Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through March 15, 2006 « Previous Next »

Ninavi
Monday, March 13, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, खरंच की.
मलयेभिल्ल पुरंध्री चंदनतरुकाष्ठमिंधमं कुरु ते..

प्रसाद, चूक छान आहे.
निरंजन, ' का उडून जाते शाई, राहते कवीचे रक्त...' सुरेख.

करपे, स्वप्न मस्त. आधी पाल वगैरे वाचून दचकले एकदम, पण खरंच तसंच होतं. आता ही प्रतिमा डोक्यातून जाणार नाही.


Pkarandikar50
Monday, March 13, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळी सावली

घासून-पुसून लख्ख केलेत तुमचे सगळे दिवे,
जळकी चिरगुटे झटकलीत माझ्या आन्गणात.
काजळ-राशी उन्मत्त, जेंव्हा आढ्याकडे धावल्या,
तीच तर झाली पुढे, आणि आकान्ताने झगडली?
कधी काळी निथळले, माझ्याही अन्गातून विखार,
रन्ध्रा-रन्ध्रातून व्यायली पिवळ्या सापान्ची पिल्ले.
तेंव्हाही तीनेच नाही का, आपला पदर कसला,
कवटाळले, टिपले, पचवले ते कुट्ट अन्गार?
माहीत असूनही बाबांनो, चान्गले तुम्हाला सारे,
खुशाल विचारता, माझी सावली काळी का बरे?

बापू





Pkarandikar50
Monday, March 13, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sanghamitraa
मी शंभर टक्के सहमत आहे. शास्त्र सुद्धा स्थिर, अचल नसते.

फलंदाजी करताना आडवी बॅट वापरू नये, असे शास्त्र एकेकाळी होते. ब्रॅडमनने ते धाब्यावर बसवले.त्यातून पुल नावाच्या फटक्याचे नवे शास्त्र जन्माला आले. आता तोच फटका शास्त्रशुद्ध मानला जातो.
यमन गाताना फक्त तीव्र मध्यम लागतो. कोणी श्रेष्ठ गायक कोमल मध्यम पण घेऊ लागले. ते अशास्त्रीय मानले गेले. पण कोमल मध्यमाच्या प्रयोगामुळे रन्गत वाढते,यमनच्या गम्भीर छटा थोड्या कमी गडद होतत, हे लक्षात आल्यावर तो प्रकार रुळू लागला. त्यालाच पुढे यमन-कल्याण असे नाव पडले. नवा राग जन्माला आला.
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने योग्य वेळी, योग्य कारणासाठी, तारतम्य राखून तन्त्रापासून किँवा आखून दिलेल्या चाकोरीपासून थोडी सुटका करून घेतली तर त्यातून रस-निष्पत्ति आणि सौन्दर्य-निर्मिती होते ना ते पहावे, उगाच अशास्त्रीय म्हणून छाती पिटून घेत सुटू नये, असेच मला वाटते. शेवटी, तन्त्र हे कलेसाठी असते, कला तन्त्रासाठी नसते, हे विसरून चालणार नाही.

Niranjan, खूप दिवस वाट पहायला लावल्यासारखी छान कविता टाकलीत. थोडी लाम्बी कमी केली असती, तर पुनरावृत्तीचा भास होणे, टळले असते. तरीही एक श्रेष्ठ रचना, हे निश्चित.
बापू


Ajjuka
Monday, March 13, 2006 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलू पहाणार्‍या ओठांना
लिपस्टिक लावून
एक हसू फेकलं
काहींनी हसूच घेतलं
काहींना लिपस्टिकचा रंग दिसला

तुला दिसले का रे..
लिपस्टिकखालचे गुदमरले ओठ?


Vaibhav_joshi
Monday, March 13, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !!!! सारंग , प्रसाद , निरंजन , कर्पे , बापू .... दोन दिवसांत धिंगाणा झालाय अगदी ...
सुमतीताई .... खरंय ... कसं जमायचं ...

देवदत्ता ... सोडले मी ची थीम भारी आहे पण somehow मांडणी ज्या पध्दतीने झालिय त्यावरून impact येत नाहिये.

कर्पे ... जगूया थोडे पेक्षा अर्थातच स्वप्न छान .. हे बहुधा तुम्ही पण मान्य कराल .. तुमच्या कविता hard hitting च असायला हव्यात ... कर्पे म्हणजे जळजळीत सत्य असं माझ्या डोक्यात फिट्ट बसलंय

सारंगा . जो नको होता अबोला वा ! मस्तच .... पुरंध्री मलाही योग्य वाटतो शब्द आणि सजा घडू लागली असं वापरलं जातं हे खरंय

प्रसाद .... चूक छान आहे

निरंजन ... मस्त ... फक्त सतेज आकंक्षाचा भांग आणि रांग ह्यांची सांगड घलू शकलो नाही ... पण ते ठीक आहे ... u will have a concept behind that , i am sure

बापू .. बरयाच दिवसांनी लेकरांवर सावली धरलीत , येत चला दिवसातून एकदा तरी !!!


Ajjuka
Monday, March 13, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया... परत एकदा मस्त...
प्रसाद मोकाशी.. छान आहे कविता पण सुरूवातीला मोठ्या अपेक्षा निर्माण केल्यास तू आणि शेवटात खूपच सोप्पे केलेस असे वाटले. स्पष्टतेबद्दल क्षमस्व!


Vaibhav_joshi
Monday, March 13, 2006 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रास्त ...

मैफल तशी नित्याची आहे
ठराविक चिजा .. ठरलेल्या जागा ...
लक्ष नसतानाही सरावाने गळा मुरकी घेतो
अन समेवर येवून थांबतो .. सवयीने ...
तानपुर्‍याला गवसणी घालताना मात्रं जाणवतं ...
आज आपल्या अंगावर शहारा आला नाही
मग एकांतात .. एकेक स्वर प्रेमाने कुरुवाळत ...
जेव्हा तीच चीज .. तीच जागा भेटते नव्याने
असं वाटतं जीव जाईल अतीव समाधानाने ..
मनाला हे पटून गेलंय ...
आयुष्यात हेच संचित जास्त असतं
सजीवांपेक्षा ....
निर्जीव गोष्टींवर प्रेम करणंच रास्त असतं


Sumati_wankhede
Tuesday, March 14, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी घुसमट....
माझी तडफड.....
माझ्या देहाची थरथर...
अन आतवर पसरलेला पाझर.......
तुला जाणवत नाही का रे........

ह्या मधल्या वाटेला 'डोळे' असते तर....
किती बरं झालं असतं.

अन 'हात'ही असते तर...
अवघ्या आयुष्याचंच सोनं झालं असतं.


Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक प्रश्ण

समेवर म्हणजे काय?
seriously मला मराठीत कळले नाही


Himscool
Tuesday, March 14, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'समेवर येणे' म्हणजे 'एखादी वेळ बरोबर गाठणे'
आणि तांत्रिक दृष्ट्या शास्त्रीय संगीतात गायक जेव्हा एखादी हरकत घेऊन बरोबर पहिली मात्रा दाखवतो त्याला समेवर येणे म्हणतात.


Pkarandikar50
Tuesday, March 14, 2006 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निगरगट्ट सावली

विस्मरणाच्या खाईत विसर्जित केलेली,
एकेका आठवणीची एकेक लोचट सावली.

दूर लोटली,बळेच ढकलली, हाकलली.
तरी तिची निगरगट्ट सवय नाही सुटली.

एखाद्या कोपर्‍यावर परिचित,
ऊपटतेच अनाहूत अवचित.

एखाद्या गाफिल वळणावर
बसते, दबा धरून,श्वास रोखून.

आणि गोचिडासारखी चिकटतेच
पुन:पुन्हा येऊन.

शेवटी सावलीच ती, तिचे काय चुकले?
प्रसन्गावधान तीला कधी कुणी शिकवले?

रोमान्च किम्वा हुरहूर, तीला काय माहीत?
कसे व्हावे तीने तरी, व्याकूळ किम्वा पुलकीत?

बापू.



Ninavi
Tuesday, March 14, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते आणि ती

ते पडवीत करत असतात चर्चा
जगातल्या उपाशी पोटांची
अगदी पोटतिडीकीने
सुपारी कातरता कातरता

तेव्हा ती
बाळ रडायला लागलं म्हणून
भरल्या पानावरून उठून
हात धुवून मुकाट्याने पाजायला घेते त्याला
आणि मधेच
त्यांच्या चहाची वेळ झाली की काय
म्हणून दचकून घड्याळात बघते..


Ameyadeshpande
Tuesday, March 14, 2006 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समेवर सुबक ठेंगणी - courtesy म्हैस

Ameyadeshpande
Tuesday, March 14, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीव जाईल अतीव समाधानाने... - वैभव!!!



Ninavi
Tuesday, March 14, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, तू मांडलेला अनुभव नित्याचाच, आणि ( नित्याप्रमाणेच) सुरेख शब्दबद्ध केलायस.
पण निष्कर्ष मला पटला नाही.
अर्थात, कविता.. सुंदरच.


Ameyadeshpande
Tuesday, March 14, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी माझं थोडसं हेच मत आहे... असं comparison नाही होऊ शकात, दोन्ही गोष्टी आपापल्या जागी असतात...

Vaibhav_joshi
Wednesday, March 15, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी , अमेय , धन्यवाद ...
निनावी ... ते आणि ती सुंदर आहे



Zaad
Wednesday, March 15, 2006 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(या 'कविते'त मी वृत्ताच्या चिंध्या केल्या आहेत याची नम्र जाणीव ठेवून..)

तू जाताना डोळे भरुन एकदा नुसते...
सहजच मागे वळून पाहिले असते...
तू निघालीस मला सोडून सखये जशी
जरा माझ्यातल्या तुलाही तोडले असते...
जाताना जी दिली कुठल्या प्रश्नांची
तुझ्या परतण्याचे प्रश्नही दिले असते...
पावसाला काय सांगायचे ते पाहीन मी
तू डोळ्यांत पाणी असे आवरले नसते...
तू गेल्यावरही सुखाने जगलॊ असतॊ
सोबत दोघांचेही तू दु:ख नेले नसते...


Shyamli
Wednesday, March 15, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>>>>>>सजीवांपेक्षा ....
निर्जीव गोष्टींवर प्रेम करणंच रास्त असतं
खरय रे वैभव.. .. ..
निनावी बापु....
आणि झाड......ऽहो भावनेला महत्व....
आम्हाला त्यासाठीसुधा शब्द सापडत नाहित हो....


Ajjuka
Wednesday, March 15, 2006 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रिएटिविटीच्या भुता,
तुला कोटी कोटी प्रणाम.
अचानक गायब होऊन
आमची मारून ठेवणार्‍या
तुझ्या कुत्रेपणाला काय म्हणावे!!!

का मेल्या तू अस्तित्वातच नाहीस?
तसं खरतर बिश्वासही नाही माझा
भुताखेतांवर, आत्म्यंआवर
त्यामुळे बहुतेक मला आत्मा नाही
आणि क्रिएटिविटीचे भूत सुद्धा. . . . .


Bee
Wednesday, March 15, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, काय झाले एकाएकी :-) कवितेचे वळण बदलले.

Mmkarpe
Wednesday, March 15, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि,.. वैभव... धन्यवाद.


फुटपाथ..

ध्येय दुर्लभ भासतेय
जिद्द हवी आहे
मुंग्यांचे वारुळ पहा

परिस्थिती प्रतिकुल आहे
हिंमत हवी आहे
तुळशीपुढे तेवणारी वात पहा

संकटे समोर उभी आहेत
धैर्य हवे आहे
महापुरात तग धरुन राहिलेला लव्हाळा पहा

जगण्याचे ओझे वाढत आहे
साथ हवी आहे
एकटा वटवृक्ष पहा

आणि काही नसेलच यातलं आजुबाजुला
तर रस्त्यावर फिरायला ये
फुटपाथवरचे जीवन पहा.


Moodi
Wednesday, March 15, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा! कर्पे अतिशय सुरेख, दुर्दम्य आशावाद.

Ameyadeshpande
Wednesday, March 15, 2006 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



माझा मुंबईवरचा पहिला वहिला flight experience तोही संध्याकाळच्या वेळी.

Sanghamitra
Wednesday, March 15, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू दोन्ही सावल्या छान.
अज्जुका लिपस्टिक आवडली. आणि क्रिएटीविटी तर अगदी अगदी.
वैभव, सुमती, करपे सही.
निनावी तूही मुक्तछंदात उतरलीस :-)
झाड तुझी कविता खूप आवडली.
अमेय मुंबई इतकीच लखलखती कविता.
एकूणच गुलमोहोर बहरतोय. बाहेरचा अन् इथलाही.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators