Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
झांजरोळी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » ललित » झांजरोळी « Previous Next »

Dineshvs
Wednesday, July 25, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसाळा आला म्हणजे शहरवासीयाना पावसाळी सहलीचे वेध लागतात. पण हल्ली कुठल्याही स्पॉटवर गेले की एकच दृष्य बघायला मिळते. प्रत्येक धबधब्याखाली अर्धनग्न अवस्थेत उभे असलेले तरुण. हातात बियर आणि व्होडकाच्या बाटल्या. पार्क केलेल्या गाड्यात, कर्कश आवाजात गाणी. रस्त्यावर वाहतुक कोंडी, येणार्‍या जाणार्‍या गाड्यांकडे बघुन अश्लील हावभाव. उबग येणारे वातावरण.

एकेकाळी आडवाटेला असलेल्या माळशेज घाट, अंबोली इतकेच नव्हे तर चोर्ला घाटातही हेच दृष्य बघायला मिळाले, यावेळी.

मग मी १२ वर्षांपुर्वी भेट दिलेल्या एका रम्य स्थानाला भेट दिली. लिहायला खुप आनंद होतोय, की ते ठिकाण अजुनही तितकेच रम्य आहे, आणि खास मायबोलिकरांसाठी ही माहिती देतोय.

एक मह्त्वाची सूचना. तिथे जायला सार्वजनिक वाहनानेच जावे लागेल. तिथे कुठलेही रिसॉर्ट नाही. खायची, प्यायची, रहायची सोय नाही. झोपायला देऊळ वैगरेही नाही. गावात फारतर पाणी मिळु शकेल. पण तरिही तिथे आहे, प्रचंड मोठा कडा, पाऊस असेल तर त्यावरुन कोसळणारे धबधबे, एक विस्तिर्ण शांत जलाशय, नजर पोहोचेल तिथवर हिरवाई, आणि अक्षरशः नीरव शांतता.

मुंबईकराना ठिकाण तसे दुर नाही. एका दिवसात जाऊन येण्यासारखे आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवरच्या केळवे गावी जावे लागेल. विरारहुन डहाणु शटल वा कुठलिही पॅसेंजर गाडी पकडुन केळवे ला जाता येते. विरारनंतर वैतरणा, सफाळे नंतर केळवे स्टेशन लागते. विरारहुन साधारण ४० मिनिटे लागतात. पण गाड्यांच्या वेळा बघायला हव्यात.

केळवे स्टेशन अगदीच छोटे आहे. स्टेशनबाहेरही निवांतपणा. इथुन पश्चिमेला म्हणजे प्लॅटफ़ॉर्म नंबर एकच्या बाहेर पडल्यास रिक्षाने केळवेच्या सुंदर समुद्रकिनार्‍यावर जाता येते. हा किनारा एकेकाळी खुपच सुंदर होता. पण दोन दिवसांपुर्वी या किनार्‍याचा फोटो पेपरमधे आला होता. ठाईठाई तिथे प्लॅष्टिकचा कचरा झाला आहे.

पण आपल्याला तिथे जायचे नाही. याच स्टेशनच्या पुर्वेला म्हणजे प्लॅटफ़ॉर्म नंबर तीनच्या दिशेने एक छोटा डांबरी रस्ता सुरु होतो. तो एकमेव रस्ता असल्याने चुकायची शक्यताच नाही. तिथे एखादी रिक्षा उभी असते, पण चालत गेले तर उत्तम.
हा रस्ता जातो झांजरोळी नावाच्या गावात. अंतर साधारण ४ किलोमीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुना मस्त हिरवाई आहे. चिकुच्या बागा आहेत. काहि शाळा व काहि घरे आहेत. आजुबाजुला चौकस नजरेने बघितलेत तर मुरुडशेंग, रानद्राक्ष, गुंज अश्या वनस्पति दिसतील. बर्‍याच विहिरी लागतील. काहि हातपंप आहेत. तिथे पाणी पिता येईल.

हा रस्ता काहि वळणे घेतो, पण त्याला कुठेच फाटा नसल्याने, शेवटपर्यंत हाच रस्ता आपल्याला घ्यायचा आहे. अगदी शेवटी झांजरोळी हे गाव लागते, आणि तिथे रस्ता संपतो. त्या गावाच्या आधी साधारण ५० मीटर्सवर एक डावा कच्चा रस्ता जातो. या रस्त्याच्या एका बाजुने तारेचे कुंपण आहे. त्या रस्त्याने पाच मिनिटे चालले कि आपण, एका बांधार्‍यावर येऊन पोहोचतो. बांधारा दगडी आहे आणि बराच विस्तिर्ण आहे. त्या पलिकडे आहे एक रम्य जलाशय. आणि त्या पल्याड आहेत उभे कडे. ऐन पावसाळ्यात त्या कड्यांवरुन अनेक धबधबे कोसळत असतात. पण तरिही ते आवाक्यातले नाहीत. जलाशय ओलांडला तरी गर्द जंगल आणि उंची यामुळे तिथपर्यंत पोचणे कठिण आहे.

बांधार्‍यावरुन डाव्या हाताला चालत गेलो कि जलाशयाचे एक टोक दिसते. तिथुन जरा दुरवर आणखी एक छोटेखानी धबधबा आहे. कदाचित तिथपर्यंत पोहोचणे शक्य होईल.

समोरच एक वैषिष्ठपुर्ण शिखर दिसते. समोरचा भाग जरी उभ्या कड्यासारखा असला तरी तिथे पोहोचायला एखादी वाट असेल. स्थानिक लोक ती सांगु शकतील. ( मला तिथे जायचे नसल्याने मी चौकशी केली नाही. )

पण या जलाशयाच्या टोकाशी निवांत जागा आहे. बसण्यासाठी काहि नैसर्गिक खडक आहेत. दोनचार सावलीची झाडेही आहेत. अजिबात म्हणजे अजिबातच कचरा नाही. गावात पाण्याची सोय असल्याने, तिथे कुणीही कपडे वा गुरे धुवायला येत नाही, त्यामुळे तिही घाण नाही.

जलाशय कितपत खोल आहे याची कल्पना नाही. तिथे पोहायला बंदी आहे. पण तरिही पाण्यात पाय सोडुन बसण्यासारख्या अनेक जागा आहेत.

१२ वर्षांपुर्वी लोकप्रभा मधे या जलाशयाबद्दल लिहुन आले होते. त्यावेळी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी जलाशयात काहि तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसले होते. आता ते बुंधे गायब झालेत. बहुतेक कुजले असतील किंवा पाण्याची पातळी वाढली असेल.

त्यावेळी तिथे काहि सुंदर पक्षी दिसले होते. यावेळी जरा कमी दिसले पण मी त्यावेळी थंडीच्या दिवसात गेलो होतो. तिथे निवांत बसुन समोरच्या धबधब्याकडे बघत बसणे, म्हणजे आनंदाची परिसीमा आहे. तसे हे धबधबे चालत्या गाडीतुनही दिसतात, पण तरिही तिथे बसुन बघण्यात जास्त आनंद आहे. ( हे धबधबे पावसातच असतात. )

अजुन रानफुलांचे दिवस नाहीत, पण श्रावण भाद्रपदात तिही दिसतील.

तिथे कसलीच सोय नसल्याने, जेवण व पाणी न्यावे लागेल. हौस असेल तर तिथे जेवण शिजवताही येईल. पण त्यापेक्षा समविचारी मित्रमैत्रीणींशी निवांपणे गप्पा मारायला ते छान ठिकाण आहे.

परत येताना परतीच्या गाड्यांच्या वेळेचा अंदाज घेऊन निघावे.

एकंदरीत फारसे श्रम न करता, फारसा प्रवास न करता, निसर्गाच्या कुशीतील निवांतपणा अनुभवायचा असेल, तर एक छान ठिकाण आहे हे.

या जागेचे काहि फोटो माझ्या बीबीवर टाकतोय.



Dineshvs
Wednesday, July 25, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो इथे बघता येतील

/hitguj/messages/58489/93441.html?1185356738

Monakshi
Wednesday, July 25, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा खुपच छान वर्णन आणि फोटो देख़ील खूप छान आहेत. याबाजूला एवढं छान ठिकाण असेल असं वाटलं नव्हतं. केळव्याला आम्ही जाऊन आलोय. पण ते बीचवर. इकडे जायला पाहिजे एकदा.

Dhumketu
Wednesday, July 25, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या ठिकाणी एकदा चक्कर मारायला पाहीजे.

हे मात्र खरे की आताशी कुठल्याही धबधब्याच्या ठिकाणी नुसता गजबजाट असतो..

वरंध घाटात वरती चढताना उजवीकडे एक मोठा धबधबा दिसतो. तिथे पायी जाता येते असे म्हणतात. एकदा जाऊन पाहायचे आहे तिथे. लांबूनच तो बर्‍यापैकी मोठा दिसतो..



Asami
Wednesday, July 25, 2007 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथुन पश्चिमेला म्हणजे प्लॅटफ़ॉर्म नंबर एकच्या बाहेर पडल्यास रिक्षाने केळवेच्या सुंदर समुद्रकिनार्‍यावर जाता येते. हा किनारा एकेकाळी खुपच सुंदर होता. पण दोन दिवसांपुर्वी या किनार्‍याचा फोटो पेपरमधे आला होता. ठाईठाई तिथे प्लॅष्टिकचा कचरा झाला आहे. >>

हो :-(. माझे गाव हे. अतिशय टुमदार गाव नि pristine समुद्रकिनारा , ज्याची आत्ता पर्यटनाच्या नावाखाली पूर्णपणे वाट लागलेली आहे. गाड्या घेउन लोक येतात, दारू पितात आणी कचरा करतात. :-(

दिनेश , त्या जलाशयामधे बिनधास्त पोहू शकता. आम्ही बरेचदा पोहलो आहोत लहान असताना. त्या खिंडीपर्यंत जायला एक वाट आहे. पण तसे खास तिथे काहिच नाही. लहान असताना उगाच मला आपले तिथे शिवाजी महाराजांचा एखादा किल्ला आहे असे वाटायचे उगाच.


Bee
Thursday, July 26, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, खूप दिवसानंतर गुलमोहोरावर तुमचे साहित्य आले आहे. कथा तर लिहायच्याच सोडल्या असे दिसते. असो.. हा लेख छान आहे. छान वर्णन केलय.

गुंज झाडाबद्दल सचित्र लिहा कधीतरी.


Dineshvs
Thursday, July 26, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामि, या किनार्‍यांचे पुर्वीचे वैभव मी पाहिले आहे. मला समजु शकते वेदना. त्या खिंडीबद्दल मलाही उत्सुकता होती. आता शमली. अलिकडे डोंगर चढायची उर्मी राहिली नाही. वय झाले !!!
बी, झाडांबद्दल लिहितोय ना म्हणुन इथे लिहायला वेळ मिळत नाही.


Ramani
Friday, July 27, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, मस्तच. योगायोग म्हणजे, कालच लोकसत्तेच्या विवा पुरवणीत याच गावाविशयीचा लेख छापुन आला आहे.

Princess
Friday, July 27, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, आज वाचला तुमचा लेख. या ठिकाणाबद्दल नवर्‍याकडुन खुपदा ऐकले आहे पण जाण्याचा योग कधीच नाही आला. पण तुम्ही इतके सुरेख वर्णन केलय की आता एकदा तरी नक्की जाऊन येईन.

Ajai
Saturday, July 28, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh- केळव्याच्या आजुबाजुला आणि दोनचार ठिकणे आहेत ज्याना अजुन या शहरि कचर्‍याचा स्पर्श झालेला नाहिय.
मुम्बई- अह्मदाबाद हायवे वर मनोर आधी वरई फाट्यावरुन केळव्याला जाणार्‍या रस्त्यावर 'तांदुळ्वाडीचा किल्ल्ला' लागतो. वर किल्ल्यावर पाण्याचि कुंड, घळि आहेत. जंगल बर्‍यापैकि शिल्लक आहे त्यामुळे ट्रेक साठि उत्तम स्पॉट. वरुन वैतरणा नदिचा विएव खासच.
alternative route- सफाळे स्टेशनहुन तांदुळ्वाडी/ लालठाणे बस मिळते.

सफाळ्याहुन पुढे केळव्याला जाताना थोदे आडवाटेला उसरणी गाव लागते. तिथला समुद्रकिनारा अजुनही स्वच्छ आहे. तिथले ताडगोळे मस्तच.

जर मनोरवरुन केळ्व्याला जात असाल तर मधे चाहाड्याचि खिंड लागते. तिथे पावसाळ्यात छोटे छोटे धबधबे तयार होतात. विकएन्ड्ला तुरळ्क गर्दि होते
याच खींडीत वाघोबामंदीरा जवळुन वर डोन्गरावर काळ्मेघाचे मन्दीर आहे. तोही उत्तम ट्रेक आहे. काळमेघ हे आदिवासिंचे दैवत. पाऊस लांबला तर आदिवासि तिथे साकड घालायला जातात.

याच रस्त्यावर पुढे देवकोपचा बन्धारा आहे.सुन्दर जलाशय


Dineshvs
Saturday, July 28, 2007 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो अजय, हा भाग खुप सुंदर आहे खरा. जव्हार पण छान आहे. खुप वर्षांपुर्वी मी या भागात रंग बदलणारा सरडा बघितला होता.
पण आता या मार्गावर काहि रिसॉर्ट होताहेत. हायवे झाल्यापासुन गर्दीही वाढलीय.


Ajai
Saturday, July 28, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जव्हार च्या अलिकडे विक्रमगड्ला दिवेकरवाडी resort आहे त्यांचेच resort जवळच्याच सजण या गावि आहे. बहुतेक naturs trail अस काहितरी नाव आहे. ज़व्हारकडे जाताना साखरे गाव लागते त्या गावा जवळ पलुचा धबधबा आहे जवळ्जवळ ३०० फ़ुट. july , August would be best time to visit.
जव्हारला sunset point, hanumaan point राजवाडा आहेतच





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators