|
Psg
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:28 am: |
| 
|
काल ऑफ़िसमधे लंच करत असताना एकीनी तिची आजी गेल्याची बातमी सांगितली.. ती दोन दिवस आली नव्हती, आज आल्यावर हे कळलं. खूपच धक्का बसला होता तिला.. आजी ८७ वर्षाची होती तिची, घरातच गेली.. काहीही आजार नव्हता, वृद्धापकाळानी आलेला क्षीणपणा फ़क्त. एकही व्याधी नव्हती आजींना- बीपी, डायबीटीस तर नाहीच, पण ७-८ दातही शाबूत होते.. कवळी सुद्धा नव्हती! सकाळी उठून त्यांनी सर्व आन्हिकं स्वत:ची स्वत: उरकली, आंघोळ केली, देवाला नमस्कार करायला वाकल्या आणि गेल्याच! बापरे.. आम्ही ऐकता ऐकताच शहारलो. लंच नंतर अबोलपणेच संपला. नंतर जागेवर आले आणि सहजच विचार करत होते.. काय होतं ना या बायकांचं आयुष्य! साधारणपणे ७०-७५ वर्षापूर्वी यांनी संसाराला सुरुवात केली असेल.. वय अगदी लहान- तेराव्या किंवा चौदाव्या वर्षी लग्न- शिक्षण असेल किंवा नसेलही, असलं तरी शालेयच. त्या वेळची कुटुंबही किती मोठी.. घरात सहज १५-२० माणसं. ही बिचारी नवं लग्न झालेली मुलगी त्या गोंधळात पार हरवून जात असेल. ती भांबावली तरी तिला जवळ घेणारे, समजून घेणारे हात सुद्धा नव्हते त्या काळी. नवर्याशी मोकळेपणी बोलायची पद्धत नाही, सासू-जावा ही नाती अशी की त्यात मोकळेपणा अजूनही नाही, त्या काळी तर शक्यच नाही. तर अश्या पूर्णपणे अनोळखी वातावरणात संसाराला सुरुवात करायची.. घराच्या रगाड्यात स्वत:ला जुंपायचे. मोठे कुटुंब असल्यामुळे सासू जे काम देईल ते निमूटपणे करायचे. दिवसरात्र तेच- स्वयंपाक, रांधणे, घराची स्वच्छता, आल्यागेल्याचं करणं, स्वत:ची बाळंतपणं, मुलांची आजारपणं! मुलं जितकी होतील तितकी- ८, ९, १० कितीही.. त्यातली किती जगली, किती आजारपणामुळे, उपचाराअभावी गेली याची खंत कोणाकडे बोलून दाखवायची? सासूरवास पण चिकार असायचा त्या काळी.. शारिरीक आणि मानसिकही. नवरेही त्याकाळी 'बायकोला समजून घेणारे' वगैरे कमीच. पैसेही बेताचेच मिळायचे, त्यामुळे हौसमौज, बाहेर खाणं, हिंडणं-फ़िरणं, सिनेमे पहाणं तर अशक्य कोटीतल्या गोष्टी! एखादी जाऊ किंवा नणंद बरी असेल तर तिच्यापाशी मन मोकळं तरी करता येत असेल, नाहीतर कुढणं हेच नशीबी. अर्थात कालांतरानी यातलं सगळंच कमी झालं, या पिढीचा त्रासही कमी झाला. मुलं शिकली, परिस्थिती सुधारली.. पण ऐन तारुण्य तसं म्हणलं तर हालाखीचच. पण या बायका मनानी फ़ारच खंबीर. संसारात जे पुढे आलं ते निमूटपणे सोसलं, आहे ते गोड मानून घेतलं. पुढे परिस्थिती बदलल्यानंतर ते बदलही स्वीकारले. नाती कमी झाली, मुलं परगावी गेली, तीर्थयात्रा घडल्या, थोडीफ़ार हौसमौजही झाली. देवकृपेनी यातील बर्याच बायकांना दीर्घायुष्य मिळाले. अतोनात कष्टांपासून ते सुखासीन आयुष्यापर्यंत- किती मोठी स्थित्यंतरं आली आणि सगळीच पचवली त्यांनी. आणि आज! मी आणि माझ्यासारख्या लाखो बायका स्वत:ला 'सूपरवूमन' म्हणवण्यात धन्यता मानतो. कारण आम्ही शिकलेल्या आहोत, कमावत्या आहोत. घर, मुलं आणि ऑफ़िस सगळं व्यवस्थितपणे 'मॅनेज' करतो. पण आम्हाला कितीतरी सोयी उपलब्ध आहेत, आणि म्हणून आम्ही उभ्या आहोत याचा विसर पडतो कधीकधी. कामवाली बाई माझं घर स्वच्छ करते, पाळणाघरात माझं मूल वाढतं, नवर्याचं तर प्रत्येक बाबतीत सहकार्य असतं. ऑफ़िसमधेही बॉस, कलीग्स अडचणी समजावून घेतात. सासूरवास आम्हाला नाहीच, कारण आम्ही मुळात स्वतंत्र रहातो, किंवा बरोबर रहात असलो तरी कोणतीच गोष्ट मनाविरुद्ध आम्ही सहन करत नाही. नातेवाईक, आलागेला ही संकल्पना तर आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. कोणी आलं तरी आमची वेळ आणि सोय पाहून, फोन करून येतं. अश्या सर्व सोयी जेव्हा असतील तेव्हाच आणि त्यांच्याच बळावर आमचं आयुष्य सुरळीत सुरु असतं. यातलं एक जरी काही नसेल तर 'आमच्यावर अन्याय होतोय' असं वाटतं आम्हाल. मग असं असताना 'सूपरवूमन' ही बिरूदावली मिरवायला आम्ही योग्य आहोत की या ३-४ पिढीपूर्वीच्या बायका?- माझ्या दृष्टीने याच बायका खर्या अर्थानी सुपरवीमेन. यांच्या कष्टांचं ना कधी चीज झालं आणि यांचं कर्तृत्व कायमच डावललं गेलं. 'तुम्ही काय विशेष केलं' असा प्रश्न कदाचित आजही विचारला जाईल त्यांना. पण आपण कल्पनाही करू शकणार नाही अश्या प्रतिकूल परिस्थितीला, अनेक संकटांना यशस्वीपणे, स्वत:च्या हिंमतीवर तोंड दिलं त्यांनी. अत्यंत स्वावलंबी आणि कणखर होत्या या बायका. आणि मला खात्री आहे, त्यांना संधी मिळाली असती तर नक्कीच त्यांनी स्वत:च्या एकटीच्या बळावर उज्ज्वल यशही मिळवलं असतं. या 'सूपरवीमेन'ना माझा प्रणाम!
|
Monakshi
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:25 am: |
| 
|
पूनम सहीच. सुंदर विषय निवडलायस आणि खूप छान लिहिलयस. खरंच आपण आपल्या आजी आजोबांना किती taken for granted घेतो नाही. आपल्यापेक्षा जास्त कष्ट त्यांनी केले म्हणून तर हे सुखाचे दिवस आपण बघू शकतो.
|
Daad
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:30 am: |
| 
|
सहमत पूनम आणि मांडलयसही सुंदर.
|
Badbadi
| |
| Thursday, August 02, 2007 - 8:40 am: |
| 
|
पूनम...... खरं आहे. माझ्या एका मैत्रिणीने घरी एक छोटं aquarium आणलं होतं नि त्या माशांचं कोण कौतुक मला सांगत होती. मी तिला म्हणाले... हे सगळं कौतुक, प्रेम तू घरात आलेल्या आगंतुकाबद्दल दाखवू शकतेस का? उत्तर अर्थातच नाही होतं!!! तर अशी आहे आपली पिढी....
|
Chinnu
| |
| Thursday, August 02, 2007 - 2:30 pm: |
| 
|
माझाही आजच्या आणि कालच्या सुपरवूमन ला प्रणाम. पुनम सहीच लिहिलसं.
|
हं, खरंय. या बायका superwomen होत्या खर्या. आपल्या आयांची पिढी तर सूपर ड्यूपर म्हणावी लागेल. ' घरा'च्या चौकटीत स्थित्यंतर झालं ते तिथे, त्यामुळे त्यांची ओढाताण सर्वांत जास्त झाली. पण म्हणून एकदम आपली पिढी किती भुक्कड असा सूर लावू नका गं. दोन्ही lifestyles चे आपले आपले pros and cons आहेतच. केवळ चार शारीरिक कष्ट कमी झाले म्हणजे आपण आरामात आहोत का? बडे, केवळ ' ई - ओळखी'वरसुद्धा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी आणि वेळेला घावून धावून मदत करणारी पण हीच पिढी आहे गं.
|
मला स्वातिच म्हणण पटल. पुनम फ़ार छान लिहलयस तु. त्या काळातिल बायका great होत्या यात काहिच संशय नाहि. त्या काळातिल कष्टांचि आज कल्पनाहि येण अवघड आहे. पण आजहि बायकांच्या नशिबातले कष्ट कुठे सुटले आहेत? फ़क्त त्यांच स्वरुप बदलल. पैशांच म्हणाल तर फ़ार थोड्या त्याबाबत सुखि आहेत. निव्वळ career म्हणुन किति झणि नोकरि करतात आणि पैश्यांचि गरज म्हणुन किति हा प्रश्न उरतोच आणि ज्यांच्या जवळ तो आहे त्यांचे तरि सगळे प्रश्न कुठे सुटलेत? इथे रहणार्या कितितरि बायकांचि मनुष्यबळा अभावि मुलांचा संगोपन आणि स्वत:च career यांत balance साधताना होणारि परवड बघता काळ बदलला पण त्याच नक्कि फ़यदा किति आणि कोणाला होतोय हा विचार नेहमि मनात येतो.
|
Zelam
| |
| Thursday, August 02, 2007 - 5:51 pm: |
| 
|
पूनम फार सुंदर लिहिलंस एकदम पटलं. आपल्या आज्या सुपरवुमेन नक्कीच होत्या. आता विचार करताना वाटतं की त्याना जरा संधी मिळाली असती तर अजूनही काय काय करून दाखवलं असतं त्यानी. पण दुर्दैवाने कामाच्या रहाटगाडग्यात त्यांच्या कित्येक छोट्याछोट्या आवडीनिवडी, हौशी दबून गेल्या असतील. लौकिक अर्थाने शिक्षीत नसून सुद्धा खूप जणींनी व्यवहारी शहाणपण जपलं आणि आपल्या पुढcया पिढीला दिलं. आता काळ बदलला. आजच्या पिढीचे problems असतीलही आणि ते काळाप्रमाणे बदलतच जाणार. कष्टही सुटणार नाहीतच पण आज मुलीना जे विचार स्वातंत्र्य आहे ते बघता आपली पिढी नक्कीच भाग्यवान आहे असं मला वाटतं.
|
Psg
| |
| Friday, August 03, 2007 - 11:37 am: |
| 
|
ह्म्म. सर्वांशी सहमत. बायकांचे कष्ट कधीच कमी झालेले नाहीत. या ना त्या रूपात हे आहेतच. पण कमीतकमी 'हो, तुम्हाला कष्ट पडतात' असं मान्य करणारी सामजिक व्यवस्था तरी आहे आता. या आपल्या बिचार्या आज्या, पणज्या नुसत्या झिजल्या, आणि वाईट याचे वाटते की त्याबद्दल कोणाला काही विशेष वाटले नाही, खुद्द त्यांनाही! असो! तर, त्यानिमित्तानी, चीअर्स टू ऑल ऑफ़ अस!
|
Princess
| |
| Saturday, August 04, 2007 - 12:25 pm: |
| 
|
नेहमी सारखच छानच लिहिलय पूनम. आपल्या आज्जी पेक्षा आपल्याला खेळण्याचे दिवस जास्त मिळालेत. आपल्याला कष्ट आहेत पण तू म्हणतेस तसेच मलाही वाटते, आपल्या कष्टाचे कौतुक तरी होते ना त्यांचे मात्र खेळण्याचे दिवस तो साडीचा ओचा आणि चुल सांभाळण्यातच हरवुन गेलेत.
|
Mankya
| |
| Monday, August 06, 2007 - 3:20 am: |
| 
|
Psg... अगदि खरंय ! त्या पिढिचं चित्रही मस्त रेखाटलयस, अभिनंदन ! आवडलं ! अन स्वातीला अनुमोदन या पिढिच्या मुद्याबद्दल ! आपलाही सलाम ... ! माणिक !
|
Disha013
| |
| Monday, August 06, 2007 - 7:37 pm: |
| 
|
मस्त लिहीलयं पूनम. त्या पिढीतल्या स्रियांना बाहेरचं आभाळही कधीतरीच दिसत असणार. स्रियांचे कष्ट तेव्हाही होते आणी आजही आहेत. फ़क्त स्वरूप बदलतयं एवढच.
|
Mepunekar
| |
| Monday, August 06, 2007 - 10:57 pm: |
| 
|
पुनम, छान लिहिलयेस, एकदम पटेश आताच्या बहुतांशी बायकांना समजुतदार नवरा, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, घरामधे सर्वांकडुन मिळणारा respect , माहेरच्या माणसांचे मनासारखे करता येणारे आदरातिथ्य या गोष्टी तरी आहेत ज्या पुर्विच्या बायकांना कधीच मिळाल्या नाहीत.
|
Shyamli
| |
| Wednesday, August 08, 2007 - 3:56 pm: |
| 
|
अरे वा पूनम मस्त विषय, छान लिहिलयस. कदाचित त्यांच तरुणपण हालाखित गेल्यामुळे त्या जास्त कणखरपण झाल्या असतील. बाकी स्वातिला अनुमोदन,
|
Lalu
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:17 pm: |
| 
|
पूनम, आवडलं. छान विचार मांडला आहेस. स्वातीचे म्हणणेही पटले. पण तरीही हल्लीच्या मुलींची लहानसहान गोष्टीत किरकीर आणि स्वतःचे कवतीकच फार! ~D
|
|
|