|
Giriraj
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:08 pm: |
| 
|
हमे तुमसे प्यार कितना… वसंताच्या आगमनाबरोबर कोवळी लुसलुशीत पानं दिसू लागतात,सृष्टीचं रुपडंच बदलून जातं. अश्याच वसंतातल्या एका सकाळी तीच पालवी थोड्या वेगळ्याच रुपात येते.कोवळी प्रेमभावना कुठून,कशी आणि अगदी नकळत मनात उमलत जाते.असं कसं हे प्रेम,नीट उमजतही नाही आणि सुटतही नाही.व्यक्त करावं म्हंटलं तर तेही नाहीच! तिच्याशिवाय काहीच दिसत नाही पण तिच्यापर्यंत पोचवताही येत नाही.कधी उन्हाचा कहर तर कधी जीवाची घालमेल करणारा उकाडा! असाच उन्हाळा येतो.असाच जीव बेचैन होत राहतो.आणि अचानकच आकाश भरून जातं,्निळशार आकाश अगदी काळंकुट्ट होऊन जातं.मग तर बेचैनी विचारूच नका! काय कारावं हेही सुचत नाही. मग गडगडाट होऊन सगळं आभाळ वाहून जातं.प्रेम मोजता येत नाहीच.पण किती प्रेम आहे तिच्यावर हे कस्ं सांगणार?आणि मग मनातलं मळभ असंच दूर होतं.... प्रेम का अस्ं मोजता येतं?मग? नाही माहीत प्रिये,किती प्रेम आहे माझं,पण एक मात्र खरंय.. तुझ्याशिवाय जगणं नाहीच असू शकत. हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारे बिना गहिऱ्या बासरीच्या स्वरांनन्तर ऐकू येतो किशोरचा जादूई स्वर!अगदी मुलायम आवाजात किशोर गायला लागतो आणि एका बेचैन आणि कोवळ्या प्रेमाची कथा उमलू लागते.किती खरंय नाही.. प्रेमाला कोणतं परिमाण लावणार?ते का असं मोजता येतं?ते असंच असतं.. अचानक कोसळणाऱ्या पावसासारखं! तेच सांगू जाणे.. तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे प्रिये! कुणी असतिल असे जे प्रेमात वर्षानुवर्ष झुरत आहेत,प्रियेची वाट पहात असतिल! पण माझ्याने हे कसं बरं सहन व्हावं. सुना गम जुदाई का उठाते है लोग जाने ज़िन्दगी कैसे बिताते है लोग दिन भी यहाँ तो लगे बरस के समान सारं आयुष्य विरहात काढणारे कुणी और असतिल.. मला तर एकेक दिवस वर्षांपेक्षाही मोठा वाटतो. प्रेमविव्हल प्रियकारचं हृदयच किशोरने आपल्या समोर उघडून दाखवलंय! य कडव्याच्या आधी येणारं संगीत तर काय वर्णावं! वायोलिनचा आर्त स्वर,गिटारीचा हृदयाचे तार अन तार हलवणारा स्वर आणि तबल्यावर निघणारे दोलायमान मनाचे तरंग.. पुढच्या शब्दांची जादू आधीच घेऊन येतात. प्रेमात मी किती वाट पाहू शकेन हे माहीत नाही मला ,पण एक मात्र निश्चित आहे हमे इंतज़ार कितना ये हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारे बिना ही तर झाली प्रियकराची स्थिति! पण तिचं काय? तिला या प्रेमाचा थांगपत्ता आहे की नाही? काहिही काय? असं कसं होईल... आर्त प्रेमाची ही हाक तिला ऐकू न यायला तिचं हृदय दगडाचच हवं.मग? काय आहे तिच्या मनात? तिचंही उत्तर आहेच की! तिचही प्रेम आहेच की.. आपले महाशय प्रेमात आज पागल झाले आहेत.. पण तिच्या मनात हा प्रेमभाव कधीच जागृत झालाय.. महाशयांना काही कळायच्या आधीच... मै तो सदासे तुम्हरी दिवानी, भूल गये सैंया प्रीत पुरानी, कदर न जानी कदर न जानी परविन सुलताना! नावंच पुरेसं आहे. एका तरल आवाजाचं मुर्तिमंत प्रतिक! त्या गातात तो मुखडा तोच आहे(गीत वेगळंच असलं तरी),पण त्यातला अंदाज़ काय वर्णावा! यातल्या ‚प्यार’ या शब्दावर जी काय करामत केलीय त्यांनी.. अहाहा! आणि ॑मगर जी नही सकते’ मधल्या ‚॑बिना’ वर तर काय कलाकुसर केलिय! त्यांनी उलगडुन दाखवलंय प्रेयसीचं मन! मै तो सदासे तुम्हरी दिवानी... तुला कधीच नाही कारे कळलं?तूच बहुदा विसरुन गेला आहेस ही जन्मांतरीची प्रीत. माझ्या प्रेमाची तुला कधी किंमतच नव्हती जणू! अहाहा! इकडे तो झुरतोय प्रेमात,कळत नाहिये कसं व्यक्त करावं हे प्रेम आणि ती तर जन्मांतरीच्या प्रेमाची साद घालते आहे. काय म्हणावं अश्या मधुर प्रेमाला? अस्ं वाटत्ं की आपणच जाऊन सांगावं की बाबांनो,का झुरताय असे विरहात? दोघेही तितकेच तर व्याकूळ आहात एकमेकांसाठी! पण ते सोडून देऊयात या गाण्यावरच... पुन्हा एकदा किशोरच्या गाण्याकडे आपोआपच माझं मन वळतं.अगदीच कोमल प्रेम ,तितकंच हळवं! मग त्यात possessiveness असणारच! त्यात गैर असं काहीच नाही.पण महाशयां्नी अगदीच सीमा गाठली आहे म्हणावं लागेल... तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल बडी मुश्किलों से फ़िर संभलता है दिल प्रेमात वाटेकरी नको हे ठिकच! पण तुला दुसऱ्या कुणी बघणंही मला जाळत जातं.काय करू मी?मनाला आवर घालूनही सावरायला वेळच लागतो.तुझ्या आठवणीतही मला वाटेकरी नकोय. तुझ्या काय काय गोष्टी लक्षात आहे म्हणून सांगू?तुझं हसणं,बोलणं,बोलतांना मध्येच तिरकी मान करून बघत राहणं आणि काय काय! वेडाच झालोय म्हण ना मी तुझ्या प्रेमात!ही बेचैनी नाही मला सांगता येणार.... क्या क्या जतन करते है तुम्हे क्या पता ये दिल बेकरार कितना ये हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारे बिना पण तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच अशक्य आहे! तिचा आवाज ऐकाव तर केवळ मीच,तिला पहावं तर फ़क्त मीच,ती फ़क्त माझीच असावी! अगदी विचारातही तिच्या प्रेमात मला वाटेकरी नकोय! हेही प्रेमाचं एक रुप! आता आपल्याला कळलंच आहे की तीही तितकीच प्रेमात आहे तर तिचीही मनःस्थिति पाहूयात की जरा... कोई जो डारे तुमपे नयनवाँ देखा न जाये मोसे सजनवाँ जले मोरा मनवा जले मोरा मनवा त्याच्या प्रेमात passion आहे तर ती थोडी अधिक मनाच्या पातळीवर दिसतेय.पण तिलाही कुठे सहन होतय त्याला कुणी पाहणं?कुणी त्याच्याशी हसून बोलत असली तरी हिचा जीव खालीवर होतो. परविन सुलताना! मी खरं तर त्यांचं version ऐकून काही वर्षं लोटली आहेत.तसं ते मी ऐकलही खूप उशीराच.आणि आश्चर्य वाटत राहिलं,अरे हे इतकं सुंदर गीत आपण पूर्वी कसं बरं नव्हतं ऐकलं?पण बरंच झालं म्हणायचं. वयाच्या टप्प्यावर थोडि ऊशीराच भेटलेली गाणी असोत की माणसं... खूपच लक्षात राहतात... आणि आवडून गेली तर विचारूच नका! त्यामुळेच आज काही वर्षांनंतरही मला त्या गाण्यातले त्यांचे शब्दनशब्द,सूर अन सूर कानात घुमाताहेत! ’जले मोरा मनवा’ यात दोनदा येतं.पहिला वरचा सूर आणि नंतरचा खाली अलगद येणारा स्वर... अहाहा! टीपेला पोचलेला झोका तितक्याच नैसर्गिकतेने,सहजतेने खाली यावा तसा भास होतो हे ऐकतांना! खरं तर ही दोन्ही व्हर्जन्स चित्रपटात वेगवेगळ्या वेळेला येतात.पण केवळ गीत म्हणून ऐकतांना मला त्यांचा परस्परांतला संबंध नेहेमीच जाणवतो. भारतिय अभिजात संगिताशी सलगी साधणारं परविन सुल्ताना यांचं व्हर्जन असो की हृदयाला भिडणारं किशोरचं व्हर्जन,त्यामागे जादुगारी एकाच माणसाची.. RD! वेडं करतो खरं तर हा माणूस.. आपण किती वेळा त्याला दाद देणार? बस्स! त्याने संगितातून घोळवून काढलेली गाणी ऐकत रहावं आणि म्हणत रहावं ’सलाम RD!’ मजरूह सुलतानपुरींनी दोन्ही गीतं शब्दबद्ध केलीय.अगदी साध्या सोप्या शब्दांत खूप काही मांडून जाणं हाच मजरूह यांच्या गीतांतला स्थायीभाव!म्हणूनच तर नूतनसाठी ’चाँद फ़िर निकला मगर तुम ना आये जला फ़िर मेरा दिल,करू क्या मै हाये’ लिहिणारे मजरूह आमिर खानसाठी ’्पापा कहते है’ लिहू शकतात आणि मनिषा - सलमानसाठी ’बाहों के दरमियाँ’ लिहू शकतात! प्रियकराची अगतिकता आणि प्रेयसीचा अनुराग,दोन्ही एकाच मुखड्याच्या गीतांत उतरवतांना किती वेगवेगळे भाव ओतले आहेत! किशोरबद्दल तर बोलावं तितक्ं थोडंच आहे! त्याच्या मर्यादांवर बोट ठेवणारेही त्याच्या तितक्याच प्रेमात असतात जितके की त्याचे die hard Fans! प्रेमाचा अनुभव घेतल्याशिवाय नाहीच लिहू शकत हे गीत,नाहीच येऊ शकत याचे स्वर तितके मनातून! आणि अशीच वेळ असेल तीही... भुरभूर पावसाची.. तिच्या प्रेमात झुरण्याची... तिने आतून ’ओ’ देण्याची आणि हुरहुर लावणाऱ्या तिच्या उत्तराची! उगाच हे गीत ऐकून मन हळवं होतं... उगाच कुणासाठी तरी झुरावसं वाटू लागतं... आणि झिरमिर पावसाच्या साथीनं म्हणावसं वाटतं... ... मगर जी नही सकते तुम्हारे बिना! (मी स्वतःला संगितातला जाणकार समजत नाही.त्यामुळे ही काही गीताची समीक्षा नाही.एका दाद द्याव्याश्या वाटणाऱ्या ,आतून आनंद देणाऱ्या गाण्यातला आनंद सगळ्यांबरोबर वाटून घ्यावासा वाटला म्हणुन हा प्रपंच!) गिरीराज
|
Sashal
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:18 pm: |
| 
|
बाहोंके दरमियाँ मध्ये सलमान आणि मनिषा आहे .. 'हमे तुमसे .. ' गाणं मात्र खरंच magical आहे ..
|
Giriraj
| |
| Thursday, June 01, 2006 - 2:24 pm: |
| 
|
सशल,दुरुस्ती केलीय! मला 'मदहोश दिल कि धडकन' आठवलं होतं तेव्हा!
|
Chinnu
| |
| Thursday, June 01, 2006 - 5:01 pm: |
| 
|
गिरी! Excellent ! तुला जे काही हवे ते तुला बक्षिस
|
वा! या छान गाण्याच्या सुरावटी मनात उमटल्या! ते खरच सोनेरी दिवस होते... गाणी पण अफलातून! पुन्हा तशी होणे नाही! आता काय नुस्त धडाम धुडुम ढुमुक ढुमुक! ताशा परवडतो त्यापुढे!
|
गिर्या,छान लिहीलयस रे... आणि तु एवढं मनापासुन लिहिलयस म्हणजे नक्कीच काहीतरी चालु आहे
|
Deemdu
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:50 pm: |
| 
|
गिरी, अगदी अगदी, पण आता एकदा नावही declare करुन टाक गड्या तिचं
|
Krishnag
| |
| Friday, June 02, 2006 - 12:49 am: |
| 
|
गिरी, झकास!! वर्षागमनातही वसंत फुलला!! पहिल्या पावसाच्या सरीनं गिरीही बहरला!!
|
Abhi_
| |
| Friday, June 02, 2006 - 1:53 am: |
| 
|
गिरी मस्तच लिहिलयस रे!! मला किशोरदा आणि परवीनजी या दोघांनीही गायलेलं आवडतं. पण परवीनजींच थोडं जास्तच आवडतं. बक्षी साहेबांचे उत्कट शब्द, पंचमदांनी भैरवीवर बांधलेली सुरावट आणि परवीनजींचा आवाज म्हणजे त्रिवेणी संगमच!! १९८१ मध्ये परवीनजींना या गाण्यासाठी National Award मिळाले होते
|
गिरी ... मस्त लिहीलंयस रे ... किशोर फेवरिट असूनही ह्या एका गाण्याच्या बाबतीत परवीन सुलताना ... ANY DAY ...
|
Cool
| |
| Friday, June 02, 2006 - 2:54 am: |
| 
|
गिरी... पावसाळा जोरात आहे म्हणायचा यंदा... खुपच छान लिहिलय.. आणि हो उगाच कुणासाठी तरी झुरावसं वाटू लागतं कुणासाठी?????
|
Champak
| |
| Friday, June 02, 2006 - 5:10 am: |
| 
|
Giri...... खुपच छान लिहिलय..
|
गिर्या नेहेमीप्रमाणेच सुंदर लिहीले आहेस. किशोरचे हे गाणे खरच आतमधे शिरते. परवीन सुलताना जास्त भावते हे मात्र खरं. असो. आता नेमेची येतो पावसाळा असे म्हणून यंदाचा पावसाळा वाया घालवू नकोस. 
|
Dineshvs
| |
| Friday, June 02, 2006 - 1:40 pm: |
| 
|
छान गिर्या, काल रात्रीची धमकि मनावर घेतलीस तर. मला बेगमसाहिबांचे गाणे जास्त आवडते. त्याना आर्डीने पुर्ण मुभा दिली होती. त्या पुरेश्या अभिमानाने म्हणाल्या, मी गाणार आहे म्हणजे जरा कलाकुसर करणारच. अर्थात हि कलाकुसर कुठेहि या गाण्याच्या भावनेला मारक ठरत नाही. त्यानीच गायलेली, बिसरत जाये मोसे कान्हा, आणि देव पुजी पुजी, गाणी ऐकलीस का, सिनेमातलीच आहेत, पण सिनेमांची नावे आठवत नाहीत. बाकि तुझ्यावर झालेले आरोप मला साफ नामंजुर आहेत. प्रेम काय, कुणावरहि करावे, या मताचा आहेस तु.
|
Giriraj
| |
| Saturday, June 03, 2006 - 2:16 am: |
| 
|
धन्यवाद,मित्रहो! आणि तुम्ही म्हणताय ते खरंच आहे... मी प्रेमात पडलोय पण या गाण्याच्याच! (आधी गीताच्या लिहिणार होतो.. पण घाबरलो... ) मामा,तुम्ही बरोब्बर ओळखले! ही गाणीच अशी आहेत की ऐकताच क्षणी प्रेम जडते...
|
Itsme
| |
| Saturday, June 03, 2006 - 9:09 am: |
| 
|
girI surekha ..... (' barech kaahI 'lihINyaachaa moha aawarate aaNi ewhaDe donach shabda lihite )
|
Moodi
| |
| Saturday, June 03, 2006 - 10:52 am: |
| 
|
गिरी अतिशय सुंदर अन रसाळ वर्णन. 
|
Ashwini
| |
| Saturday, June 03, 2006 - 2:14 pm: |
| 
|
गिरी, सुरेख लिहीलं आहेस. पण गीताच्या ऐवजी नीता लिहायचं होतं का? आठवतय का ' तुझी नीता ' ?
|
Shyamli
| |
| Saturday, June 03, 2006 - 3:16 pm: |
| 
|
मला अमिन सायानी आणि ते करायचे ते गाण्यांच वर्णन आठवल... सुरेखच....
|
छान... ... .. .. .. .. ... ..
|
|
|