं पिळवटणारा अनुभव. कसल्या insecure मनस्थितीत असेल ती पोर.... ज्या दिवसात जास्तीत जास्तं स्थैर्याचा गरज असते, तेव्हाच हे असलं भोगायला लागणं म्हणजे... किती अन्याय त्या लहान जीवावर!
|
दिनेश, ह्म्म्म. सो सॅड.
|
Zakasrao
| |
| Monday, September 03, 2007 - 4:02 am: |
| 
|
साल अस खडुसपणे (कदाचित हा शब्द कमीच आहे) असेल देव जाणे. वागायच म्हणुन दुसर्याला मुद्दाम त्रास होइल अस वागायच. आणि माणसांच्या ह्या वागणुकीला त्या काळ्या कोटातील वकीलाने जर खत पाणी घातल तर मग तोंडात अस्सल कोल्हापुरी शिव्या येतात. असो खुप वाइट वाटणे ह्या पलिकडे काय करु शकतो.
|
Wakdya
| |
| Monday, September 03, 2007 - 6:16 am: |
| 
|
Dineshvs दुर्दैवाने अशी वेळ कोणावर येवु नये, आणि आलीच तर त्यातुन मार्ग काढण्यास कोणी पाठीशी उभे रहावे अशी सदिच्छा. त्या मुलीबद्दल वाईट वाटते. या बाबत काही अन्य मुद्दे असतात ज्याला कायदा स्पर्श करु शकेलच असे नाही. मुलीच्या वडिलांची असल्यास काही स्वकष्टार्जित अथवा वाडवडिलोपार्जित स्थावर मालमत्ता ज्यावर वारस म्हणुन मुलीचाच हक्क असु शकतो, तिचा मोह असणे हा मुद्दा प्रभावी आहे. त्यावर दुसरे लग्न केल्याने मुलीच्या आईच अधिकार असत नाही. पण मुलीच्या कष्टडीच्या माध्यमातून, ती सज्ञान होईस्तोवर मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार मात्र गृहित असतो. हा मोह सिद्ध करता येवु शकतो पण वरील प्रकरणात मृत्यु नंतर मिळालेल्या विमा व इतर रकमांचे काय झाले, त्या कोणाला मिळाल्या याचे स्पष्टिकरण होत नसल्याने त्यावर भाष्य करणे कठीण आहे. जर मुलीच्या चुलत किंवा आजोळकडील कोणा व्यक्तीनी "दत्तक" विधान करुन घेण्यास तयारी दाखवली तर यातुन मार्ग निघु शकेल असे वाटते, जसे की भले दत्तक विधान प्रत्यक्षात आले नाही तरी मुलगी सद्ज्ञान होईस्तोवर कष्टडीच्या दाव्या विरोधात स्टे ऑर्डर घेता येवुन कालहरण करता येईल असे वाटते, अर्थात यावर जाणकार वकिलच नेमके भाष्य करू शकतात. मी केवळ हिंट दिली आहे की मी जर त्या आत्याच्या नवर्याच्या जागी असतो तर काय केले असते. त्या मुली बद्दल खुपच वाईट वाटते, देव तिच्या पाठीशी उभा राहो.
|
Dineshvs
| |
| Monday, September 03, 2007 - 11:48 am: |
| 
|
मीपण वकिलांशी चर्चा केली नाही. पण वडील हयात नसतील तर आईचीच बाजु जास्त प्रबळ आहे. मुळात जर आजीआजोबांची भेटायला काहिच हरकत नसेल तर कायद्याची भाषा कराच का ? आणि वकिल या पेश्याचा प्रामाणिकपणाचा तर सोडाच, माणुसकीचाही चेहरा हरवला आहे. बघ तुला कित्ती रक्कम मिळवुन देतो / देते आणि अर्थातच त्यातले माझे कमिशन अमुकतमुक, हिच भाषा चालते तिथे. अगदी फ़ॅमिली कोर्टातही.
|
Wakdya
| |
| Tuesday, September 04, 2007 - 4:03 am: |
| 
|
Dineshvs आपले म्हणणे रास्त आहे, तरीही या प्रश्नाचे अन्य कंगोरे कुठवर पोचतात ते बघणे इंटरेस्टींग ठरेल आजी आजोबा रहात असलेली जागा जर मृत व्यक्तीच्या नावावर किंवा त्याच्या खरेदीची असेल तर मुलीचा ताबा तिच्या आईकडे जाणे येवढ्यावरच हे प्रकरण संपणार नाही. तशात ही जागा मुंबईमधे कुठे आहे त्यावरही बरेच अवलंबुन असेल. या ठिकाणी, आईने दुसरे लग्न केल्यामुळे, व अशा व्यक्तिशी जी कामधंदा करीत नाही, आणि या परिस्थितीत ती मुलीचा ताबा मागते आहे तर कोणताही खमक्या वकील तिची बाजु कमकुवत सिद्ध करू शकतो हे ही तितकेच खरे आहे. यात अजुन एक प्रश्न दडलेला आहे तो असा की लग्न होताना मुलिचा ताबा आज्जीआजोबांकडेच कसा काय राहिला? लग्न करताना, केल्यावर आईने मुलिला बरोबर का नेले नाही? तसे करण्यास नवर्याचा तेव्हा विरोध होता का? की लग्नानंतरच्या हनिमुनच्या काळात आधिच्या अपत्याची अडचण होत होती? की मृत नवर्याच्या इस्टेटीवरील हक्क "आई" या नातेसंबंधाने कायम रहाण्यास तेव्हा पुरते मुलीचे आज्जी आजोबांकडेच रहाणे वहिवाटीचा व अन्य अधिकार सुस्थापित ठेवण्यास मुलीची आई किंवा तिचा नविन नवरा यांना अपरिहार्य वाटले? सर्वसाधारणतः, आणि माझ्या माहितीत तरी कोणताही पुरुष लग्नाची बायको करताना बायकोच्या आधीच्या अपत्याचा स्विकार करण्यास नकार देतो. त्यात जर ते अपत्य बर्यापैकी वयाने मोठे असेल म्हणजेच पाच सहा वर्षांचे असेल तर नक्कीच नकार देतो. याला अनेक कारणे असू शकतात. पण अपवादात्मक परिस्थितीत, बाई लग्न करताना, आधीच्या अपत्याच्या वाटच्या इस्टेटीची भुरळ नविन नवर्यास घालू शकते किंवा तिचा तसा उद्देश नसला तरी नविन नवर्याची सूप्त इच्छा लग्न करताना नसेलच असेही म्हणता येत नाही. माझ्या मते, मुलिने कोर्टासमोर आईकडे जाण्यास ठाम नकार दिला व त्या नकारामागची पार्श्वभुमी प्रत्यक्ष व तार्किक पुराव्यांआअधारे वकिला मार्फत मांडली तर कोर्ट मुलीच्या बाजुने सहानुभूतीपुर्वक विचार करु शकते. आईच्या वात्सल्याची बालकास असलेली गरज जशी कोर्ट विचारात घेते, त्याचबरोबर, ते ते बालक पोसण्याची आईची शारिरीक मानसिक व परिस्थितीनुरुम कुवतही विचारात घेते. या ठिकाणी नविन नवर्याने केलेल्या मारहाणीचा मुद्दा आईची बाजू कमकुवत करेल. अर्थात मुलीच्या मागे कोणी खंबिरपणे उभे राहिले तरच. पदरी अपत्य असताना, नवरा मेल्यास स्त्रीने दुसरे लग्न करावे की करु नये हा परिस्थितीनुरुप विषय आहेच पण तो वादचर्चेचा विषयही आहे. ललित साहित्यात त्यास जागा नाही. पण आपण ही सत्य घटना इथे लिहिल्याने, या इथेच मत नोंदवावे लागले. असो. याच प्रश्नाची दुसरी बाजु अशी, आपण विचारता की कायद्याची भाषा करावीच का जर आजीआजोबांची भेटण्यास हरकत नाही. आपण एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की जर सर्व सुरळीत असेल, मुलीस भेटण्याची परवानगि असेल, आणि समजा ती येत नसेल तरी कोणती आई मुलीच्या इच्छेविरुद्ध जाऊन तिला सक्तीने आपल्या नविन नवर्याशी जुळवुन घ्यायला भाग पाडेल? त्याशिवाय, मुलीचा न जाण्याच्या निर्णया विरोधात मुलीच्या आईने कोर्टाकडे कस्टडीचा दावा दाखल केला आहे असे आपण म्हणू शकतो का? अर्थात मुलगी ज्यांच्याकडे स्वैच्छेने रहाते, त्यांच्याकडुन मुलीचा ताबा मिळण्याकरता हा दावा दाखल केला आहे हे असेच समजण्यावाचून दुसरा प्रत्यवाय नाही. मग हा दावा दाखल करण्यायेवढि काय परिस्थिती उद्भवली आहे याचाही विचार करावा लागेल. मुलीच्या आईने ताबा मिळविण्यासाठी कोर्टाचे दरवाजे खटखटवुन आधीच कायद्याची भाषा वापरली आहे. जर तिला मुलीला घेवुनच जायचे असेल तर त्यास कोर्टात जाण्याची मुळात गरज नव्हती, नाही. जर लग्नावेळेसच मुलिला बरोबर नेले असते, तर, आणि मुलिचा विरोध असुनही मुलीचे आईबरोबर रहाणे कोणत्याही कायद्यास अमान्य नाही. उलटपक्षी, मुलीच्या आईव्यतिरिक्तच्या नातेवाईकांनी मुलिच्या ताब्याकरिता दावा केला असता तर ते तर्काला धरुन होते. याइथे मला वेगळाच वास येतो. मुलीचा ताबा कोर्टाच्या दाव्यातुन मिळवणे याचाच दुसरा अर्थ असा की मुलिच्या मूळ बापाकडून वा वाडवडिलोपार्जित, तिला वारसहक्कातून मिळणार्या वाट्याच्या संपत्तीवर कायदेशीर निर्णयाच्या आधाराने "अज्ञान" बालकाचे पालनकर्ते, इथे आई, या नात्याने ताबा मिळविणे हाच तर उद्देश नसेल? तसा नसेल तर केवळ मुलगी घेवुन केव्हाही, अगदी लग्न केल्याकेल्याच जाता आले असते की. त्याकरीता दाव्याची गरज काय? अर्थात गरज अशासाठि भासेल कारण दुसरे लग्न केल्याने आधीच्या नवर्याच्या इस्टेटीतील वाट्यावरचा अधिकार संपतो यास अपवाद म्हणजे नवरा मेल्यानंतर वाटणी होवुन ताबा मिळाला असेल तर हा प्रश्न निर्माण होत नाही, मात्र या ठिकाणी आजिआजोबा जिवंत असताना, आणि रहाते घर वा अन्य बाबी त्यांच्या ताब्यात असताना वाटणी होणे शक्य नाही हेही लक्षात घेतले पाहीजे. आणि मग त्यास एकच पर्याय, तो म्हणजे दाव्याचा, तो पर्याय त्या आईने वापरला आहे असे माझे मत बनते. दिनेशजी, मी असेही उदाहरण प्रत्यक्षात बघितले आहे की, नवरा मेल्यावर त्याच्या फंड, विमा इत्यादिचे सर्व पैसे ताब्यात घेवुन, सर्व दागदागिने घेवुन बाई दुसरे लग्न करुन गेली जेव्हा तिचे पाचसहा वर्षाच्या मुलाला रिटायर्द आजीआजोबांकडेच सोडुन गेली ती पुन्हा त्या अपत्यास बघावयास देखिल फिरकली नाही. आजीआजोबांचे घर त्यांनी स्वतः बांधलेले असल्याने व ते मुलाच्या नावे केलेले नसल्यानेच केवळ त्या लोकांस निदान डोक्यावर छप्पर तरी शिल्लक राहीले, पण उत्पन्नाचे कसलेच साधन नाही आणि शब्दष निष्कांचन अवस्थेत त्यांना कसे दिवस काढावे लागले ते बघता समस्त स्त्रीया या वात्सल्याच्या स्त्रोत असतात, वात्सल्या उफाळुन उतू जात असते व समस्त पुरूष हे निर्दयी, कठोर ह्रुदयाचे असतात असे विचार या केवळ कवि कल्पना आहेत असे वाटल्यावाचून रहावत नाही. माफ करा, पण आपण लिहिलेल्या सत्यकथेमधे माझ्याकडून थोडे विषयांतर झाले आहे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:11 am: |
| 
|
|ते बघता समस्त स्त्रीया या वात्सल्याच्या स्त्रोत असतात, वात्सल्या उफाळुन उतू जात असते व समस्त पुरूष हे निर्दयी, कठोर ह्रुदयाचे असतात असे विचार या केवळ कवि कल्पना आहेत असे वाटल्यावाचून रहावत नाही. | विषयांतराबद्दल माफीच पण ही गृहितकं म्हणजे निव्वळ कल्पनाविलास आहे. हळवेपणा हा खरंतर पुरूषांचा प्रांत आहे. फक्त सामाजिक चौकट त्यांना व्यक्त व्हायची परवानगी देत नाही. बायकांना देते. याचा ५०% वेळा गैरफायदाच घेतला जातो.. असो हा विषय नंतर कधीतरी बोलूच.. बाकी घटस्फोट आणि त्यामधे होणारे मुलांचे हाल हा खूपच त्रासदायक विषय आहे. कधी कधी सगळ्या बाजू बरोबर असतात आणि तरीही कुणाच्याही बाजूने निकाल जाणे हे कुणाना कुणावर अन्याय करते, कुणा ना कुणाची तरी पडझड करतेच..
|
दिनेश्दा छान लिहिलय... अज्जुका u said it..
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:58 pm: |
| 
|
अज्जुका, अगदी मनातलं बोललीस. आपले सर्व कायदे या गृहितकावरच बेतलेले आहे. तूम्ही सतरा वर्षे ३६४ दिवस २३ तास ५९ मिनिटे आणि ५९ सेकंदाचे असेपर्यंत अजाण असता आणि पुढच्याच क्षणी जाणते होता. अवमानाच्या भितीने, फारसे स्पष्ट लिहिताही येत नाही, पण आपल्या न्यायालयात न्याय मिळतो, यावर माझा विश्वास नाही. जो मिळतो, त्याला न्याय म्हणायची प्रथा आहे, इतकेच.
|
Manuswini
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:01 am: |
| 
|
bitter truth दीनेशदा, घटस्पोटात लहान मुले मात्र कधी कधी वापरली जातात. अगदी तान्हे बाळ सुद्धा. का तर स्वःताचा ego , दुसर्याला( partner ला) त्रास देण्याच्या भावनेतून, आणि त्यामध्ये एकाला अजीबात काडीचेही प्रेम नसताना किंवा तेवढी तळमळ त्या बाळाबद्दल नसताना. करुण आहे हे सगळे एवढेच म्हणु शकतो.
|
Saee
| |
| Monday, September 10, 2007 - 7:25 am: |
| 
|
नीरजाशी १०० % सहमत. आणि तो खुप मोठा विषय हेही तितकंच खरं.
|
Shyamli
| |
| Monday, September 10, 2007 - 7:45 am: |
| 
|
खुपच विचित्र प्रसंग आहे हा, दिनेशदा तुम्ही लिहिलयत खुपच मस्त, पण त्या आईच दावा ठोकण मला तरी चुकीच वाटत नाहीये, कोणत्या आईला आपल मुल आपल्याजवळ असावं असं वाटणार नाही? आणि पुर्ण गोष्ट आपल्याला माहित नाहिये, जसं वाकड्याजींनी इस्टेटीबाबत काहि मुद्दे मांडलेत ते ही विचारात पाडणारे आहेत. पण मला तर असहि वाटून गेलं की कदाचित त्या आईला आता त्या नव-याचाही आधार,सोबत भक्कम आहे असं वाटत नसेल, कुणी का होईना आपलं म्हणणारं आपल्या जवळ असावं अस जाणवल असेल तीला.(एवढ्या वर्षानी ती कस्टडी मागतीये म्हणुन हे कनक्लुजन) मुलीची बाजु बरोबर आहे अगदिच अनोळखी असणा-या माणसाला आता तु याला बाबा म्हण म्हणल तर १२-१३ काय ४-५ वर्शाचं मुल देखील तयार होणार नाही. एकुण काय हा तीढा न सुटणारा आहे........ती मुलगी अशीच १८ वर्शाची होईल आणि स्वत:चा निर्णय घ्यायला कायद्यानी सक्शम होईल(कायद्याच्या दृश्टीनी)तेंव्हाच काय ते खरं, तसं बघायला गेलं तर ती आताच सद्न्यान आहे.तीला तीच बरं वाईट कळतय
|
Dineshvs
| |
| Monday, September 10, 2007 - 2:08 pm: |
| 
|
सई, श्यामली, आपले कुठलेच तिढे सहज बोलुन का सुटत नाहीत कोण जाणे ? वाकड्याने लिहिले त्याप्रमाणे, प्रॉपर्टीचा ईश्यु नव्हता बहुतेक. पण त्या मुलीचा आईवरचा आणि त्या माणसावरचा राग वेगळेच काहि सुचवत होता. पण कायदा असा विचित्र आहे ना. अजाण मुलाना चक्क मालमत्ता म्हणुन ट्रिटमेंट दिली जाते. समजा ती मुलगी कोर्टाने आईला दिली, तर आजी आजोबाना तिला भेटायचा, कायदेशीर हक्कच नाही. तिचे आजोबा अगदी मिलिट्री पर्सनालिटी वाटत होते. पण त्या दिवशी पुरते कोलमडुन पडले होते.
|
Bhagya
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:05 am: |
| 
|
अगदी हृदयस्पर्शी लिहिलय... दिनेशदा, सहज बोलून तिढे सुटण्यासाठी समोरची माणसे समजूतदार असायला हवीत ना? अशा लोकांना फ़क्त एकच point of view दिसतो आणि तो त्यांचा स्वत्:चा असतो. अशा लोकांशी काय बोलणार? आणि कोर्टात न्याय होतो यावर माझा पण विश्वास नाही.
|
|
|