Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Haravalelaa

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » Haravalelaa « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 15, 200720 07-16-07  3:58 am

Daad
Monday, July 16, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्यक्रम संपल्यावर तर बरं वाटत नाहीये म्हणून निघूनही आला कुणालाच न भेटता. रंजनालाही काळजी वाटायला लागली होती. नेहमी दाद देऊन, प्रोत्साहन देत, अगदी साध्या साध्या कलाकारांनाही खुलवणारा अश्विन, एकदम गप्प गप्प होता. तिलाच guilty वाटू लागलं, उगाच खेचून नेला त्याला म्हणून.

हे सगळं डोक्यातून काढायला, दुसर्‍या दिवशी अश्विनने रजा घेतली आणि रंजनालाही घ्यायला लावली. त्याचा बॉस, रव्या त्याचाच मित्र. त्याला फोन केला तर, ' tell somone who cares . अरे, मी ही आज ऑफिसात नाहिये.'
आणि मग बायकोसह रजा घेऊन करण्यासारखी तेवीस "कामं" त्यानेच सांगायला सुरूवात केली.... आणि अश्विनने हसत हसत फोन ठेवला.
'खूप दिवसात लॉंग ड्राईव्हला गेलो नाही रे', असं रंजनाने म्हणताच त्यानेही अगदी 'आज्ञा शिरसावंद्य' म्हणून कुर्निसात केला....

मग रंजना बिट्ट्याला शाळेत सोडून्-बिडून येईपर्यंत त्याने मस्त पैकी आलं घालून चहा केला आणि मालिनीबाईंचा नटभैरव ऐकत आंघोळ उरकली. एका छोट्या बास्केटमध्ये थोडी फळं, नपकिन, पाण्याची बाटली, चिप्स सारखे स्नॅकी पदार्थ भरले. रंजनाला भोवळ येईल अशी तयारी करून होईपर्यंत मालिनीबाईंनी टप्पा सुरू केला होता. रंजना घरात आली. समोर कॉफ़ीटेबलवर जय्यत तयारीत बास्केट आणि अश्विन दोघेही बसले होते.
'अशू, काय मस्तं तयारी रे! कधी कधी तुला नं, कुठे ठेवू अन कुठे नको असं होतं', आणि तिला आपली चूक कळली लगेचच अन लाजून पळतच होती ती आत.

इतक्यात फोन वाजला आणि एका हाताने तिचं मनगट धरून ठेवत अश्विनने बघितलं. परत रव्याचाच फोन होता. 'तुझ्या तेवीस पैकी एकही अजून सुरूही केलं नाहीये...', अश्विनने सुरूवात केली. पण रव्या तिसरंच ताट वाढून तयार होता.
'अश्क्या लोचा झालाय, रे. आत्ता अनुष्का उठलीये, तिला ताप आलाय आणि रेशमाला सुट्टी घेता येत नाहीये..... अनुष्काला तुझ्याकडे ठेव म्हणत नाहीये मी.....' अश्विन ऐकतच होता...'अरे, मी सावनीबाईंना थोडं आजूबाजूचं दाखवायला घेऊन जाणार होतो... ते जरा तू करू शकशील तर...'
अश्विनची रंजनाच्या हातावरली पकड घट्ट झाली. जोरात मान हलवत त्याने, ' no way , अजिबात नाही. दुसरं काहीही सांग...' म्हटलं.
त्याचा आक्रसलेला चेहरा बघून रंजनाने फोन त्याच्या हातातून काढून घेतला जवळ जवळ.
सगळं रवीकडून समजून घेतल्यावर तर तिला अश्विनचं वागणं कळेचना. अश्विनच्या वतीने तिने 'हो' म्हणूनही टाकलं.
'अरे, नेहमी सगळ्यांना धावून मदत करणारा तू... आज झालय काय तुला? आपली आणि रवीची अनेक वर्षांची ओळख... आपल्या सगळ्या अडी-नडीला असतो तो. आज अनुष्काला बरं नाही म्हणून म्हणतोय तर... तुला काय नको ते सुचतय?
आपण जाऊ की नंतर कधीतरी. खरतर मलाही आज रजा घेणं खरच शक्य नव्हतं. तुझा कालचा मूड पाहून वाटलं घ्यावी आज. पण तू ठीक आहेस. शिवाय रवीची अडचण... आपण नको करायला? तुझ्यासारखं शास्त्रीय संगितावर मला जमणार नाही बोलायला तासन्तास, नाहीतर तुझ्या पाया पडाव्या लागल्या नसत्या' रंजन त्राग्याने म्हणाली.
'अरे, मागे त्या शिरोडकरांना नव्हतस का फिरवून आणलं? किती खूष झाले होते ते? तुला सगळे ओळखतात इथे यासाठी. पण आधी सांग, का जायचं नाहीये तुला?'

रंजनाचे नको ते प्रश्न सुरू झाल्यावर अश्विनचा नाईलाज झाला. तो उठला, तशी, 'गुणाचा माझा नवरा तो', म्हणून तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले.
'घे, ही बास्केट घेऊन जा.' म्हणून ती वळली. अश्विनने तिला समोर उभी करून नुसतीच घट्ट घट्ट मिठीत घेतली. ' ranjan, love u '.
'हो रे... हे काय आणि नवीन? yes sir, I know you love me. लिहून देऊ? आता पळ आणि मलाही जाऊदे ऑफिसला, मी उगीच कशाला रजा फुकट घालवू?.... ए, आणि मी raincheck घेतेय हं आजच्या दिवसाचा....'

क्रमश:


Daad
Monday, July 16, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फडकेंच्या घरी पोचला तेव्हा शकुंतला काकू दारातच उभ्या होत्य.
' thanks रे बाबा. आयत्यावेळी देवासारखा धाऊन आलास. तुझ्याइतकं कोण त्यांना entertain करू शकणार? तुम्ही एका क्षेत्रातली माणसं. अरे, संध्याकाळी कर्णिकांनी जेवायला बोलावलय त्यांना..... तुला आमंत्रणाची गरज नाहीये. तिकडेच परस्पर घेऊन ये.... उगीच फेरफटका पडेल नाहीतर तुला लांबचा..... अरे, बाहेरच काय उभायेस, आत ये. त्यांचं आवरलच आहे.'

नाईलाजाने अश्विन आत गेला.
'काय गायल्यात बाई काल... मारव्या नंतर सरस्वती ही जमलाच. आजकाल घराण्याच्या चिजा गात नाहीत फारसे. मध्यंतरानंतरही रंगलं की नाही रे गाणं?'
'हो, आणि त्यांना सांगितलय मी तुझ्याबद्दल..... म्हणजे आमचा आपला घरचा 'झाकिर हुसेन' रे......' काकून बोलतच होत्या स्वयंपाकघरातून.

समोरच्या बंद टीव्हीच्या काचेत त्याला सावनी मागून येताना दिसली आणि एक दीर्घ श्वास घेऊन अश्विन तिला सामोरा जायला उभा राहिला. तोपर्यंत सावनीने हात जोडले होते आणि म्हणाली, 'नमस्कार!!'

तिचं हे परक्यासारखं नमस्कार करणं बघून तो ही म्हणाला, 'नमस्कार, चला. काकू निघतो. ह्यांना कर्णिकांच्यातच सोडेन'

'येते हं. संध्याकाळी भेटू', बाहेर आलेल्या काकूंना सावनी म्हणाली.

गाडी सुरू करून गाव सोडेपर्यंत दोघेही काहीही बोलले नाहीत. आजूबाजूची हवा जड होते म्हणजे काय ते अश्विनला कळत होतं. नुसता श्वास घेणही जड झालं....
शेवटी गाव संपून तळ्याजवळचा झाडीचा परिसर चालू झाल्यावर तिनेच वळून विचारलं, 'कसा आहेस'?

तिचं हे आधी अपरिचितासारखं सामोरं येणं आणि मग आजूबाजूचं जग विरल्यावर जिव्हाळ्याच्या माणसासारखी विचारपूस...... त्याने काहीच उत्तर दिलं नाही अन कार पुढे जातच राहिली.
क्रमश:


Daad
Monday, July 16, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'थांब. गाडी थांबव. अशू, गाडी बाजूला घे, आत्ता.'
अश्विनने गाडी स्लो करत बाजूला घेऊन थांबवली. उतरून सावनी समोरच्या डोंगर्-दर्‍यांकडे पहात उभी राहिली.
'सावनी, तुला... sorry चुकलो, तुम्हाला अजून बरंच काही दाखवायचय. बघण्यासारखी बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत इथे. झालच तर....'
त्याला मधेच तोडत ती म्हणाली, 'अशू.... मला माहीतेय की, तू.....' सावनीने काहीतरी बोलायला सुरूवात करून मध्येच विचारलं, 'अलकाला भेटला होतास का रे त्यानंतर कधी?'
'त्यानंतर म्हणजे कधी? कशाच्यानंतर?', अश्विन अजूनही अडून होता.

'मला माहितीये, अशू. you... you are hurt. I shouldn't have come accross like... म्हणजे मगाशी तिर्‍हाइतासारखी. गोंधळले रे, कळेना इतक्या वर्षांनी भेटलास तेव्हा काय बोलावं.... आणि काल कार्यक्रमा नंतर भेटशील वाटलं होतं.... दिसलास पण भेटला नाहीस नंतर......
अलकाशी बोलले मी..... नंतर कधीतरी माझे पाय जमिनीला लागले तेव्हा..... अलकानेच सांगितलं how... how you felt about.... about me.... then तेव्हा' सावनी खाली मान घालून शब्द शोधत म्हणाली.

'त्यासाठी अलकाशी बोलावं लागलं तुला? मी... माझ्याकडून काहीच प्रयत्नं... मी तुला विचारलंच नाही असं म्हणायचय का तु....' अश्विनला शब्दही सुचेनात. त्याचबरोबर आपण इतके excite होऊन का बोलतोय तेही कळेना त्याला.

'नाही. ते, त्याचा अर्थ मला कळेपर्यंत तू खूप पुढे निघून गेला होतास, आपण वेगवेगळ्या वाटांवर खूप अंतर गेलो असं म्हणुया हवं तर. अशू, आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवंय ते कळेपर्यंत खूप उशीर झाला होता, माझ्यासाठी, तरी. एक कलाकार, अतिशय यशस्वी कलाकार म्हणूनच जगायचं ही माझ्या आईची इच्छा माझ्यातून पूर्णं झाली. एक कलाकार म्हणून अगदी भरून पावले..... पण' सावनीने आवंढा गिळला आणि थांबली.

अश्विनचा तोल सुटल्यासारखा झाला, 'सावनी, बोल. पण... काय? आता काही माझ्यापासून ठेवशील तर ते.... तुला.... तुझं माहीत नाही, पण मला पेलणं शक्य नाही. एकतर बोलतरी सगळं किंवा मगाचशासारखी पूर्ण तिर्‍हाईत हो, मला ते चालेल एकवेळ. तुझ्याबरोबर आजचा दिवस मी मागून घेतलेला नाही.... मला मुळीच आज....', अश्विन बोलता बोलता तटकन थांबला आणि परत अतिशय शांतपणे म्हणाला, 'हं बोल..., पण काय?'

सावनी त्याचा हा आधीचा आवेश आणि मग परत सावरल्याचा मुखवटा बघून आतून हलली. किती दुखावलाय, हा!

'.... अशू, तुला हेच समजून घ्यायचय ना, की त्या वेळी... मला तुझ्याविषयी थोडं वेगळं.... निव्वळ मैत्री पेक्षा अधिक वाटत होतं का ते?...'
'नक्कीच वाटत होतं.... but ashu ....', सावनी परत थांबली. यावेळी शांत, अपलक नजरेने अश्विन तिच्याकडे नुसतं बघत राहिला. सावनी बोलत राहिली थेट त्याच्या डोळ्यांत बघत.
' ashU, it was not enough for me, then.... I think . मी mature नव्हते, you and me , I mean आपण.. that.... that was not my focus, then . शिवाय घरून विरोध, मी तितकी स्ट्रॉंग नव्हत्ये, कारणंच शोधायची तर हीच देता येतील....... आता इतक्या वर्षांनी असंच वाटतंय की कदाचित आपल्या नशिबात नव्हतं हेच खरं कारण असेल.....' सावनीने एक निश्वास सोडला
'एक कलाकार म्हणून सगळं मिळालं.... पण बरंच काही राहिलंही..... लग्नं, घर संसार काहीच.... अरे आपल्याला नक्की काय हवंय ते कळे पर्यंत वेळ निघून गेली होती. शिवाय मला त्यावेळी जे हवं होतं, त्यात तू नुसता...', सावनीचा स्वर हलला.
'तू नुसता साथीला हवा होतास.... त्यात अश्विन हे उद्दिष्ट्य नव्हतं.... गाणं करायचं, मोठ्ठी कलाकार, यश, नाव्-लौकीक हवं होतं.... तुझी नुसतीच फरपट झाली असती... तुझं काय...' सावनी बोलतच होती पण अश्विन तिथेच थबकला आणि गुरफटला.

सावनीलाही काहीतरी वाटलं होतं, तर. आपणच वेड्यासारखे तिच्या मागे नव्हतो. कुठेतरी त्याचं दुखावलेलं 'मी'पण सुखावलं.
त्या एकाच वळणावर त्याची विचारधारा घुटमळली. त्याचा विचार तिथेच थांबल्यासारखा......, पण स्वत्: अश्विनला मात्रं सगळ्या साखळ्या तुटून तो मोकळा झाल्यासारखं वाटलं. गचपणाने घुसमटून भरलेलं आभाळसुद्धा बाजूला सारून किरणं डोकावतात, तेव्हा कसा झळाळ होतो,.... तसं झालं त्याला.

अरे, ह्याच प्रश्नाच्या उत्तरासाठीच का इतका जीव अडला होता, तडफडला होता?

काय वेड्यासारखे म्हणत राहिलो.... बढत झाली नाही आपली?
झाली. नक्कीच झाली. आयुष्याने जो राग गायला दिला, त्याचे सगळे स्वर लावले की आपण, हिंमतीने लावले. तब्येतीत आलापी केली, झटून घेतल्या बोलताना, पेचताना अन वक्री तानाही. वेळ पडली तेव्हा आड तालांतही गायलो.
आणि जो स्वर लागला नाही, तो का लावला नाही? का लागला नाही आपल्याकडून?
......तर वेड्या, तो वर्ज्यच होता..... आपल्या या आयुष्यातल्या रागाचा तो स्वरच नव्हे.
कसं नाही कळलं आपल्याला? आजवर जे ओझं घेऊन फिरलो ते निष्फ़ळ प्रेम नव्हतं तर निरुत्तर प्रश्न होता!!

ज्या प्रश्नाच्या उत्तराने आज आपला अहंकार सुखावला, फक्त.... दुसरं काही काही नाही. सावनीचाच काय पण मुळात मारवा हा आपल्या आयुष्याचा राग नाही.... षड्ज हरवलेला माणूस कोणताच राग गाऊ शकणार नाही... हे कसं कळलं नाही आपल्याला? की....,
की, हे याच स्थळ-काळाच्या छेदातच आपल्याला उमगावं हा सुद्धा दैवाचाच भाग.... सावनी म्हणतेय तसा?
तिने तिच्या आयुष्याची बंदिश गायलीये असं दिसतय आणि आपणही आपल्या.....
चुकलाच असेल कुठे एखादा ठेका, घसरली असेल एखादी स्वरांची लड, साधली नसेल एखाद्या आवर्तनाला सम, पण रागाची चौकट नाही सुटली.... मिळालेल्या साथीत सजवलीये मैफिल, आपण आपली.

तिला थांबवत अतिशय अतिशय समाधानी, जिव्हाळ्याच्या स्वरात अश्विनने विचारलं, 'सावनी.... सावनी, थांब. काही नको explain करूस. सगळं पटलय, राग कसलाच नाही. प्रश्नही नाहीत कशाही बद्दल.....'
अन सावनी त्याच्याकडे न कळून बघत असतानाच त्याने विचारलं, 'आता हे सांग, कशी आहेस?'

जवारी काढल्यावर गुणगंभीरा स्वरात झणकारू लागलेल्या तिच्या सुलक्षणी तानपुर्‍या सारखा वाटला तिला अश्विन.... स्वत्:च एक षड्ज असल्यासारखा.... झरणारा तरीही अचल, स्वत:तच पूर्ण!

समाप्त


Sanghamitra
Monday, July 16, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> ......तर वेड्या, तो व्यर्जच होता.....
वा सुरेख! दाद तुझ्या कथांची मैफिल अशीच भरात येऊ दे.
बाकी कुणाला ओवा, हिंग देण्याच्या फंदात पडू नको. :-)
लिहीत रहा.
(तेवढं एडिटिंग शक्य असेल तर ते वरच्या वाक्यात व्यर्जचं वर्ज्य करता आलं तर बघ. सुंदर वाक्य आहे म्हणून रहावलं नाही.)


Psg
Monday, July 16, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि जो स्वर लागला नाही, तो का लावला नाही? का लागला नाही आपल्याकडून?
......तर वेड्या, तो व्यर्जच होता..... आपल्या या आयुष्यातल्या रागाचा तो स्वरच नव्हे.

सही.
हे असं लिहावं तर केवळ तूच दाद! मस्त! :-)


Hems
Monday, July 16, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा ! दाद,सुंदर कथा ! कथेत वापरलेली "मारवा" रागाची उपमा तू समजावून दिल्यावर अधिक कळली .. अगदी चपखल वापर केलायस.
आणि तुझी शब्दयोजना.. त्याबद्दल तर वेगळं काही लिहायला नकोच!


Daad
Monday, July 16, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद (बाकी हा वाद आवडतो आपल्याला ;))
संघमित्रा, thanks heaps, done. ! अगदी असुंदर वाक्यालाही सुधारणा सांगत जा.


Nakul
Monday, July 16, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्तम दाद मला राग रागिण्यांमधले काही कळत नाही पण तू समजावून सांगितल्यावर जास्त भावली कथा. व. पुंच्या काही ओळी आठवल्या


Shyamli
Monday, July 16, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ाकी कुणाला ओवा, हिंग देण्याच्या फंदात पडू नको. :-)>>>सन्मी LOL ,
शलाका कथा भारून टाकत्ये ग :-)
संगितातले एकेक संदर्भ कस्सले वापरते ग तु! वा!


Bee
Monday, July 16, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message





दाद, वाह!!!

मी तुला ओवा हिंग वगैरे काही देत नाही कारण त्याची तुला गरज नाही आणि मुळात माझ्याच कडे ते कमी प्रमाणात आहे, संपल की खूप दूर जाव लागतं आणायला :-)


Zakasrao
Monday, July 16, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, एक से बढकर एक. :-)


Ajai
Monday, July 16, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यासारख्या औरन्गजेबालाही कथा आवडली.

Bee
Monday, July 16, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यासारख्या औरन्गजेबालाही >> अशी प्रतिक्रिया मी मायबोलिवर जरी पहिल्यांदा वाचली तरी ती दोन तीन वेळा बाहेर ऐकली आहे. नक्की काय अर्थ होतो ह्याचा.. माफ़ करा माझा इतिहास कमालीचा कच्चा आहे.. :-)

Zelam
Monday, July 16, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान दाद. शेवटचं रागाचं रूपक आवडलं.

Prajaktad
Monday, July 16, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे आणी मायबोलीचे सुर असेच जुळलेले राहुन आम्हाला अनेक उत्तम कथा वाचायला मिळो.. हिच इच्छा




Supermom
Monday, July 16, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, औरंगजेबाला गायन वादनाचं वावडं होतं. त्याच्या राज्यात या गोष्टींना मुळीच उत्तेजन मिळत नसे. म्हणून बहुतेक अजयनं ते वाक्य लिहिलंय.

औरंगजेबाच्या बाबतीत मी एक गोष्ट ऐकलीय. त्याच्या राज्यातले लोक त्याच्या गायन वादनाच्या तिरस्काराला कंटाळले. अन एकदा त्यांनी मुद्दामच एक अंत्ययात्रा काढली. औरंगजेबाच्या महालावरून ती जाऊ लागली, तसं त्यानं कुतुहलानं विचारलं,'कोणाची ही अंत्ययात्रा? कोणाचा मृत्यु झालाय?'
यावर लोकांनी उत्तर दिलं, 'शहेनशहा, गायनकला मरण पावली आहे. तिच्या अंत्यसंस्कारासाठी आम्ही जात आहोत.'
यावर औरंगजेबाचं उत्तर आलं,
'इतकी खोल दफ़न करा की पुन्हा वर यायलाच नको.'

अर्थात ही गोष्ट अतिशयोक्तीही असेल कदाचित.

पण दाद, आता माझ्याजवळ शब्दच नाहीत ग तुझं कौतुक करायला. एक आवर्जून सांगते. तुझ्या कथा, कविता सारंच अप्रतिम आहे. फ़क्त मायबोलीपुरतंच ते मर्यादित न ठेवता प्रकाशित कर. सार्‍यांनाच तुझ्या देखण्या भाषेत अन अपूर्व शब्दभांडारात न्हाऊ दे.
अजून काय लिहू?


Lopamudraa
Monday, July 16, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं सांग तुला काय वाटतं माझ्याबद्दल? की मीच वेड्यासारखा....'
एक क्षणभर.... किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ असेल कदाचित पण कुठेतरी तिच्या डोळ्यात त्याला तो, त्याचा षड्ज, सापडल्या सारखा वाटला. इतक्यात तिच्या आईचा आवाज आला गेटपाशी आणि हाती येत असलेली त्याची सावनी परत एकदा निसटली....>>..
काय छान लिहिलय.. मस्त आहे कथा..!!!

Anilbhai
Monday, July 16, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अणखी एक सुरेख मैफ़िल.

Ashwini
Monday, July 16, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, फारच सुरेख लिहीलं आहेस. वाचताना भान हरपून जातं आणि तुझ्या सगळ्याच कथांचा शेवटही अतिशय सुंदर असतो. लिहीत राहा.

Asami
Monday, July 16, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख , निव्वळ अप्रतिम. रागदारीचा एवह्ढा सुंदर उपयोग गाण्यापेक्षा गद्यामधे प्रथमच वाचला.

Ksha
Monday, July 16, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रंगवली आहेस कथा! व.पुंची वर्ज्य स्वराची कल्पना वापरली आहेस खरी पण फिट्ट् बसतेय अगदी त्यामुळे काहीच गैर वाटत नाही.
सर्वांत मला आवडतं ते तुझं कथेतलं सार नाजूकपणे उलगडून दाखवणं. फार कमी लोकांना जमतं ते!
सुमॉ ला अनुमोदन





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators