Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 09, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » मयुर लंकेश्वर » Archive through March 09, 2007 « Previous Next »

Moderator_10
Friday, March 09, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

proided by Vaibhav_joshi

मित्रांनो, कार्यशाळेत तयार झालेली आणखी एक सुंदर गज़ल. नाविन्यपूर्ण कल्पना असलेली ही गज़ल काही अगदी जुजबी बदल करताच निर्दोष झाली होती.

मयुर लंकेश्वर

ऋतू येत होते, ऋतू जात होते
धुमसते निखारेच श्वासात होते

मला सोसवेनात माझीच नाती
असे सोयर्‍यांचे घणाघात होते

कधी बोललो मी सुखाशी जरासा,
कधी वेचिले दुःख मौनात होते

मला आसवांची किती ओढ होती!
अनोखेच आभाळ डोळ्यात होते

कसा आंधळा मी मुशाफीर होतो
ठसे जीवनाचे स्मशानात होते


Mankya
Friday, March 09, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा ... वाटत नाही पहिला प्रयत्न ... गरूडझेपच आहे ही !
मतला ... चटकाच दिला आहेस की !
सुखाशी, मौनात ... आवडले रे खुप !
मक्ता ... जसा शेवट असावा तसाच शेवट केलायेस बघ !
( तु तर सगळेच नियम पाळलेस की, अगदि शेरांची संख्या सुद्धा ! )

माणिक !


Ganesh_kulkarni
Friday, March 09, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय मयुर
मला तर वाटतं... मयुर तुम्हीच जिंकणार ही "गज़ल कार्यशाळा!".
एका पेक्षा एक सरस असे शेर!
१) मला सोसवेनात माझीच नाती
असे सोयर्‍यांचे घणाघात होते

२) मला आसवांची किती ओढ होती!
अनोखेच आभाळ डोळ्यात होते

३) कसा आंधळा मी मुशाफीर होतो
ठसे जीवनाचे स्मशानात होते !

क्या बात है!




Nandini2911
Friday, March 09, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसा आंधळा मी मुशाफीर होतो
ठसे जीवनाचे स्मशानात होते !


ये हुई ना बात... एकदम सुंदर..


Mi_anandyatri
Friday, March 09, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर!!
मित्रा, जिंकलंस!!

अप्रतिम!
खरंच वाटत नाही ही तुझी पहिलीच गज़ल आहे! (खरं सांग, अजून वेळ गेलेली नाही ;) )..
अथ पासून इति पर्यंत आवडली मला...
जियो...!!
भावना लाख असतील, त्या तितक्याच नेमकेपणे मांडता यायला हव्यात...
ते इथे जमलंय..
प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता वाटते...
गुर्जींना हवीहवीशी गुरुदक्षिणा मिळाली असेल...


Zaad
Friday, March 09, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच सुंदर रे! खरंच हा तुझा पहिला प्रयत्न आहे असं वाटत नाही!!
सुरुवात झकास झाली, अजून गज़ल्स येऊ दे आता.....


Sarang23
Friday, March 09, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर, कल्पना छान आहेत!
पहिला प्रयत्न सशक्त आहे नक्कीच!

पण निखारे ऋतूंशी connect होत नाहीयेत...

वैभवच्या गझलेत बघ...
ऋतू येत होते ऋतू जात होते
फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते?

इथे फुलणे ऋतुशी नाते सांगते...

दुसर्‍या शेरात अगदी सरळ विचार आले आहेत... मला नाती सहन होत नाहीयेत कारण मला ते खूप त्रास देतायत... पण हाच शेर अधीक उठावदार झाला असता.

तिसरा शेर छान!
फक्त वेचिले ऐवजी पचविले टाकून लज्जत वाढेल... पचवले ने एक अनपेक्षित धक्का बसतो...

अनोखेच आभाळ डोळ्यात होते! वा खूप छान!
पहिल्या ओळीत आकाशाशी निगडीत काहीतरी वाचायला आवडले असते... पाणी आणि मेघ जमले असते पण पाणी आणि आभाळ खटकतय... पहिली ओळ बदलता आल्यास पहा.

शेवटच्या शेरात पण लज्जत वाढायला scope आहे. पहिली ओळ सुरेख आहे! खूप सहज आणि सुंदर! कसा ऐवजी असा टाकल्यास उत्तर देणारा शेर ठरतो... कसा संभ्रमाचा शेर होतो असे वाटते...
दुसरी ओळही सुंदर! दोन्ही वेगवेगळ्या ओळी छान! दोन उत्तम शेर तयार व्हायला संधी आहे...!

पुढील लेखन असेच उत्तरोत्तर सुधारत जावे ही सदिच्छा!


Jo_s
Friday, March 09, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर खरच पहीला प्रयत्न वाटत नाही. छान जमल्ये गझल
सुधीर


Mayurlankeshwar
Friday, March 09, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! मला काय बोलावे हेच मला समजत नाहीये!...
इतका कधी भारावुन गेलो नव्हतो मी आयुष्यात!

मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया वाचून मी स्वप्नात आहे की काय असा भास झाला. :-)

सारंग तुमच्या प्रतिक्रियातून बरेच काही शिकायला मिळतेय..मिळाले! :-)
सारंग तूम्ही सांगितलेले बदल समजावुन घेण्यास लगेच सुरूवात करतो. हा आमचा गृहपाठ म्हणा हवा तर!
आता वैभव ला 'आभार' असं म्हणून उगाच औपचारीकता वाढवायला नको!
सगळ्यांचेच धन्यवाद!



Sarang23
Friday, March 09, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thats the spirit! मला विश्वास आहे की तू अजून छान लिहू शकशील... मग आता गझल बीबीवर तुझ्या गझलांची वाट पहातोय... अपेक्षांमुळे आता तुझ्यावरची जबाबदारी वाढलीये!

Bee
Friday, March 09, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही सारंग सारखेच वाटते आहे. पहिल्या दोन ओळी परस्परांशी सुसंगत नाहीत. पण इतर शेर खास करुन तो आसवांचा खूप आवडला.

वैभव, मीही काल एक गझल तुझ्या मेल वर पाठवली. मिळाली असेल अशी अपेक्षा आहे.


Mankya
Friday, March 09, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, एक शंका मतल्याबद्दल ... ऋतू येत होते, ऋतू जात होते ... ह्याचा अर्थ आपण ' दिवस चालले होते ' ( ढोबळमानाने ) असाही घेऊ शकतो कि आणि Connectivity तर होईलच ना मग .... अर्थात अल्पशा ज्ञानाने हे असं वाटतय !
मार्गदर्शन करालच !

माणिक !


Mayurlankeshwar
Friday, March 09, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो माणिक मलाही तसंच वाटतंय... कोणी एक्सप्लेन केले तर 'कनेक्टीव्हीटी' चा नेमका अर्थ समजू शकेल. :-)

Shyamli
Friday, March 09, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर, छान जमली आहे गझल वेगळे विचार आहेत पुर्ण अभिनंदन :-)
निखारे ऋतूंशी connect होत नाहीयेत..>>ह्या बाबतीत सारंगला अनुमोदन, काही वेगळ हवं होतं
२,३ रा आवडला,मक्तादेखील छान आहे

Mi_anandyatri
Friday, March 09, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निखारे ऋतूंशी कनेक्ट होत नाहीयेत हे मान्य...
पण मग
"तरी तेच माधुर्य प्रेमात होते "
"मला जे हवे तेच अज्ञात होते... "
"बदलणे तुझ्याही स्वभावात होते"
"परी चांदणे तेच, स्पर्शात होते .."
या ह्याच कार्यशाळेतल्या आतापर्यंत पोस्ट झालेल्या गज़लांमधील मतल्यातील ओळी ऋतूंशी "कनेक्ट" होत आहेत असं मला तरी वाटत नाही... या सगळ्या ओळी "काळ" या अर्थाने "ऋतु"कडे पाहतात..

सारांश,
"ऋतू येत होते ऋतू जात होते" मधून कालौघ सांगायचा आहे... "कालचक्र त्याच्या गतीने फिरत होतं" इतका साधा विचार त्यात असावा असं मला वाटतं...

अशा दृष्टीने विचार केला तर
"धुमसते निखारेच श्वासात होते" यातून "काळ चालत होता पण श्वासात चीड टिकून होती" किंवा "मनात काहीतरी खदखदतच राहिलं" हे १००% "कनेक्टेड" वाटतं...

चुभूद्याघ्या.


Sarang23
Friday, March 09, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, सोप्पं आहे. नुसतेच दिवस चालले आहेत तर मग अजून बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारे सांगता आले असते... जसे की...

युगामागुनी ही युगे चालली रे... महाकवी कुसुमाग्रजांची कल्पनाशक्ती!

किंवा
आले दिवस सरत होते...
किंवा
वर्षामागून जाती वर्षे... परत महाकवी कुसुमाग्रजांची कल्पनाशक्ती!
अशी भरपूर उदाहरणे आहेत...

आता पहा वर कुसुमाग्रजांनी युगांचा उल्लेख पृथ्वीसाठी केला आहे... तिथे युगे हे सरणार्‍या दिवसांसाठी योग्य परिमाण आहे!
किंवा वर्षामागून जाती वर्षे हे उजाड माळासाठी समर्पक आहे!

इथे नुसतेच दिवस चालले आहेत म्हणायला आपण वर्षामागून वर्षे गेली असेही म्हणालो असतो तरी ठीक होते, पण इथे कवीला ऋतुंचाच का दाखला द्यावासा वाटला? फक्त दिवस येत होते आणि जात होते हे सांगण्यासाठी नाही; तर वेगवेगळ्या identities असलेले, properties असलेले दिवस येत आणि जात होते हे सांगण्यासाठी!

यालाच रसग्रहण म्हणायचं मित्रांनो. मग कवी वापरलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला लागतो! इथे लिहिणार्‍यांपैकी प्रसाद, वैभव किंवा स्वातीच्या कवितांमध्ये शब्दांचा योग्य वापर पुरेपूर आढळून येतो.. आणि मग या छोट्या छोट्या वाटणार्‍या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्याचा परिपाक म्हणजे एक सुंदर कलाविष्कार होतो.

जयश्रीच्या प्रेमकवितांमध्ये पहा हळव्या नाजूक शब्दांचा पुरेपूर वापर केलेला असतो ते त्या कवितेचं अंगभूत सौंदर्य वाढवण्यासाठीच. श्यामलीच्या छोट्या पण तीव्र धक्का देणार्‍या कवितांतही अशा शब्दांचा योग्य वापर आढळतो.
म्हणजे काय की प्रत्येक शब्दामध्ये एक अंगभूत असं सौंदर्य आहे आणि ते ओळखलं की मग कुठे कुठला शब्द टाकावा हे सवयीनेच जमायला लागतं, पण यासाठी लागतो शब्दांचा रियाज! जसा गाणार्‍याला सुरांचा!

याउलट विनोदी कवितांसाठी याचा पुर्ण व्यत्यास केलेला आढळतो... म्हणजे प्रेमाचा विषय जात्याच रुक्ष अशा engineering language मध्ये मांडणे वगैरे...

प्रसादच्या एका कवितेची थीमच म्हणे "अतिरेकी प्रेमात पडल्यावर आपले प्रेम कसे व्यक्त करतो" अशी आहे!

मला वाटतं जरा जास्तच स्पष्टीकरण झालं :-)

आनंदयात्री, वरचे स्पष्टीकरण पुरेसे असावे असे वाटते. बाकीही मतले (तुम्ही लिहीलेले) connect होतच नाहीयेत.
पण वैभवच्या गझलेतला मतला वाचा. फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते... इथे फुलावे हे ऋतूशी नाते सांगणारे शब्दयोजन त्यामुळेच आले आहे. आणि हे पाळायला जमणेच जास्त अवघड! गझलेच्या नियमांपेक्षाही!!



Chinnu
Friday, March 09, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा, गुड वन दोस्त! :-)
मला सोसवेना.. आणि कधी बोललो मी सुखाशी जरासा, खुप खुप सुंदर!
माफ करा पण चार आणि पाच मला विशेष कळले नाहीत.
आता जरा आगावुपणा करु? :-) मतल्याविषयी,
धुमसते निखारेच श्वासात होते
येणारे जाणारे ऋतू खरे तर बदलही सुचित करु शकतात. ही अशी व्यथा की, प्रत्येक जाणारा ऋतू आणि त्यामुळे घडणारे बदल हे दु:खावर मलम लावण्या ऐवजी, व्यथेची किनार अजून गडद करुन जात होते.
या ऋतुंमध्ये काळ नक्किच अभिप्रेत आहे, पण तो नुसता युगेयुगे लोटणारा काळ नाही, तर वेगवेगळे ऋतू आणुन सभोवती वातावरणात कितीतरी बदल घडवुन आणणारा अस काळ, अभिप्रेत आहे, असे वाटते. युगे युगे म्हणणे फार प्लेन झालं तर ऋतू येती, ऋतू जाती मध्ये निसर्गाचं सौंदर्य आणि काळाचा महिमा आला! दोनही संदर्भ वेगळे आणि दोन्हींचे सौंदर्य वेगळेच!
मतल्यात मांडलेला विरोधाभास हा, कि, किती ऋतू आले गेले आणि सभोवती कितीही बदल झाले तरीहि, धुमसणारे श्वास धुमसतच राहिले. सभोवतालचे बदल गजलकाराची वेदना शमवु शकले नाहीत. CBDG!


Jayavi
Friday, March 09, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर.... खूप छान रे.... पहिला प्रयत्न एकदम सही जमलाय.
मला आसवांची किती ओढ होती!
अनोखेच आभाळ डोळ्यात होते

मला सोसवेनात माझीच नाती
असे सोयर्‍यांचे घणाघात होते

हे दोन शेर सगळ्यात जास्त भिडले.

ए असं सगळ्याचं भावविश्व इतक्या वेगवेगळ्या कल्पनांमधून वाचताना खूप छान वाटतंय. रोज उत्सुकता असते.... आज कुणाची गझल असेल.त्यानं काय लिहिलं असेल.... :-)
गुरुजी....... तुस्सी सलाम :-)

Asami
Friday, March 09, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा मला वाटते ऋतू येत होते मधून सभोवतालची परिस्थिती बदलत होती , कधी अनुकूल होत होती तर कधी प्रतिकूल होत होती , वेगवेगळ्या ऋतूमधे भोवतालचे जग वेगवेगळे रुप धारण करतोय पण माझी स्थिती तीच राहतेय अशा अर्थाने मयुरच्या गझलेमधे ऋतूंचा उल्लेख चपखल बसलाय.

गज़लेच्या शेवटच्या ओळीबाबत तुझ्याशी सहमती .

ह्याला रसग्रहण म्हणता येईल का हा मात्र वादाचा मुद्दा होईल :-)


Ashwini
Friday, March 09, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर, सुरेख आहे गझल. मतला आवडला आणि 'सोसवेनात नाती' पण मस्त आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators